नृसिंहाख्यान - अध्याय १० वा

' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.


नारद म्हणाला, - हे धर्मराजा, वर मागण्यासंबंधाचें भगवंताचे ते भाषण भक्तियोगाला विघ्नकारक आहे असें मानणारा तो प्रल्हाद बालक आश्चर्य प्रदर्शित करीत भगवंताला उत्तर देऊं लागला ॥१॥

प्रल्हाद म्हणाला, - हे परमेश्वरा, स्वभावतः च विषयांच्या ठिकाणी आसक्त असलेल्या मला, असल्या वराच्या अमिषानें लोभवूं नकोस. कारण विषयांच्या संगाची भीति वाटल्यामुळेंच त्यांपासून विरक्त होऊन मोक्षप्राप्ति होण्याच्या इच्छेनें तुला मी शरण आलों आहे ॥२॥

हे प्रभो, हदयाच्या गांठीप्रमाणें बंधास कारण होणारे व संसाराला बीजभूत असे जे विषय, त्याविषयीं जी तूं प्रेरणा केलीस, ती केवळ माझी कसोटी पहाण्याकरितां केली आहेस ॥३॥

नाहींपेक्षां, हे जगद्गुरो, कृपाळू अशा तुला अनर्थसाधनामध्यें आपल्या भक्ताला प्रवृत्त करणें शक्यच नाही. हे ईश्वरा, तुझ्यापासून जो भक्त विषयप्राप्तीची इच्छा करतो तो भक्तच नव्हे, तर केवळ व्यापारी होय ॥४॥

जो सेवक स्वामीपासून आपले मनोरथ पूर्ण करण्याची इच्छा करितो तो सेवकच नव्हे, व जो स्वामी सेवकापासून स्वकार्य साधण्याच्या इच्छेनें त्याला द्रव्य देतो, तो स्वामीहि नव्हे; तर ते परस्पर व्यापारी समजले पाहिजेत ॥५॥

तुझ्यामध्यें असलेला स्वामिसेवकभाव मात्र वास्तविक आहे; परंतु मी तर तुझा निष्काम भक्त आहे व तूंहि माझा निरपेक्ष स्वामी आहेस. ह्यामुळें जसा राजा आणि सेवक ह्यांच्यामध्ये कारणपरत्वें स्वामिभृत्यभाव असतो तसा आपल्यांमध्ये नाही ॥६॥

तथापि हे वरदश्रेष्ठा परमेश्वरा, तूं जर मला इष्ट वर देत असलास, तर माझ्या हदयामध्यें वासनांचा अंकुरच उत्पन्न होऊं नये, असा मी तुजपासून वर मागतो. ॥७॥

हे कमलनयना, कामांकुराच्या उत्पत्तीमुळें, इंद्रियें, मन, प्राण, देह, धर्म, धैर्य, सारासार विवेक, लज्जा, ऐश्वर्य, प्रताप, स्मृति आणि सत्य ही सर्व नाहींशीं होतात. ॥८॥

हे पुंडरीकाक्षा, जेव्हां पुरुष, मनामध्यें असलेल्या सर्व कामवासनांचा त्याग करितो तेव्हांच तुझ्यासारखें ऐश्वर्य मिळविण्यास तो योग्य होतो ॥९॥

हे भगवंता, हे महात्म्या पुराणपुरुषा, हे श्रीहरे, हे अद्भुत नृसिंहरुप धारण करणार्‍या ब्रह्मस्वरुप परमात्म्या, तुला नमस्कार असो ॥१०॥

श्रीनृसिंह म्हणाला, - हे प्रल्हादा, तुझ्यासारिखे जे माझे एकनिष्ठ भक्त आहेत ते कधींहि इहलोकसंबंधी अथवा परलोकसंबंधीं विषय मजपासून प्राप्त होण्याची इच्छा करीत नाहीत. तथापि हें मन्वंतर संपेपर्यंत तूं दैत्यांचा राजा होऊन ह्या भूलोकीं विषयांचा उपभोग घे ॥११॥

तसेंच माझ्या आवडत्या कथा श्रवण करीत, सर्व भूतांमध्यें रहाणार्‍या एकटया मज यज्ञाधिष्ठात्या परमेश्वराला मनामध्यें धारण करुन तूं माझें आराधन कर, आणि सर्व कर्मे मला अर्पण करुन त्यांच्या बंधापासून मुक्त हो ॥१२॥

सुखानुभवानें पुण्याचा, सदाचरणानें पातकाचा आणि कालवेगानें देहाचा त्याग करुन, देवलोकीहि गायन करण्यास योग्य अशी अत्यंत पवित्र कीर्ति इहलोकी संपादन करुन तूं कर्मबंधनापासून मुक्त होशील व शेवटी मजप्रत प्राप्त होशील ॥१३॥

तुझें व माझें स्मरण करीत जो पुरुष, तूं गाईलेल्य माझ्या स्तोत्राचें पठण करील तोहि कर्मबंधनापासून मुक्त होईल ॥१४॥

प्रल्हाद म्हणाला - हे महेश्वरा, वर देणार्‍या ब्रह्मादिकांचा तूं अधिपति आहेस तरी तुजपासून दुसरे असें एक मागणेंख मागतों कीं, क्रोधानें अंतः करण व्याप्त झाल्यामुळें ईश्वरी तेज न जाणणार्‍या माझ्या पित्यानें, ‘ हा माझ्या भ्रात्याचा घात करणारा आहे ’ अशा असत्य दृष्टीनें, साक्षांत तुज त्रैलोक्याधिपति सर्वलोकगुरुची निंदा केली, व मी जो तुझा भक्त त्याशी द्रोह केला, त्या मोठ्या व दुर्धर पातकापासून तो माझा पिता मुक्त होवो. हे दीनवत्सला, तूं कटाक्षदृष्टीनें त्याच्याकडे पाहिलेंस तेव्हांच वस्तुतः तो पवित्र झाला आहे ॥१५॥॥१६॥॥१७॥

श्रीभगवान् म्हणाले, - हे निष्पापा, तुझा पिता आपल्या एकवीस पूर्वजांसह पवित्र झाला आहे. कारण, हे साधो, ह्याच्या घरी कुलपवित्र करणारा असा तूं उत्पन्न झालास ॥१८॥

हे प्रल्हादा, जेथेंजेथें अत्यंत शांत, समदर्शी, परोपकारी आणि सदाचारसंपन्न असे माझे भक्त असतात, ते कीकट देशासारखे अत्यंत अपवित्र असलेले देशहि पवित्र होतात ॥१९॥

हे दैत्यश्रेष्ठा, माझ्या भक्तीनें निरिच्छ झालेले जे लोक आहेत, ते कामक्रोधादिकांमुळें जरी कदाचित् परतंत्र झाले, तथापि ते लहानथोर प्राण्यापैकी कोणाचीहि हिंसा करीत नाहीत ॥२०॥

या लोकी जे पुरुष तुला अनुसरुन वागतील, ते सुद्धां माझे भक्त होतील; तूं तर खरोखर माझ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ आहेस ॥२१॥

हे प्रल्हादा, माझ्या शरीराचा स्पर्श झाल्यामुळें सर्वप्रकारें पवित्र झालेल्या आपल्या पित्याची केवळ शास्त्रमर्यादारक्षणार्थ तुं और्ध्वदेहादिक कार्ये कर; म्हणजे तुज सत्पुत्राच्या योगानें तो उत्तम लोकास जाईल ॥२२॥

आणि बा प्रर्‍हादा, ब्रह्मवेत्याच्या वचनाला अनुसरुन तूं पित्याच्या स्थानावर आरुढ हो, आणि माझ्या ठिकाणी मन लावून व मजवर निष्ठा ठेवून सर्व कर्मे आचरण कर ॥२३॥

नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें भगवंतानें आज्ञा केल्याप्रमाणें प्रल्हादानें पित्याचें योग्य ते और्ध्वदेहिक कृत्य केलें, आणि नंतर द्विजश्रेष्ठांनी त्याला राज्याभिषेक केल्यावर तो प्रल्हाद भगवत्पर होऊन सर्व कर्मे करुं लागला ॥२४॥

नंतर प्रसन्नतेमुळें सौम्यवदन झालेल्या त्या नृसिंहरुप श्रीहरिला पाहून देवादिकांसहित ब्रह्मदेव पवित्र शब्दांनी त्याची स्तुति करुं लागला ॥२५॥

ब्रह्मदेव म्हणाला, - हे देवाधिदेवा, हे सर्वांतर्यामी परमात्म्या, तूं प्रजापतीचाहि पूर्वज आहेस. लोकांना त्रास देणारा हा पापी असुर तूं मारिलास, ही फार चांगली गोष्ट झाली ॥२६॥

हा दैत्य, माझ्यापासून वर प्राप्त झाल्यामुळे मी उत्पन्न केलेल्या देवमनुष्यादिकांपासून मृत्यु पावण्यास अशक्य झाला होता; व तप आणि योग यांच्या बलानें गर्विष्ठ होऊन त्यानें वेदप्रणीत सर्व धर्म नाहींसे करुन टाकिले होते; यास्तव त्याला तूं मारलेस ही फार चांगली गोष्ट झाली ॥२७॥

त्याप्रमाणें बालक असूनहि सदाचरणसंपन्न व महामगवद्भक्त असा त्याचा पुत्र जो प्रल्हाद त्याला तूं मृत्यूपासुन सोडविलेंस व तो तुला शरण आला, हेंहि फार चांगले झाले ॥२८॥

हे भगवन्, तुझें हे स्वरुप, मनोनिग्रहपूर्वक तुझें ध्यान करणार्‍या पुरुषाला सर्व भीतीपासून किंबहुना वध करण्याची इच्छा करण्यार्‍या मृत्यूपासूनहि रक्षण करणारें आहे ॥२९॥

नृसिंह म्हणाला, - हे ब्रह्मदेवा, आजपासून अशाप्रकारच्या वर करस्वभावाच्या असुरांना तूं कधींहि देऊं नकोस. कारण, सर्पांना दूध पाजिलें असतां तें जसें सज्जनांना उपद्रव करितें, तसेंच स्वभावतः निर्दय, अविचारी, अशा असुरांना दिलेला वरहि लोकांना उपद्रव करणारा होतो ॥३०॥

नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें ब्रह्मदेवाला सांगून त्याचें पूजन केल्यावर, भगवान् श्रीनृसिंह तेथेंच अंतर्धान पावला; ( अदृश्य झाला. ) ॥३१॥

नंतर भगवंताचें अंशभूत असे जे ब्रह्मदेव, महादेव, कश्यपादि प्रजापति व इंद्रादि देव ह्याचें त्या भक्त प्रल्हादानें उत्तमप्रकारें पूजन करुन त्यांना वंदन केलें ॥३२॥

नंतर भृगुप्रभृति मुनसिंह ब्रह्मदेवानें प्रल्हादाला, दैत्य व दानव ह्यांचें आधिपत्य दिलें ॥३३॥

हे राजा, याप्रमाणें प्रल्हादानें ब्रह्मादिदेवांची पूजा केल्यानंतर सर्व देव त्याला उत्तमप्रकारचे आशीर्वाद देऊन आपआपल्या स्थानी निघून गेले ॥३४॥

असो. हे धर्मराजा, ह्याप्रमाणे पूर्वी जयविजयसंज्ञक असलेले मूळचे विष्णुपार्षद ब्राह्मणांच्या शापामुळें दितीचे पुत्र झाले असतां, त्यांच्या हदयामध्यें वैरभावानें असलेल्या श्रीहरीनें त्यांचा वध केला ॥३५॥

नंतर त्याच शापामुळें ते रावण व कुंभकर्ण ह्या नांवानें दोन राक्षस झाले; त्या वेळी प्रभूनें रामावतार घेऊन त्यांचा वध केला ॥३६॥

रामाच्या बाणांनीं त्यांचें हदय विदीर्ण होऊन ते युद्धभूमीवर पडले असतां पूर्वजन्माप्रमाणेंच त्यांनी आपले चित्त रामाकडे लावून देहाचा त्याग केला ॥३७॥

नंतर तेच फिरुन या भूलोकी शिशुपाल व दंतवक्त्र ह्या नावांनी पुनः उत्पन्न झाले, आणि वैरानुबंधानें हे धर्मराजा, तूं पहात असतांच श्रीहरीच्या ठिकाणीं सायुज्य मुक्ति पावले ॥३८॥

हे राज, कुंभारीणनामक माशीनें वारंवार दंश केलेला कीटक, जसा तिच्या निरंतर ध्यानामुळें तिचे स्वरुप पावतो, त्याप्रमाणे कृष्णद्रोही राजांनी कृष्णनिंदादिकांच्या योगानें पूर्वी जें पातक केले होते, तें श्रीकृष्णाच्या नित्य ध्यासानें नष्ट होऊन शेवटीं ते त्याच्या स्वरुपाला पोंचले ॥३९॥

असो. जे एकनिष्ठ भक्त आहेत, ते भेददृष्टिरहित अश सर्वोत्कृष्ट भगवद्भक्तीनें श्रीहरीचें चिंतन करुन जसे पूर्वी त्याच्या सारुप्याला पोंचले, त्याप्रमाणें शिशुपालप्रभृति राजेहि वैरानुबंधानें श्रीहरीचें चिंतन करुन त्याच्या सारुंप्याला पोंचले आहेत ॥४०॥

हे राजा, दमघोषाचे पुत्र आदिकरुन श्रीकृष्णाचा द्वेष करीत असूनहि त्याच्या सायुज्याला कसे पावले, असें जें तूं मला विचारलें होतेंस तें सर्व तुला मी कथन केलें आहे ॥४१॥

ह्याप्रमाणें हिरण्याक्ष व हिरण्यकशिपु ह्या आदिदैत्यांचा वध जिच्यामध्यें वर्णिला आहे, अशी ही ब्रह्मज्ञानसंपन्न, व भक्तिमान् परमपूज्य अशी श्रीनृसिंहवताराची पुण्यकारक कथा मी तुला कथन केली आहे ॥४२॥

॥ ॐ शांति शांति ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP