श्री गजानन विजय - अध्याय ४

भक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.


श्रीगणेशाय नमः ॥

हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा ।

महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥

तूं आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास ।

तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥

तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति ।

जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥

अनन्यभावें बाहतां । तूं पावसी आपुल्या भक्तां ।

माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥४॥

मी तुझें अजाण लेंकरुं । नको माया पाताळ करुं ।

तूं साक्षात् कल्पतरु । इच्छा पूर्ण करी हरा ॥५॥

बंकटलालाचे घरांत । असतां स्वामी समर्थ ।

प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥६॥

वैशाख शुद्ध पक्षासी । अक्षयतृतीयेचिया दिवशीं ।

पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥७॥

अक्षयतृतीयेचा दिवस । वर्‍हाडांतील लोकांस ।

विशेष वाटे प्रत्येकास । मोठा सण मानिती हा ॥८॥

त्या दिवशीं काय झालें । तें पाहिजे श्रवण केलें ।

महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥९॥

बालकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरुन ।

तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥१०॥

सकाळपून ऐसाच बसलों । चिलीम मुळीं नाहीं प्यालों ।

त्यामुळें हैराण झालों । भरा चिलीम मुलांनो ! ॥११॥

ऐसी आज्ञा ऐकतां भली । पोरें अवघीं आनंदलीं ।

चिलीम भरुं लागलीं । तंबाखू आंत घालुनिया ॥१२॥

विस्तवाचा तपास केला । तो न सदनीं मिळाला ।

कां कीं चूल पेटण्याला । अवकाश होता विबुध हो ॥१३॥

पोरें चित्तीं विचार करिती । आपापसांत निश्चिती ।

कशी करावी यासी युक्ति । विस्तव पाहिजे चिलिमीला ॥१४॥

मुलें पाहून चिंतातुर । बंकट करी मधुरोत्तर ।

अरे जानकीराम सोनार । आहे वेटाळीं * आपुल्या ॥१५॥

त्याच्याकडे तुम्ही जावें । विस्तवासी मागून घ्यावें ।

दुकान तें चालण्या बरवें । विस्तव लागतो आधीं त्या ॥१६॥

आधीं पेटते बागेसरी । त्याच्यापुढें दुकानदारी ।

ही सोनाराची रीत खरी । आहे ठावें कीं तुम्हांला ॥१७॥

पोरांनीं तें ऐकिलें । जानकीरामाकडे आले ।

विस्तव मागूं लागले । समर्थांच्या चिलमीस ॥१८॥

जानकीराम रागावला । लेंकरासी बोलता झाला ।

अक्षयतृतियेच्या सणाला । दे न कोणा विस्तव मी ॥१९॥

पोरें म्हणालीं त्यावर । जोडोनी आपले दोन्ही कर ।

नको करुं हा अविचार । विस्तव पाहिजे समर्थाला ॥२०॥

महाराज श्रीगजानन । देवाचेही देव जाण ।

त्यांच्या चिलमीकारण । विस्तव हा जातसे ॥२१॥

साधुप्रती कांहीं देतां । तेथें अशुभाचि नसे वार्ता ।

उगीच व्यावहारिक कथा । सांगत आम्हां बसूं नको ॥२२॥

आम्ही आहों मुलें लहान । तूं मोठा आमच्याहून ।

ऐसें साच असून । हें न कैसें कळे तुला ? ॥२३॥

विस्तव तूं देशील जरी । भाग्य येईल तुझ्या घरीं ।

चिलीम पिऊन तृप्त जरी । झाला गजानन महाराज ॥२४॥

तें सोनारें न ऐकिलें । अद्वातद्वा भाषण केलें ।

ज्याचें जवळ मरण आलें । त्याचे पाय खोलाकडे ॥२५॥

सोनार म्हणे बालकांसी । गजानन कशाचा पुण्यराशी ? ।

त्या चिलमीबहाद्दरासी । साधु म्हणून सांगूं नका ! ॥२६॥

गांजा तमाखू पीत बसतो । नग्न गांवांत हिंडतो ।

वेडयापरी चाळे करितो । पितो पाणी गटाराचें ॥२७॥

जात गोत नाहीं त्याला । ऐशा वेडयापिशाला ।

मी साधु मानण्याला । नाहीं मुळीं तयार ॥२८॥

बंकटलाल खुळावला । नादीं त्याच्या लागला ।

नाहीं देत विस्तवाला । मी तयाचे चिलमीसी ॥२९॥

तो आहे ना साक्षात्कारी । मग विस्तव कशाला पाहिजे तरी ? ।

आपुल्या कर्तृत्वें कां न करी । विस्तवातें निर्माण ? ॥३०॥

साधु नाथ जालंदर । पीत होते चिलीम फार ।

परी विस्तवासाठीं घरघर । ना हिंडले कदा ते ॥३१॥

जा जा उभे न राहा येथ । विस्तव ना मिळे तुम्हांप्रत ।

नाहीं मला किंमत । त्या तुमच्या पिशाची ॥३२॥

पोरें विन्मुख परत आलीं । महाराजांसी निवेदिली ।

हकीकत जी कां झाली । सोनाराचे दुकानांत ॥३३॥

ती ऐकतां हास्यवदन । करिते झाले दयाघन ।

नाहीं आपणां प्रयोजन । मुळींच त्याच्या विस्तवाचें ॥३४॥

ऐसें म्हणोन घेते झाले । चिलीम आपुल्या हातीं भले ।

बंकटलालासी बोलले । काडी एक वरती धरी ॥३५॥

बंकट म्हणे गुरुराया । थोडें थांबा परम सदया ।

विस्तव देतों करुनिया । काडी घासून आतां मी ॥३६॥

काडी घासल्यावांचूनी । कदां न प्रगटे अग्नि ।

म्हणून केली विनवणी । ती मनास आणा समर्था ॥३७॥

महाराज बोलले त्यावर । उगी न करी चरचर ।

नुसती काडी धरणें वर । तिला मुळींच घासूं नको ॥३८॥

बंकटलालें तैसें केलें । नुसत्या एका काडीस धरिलें ।

चिलमीचिया वरती भले । समर्थ-आज्ञा म्हणून ॥३९॥

तों काय झाला प्रकार । ऐका तुम्ही श्रोते चतुर ।

प्रगट झाला वैश्वानर । काडी नुसती धरतां वरी ॥४०॥

काडीप्रती विस्तवाचा । अंशही नव्हता साचा ।

हा प्रभाव शक्तीचा । महाराजांच्या लोकोत्तर ॥४१॥

काडी तैसीच राहिली । चिलीम तीही पेटली ।

कशाचीही नाहीं उरली । जरुर खर्‍या साधूला ॥४२॥

याचें नांव साधुत्व । उगीच नव्हतें थोतांड मत ।

आतां सोनाराचे घरांत । काय झालें तें ऐका ॥४३॥

या अक्षयतृतियेला । मान विशेष चिंचवण्याला ।

जेवीं वर्षप्रतिपदेला । महत्त्व निंब फुलांचें ॥४४॥

असो भोजना बैसली पंगत । चिंचवणें वाढलें द्रोणांत ।

तों प्रकार ऐसा अघटीत । घडून आला तो ऐका ॥४५॥

त्या चिंचवण्यामाझारीं । अळ्या दिसल्या नानापरी ।

बुजबुजाट झाला भारी । किळस वाटली सर्वांला ॥४६॥

लोक उठले पात्रांवरुन । अवघ्या अन्नातें टाकून ।

सोनार बसला अधोवदन । कारण कांहीं उमजेना ॥४७॥

चिंचवण्याच्या संगें भलें । अवघें अन्न वायां गेलें ।

मग त्या कोडें उमगलें । ऐसें व्हाया मीच कारण ॥४८॥

मी न साधूंसी विस्तव दिला । त्याचा प्रत्यय तात्काळ आला ।

गजाननाची अगाध लीला । मीं न खचित जाणिली ॥४९॥

गजानन जान्हवी नीर । मीं त्या मानिलें थिल्लर ।

गजानन राजराजेश्वर । मीं त्या भिकारी मानिलें ॥५०॥

त्रिकालज्ञ गजानन । मीं त्या मानिलें वेडा पूर्ण ।

कल्पतरुकारण । मीं बाभळ मानिली ॥५१॥

गजानन हा चिंतामणी । मीं लेखिली गार जाणी ।

गजानन हा कैवल्यदानी । मी ढोंगी मानिला हो ॥५२॥

हाय हाय रे दुर्दैवा । त्वां कैसा साधिला दावा ।

माझ्या हातून संतसेवा । होवो ना तूं दिलीस ॥५३॥

मसी असो हा धिक्कार । मी भारभूत साचार ।

जन्म पावलों भूमीवर । द्वय पायांचा पशु मी ॥५४॥

आज माझ्या भाग्यकाळीं । बुद्धि कशी चळती झालि ।

सुयोगाचि दवडिली । वेळ आलेली म्यां करें ॥५५॥

कांहीं असो आतां जाऊं । समर्थांचे पाय पाहूं ।

पदीं त्यांच्या अनन्य होऊं । क्षमा मंतूची मागावया ॥५६॥

ऐसा विचार करुनी । सवें घेऊन चिंचवणी ।

बंकटलालाच्या सदनीं । आला हकीकत सांगावया ॥५७॥

अहो शेटजी बंकटलाला । आज माझा घात झाला ।

पाहा या चिंचवण्याला । आंत किडे पडले बहु ॥५८॥

माणसें उठलीं उपोषित । तेणें झाला श्राद्धघात ।

हें ऐसें व्हावया कृत्य । माझा मीच कारण असे ॥५९॥

आज सकाळीं चिलिमीला । मीं नाहीं विस्तव दिला ।

पोरें मागत असतां मला । समर्थांच्या चिलिमीस्तव ॥६०॥

त्याचेंच हें आहे फळ । चिंचवणी नासलें सकळ ।

तें ऐकून बंकटलाल । बोलूं लागला येणें रितीं ॥६१॥

तुम्हीं न चिंचोके पाहिले । ते असतील किडलेले ।

म्हणून हे नासते झाले । तुमचें चिंचवणी वाटे मला ॥६२॥

सोनार म्हणे ऐसी शंका । शेटजी तुम्ही घेऊं नका ।

नवी चिंच होती देखा । मग चिंचोके किडके कसे ? ॥६३॥

जी मीं चिंच फोडिली । तिचीं टरफलें अजून पडलीं ।

चिंचोक्यांची रास झाली । मर्जी असल्या पाहा चला ॥६४॥

आतां इतुकीच विनंती । आहे शेटजी तुम्हांप्रती ।

मला नेऊन पायांवरतीं । घाला शीघ्र समर्थांच्या ॥६५॥

क्षमा मंतूची मागेन । अनन्यभावें करुन ।

साधु दयेचे परिपूर्ण । सागर मूळचेच आहेत कीं ॥६६॥

समर्थांपुढें भीत भीत । जानकीराम गेला त्वरित ।

घातलें त्यानें दंडवत । अष्टांगेंसी समर्था ॥६७॥

आणि म्हणाला दयाघना ! । तुला येवो माझी करुणा ।

मीं अपराध केले नाना । त्यांची क्षमा करावी ॥६८॥

तूं साक्षात् उमानाथ । नांदसी या शेगांवांत ।

ज्यांची होती मजला भ्रांत । ती त्वां आज निवटीली ॥६९॥

माझे अपराधरुपीं अवघें तृण । जाळी कृपाकृशानें * करुन ।

समर्था आजपासोन । मी न टवाळी तुझी करी ॥७०॥

जी शिक्षा आज केली । तेवढीच मजसी पुरे झाली ।

तूं अनाथांचा आहेस वाली । आतां अंत पाहूं नको ॥७१॥

महाराज बोलले त्यावर । खोटें न सांगे तिळभर ।

तुझें चिंचवणी आहे मधुर । किडे न पडले त्यामध्यें ॥७२॥

तें ऐकतां अवघ्यांनीं । पाहिलें तें चिंचवणी ।

पहिला प्रकार मावळोनी । गेला होता तेधवां ॥७३॥

अवघ्यांप्रती आश्चर्य झालें । समर्थांचें महत्त्व कळलें ।

हां हां म्हणतां पसरलें । वृत्त हें त्या गांवामध्यें ॥७४॥

ज्यांच्या त्यांच्या तोंडीं मात । हीच निघूं लागली सत्य ।

कस्तुरीचा नाहीं येत । वास झांकाया कवणातें ॥७५॥

चंदुमुकीन नांवाचा । गृहस्थ एक शेगांवाचा ।

निःसीम भक्त समर्थांचा । त्याची कथा ऐका ही ॥७६॥

श्रोते ज्येष्ठ मासांत । सभोंवार बसले भक्त ।

अति आदरें जोडोन हात । दृष्टि ठेवून पायावरी ॥७७॥

कोणी आंबे कापिती । कोणी फोडी हातांत देती ।

कोणी पंख्यानें घालिती । वारा समर्थांकारणें ॥७८॥

कोणी वांटिती खडीसाखर । कोणी गळ्यांत घालिती हार ।

कोणी चंदन थंडगार । लाविती अंगीं साधूच्या ॥७९॥

तयीं महाराज म्हणाले चंदूला । हे आंबे नकोत मला ।

दोन कान्होले उतरंडीला । आहेत तुझ्या ते आण जा ॥८०॥

चंदू बोले कर जोडून । आतां कान्होले कोठून ? ।

इच्छा असल्या तळून । ताजे आणितों गुरुराया ॥८१॥

तईं महाराज वदले वाचें । नाहीं कारण ताज्याचें ।

पाहिजेत तुझ्या उतरंडीचे । कान्हवले मज खावया ॥८२॥

जा वेळ करुं नको । उगीच सबबी सांगूं नको ।

गुरुपाशीं बोलूं नको । खोटें वेडया यत्किंचित् ॥८३॥

त्या मुकिनचंदूप्रती । लोक आघे बोलती ।

जा ये पाहून शीघ्रगती । खोटी न होय संतवाणी ॥८४॥

चंदू घराप्रती गेला । कांतेस पुसूं लागला ।

दोन कान्हवले उतरंडीला । आहेत काय रंभोरु ? ॥८५॥

तैं बोले अंगना । होऊन गेला एक महिना ।

आतां कान्हवले आपुल्या सदना । मिळतील कशाचे ? ॥८६॥

अक्षयतृतीया दिवशीं भले । कान्हवले मीं पतिराया केले ।

ते न आतां राहिले । संपून गेले त्याच दिनीं ॥८७॥

मर्जी असल्या नवे करितें । समर्थास्तव तळून देतें ।

ही पहा मी ठेवितें । कढई नाथा चुलीवर ॥८८॥

तुम्ही थांबा क्षणभर । सामान अवघें तयार ।

नको पाहाण्या बाजार । कान्हवल्याच्या साहित्यासी ॥८९॥

चंदू बोले त्यावरी । ताजे नकोत सुंदरी ।

जे तूं उतरंडी माझारीं । दोन ठेविले तेच दे ॥९०॥

समर्थांनीं ऐसेंच कथिलें । तेंच मी तुज निवेदिलें ।

आठवण करुन चांगलें । पाहा कांहीं येधवां ॥९१॥

ऐसे ऐकतां पतिवचन । कांता गेली घोटाळून ।

करुं लागली शोधन । कान्हवल्याचे चित्तांतरीं ॥९२॥

कान्हवल्यांचा शोध करितां । आठवण झाली तत्त्वतां ।

उघड म्हणे थांबा नाथा । सत्य गिरा समर्थांची ॥९३॥

दोन कान्हवले होते उरले । ते मी उतरंडीस ठेविले ।

त्यांचें स्मरण नाहीं उरलें । सगळ्या महिन्यांत मजलागीं ॥९४॥

त्यास महिना होऊन गेला । असेल बुरसा वरी आला ।

ते खाण्याच्या उपयोगाला । राहिले नसतील अणुमात्र ॥९५॥

ऐसें बोलून तात्काळ उठली । उतरंड सर्व धांडोळली ।

कान्हवले ते ठेवलेली । कळशी होती खापराची ॥९६॥

आंत जों पाहिलें न्याहाळून । तों दृष्टी पडले तिच्या दोन ।

कान्हवले जे सुकोन । गेले होते थोडके ॥९७॥

बुरसा मुळींच नाहीं आला । श्रोते त्या कान्हवल्याला ।

बट्टा संतवाणीला । नाहीं लागला कधीं जगीं ॥९८॥

कान्हवल्यातें पाहोन । उभयतांचें हर्षलें मन ।

धन्य साधु गजानन । महा समर्थ सिद्धयोगी ॥९९॥

चंदू कान्हवले घेऊन आला । समर्थांसी अर्पिता झाला ।

लोक करती आश्चर्याला । त्याच्या कृतीतें पाहून ॥१००॥

लोक म्हणती गजानन । खचित असती त्रिकालज्ञ ।

भूत भविष्य वर्तमान । यांसी अवघे कळतसे ॥१॥

चंदूच्या त्या कान्हवल्यांसी । सेविते झाले पुण्यराशी ।

राम शबरीच्या बोरांसी । जेवीं झाला भक्षिता ॥२॥

शेगांवच्या दक्षिणेसी । चिंचोली गांव परियेसी ।

तेथील एक रहिवासी । माधव नामें विप्र होता ॥३॥

वय ज्याचें साठावर । अवयव झाले क्षीण फार ।

तरुणपणीं संसार । हेंच होतें ब्रह्म ज्याचें ॥४॥

प्रारब्धाच्या पुढारी । कोण जातो भूमिवरी ? ।

ब्रह्मदेवें जीं कां खरीं । लिहिलीं अक्षरें तेंच होय ॥५॥

माधवासी न कोणी उरले । कांतापुत्र मरुन गेले ।

म्हणून विरक्त जाहलें । मन तयाचें संसारीं ॥६॥

जी का होती चीजवस्त । ती अवघी केली फस्त ।

म्हणे आतां माझी गत । होईल कैशी देवदेवा ? ॥७॥

म्यां हमाधुमीचा संसार केला । तो आतां अवघा निमाला ।

आठविलें कधीं नाहीं तुला । एक क्षणही दीनबंधो ! ॥८॥

आतां माझा वाली कोण ? । दीनदयाळा तुजवांचून ।

माझें हें अरण्यरोदन । तुजविण देवा कोण ऐके ? ॥९॥

ऐसा अनुताप धरुन पोटीं । शेगांवीं आला शेवटीं ।

गजाननाच्या द्वारवंटीं । हट्ट धरुन बैसला ॥११०॥

आरंभिलें उपोषण । अन्नपाण्यातें त्यागून ।

वदनीं वदे नारायण । खंड न पडे तयाला ॥११॥

ऐशापरी एक गेला । दिवस परी नाहीं उठला ।

तईं महाराज वदले तयाला । हें करणें उचित नसे ॥१२॥

हेंच हरीचें नामस्मरण । कां न केलें मागें जाण ।

प्राण देहातें सोडून । जातां वैद्य बोलाविसी ! ॥१३॥

तरुणपणीं ब्रह्मवारी । म्हातारपणीं करिसी नारी ।

अरे वेळ गेल्यावरी । नाहीं उपयोग साधनाचा ॥१४॥

जें करणें तें वेळेवर । करावें कीं साचार ।

घर एकदां पेटल्यावर । कूप खणणें निरर्थक ! ॥१५॥

ज्या कन्यापुत्रांसाठीं । तूं केलीस आटाआटी ।

ते अवघे गेले शेवटीं । टाकोनिया तुजलागीं ॥१६॥

अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरुन ।

त्या कर्माचीं तुजलागून । फळें भोगणें भाग असे ॥१७॥

तीं फळें भोगिल्याविना । सुटका तुझी होईना ।

दे हा टाकून हट्टीपणा । विवेक कांहीं करी मनीं ॥१८॥

तें न माधवें ऐकिलें । हट्टासि ना सोडिलें ।

यत्‍न लोकांचे वायां गेले । त्यासी भोजन घालण्याचे ॥१९॥

शेगांवचा कुलकर्णी । करुं लागला विनवणी ।

भोजनास चला सदनीं । अन्नाविण राहूं नका ॥१२०॥

तेंही म्हणणें माधवाला । नाहीं पटलें तसाच बसला ।

समर्थांच्या सान्निध्याला । नाम घेत हरीचें ॥२१॥

रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर ।

निशीचा तो शब्द किर्र । होऊं लागला वरच्यावरी ॥२२॥

आसपास कोणी नाहीं । ऐसें पाहून केलें कांहीं ।

कौतुक तें लवलाही । स्वामी गजाननांनीं ॥२३॥

रुप धरिलें भयंकर । दुसरा यमाजी भास्कर ।

आ पसरुन माधवावर । धांवून आले भक्षावया ॥२४॥

तेणें माधव पळाला । घेऊन आपला जीव भला ।

धडकी भरली चित्ताला । छाती उडे धडधड ॥२५॥

बुडबुडा आला तोंडासी । शब्द फुटेना वाचेसी ।

ऐशा पाहोन स्थितीसी । समर्थें धरिलें सौम्य रुप ॥२६॥

आणि बोलले गर्जोन । हेंच कां तुझें धीटपण ।

तूं काळाचें भक्ष्य जाण । असाच खाईल काळ तुला ॥२७॥

त्याची चुणूक दाखविली । पुढची स्थिति जाणविली ।

तेथें पळाया नाहीं उरली । यमलोकांत जागा तुला ॥२८॥

माधव ऐसें ऐकतां । झाला विनयें बोलतां ।

यमलोकाची नको वार्ता । तेवढी माझी टाळा हो ॥२९॥

नको नको हें जीवित । द्या धाडून वैकुंठांत ।

हीच विनंति आपणांप्रत । महाराज माझी शेवटची ॥१३०॥

यमलोकीं जें दिसणार होतें । तें तुम्हीं दाविलें येथें ।

आतां या लेंकरातें । यमलोकीं धाडूं नका ॥३१॥

माझ्या पातकाच्या राशी । आहेत जरी बहुवशी ।

परी त्या जाळणें तुम्हांसी । नाहीं मुळीं अशक्य ॥३२॥

कांहीं सुकृत पदरीं होतें । म्हणून पाहिलें तुम्हांतें ।

संतभेटी ज्याला होते । यमलोक ना तयासी ॥३३॥

ऐसें ऐकतां भाषण । समर्थें केलें हास्यवदन ।

महापतीता पावन । साधूच एक करिती कीं ॥३४॥

श्रीमन्नारायण नारायण । ऐसेंच माधवा करी भजन ।

जवळ आलें तुझें मरण । आतां गाफील राहूं नको ॥३५॥

किंवा अजून वांचण्याची । आस आहे तुला साची ।

ती असल्यास आयुष्याची । वाढ तुझ्या करितों मी ॥३६॥

माधव म्हणे गुरुराया । नको मला आयुष्य सदया ।

ओखटी ही प्रपंचमाया । त्यांत पुन्हां गोवूं नको ॥३७॥

तथास्तु ऐसें महाराज वदले । तूं जें मागसी तें मीं दिलें ।

आतां तुला नाहीं उरलें । जन्मास येणें भूमीवर ॥३८॥

ऐशा रीतीं दोघांचा । संवाद गुप्त स्वरुपाचा ।

झाला त्या वर्णण्या वाचा । नाहीं माझी समर्थ ॥३९॥

इहलोकीचें देहभान । माधवाचें निमालें जाण ।

कित्येक बोलूं लागले जन । उपवासें फिरलें मस्तक ॥१४०॥

म्हणून वेडेचार करी । जनकल्पना नानापरी ।

उठत्या झाल्या त्या अवसरीं । त्या किती म्हणून वर्णाव्या ? ॥४१॥

असो माधवाचें देहावसान । समर्थासन्निध झालें जाण ।

चुकलें त्याचें जन्ममरण । गजाननाच्या कृपेनें ॥४२॥

असो एक्या समयीं भली । समर्थांसी इच्छा झाली ।

ती त्यांनीं निवेदिली । आपुल्या शिष्यवर्गातें ॥४३॥

वैदिक ब्राह्मण बोलवा । मंत्रजागर येथें करवा ।

वेदश्रवणें देवदेवा । आनंद होतो अतिशय ॥४४॥

पन्हें पेढे बरफी खवा । भिजल्या डाळीस मीठ लावा ।

एकेक रुपया तो द्यावा । घनपाठी ब्राह्मणातें ॥४५॥

ऐसें भाषण ऐकिलें । शिष्य विनवूं लागले ।

ऐसे वैदिक नाहीं उरले । या आपुल्या शेगांवीं ॥४६॥

सांगाल तो करुं खर्च । परी अडचण आहे हीच ।

ब्राह्मण मिळविण्याचि साच । आमचा उपाय यातें नसे ॥४७॥

महाराज म्हणाले त्यावरी । करा उद्यां तयारी ।

ब्राह्मण धाडील श्रीहरी । तुमच्या वसंतपूजेला ॥४८॥

मग काय विचारितां । अवघे हर्षले तत्त्वतां ।

झाली तयारी हां हां म्हणतां । रुपये शंभर झाले जमा ॥४९॥

सामान सर्व आणिलें । चंदनाचें उटणें केलें ।

आंत केशर कालविलें । तैसाच आणखी कापुर ॥१५०॥

दोन प्रहरचे समयाला । ब्राह्मण आले शेगांवाला ।

जे पदक्रम जटेला । जाणत होते विबुध हो ! ॥५१॥

थाटांत वसंतपूजा झाली । ब्राह्मण मंडली आनंदली ।

दक्षिणा घेऊनी गेली । अन्य ग्रामाकारणें ॥५२॥

संतांच्या जें मनीं येत । तें तें पुरवी रमानाथ ।

कमी न पडे यत्किंचित । ऐसा प्रभाव संतांचा ॥५३॥

बंकटलाल प्रतिवर्षी । व्रत हें चालवी अतीहर्षी ।

अजून परी शेगांवासी । वंशज त्याचे करिती हें ॥५४॥

हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।

साधकासी दावो पथ । विमलशा हरिभक्तीचा ॥१५५॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP