मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय २७

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ॥

जय जय सच्चिदानंद परब्रह्म मूर्ती । अपरिमित तुझी सत्कीर्ती ।

महिमा वर्णिता शिणल्या श्रुती । कंठित मती शास्त्रांची ॥१॥

तुझे पवाडे देवाधिदेवा । वदतां शिणला चक्षुःश्रवा ।

ठक पडिलें कलोद्भवा । आमुचा केवा तो किती ॥२॥

बालक बोले बोबडें वचन । ऎकोनि मातेसी समाधान ।

शुध्द पुसे पडताळून । निजप्रीतीनें आपुल्या ॥३॥

तैशाच परी रुक्मिणीपती । भक्त आर्ष करितां स्तुती ।

तैं तुज वचनें गोड लागती । सप्रेम भक्तीचेनि बळें ॥४॥

शाहाणपणें वेद जाहला मुका । बांधितां गौळणी तुज भाविका ।

तयासि भिऊनि वागसी निका । विश्वोध्दारका जगद्गुरु ॥५॥

तुझा व्हावया साक्षात् कार । महर्षि यजिती थोर थोर ।

तो तूं भिल्लीणीचीं उच्छिष्ट बोरे । खातोसि आदरें नवल कीं ॥६॥

तूं ब्रह्मयाचा तात केवळ । आणि यशोदेचा म्हणविसी बाळ ।

अंकीं लोळसी सर्वकाळ । नसतीच आळ घेउनी ॥७॥

दुर्योधन सार्वभौम नृपवर । न घेसी त्याचा सन्मान आदर ।

आणि दासी पुत्र भक्त विदुर । धुंडिसी घर तयाचें ॥८॥

सप्रेम भक्तीची देखोनि चट । खासी गोपाळांचीं उच्छिष्टें ।

लोटोनि पक्वान्नाचें ताट । मागसी देंठ भाजीचा ॥९॥

तैशाच रीतीं करुणाघनें । अंगीकारावी आर्ष वचनें ।

चित्तीं देऊनि आठवण । वदवीं गुण संतांचे ॥१०॥

मागिल्या अध्यायाचे शेवटीं । तुकयासि निरधिली संसार रहाटी ।

वैश्य व्यवसाय उघडतां दृष्टीं । संतोष पोटी वडिलांतें ॥११॥

माता पिता बंधु सज्जन । घरीं उदंड धन धान्य ।

शरीरीं आरोग्य लोकांत मान्य । एकही उणें असेना ॥१२॥

ऎसें असतां तये वेळ । प्रपंचीं चित्त रमलें केवळ ।

तों पुढें विपरीत ओढवलें तत्काळ । तें ऎका प्रेमळ भाविकहो ॥१३॥

सुखापुढें येतसें दुःख । हें अनादि सिध्द भविष्य कारक ।

कीं हरिखापुढें सवेचि शोक । देखती लोक दृष्टीसीं ॥१४॥

जैसा मावळतां दिनकर । तितुकाचि पडे अहंकार ।

कीं आधीं धान्य पिके अपार । मग दुष्काळ थोर ये पुढें ॥१५॥

नातरी अत्यंत मैत्रि की जेथें । सवेचि विकल्प येतसे तेथें ।

बहुत सन्मान जाहला जेथें । तरी निंदाही तेथें उद्भवे ॥१६॥

कीं देह श्लाघ्यता मानितां भोग । तंव शरीरीं उद्भवे रोग ।

अमृत मंथूनि काढितां मागें । विषही मग प्रगटलें ॥१७॥

संसारीं सुख मानितां प्रीतीं । तैसाचि जाहलें तुकया प्रती ।

पुढें त्रिताप उद्भवे चित्तीं । कैशा रीतीं ते ऎका ॥१८॥

आयुष्य सरोनि गेलिया तत्वतां । वैकुंठासि गेलीं मातापिता ।

तेणें तुकयाच्या चित्ता । खेद सर्वथा नावरे ॥१९॥

बंधु बहीण शोक करी । तेणें अधिकचि दुःख वाटे अंतरीं ।

म्हणे संसार ओझें आपुलें शिरीं । कैसी परी होईल ॥२०॥

ऎशा रीतीं चिंता करितां । सवेंचि धीर देतसे चित्ता ।

म्हणे होणार ते झालें आतां । नोहे अन्यथा माझेनी ॥२१॥

ऎसा चित्तासि देतां धीर । तों वडिल सावजी सहोदर ।

त्याची स्त्री पावली परत्र । तेणेंही अंतर दुखवलें ॥२२॥

सावजी आधींच होता उदास । मानीं संसाराचा त्रास ।

त्यावरी कांतेचा होता पाश । तोही अनायासें निरसला ॥२३॥

परम अनुताप धरूनि मनीं । बंधु तो गेला तीर्थाटणीं ।

मुखीं अमृत संजीवनी । नामस्मरणीं सर्वदा ॥२४॥

सप्तपुर्‍या ज्योतिर्लिंगें बारा । दृष्टीसीं पाहिलीं त्या अवसरा ।

पुष्करादि तीर्थे करोनि सत्वरा । दुस्तरा संसारा निवटिलें ॥२५॥

कायिक वाचिक मानसिक । तपें आचरला स्वाभाविक ।

षड्वैरी जिंकोनि देख । शांति सुख पावला ॥२६॥

सर्व तीर्थे करोनि जाणा । मागुती आला आनंदवना ।

संत समागम धरोनि नाना । आत्म साधना विचारी ॥२७॥

आत्मस्थिती पावोनि पूर्ण । जाहलें स्वस्वरूपीं समाधान ।

असो इकडे अनुसंधान । ऎका सज्जन निजप्रीतीं ॥२८॥

देहुसि तुका वैष्णव । खेद करित नित्य नित्य ।

म्हणे मातापिता क्रमिलीं निश्चित । बंधूची गत हे झाली ॥२९॥

कांता जिवंत असती जरी । मग फिरोनि येता कधीं तरी ।

आधींच उदास होता अंतरीं । फावली बरी संधि आतां ॥३०॥

म्हणे रुक्मिणीवरा पंढरीनाथा । जोंवरी होतीं मातापिता ।

तोंवरी मज नव्हती एकही चिंता । तरी कैसें आतां करावें ॥३१॥

पितयाचें धन होतें बहुत । तेंही जाहलें वाताहत ।

जैसी शीत काळ येतां अभ्र समस्त । विलया जात आकाशीं ॥३२॥

कीं पृथ्वीवरी तृणांकुर असती । ते उष्णकालीं वाळोनि जाती ।

कीं अभ्रच्छायेच्या बैसतां वस्ती । ती नाहींच होतीं क्षणमात्रें ॥३३॥

कीं इंद्रधनुष्य दिसतां पाहे । परी क्षण लोटतां नाहींसें होय ।

ना तरी तरंगाचा स्वभाव काय । अक्षय आहे विचारा ॥३४॥

तैसें तुकयाचें धनधान्य समस्त । अटोनि गेलें जेथील तेथ ।

यास्तव होऊनि चिंताक्रांत । म्हणे कैसी मात करावी ॥३५॥

आपुलें द्रव्य दुसर्‍यावर । ते बोलो न देती साचार ।

उदीम न चले अणुमात्र । कैसा विचार करावा ॥३६॥

कुटुंबवत्सल खर्च पदरीं । म्हणोनि धांवे हटबाजारीं ।

द्रव्यासाठी नानापरी । प्रयत्न करी बहु फार ॥३७॥

येणेंही नयेचि पुरवठा । मग दुकान मांडोनि बैसे चोहटा ।

वाचेसि हरिनामाचा फांटा । व्यापार खोटा न करवे ॥३८॥

म्हणे उणेम द्यावें कोणास । तरी असत्य वर्ततां महादॊष ।

गिर्‍हाईक मागतसे जैसें । धारणें विशेष तें द्यावें ॥३९॥

सर्वभूतीं दयापूर्ण । असत्य सर्वथा न बोले वचन ।

वाचेसि अखंड हरिस्मरण । एकही क्षण न विसंबे ॥४०॥

ऎसी स्थिती देखोनि पाहें । देव कसवटी लाविताहे ।

याही व्यापारें पुरवठा नये । मग आणिक उपाय करितसे ॥४१॥

वैश्यव्यवसाय नानाविध करी । परी कोठेंही साह्य न होचि श्रीहरि ।

चित्तीं कष्टी होतसे भारी । आटती परी देखोनी ॥४२॥

आपण कष्टोनि रात्रंदिवस । ढोरावरी गोण्या वाहतसे ।

शीत उष्ण निद्रा आळस । कांहींच ध्यानास आणीना ॥४३॥

आणिक कर्ज घेऊनि फार । मागुती धंदा केला थोर ।

परी नफा न होय आणुमात्र । चिंतातुर यासाठीं ॥४४॥

आणिक ऋण घेऊनि पाहे । कांहीं हातवटी करूं जाय ।

तेणेंही न दिसेचि सोय । म्हणे करावें काय विठोबा ॥४५॥

बहुत कष्टी होऊनि चित्तीं । स्मरण करीत अहोरातीं ।

कांहीं ऋण घेऊनि मागुतीं । वस्तभाव होती तेही मोडिली ॥४६॥

वजन करोनि हिशोब पाहत । घरीं वाणी मिळेल समस्त ।

तंव ते अधिकचि आलें आंत । कैसी मात करावी ॥४७॥

सोयरे पिशुन ते वेळे । म्हणती याचें तें निघालें दिवाळें ।

सावकार येऊनि द्वारीं बैसले । आश्रुपातें भरले नेत्र तेव्हां ॥४८॥

म्हणे देवाधिदेव रुक्मिणीकांता । कैसी विपरीत केली वार्ता ।

काय संसारासि करूं आतां । म्हणवोनि चिंताक्रांत मनीं ॥४९॥

तेव्हां इष्टमित्र आप्तसंबंधीं । रक्षिते जाहले तये संधी ।

कोणी हवाले घेतले त्रिशुध्दी । आपणांसि उपाधी लागावया ॥५०॥

कोणी आपली दाखवूनि पत । आणि कर्ज काढोनि देत ।

तुकयासि करोनि फजीत । काय सांगत तेधवा ॥५१॥

तूं तरी जाहलासि परमार्थी । नाम जपतोसि अहोराती ।

यास्तव संसारी जाहली फजीती । तरी विठ्ठल चित्तीं न धरावा ॥५२॥

विष्णुभक्ति करितां साचार । कोणाचे नाहीं जाहलें बरें ।

सांगत गेले आमुचें पितर । अनुभवें साचार तूं पाही ॥५३॥

संसारयुक्ति मुख्य हें नकळें । आणि नाम जपतोसि सर्वकाळ ।

तरी हे साच भविष्य केवळ । भिकेचे डोहळे तुज आले ॥५४॥

हितास्तव देतो शिकवण । यास्तव अंतरीं कोपाल झणें ।

आमुचें नायकोनि कराल भजन । तरीं अधिकचि ऋण होईल ॥५५॥

ऎसें शिकवोनि त्या अवसरा । वाणी गेले आपुल्यां घरां ।

हळहळ करिती दारा । म्हणती संसारा काय करूं ॥५६॥

घरधनियास जैंपासून । विठोबाचें लागलें ध्यान ।

आम्हीं उठलों माणसांतून । खावयासि अन्न मिळेना ॥५७॥

घरीं कांता ऎशा रीती । नानापरीचे अपशब्द बोलती ।

बाहेर पिशुन सर्व हांसती । परी निश्चय चित्तीं सोडीना ॥५८॥

सप्रेमभावे तये क्षणी । जिव्हा रंगली नामस्मरणी ।

घरीं हळहळ करिती राणी । गेलो म्हणोनि उदिमासी ॥५९॥

चार ढोरें होतीं जाण । रोग होतांचि गेलीं तीन ।

कसोनि पाहे रुक्मिणीरमण । टाकितो भजन काय माझे ॥६०॥

परी अधिकोत्तर भजनांचा । सप्रेम टाहो करीत वाचा ।

सोबती म्हणती त्रास याचा । आला साचार आम्हांसी ॥६१॥

नेणेचि कांही काळवेळ । बडबड करितो सर्व काळ ।

निद्रा नयेचि आळुमाळु । आमुचें कपाळ उठविते ॥६२॥

तुकयासि चुकवोनि निश्चित । सोबती पुढे गेले समस्त ।

मग आरण्यामाजी विष्णुभक्त । भोंवतें पाहत तेधवां ॥६३॥

कोणी दुसरें नाहीं आणिक । रात्र जाहली घटिका एक ।

बैलावरील गोणी देख । खाली पडली तेधवा ॥६४॥

तेव्हां चिंता उद्भवली जाण । म्हणे आतां उचलूं लागेल कोण ।

आकाशी मेघ करी गर्जत । वळला पर्जन्य सभोंवती ॥६५॥

अद्भुत सुटला प्रभंजन । धुळीनें नेत्र झांकले जाण ।

गगनीं कडकडली सौदामिन । तुषार पर्जन्य तेव्हां ॥६६॥

भयानक वन साचार । दिसती श्वापदांचे भार ।

अद्भुत पर्जन्य वर्षतो वर । तेणें दुखवे अंतर तुकयाचें ॥६७॥

मग म्हणे आपुले पोटीं । संसार चांडाळे घेतली पाठी ।

तेणें बहुत जाहलो कष्टी । कोणासि गोष्टी सांगावी ॥६८॥

मायबापें टाकूनि दीधलें मज । बंधु वैरागी जाहला सहज ।

दिवाळें निघालें माझें । तेणें वाटती लाज संसारीं ॥६९॥

मान करीत होते पिशुन । तेचि हांसती करोनि हेळण ।

वाताहत जाहलें धन । खावयासि अन्न घरीं नाहीं ॥७०॥

सोबती गेले चुकवोनी । कोण उचलूं लागेल गोणी ।

म्हणे देवाधिदेवा चक्रपाणी । तुजवीण कॊणी असेना ॥७१॥

मातापिता बंधु चुलता । तूंचि होसी पंढरीनाथा ।

प्राण सांडी होईल आतां । ये अनंता लवकरी ॥७२॥

इष्टमित्र सखा सज्जन । तुज वांचोनि नसेचि आन ।

जैसें अज्ञान बाळक तान्हें । तरी जननीवीण कोण त्यासी ॥७३॥

माझी बळबुध्दि खुंटली जाण । म्हणवोनि करितों तुझें चिंतन ।

जरी तूं नसेसि करुणा घन । तरी हांसते पिशुन सर्वत्र ॥७४॥

ऎसें म्हणवोनि प्रेमळ भक्त । नेत्रीं वाहती अश्रुपात ।

म्हणें विठाबाई अनाथनाथे । मज दिनातें सांभाळी ॥७५॥

ऎसा सप्रेम धांवा ऎकोनि कानीं । पांथस्थाचें रूप धरोनि ।

तत्काळ पावले चक्रपाणी । तुकया लागुनी पुसती ॥७६॥

येव्हढे रात्रींमध्यें जाण । वाट रोधूनि बैससी कोण ।

ऎसे पुसतां मधुसूधन । तयासि वचन बोलतसे ॥७७॥

म्हणे मी वाणी व्यवसायी । गोणी पडिली ये ठायीं ।

उचलावयासी कोणी नाहीं । सोबती सर्वही ते गेले ॥७८॥

ऎकोनि तुकयाचें उत्तर । काय करीत सारंगधर ।

हात लावोनि बैलावर । गोणी सत्वर घातली ॥७९॥

तेणें संतोषे वैष्णव वीर । परी मार्ग न दिसे अंधकार ।

वाटसरू बोले उत्तर । ये सत्वर मज मागें ॥८०॥

निजभक्तासि पांडुरंग मूर्ती । वाट दावी सत्वर गतीं ।

परी वैष्णव मायेनें घातली भ्रांती । म्हणोनि चित्तीं समजेना ॥८१॥

असो पुढें वाट दाविता घननीळ । मागें येतसें भक्त प्रेमळ ।

आले इंद्रायणीच्या जवळ । तों पूर तुंबळ चालला ॥८२॥

तुकयासि चिंता उपजली मनीं । म्हणे कैसी उतरोनि न्यावी गोणी ।

मग म्हणे कैवल्यदानी । ठाव पाहोनि मी येतों ॥८३॥

लीला नाटकी जगज्जीवन । खालीं घातलें सुदर्शन ।

तुकयासि म्हणे मधुसूदन । गोणी उतरणें न लगेचि ॥८४॥

ऎसें म्हणवोनि रुक्मिणीवर । पुढें चालिले स्थिर स्थिर ।

गोणी तैसीच बैलावर । वैष्णव वीर उतरला ॥८५॥

तुकया विस्मित होतसे जीवीं । म्हणे आजि पांथस्थ धाडिला देवें ।

नाहींतरी नव्हतें बरवे । उतरायी व्हावे कैसेनी ॥८६॥

ऎसा विस्मित होता मनीं । तों नवल देखिलें तये क्षणीं ।

गगनीं चमके सौदामिनीं । त्या प्रकाशें करोनी पहात ॥८७॥

पांथस्थ जात होता पुढें । तेंचि चतुर्भुज जाहलें रूपडें ।

तुकयासि ब्रह्मानंद जोडे । निजनिवाडे पहातसे ॥८८॥

कांसेसी दिव्य पीतांबर । कंठीं कौस्तुभ झळके सुंदर ।

गळा वैजयंती हार । श्रीमुख मनोहर जयाचें ॥८९॥

श्याम तनु विराजमान । त्यावरी चर्चिला शोभे चंदन ।

श्रीवत्सांकित भूषणें । मुगुटीं रत्नें लखलखिती ॥९०॥

दिव्य कुंडलें कानीं तळपती । वदनीं दशन हिरे झळकती ।

पायीं तोडरवांक्या वाजती । विस्मित चित्तीं होय तुका ॥९१॥

सौदामिनीच्या तेजें सत्वर । देखिला लावण्य सुखसागर ।

हें तुकयासि दाखविलें चरित्र । परी दृष्टांत न स्फुरे ये ठायीं ॥९२॥

दीपकाच्या प्रकाशेंकरोनी । कैसा पहावा वासरमणी ।

अमृतासि चव यावया लागुनी । साकर घालोनि पहावी ॥९३॥

चक्षुःश्रवा भेटावया निश्चित । विरोळा घालिजे पुढाइत ।

कीं भूतांचि धरोनि संगत । कैलासनाथ पहावा ॥९४॥

कीं अज्ञान भ्रांतीसी प्रतिपादून । कैसे साधकासि होईल ज्ञान ।

षड्वैरियांच्या संगतीनें । शांति-सुख दिसोन नये कीं ॥९५॥

तेवीं सौदामिनीच्या तेजें निश्चिती । सर्वदा न दिसे पांडुरंग मूर्ती ।

देखोनि याची सप्रेम भक्ती । स्वयें श्रीपती प्रगटला ॥९६॥

परी तुका ओळखोनि निजनिवाडे । प्रेमें भेटे येवोनि कोडें ।

यास्तव सौदामिनी तेज करोनि पुढें । दर्शन रोकडें देत असे ॥९७॥

सवेंचि पाहे सावधपणें । तों पांथस्थ पुढें करी गमन ।

उभयतां घरासि येऊन । कोणी उतरोन ठेविली ॥९८॥

ढोराची खटपट करावयासी देखा । गुंतला तेव्हां वैष्णव तुका ।

संधी फावली वैकुंठनायका । गेला भक्तसखा तेथूनी ॥९९॥

असो प्रातःकाळ होतांचि जाण । गांवांत कळलें वर्तमान ।

कीं तुका आला वणजेहून । ढोरें मारून टाकिलीं ॥१००॥

सावकार पिशुन आणि खळ । गृहासि पातले जैसे काळ ।

जैसें क्षत लक्षूनि तात्काळ । येती कावळे टोंचावया ॥१०१॥

परमार्थ प्रपंची साचार । अखंडाकार चाल वैर ।

एक राजहंस ससाणे फार । तैसा विचार तो झाला ॥२॥

कीं बोरबनामाजी साचें । एकचि झाड कर्दळीचें ।

तैशाच परी तुकयाचें । छळण वाचें तें करिती ॥३॥

चार ढोरें होतीं निश्चित । तीन मरोनि गेलीं त्यांत ।

हे श्रीभजनाची प्रचीत । आली निश्चित तुजलागीं ॥४॥

चित्तीं धरितां रुक्मिणीवर । सांग कवणाचें जाहलें बरें ।

हरिश्चंद्र राज सत्वधीर । क्लेश थोर त्या झाले ॥५॥

नळराजा आणि दमयंती । त्यांणीं चित्तीं धरितां रुक्मिणीपती ।

संसारांत झाली विपत्ती । सांगावी किती निजमुखें ॥६॥

एक म्हणती तुकयासि पाहीं । हृदयीं धरिला शेषशायी ।

लौकिक लाज किंचित नाहीं । जाहली सर्वही वाताहत ॥७॥

आम्ही शिकवितों परी हा नायके । तेणेंचि बहुत पावतो हा दुःख ।

कर्ज घेऊनि बुडविले लोक । परी लज्जा शोक यासि नाहीं ॥८॥

ऎसें बोलोनि त्या अवसरा । पिशुन गेले आपुल्या घरा ।

चिंता उद्भवली वैष्णव वीरा । म्हणे या संसारा काय करूं ॥९॥

परमार्थी चित्त प्रपंचीं देह । दों ठायीं जीव वांटला आहे ।

कधीं सोडविसील विठ्ठामाये । करुणा नये तुज कैसी ॥११०॥

पर्जन्य गेला देशांतून । दुष्काळ आला पुढें कठिण ।

मुले माणसें खाण्यावांचुन । होती हैरण सर्वदा ॥११॥

संसार टाकावा कोणावर । तरी आणिक साह्य नसे दुसरें ।

ऎसें म्हणोनि वैष्णव वीरें । चित्तीं विचार योजिला ॥१२॥

कांहीं भांडवल उरलें होतें । त्याच्या मिरच्या तेथें ।

तीन गोण्या भरोनि निश्चित । जाय कोंकणांत तेधवां ॥१३॥

मार्गीं चालतां तये क्षणीं । विठ्ठल नामाचा उमटे ध्वनी ।

सगुण रूप आणोनि ध्यानी । सप्रेम मनीं सर्वदा ॥१४॥

संसाराचा यावा त्रास । म्हणोनि व्यवसाय करीतसे ।

मन विटवावें भलतैसें । धरिली आस यासाठी ॥१५॥

नामरूपीं जडलें चित्त । देहभाव नाहीं किंचित ।

समुद्रतीरीं वैष्णवभक्त । गांवाबाहेर उतरला ॥१६॥

तेथें शिवालय होतें थोर । पुढें वटपिंपळ तरुवर ।

तेथें गोणी लोटोनि सत्वर । स्वहस्तें डोरें बांधिलीं ॥१७॥

गोणी उसवोनियां हातीं । दुकान मांडिले तयेक्षितीं ।

चित्तीं बैसली पांडुरंगमूर्ती । देहाकृती नाठवे ॥१८॥

नरनारी येऊनि जाण । तुकया प्रती बोलती वचन ।

विकावयासि आणिलें केण । याची धारणा सांगावी ॥१९॥

ऎकोनि म्हणे वैष्णव भक्त । तुम्हांसि नाहीं काय विदित ।

लागेल तें न्यावें त्वरित । संकोच चित्त न व्हावें ॥१२०॥

तंव एकें तांदूळ आणिले शेर । ते मोजूनि घेतले सत्वर ।

त्याच्या हिशोबें वैष्णववीर । देत साचार मोजूनी ॥२१॥

वर द्या कांहीं बोलती वचन । ऎकोनि म्हणे वैष्णवजन ।

तुम्हीं आपुल्या स्वहस्तें घेणें । संकोच मनीं न धरितां ॥२२॥

भीत भीत काढा घेती पाहे । म्हणती हातास झोंबेल काय ।

तंव तो तिकडे न पाहे । देहींच विदेही म्हणोनी ॥२३॥

आणि कसा रुके घेऊनी देखा । आल्या तेथें दोघी बायका ।

तयांसि मोजूनि देतसे तुका । म्हणती आणिक दे वर कांहीं ॥२४॥

येरू म्हणे आपुल्या हातें । घेऊनि जावें लागेल तें ।

एक हात घाली भीत भीत । दुसरी बोलत तिजलागीं ॥२५॥

तुकाशेट वाणी भला फार । माप मोजूनि देतसे खरें ।

काढा घेतां दोन्हीं करें । हातासि आणुमात्र झोंबेना ॥२६॥

शब्द बोलोनि ऎशा रीतीं । दोन्हीं हातें काढा वोढितीं ।

परी कांहीं न वर्जी तयांप्रती । लोक पाहती सभोंवतें ॥२७॥

गांवांत जावोनि सांगती कोणी । बाहेत आला तुकाशेट वाणी ।

तो परम भला सुलक्षणीं । हरिभजनीं तत्पर ॥२८॥

मोजणीपरीस साचार । दुप्पट गुणें देतो वर ।

हातासि न झोंबे अणुमात्र । पहा चरित्र दृष्टीसीं ॥२९॥

गांवांत प्रगट जाहली मात । पाहावयसि लोक येत ।

म्हणती हा केवळ भोळा भक्त । कार्य त्वरित साधावें ॥१३०॥

पैका आणावयासि गेलों घरीं । तरी उडोनि जाती वरच्यावरी ।

तुकयासि म्हणती ते अवसरीं । आमुचे मंदिरीं खर्च बहू ॥३१॥

उधार द्याल जरी निश्चित । तरी पैका देऊं मागिल्या हातें ।

लागतील त्या न्या निश्चित । वैष्णव भक्त म्हणतसे ॥३२॥

मोजूनि देतो वैष्णव वीर । स्वहस्तें चौगुणे घेती वर ।

म्हणती राशीपरीस सर्वां फार । गोष्ट अपूर्व हे झाली ॥३३॥

देखोनि त्याचें भोळेपण । मागों लागलें अवघे जन ।

मग दुसरी गोणी उसवोन । स्वहस्तें घेणें म्हणतसे ॥३४॥

एकदांच मागतां सर्वत्र । एकला देऊं कोठवर ।

माझा विश्वास तुम्हांवर । आपुल्या करें घेऊनि जा ॥३५॥

ऎसें बोलतां वैष्णववीर । सर्वत्र एकदाच घालिती कर ।

जैसे उच्छिष्ट पात्रें देखोनि फार । श्वानें निकुरें भांडती ॥३६॥

प्रपंच स्वार्थ करोनि निश्चितीं । एकासी एक गुरगुरिती ।

परी पुढें कैसी होईल गती । विचार चित्तीं नाठवे ॥३७॥

कोणी होते जोरावर । त्यांणी घेतल्या मणभर ।

कोणी आदमण वोढिल्या करें । पांच शेर कोणाशी ॥३८॥

कोणी आदपाव दोन शेर । कोणासि आल्या वोटिभर ।

कोणी घेऊनि बचकभर । जाती सत्वर मंदिरां ॥३९॥

दोन गोण्या ऎशा रीती । मिरच्या लुटोनि नेल्या समस्तीं ।

तों एक महाखळ अवचित्तीं । तुकया प्रतीं बोलत ॥१४०॥

माझें घरीं खर्च थोर । मिरच्या पाहिजेत गोणीभर ।

तुम्हांसि असत्य वाटेल जर । पुसा सत्वर लोकांसी ॥४१॥

ऎकोनि म्हणे वैष्ण्वभक्त । तुमचा विश्वास आहे निश्चित ।

वचन ऎकोनियां त्वरित । नष्ट उचित गोणीतें ॥४२॥

तयासि म्हणे प्रेमळ भक्त । गोणी आणूनि द्यावी त्वरित ।

तो म्हणे साठवण निश्चित । नसे घरांत माझिया ॥४३॥

तुम्ही मागुती याल परतोनी । मग रिती करोनी देईन गोणी ।

ऎशारीती खळ बोलोनी । गेला सदनीं आपुल्या ॥४४॥

अंतरींचा कृत्रिम भाव । सर्वथा नेणे भक्त वैष्णव ।

याच विषयीं तुम्हीं सर्व । दृष्टांत अपूर्व अवधारा ॥४५॥

आज पर्जन्य वर्षेल घटिका । ऎसें जाणती पिपीलिका ।

मग आंडीं काढोनियां देखा । ठिकाणीं आणिका त्या नेती ॥४६॥

आणि लघ्वी करितां भूमीवर । त्याच मुंग्या वाहती पुरें ।

त्यांसि ब्रह्मांडींचा कळे विचार । परी मानवाचें अंतर न जाणती ॥४७॥

तैसें देवाचें मनोगत । तें जाणती प्रेमळभक्त ।

परी दुर्जनाचें कठिण चित्त । तें निश्चित कळेना ॥४८॥

कांहींन द्यावें यालागुनी । मिरच्यासहित नेली गोणी ।

परी तुकयासि त्याचा विश्वास मनीं । कपटखाणी कळेना ॥४९॥

परम संतोष जाहला अंतरा । म्हणे बरा सत्वर जाहला विकारा ।

स्नान करोनि ते अवसरा । रुक्मिणीवरा आठवीत ॥१५०॥

शेर तांदूळ स रुके सजगाणी । रोख इतुकीच जाहली बोहणी ।

तें देखोनियां नयनीं । संतोष मनीं तुकयाच्या ॥५१॥

म्हणे साहित्य तों आलें निश्चित । आतां करावी पाक निष्पत्त ।

पितळी तपेलें घेऊनि त्वरित । घातला भात शिजावया ॥५२॥

जनार्दनचि भरला जनीं । ऎसा निश्चय दृढ मनीं ।

ध्यानांत आणूनि कैवल्यदानीं । नामस्मरणीं डुल्लत ॥५३॥

ऎसी जाणूनि तयाची स्थिती । काय म्हणतसे रुक्मिणीपती ।

याची तो ऎसी उदास वृत्ती । प्रपंच भ्रांती कळेना ॥५४॥

तीन गोण्या साचार । मिरच्या घेऊनि गेले चोर ।

घरीं आडवितील सावकार । मग काय उत्तर देईल त्यां ॥५५॥

ऎसें म्हणोनि भक्तकैवारी । मनुष्यवेष घेत सत्वरी ।

गांवांत जावोनि एके घरीं । मधुरोत्तरीं बोलत ॥५६॥

म्हणे उधार द्यावाजी सत्वर । आम्हांसि जावया जाहला उशीर ।

ते म्हणती तूं कोण साचार । कशाचा उधार मागसी ॥५७॥

ऎकोनि म्हणे सारंगधर । तुकशेट वाणी देहूकर ।

मी विठोजी त्याचा चाकर । आलों उधार मागावया ॥५८॥

यावरी म्हणती स्वार्थी जन । आम्हांसि येर्‍हवीं दीधल्या त्यानें ।

मोजूनि घेतल्या असतील जाण । तरी मागणें साजतें ॥५९॥

यावरी म्हणे वैकुंठपीठ । तो हात तुकेंचि देतो स्पष्ट ।

यास्तव त्यासी तुकशेठ । नांव वरिष्ट बोलती ॥१६०॥

यावरी गांवीचे लोक बोलती । तरी मिरच्या आम्हीं आणिल्या किती ।

जैसें सांगती रुक्मिणीपती । तितुक्याच भरती मोजितां ॥६१॥

ऎसा देखोनि चमत्कार । पैसे आणोनि देती सत्वर ।

भक्तांसाठी सारंगधर । घरोघर फिरतसे ॥६२॥

कोणी आले थोटाईसी । तरी गाळिप्रदानें देतसे त्यासी ।

कोणी परतोनि बोलतां यांसी । उगाच सोशी जगदात्मा ॥६३॥

ज्याचे आंगीं जितुकें लावित । तितुकेंचि वजन भरत तेथ ।

म्हणती तुकाशेट हें नांव सत्य । आश्चर्य करिती जन तेव्हां ॥६४॥

भक्तिभावें भुलला हरी । आपुलें महत्त्व न विचारी ।

रंक होऊनि ते अवसरी । घरोघरीं फिरतसे ॥६५॥

स्वमुखें बोले बाजारांत । गावींचे लोक थोट बहुत ।

उधार मागतां बळासि येत । परी होतील फजीत या गुणें ॥६६॥

कोणी चमत्कार पाहोनी । द्रव्य देताति आणोनी ।

कोणी कज्जासि भिवोनी । देती आणोनी चोहाटी ॥६७॥

ऎशा रीतीं राजीवनेत्रें । उधार उकळिलां सर्वत्र ।

परीं मिरच्या नेल्या गोणीभर । तो एक साचार राहिला ॥६८॥

मनांत म्हणे जगज्जीवन । त्याचे कैसें उगवेल धन ।

दिसतो खळ सर्वांहून । उपाय कोण करावा ॥६९॥

जैसा धान्यामाजी कुचर । न भिजे न शिजे आणुमात्र ।

तैसें खळाचें अंतर । न द्रवे साचार सर्वथा ॥१७०॥

संकट जाणोनि श्रीहरी । उभे राहिले त्याचे द्वारीं ।

सक्रोध होऊनि अंतरीं । कठिणोत्तरीं बोलत ॥७१॥

तुकशेट वाणी देहूकर । मी विठोजी त्याचा चाकर ।

मिरच्या आणिल्या गोणीभर । त्याचा उधार दे आतां ॥७२॥

भला माणूस दिसतो नयनीं । आणी घरीं आणोनि ठेविली गोणी ।

वाट पाहतो माझा धनी । आतां उधरणी देईजे ॥७३॥

ऎसें बोलतां घननीळ । काय उत्तर देतसे खळ ।

चाल तुझ्या धन्या जवळ । म्हणोनि बळें वोढिला ॥७४॥

तुकशेट माझा मित्र जाण । मजवरी केलें यहसान ।

त्याणें काय दीधल्या मोजूनि । आलासि म्हणोनि या ठायां ॥७५॥

ऎसें बोलतां दुर्जनासी । काय म्हणे वैकुंठवासी ।

मी तरी न जाय तयापासी । म्हणेल अपेशी चाकर हा ॥७६॥

तो म्हणे मीं नाहीं देत । कैसा घेतोसि पाहतों येथ ।

देखोनि तयाचें कठिण चित्त । वैकुंठनाथ काय करी ॥७७॥

चर्‍हांट सोडोनि जगन्निवासें । आपलें कंठीं बांधिला फांस ।

म्हणे प्राण देऊनि उदास । अवघ्या गांवास बुडवीन ॥७८॥

निर्वाण देखोनि ते अवसरीं । वाडियांत मिळाल्या नरनारी ।

खळासि फजीत नानापरीं । गांवकरी करिताती ॥७९॥

गोणीभर मिरच्या कोणाकारणें । फुकट देईल ऎसा कोण ।

उगेंचि कां करितोसि भांडण । दे टाकून द्रव्य त्याचें ॥१८०॥

खळ तो म्हणे ये क्षणीं । घेऊनि जा भरली गोणी ।

मग म्हणे कैवल्यदानी । आधींच कां घेऊनी आलासी ॥८१॥

ऎसें म्हणोनि सारंगधर । स्वहस्तें खांडासि लाविला दोर ।

गरगरां फिरवितसे नेत्र । लोक सर्वत्र पाहाती ॥८२॥

जयाची मुर्ति हृदयसंपुटीं । एकांती ध्यातो धूर्जटी ।

तो तुकयाचे भक्तीसाठीं । पाश कंठी बांधित ॥८३॥

अष्टांगयोग साधिती हटी । परी कदापि न पडे त्यांच्या दृष्टीं ।

तो भक्तिपाश वागवी कंठीं । नवल पोटीं मज वाटे ॥८४॥

ज्याची प्राप्ति व्हावया कारणें । महर्षि करिती अनुष्ठानें ।

तो भक्तकार्यास्तव जाण । घेत बांधोन जगदात्मा ॥८५॥

तो कमलोद्भवाचा पिता होय । इंदिरा ज्याचे ध्यातसे पाय ।

जो नारदादिकांचे गेय । बांधला जाय भक्तीनें ॥८६॥

असो आतां अनुसंधान । सादर ऎका भाविक जन ।

गांवकरी भयभीत होऊन । खळकारणें ताडिती ॥८७॥

म्हणती यानें प्राण दीधला जर । तरी आमुचा गांव बुडेल समग्र ।

म्हणोनि लाताबुक्या वर । मारिती सर्वत्र त्यालागीं ॥८८॥

जनीं जनार्दन भरला निश्चित । नानाप्रकारें केला फजीत ।

मिरच्या मोजूनी समस्त । द्रव्य देववित गांवकरी ॥८९॥

इतुकें कार्य करोनि जाण । बंधन सोडित जगज्जीवन ।

समस्त उधार एकत्र करून । आणिक विंदान काय करी ॥१९०॥

चौधरियाच्या रूपें त्वरित । तुकयासि म्हणे वैकुंठनाथ ।

आपुलें घ्याजी द्रव्य त्वरित । येरू म्हणत कशाचें ॥९१॥

मग म्हणे सारंगधर । मिरच्या गांवांत दीधल्या उधार ।

तें द्रव्य उकळोनि समग्र । आलों सत्वर या ठायां ॥९२॥

प्रेमळ भक्त म्हणे तया । म्यां येर्‍हवीं दीधल्या वांटावया ।

चौधरी म्हणे कासया । पाहिजे वायां तुमचें ॥९३॥

आम्ही गृहस्थ नामांकित थोर । काय उणें ईश्वरें ।

मग द्रव्य गांठोडी समग्र । ठेविली सत्वर त्यापुढें ॥९४॥

स्वस्थानीं बैसतांचि जाण । प्रेमळ भक्त तयासि म्हणे ।

पैलते सारुके घेऊन । आणूनि देणें घृत आम्हां ॥९५॥

अवश्य म्हणोनि ते अवसरीं । तेथूनि निघाला चौधरी ।

घृत आणिलें तांब्याभरी । तुका अंतरीं विस्मित ॥९६॥

म्हणे आज्य बहु दिसताहे । ऎकोनि म्हणे पंढरीराय ।

घृत बहुत स्वस्त आहे । उणें काय या गांवीं ॥९७॥

चौधरियासि म्हणे ते अवसरीं । पाकनिष्पत्ती जाहली बरी ।

येथें भोजन कराल जरीं । संतोष अंतरीं मज होय ॥९८॥

देखोनि भक्ताचा शुध्दभाव । अवश्य म्हणे देवाधिदेव ।

तों अतीत रूप धरूनी अपूर्व । सदाशिव काय म्हणे ॥९९॥

शिवालयासमोर बैसोनि देखा । म्हणे मी अतीत बैसलों भुका ।

पंक्तीचा लाभ आम्हांसि देकां । ऎकोनि तुका संतोषे ॥२००॥

चौधरी अतीत भक्त प्रेमळ । पंक्तीसि जेविले ते वेळ ।

मुखशुध्दि तुळसीदळ । देत तत्काळ त्यांलागीं ॥२०१॥

तुकयाची भक्ती देखोनी । शिव-विष्णु जेविले दोन्ही ।

अतीत जातां त्यालागोनी । आशीर्वचनीं गौरवी ॥२॥

सनाथ करोनि प्रेमळ भक्त । चौधरी तो जाहली गुप्त ।

तों गावींचे लोक मिळाले तेथ । देखोनि बोलत तुकयासी ॥३॥

तुकशेट तुम्ही भक्त वैष्णव । वाचेसि जपतां हरीचें नांव ।

आजि बुडविला होता आमुचा गांव । काय सांगावें ये स्थिती ॥४॥

एकासी एक बोलती वचन । आधीं साधुत्व दाविलें यानें ।

येर्‍हवीं वांटितों म्हणवून । गेले घेऊन गांवकरी ॥५॥

जैसा बकध्यान धरी निश्चित । मत्स्य येतांचि गिळी त्यांतें ।

तैसा तुकशेट साधु दिसत । तुम्हां सर्वांते कळों द्या ॥६॥

ऎसें गांवींचे थोर लहान । परस्परें बोलती वचन ।

तुका विस्मित होऊनि मनें । एका कारणें पुसतसे ॥७॥

मग तों सांगे सविस्तर । विठोजी माणूस तुमचा चाकर ।

त्याणें फिरोनि घरोघर । भांडोनि उधार उकळिला ॥८॥

गोणीभर मिरच्या नेल्या ज्यानें । तो नेदीच कांहीं त्याजकारणें ।

मग तेथें तुमच्या चाकरानें । गळफांस जाण घेतला ॥९॥

गलबला ऎकोनि थोर । ग्रामवासी मिळाले समग्र ।

मग खळासि लाता बुक्यावर । तोंडावर हाणिती ॥२१०॥

तयासि फजीत करोनि बरवें । जाहला हिशोब देवविला सर्व ।

नाहीं तरीं तो देतां जीव । बुडतां गांव यासाठीं ॥११॥

ऎसा सांगतांचि वृत्तांत । विस्मित चित्तीं वैष्णव भक्त ।

म्हणे असत्य म्हणावी जरी मात । तरी उधार समस्त आला कीं ॥१२॥

सत्य म्हणावें जरी कांहीं । तरी म्यां माणूस ठेविलें नाहीं ।

असो हरीची माया वैष्णवी । लीला दावी ते कळेना ॥१३॥

अहो भक्तलीलामृत ग्रंथ सार । हाचि मानससरोवर ।

सभाग्य श्रोते प्रेमळ चतुर । ते महर्षि थोर ये ठायीं ॥१४॥

यांसि पुजावें कवणे रीतीं । जेणे साधु संतुष्ट होती ।

ऎसे कवीचि ये मती । विचार चित्तीं आठवे ॥१५॥

प्रांजळ ओव्या सुमनें बरीं । हार गुंफोनि नानापरी ।

महीपती होऊनि फुलारी । वैष्णव मेळीं तिष्ठत ॥१६॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । सत्ताविसावा अध्याय रसाळ हा ॥२१७॥ ॥ अ० २७॥ ओव्या ॥ २१७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP