पंचीकरणादी अभंग - १ ते ५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  



ओवीचे आरंभी वंदू विनायक । बुद्धिदाता एक लोकांमध्यें ॥१॥
लोकांमध्यें बुद्धीवीण कामा नये । बुद्धीचा उपाये सर्वत्रांसी ॥२॥
सर्वत्रांसी बुद्धी देतो गणनाथ । करितो सनाथ अनाथासी ॥३॥
अनाथा नाथाचा नाथ केला जनीं । तो हा धरा ध्यानीं लंबोदर ॥४॥
लंबोदर विद्यावैभवें पुरता । दास म्हणे माता सरस्वती ॥५॥


नमूं योगेश्वरी शारदा सुंदरी । श्रोता प्रश्न करीं वक्तयासी ॥१॥
वक्तयासी पुसे जीव हा कवण । शिवाचें लक्षण सांगा मज ॥२॥
सांगा मज आत्मा कैंचा परमात्मा । बोलिजे अनात्मा तो कवण ॥३॥
कवण प्रपंच कोणें केला संच । मागुता विसंच कोण करी ॥४॥
कोण तें अविद्या सांगिजोजी विद्या । कैसें आहे आद्यस्वरूप तें ॥५॥
स्वरूप ते माया कैसी मूळमाया । ईसी चालावया कोण आहे ॥६॥
आहे कैसें शून्य कोण तें चैतन्य । समाधान अनन्य तें कवण ॥७॥
कवण जाणता कवणाची सत्ता । मोक्ष हा तत्वता कोण सांगा ॥८॥
सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण । पंचवीस प्रश्न दासें केले ॥९॥


नमूं वेदमाता नमूं त्या अनंता । प्रश्न सांगों आतां श्रोतयाचे ॥१॥
श्रोतयाचे प्रश्न जीव हा अज्ञान । जया सर्व ज्ञान तोचि शिव ॥२॥
शिवापर आत्मा त्यापर परमात्म । बोलिजे अनात्मा अनिर्वाच्य ॥३॥
वाच्य हा प्रपंच माई जाणावा । घडामोडी देवापासुनीयां ॥४॥
विषय अविद्या त्यागावी ते विद्या । निर्विकल्प आद्या तेचि रूप ॥५॥
कल्पना हे माया सत्व मूळमाया । इसी चाळावया चैतन्यचि ॥६॥
नकार तें शून्य व्यापक चैतन्य । ईश्वर अनन्य समाधान ॥७॥
जीव हा जन्मला जीवा मृत्यु आला । बद्ध मुक्त जाला तोहि जीव ॥८॥
ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता । मोक्ष हा तत्वता ईश्वरची ॥९॥
ईश्वर निर्गुण ईश्वर सगुण । हेचि ब्रह्मखूण दास म्हणे ॥१०॥


सत्य राम एक सर्वहि माईक । जाणावा विवेक योगियांचा ॥१॥
योगियांचा देव तया नाहिं खेव । जेथें जीवशिव ऐक्यरूप ॥२॥
ऐक्यरूप जेथें हें पिंडब्रह्माडं । तें ब्रह्म अखंड निराकार ॥३॥
निराकार ब्रह्म बोलताती श्रुती । आदि मध्य अंतीं सारिखेंची ॥४॥
सारिखेंची ब्रह्म नभाचीये परी । बाह्य अभ्यंतरी कोंदाटले ॥५॥
कोदाटलें परी पाहतां दिसेना । साधुविण येना अनुभावा ॥६॥
अनुभवा येतां तें ब्रह्म निश्चळ । जाय तळमळ संसाराची ॥७॥
संसाराचें दुःख सर्वहि विसरे । जरी मन भरे स्वस्वरूप ॥८॥
स्वस्वरूपीं नाहीं सुख आणि दुःख । धन्य हा विवेक जयापाशीं ॥९॥
जयापाशीं ज्ञन पूर्व समाधान । त्याची आठवण दास करी ॥१०॥


मन हें विवेकें विशाळ करावें । मग आठवावें परब्रह्म ॥१॥
जयापाशीं ज्ञान पूर्व समाधान । त्याची आठवण गळे अहंकार ॥२॥
अहंकार गळे संतांचे संगतीं । मग आदि अंतीं समाधान ॥३॥
समाधान घडे स्वरूपीं राहतां । विवेक पाहतां निःसंगाचा ॥४॥
निःसंगाचा संग दृढ तो धरावा । संसार तरावा दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP