श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय ६

स्वामी समर्थांचा आशीर्वाद "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे."

श्री गणेशाय नमः ॥ धरोनी शिशूचा हात । अक्षरे पंडित लिहवीत । तैसे स्वामीचरित्रामृत । स्वामी समर्थ वदविती ॥१॥
मी केवळ मतिमंद । केवी वर्णू चरित्र अगाध । परी माझा हा छंद । स्वामी समर्थ पुरविती ॥२॥
ज्यांच्या वरप्रसादे करुन । मुढा होय शास्त्रज्ञान । त्या समर्थांचे चरण । वारवार नमितसे ॥३॥
कृपाळू होऊन समर्थं । वदवावे आपुल्या चरिता । श्रवणे श्रोतयांच्या चित्ता । ब्रह्मानंद प्राप्त होवो ॥४॥
सुरतरुची घेऊनी सुमने । त्यासीच अर्पावी प्रीतीने । झाला ग्रंथ स्वामी कृपेने । त्यांच्याच पदी अर्पिजे ॥५॥
मागील अध्यायाच्या अंती । चोळाप्पा विनवी स्वामीप्रती । कृपा करोनी मजवरती । बडोद्यासी चलावे ॥६॥
भाषण ऐसे ऐकोनी । समर्थं बोलती हांसोनी । मल्हाररावाचिया मनी । आम्हांविषयी भाव नसे ॥७॥
म्हणोनी तयाच्या नगरात । आम्हा जाणे नव्हे उचित । अक्कलकोट नगरात । आम्हा राहणे आवडे ॥८॥
ऐसी ऐकोनिया वाणी । चोळाप्पा खिन्न झाला मनी । त्याने सत्वर येवोनी । तात्याप्रती सांगितले ॥९॥
ऐसा यत्न व्यर्थ गेला । तात्या मनी चिंतावला । आपण आलो ज्या कार्याला । ते न जाय सिद्धीसी ॥१०॥
परी पहावी यत्न करोनी । ऐसा विचार केला मनी । मग काय केले तात्यांनी । अनुष्ठान आरंभिले ॥११॥
ऐसे नाना उपाय केले । परी ते सर्व व्यर्थ गेले । कार्य सिद्धिस न गेले । खिन्न झाले मुख त्यांचे ॥१२॥
भक्ती नाही अंतरी । दांभिक साधनाते करी । तयांते स्वामी नरहरी । प्रसन्न कैसे होतील ॥१३॥
तयांनी माजविली ढोंगे । आणि केली नाना सोंगे । भक्तीविण हठयोगे । स्वामी कृपा न होय ॥१४॥
मग तात्यांनी काय केले । सप्ताहासी ब्राह्मण बैसविले । गुरुचरित्र आरंभिले । व्हावयासी स्वामीकृपा ॥१५॥
परी तयाच्या वाड्यात । कधी न गेले समर्थ । तात्या झाला व्यग्रचित्त । काही उपाय सुचेना ॥१६॥
मल्हारराव नृपाने । पाठविले ज्या कार्याकारणे । ते आपल्या हातून होणे । अशक्य असे वाटते ॥१७॥
आता जाऊनी बडोद्यासी । काय सांगावे राजियासी । आणि सकळ जनांसी । तोंड कैसे दाखवावे ॥१८॥
ऐशा उपाये करोन । न होती स्वामी प्रसन्न । आता एक युक्ती योजुन । न्यावे पळवोन यतीसी ॥१९॥
स्वामी केवळ ईश्वरमूर्ती । हे नेणे तो मंदमती । म्हणूनी योजिली कपटयुक्ती । परी ते सिद्धीते न जाय ॥२०॥
असो कोणे एके दिवशी । साधोनी योग्य समायासी । मेण्यात घालोनी स्वामीसी । तात्यासाहेब निघाले ॥२१॥
कडपगांवचा मार्ग धरिला । अर्धमार्गी मेणा आला । अंतरसाक्षी समर्थाला । गोष्ट विदित जाहली ॥२२॥
मेण्यातूनी उतरले । मागुती अक्कलकोटी आले । ऐसे बहुत वेळा घडले । हाही उपाय खुंटला ॥२३॥
मग पुढे राजवाड्यात । जाऊनिया राहिले समर्थ । तेव्हा उपाय खुंटत । टेकिले हात तात्यांनी ॥२४॥
या प्रकारे यत्न केले । परी तितुके व्यर्थ गेले । व्यर्थ दिवस गपाविले । द्रव्य खर्चिले व्यर्थची ॥२५॥
मग अपयशाते घेवोनी । बडोद्यासी आले परतोनी । समर्थकृपा भक्तीवाचोनी । अन्य उपाय न होय ॥२६॥
परी मल्हारसव नृपती । प्रयत्न आरंभीती पुढती । सर्वत्रांसी विचारिती । कोण जातो स्वामींकडे ॥२७॥
तेव्हा मराठा उमराव । यशवंत तयांचे नाव । नृपकार्याची धरुन हाव । आपण पुढे जाहला ॥२८॥
स्वामीकारणे वस्त्रे भूषणे । धन आणि अमोल रत्ने । देऊनी त्याजवळी नृपाने । आज्ञा दिधली जावया ॥२९॥
तो येवोनि अक्कलकोटी । घेतली समर्थांची भेटी । वस्त्रे अलंकार सुवर्णताटी । स्वामीपुढे ठेवित ॥३०॥
ती पाहूनी समर्थाला । तेव्हा अनिवार क्रोध आला । यशवंता पाहोनी डोळा । काय तेव्हा बोलले ॥३१॥
अरे बेडी आणोनी । सत्वर ठोका याचे चरणी । ऐसे त्रिवार मोठ्यांनी । समर्थ क्रोधे बोलले ॥३२॥
क्रोध मुद्रा पाहोनी । यशवंतराव भ्याला मनी । पळाले तोंडचे पाणी । लटलटा कापू लागला ॥३३॥
मग थोड्याच दिवशी । आज्ञा आली यशवंतासी । सत्वर यावे बडोद्यासी । तेथील कार्यासी सोडोनी ॥३४॥
साहेबा विषप्रयोग केला । मल्हाररावावरी आळ आला । त्या कृत्यामाजी यशवंताला । गुन्हेगार लेखिले ॥३५॥
हाती पायी बेडी पडली । स्वामीवचनाची प्रचिती आली । अघटित लीला दाविली । ख्याती झाली सर्वत्र ॥३६॥
समर्थांची अवकृपा जयावरी । त्याच्या कष्ट होती शरीरी । कृपा होय ज्यावरी । तया सर्वानंद प्राप्त होय ॥३७॥
महासमर्था भक्त पालका । अनादिसिद्धा जगन्नायका । निशिदिनी शंकर सखा । विष्णूचिया मनी वसे ॥३८॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भक्त परिसोत । षष्ठोऽध्यायः गोड हा ॥३९॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृते षष्ठोऽध्याय ॥ शुभं भ तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP