विशेषोक्ति अलंकार - लक्षण ३

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


‘जो उदय पावला नसतां जग दिसतें व जो उदय पावला असतां जग दिसेनासें होतें, त्या अपूर्व ज्ञानरूपी सूर्याला नमस्कार असो.’
ह्या ठिकाणीं, ज्ञानरूपी सूर्याचा उदय झाला नसता जग दिसतें व उदय झाला असता जग दिसेनासें होतें, असें वर्णन असतांही, विभावना आणि विशेषोक्ति हे दोन अलंकार येथें होत नाहींत; कारण ह्या ठिकाणीं खर्‍या सूर्याचें वर्णन केलेलें नाहीं. तसें केलें असतें तर, विभावना व विशेषोक्ति हे दोन अलंकार (आळीपाळीनें) झाले असते. बरें, खर्‍या सुर्याचा येथें उदय असता तर ही कवीची उक्ति संभवलीच नसती. पण ब्रम्हा व आत्मा यांच्या ऐक्याचें जें ज्ञान हाच कोणी एक सूर्य, त्याच्या उदयाचें हें वर्णन आहे. अशा या बोधरूपी सूर्याच्या उदयाचें, जग न दिसणें हेंच कार्य; जग दिसणें हें कार्य नव्हें. जाग दिसणें हें जर कार्य असेल तर, वरील खर्‍या सूर्योदयाच्या वर्णनाप्रमाणें हे वर्णनही असंभवित होऊ लागेल. (कारण ब्रम्हात्मैक्याचा बोध झाला असतां, जग दिसतें हें म्हणणें संभवतच नाहीं) म्हणूनच ताद्रूप्यरूपकानें युक्त अशा या पद्यांत व्यतिरेक अलंकाराचा स्पष्ट प्रादुर्भाव मानणेंच जुळते.
ज्या ठिकाणीं आपल्या प्रतियोगिता या असाधारण धर्मानें (विशेष संबंधानें) विशिष्ट अशा रूपानें कारण व कार्य यांचा अभाव शब्दानें स्पष्ट सांगितला असेल त्याच ठिकाणीं, अनुक्रमें विभावना व विशेषोक्ति शाब्द असतात.
उदाहरण :---
‘भगवंताच्या वदनकमलाला रात्रंदिवस पाहत असूनही, गोपीच्या डोळ्याची तहान अधिकच वाढली.’

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP