मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ११

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

जो अनंत लावण्याची खाणी । सकळ सौंदर्य ज्यापासुनी ।

जो पांडुरंग कैवल्यदानी । करद्वय जघनीं ठेविलें ॥१॥

ज्याचे सत्तेनें सकळ । प्रकाशे चंद्र आदित्य मंडळ ।

तो सगुण रुप धरोनि सांवळें । उभा घननीळ पंढरीसी ॥२॥

चक्षुःश्रवा ज्याचा तल्पक । जो शेषशायी रमानायक ।

तो विटेवरी उभा राहोनि देख । सप्रेम सुख भोगीतसे ॥३॥

ज्याचें ध्यान हृदयसंपुटीं । एकांतीं करीतसे धूर्जटी ।

तो पुंडलीकाच्या भेटीसाठीं । भीमातटीं वास करितसे ॥४॥

अष्टांगयोग साधितां नाना । जो न येचि योगियांच्या ध्याना ।

ज्याच्या इच्छेनें विश्व रचना । नासोनि पुनः पुन्हाः होतसे ॥५॥

विधाता बाळ होऊनि पोटिंचा । सर्वथा पार नेणे ज्याचा ।

तो अंकित जाहला भाविकांचा । पुंडलिकाचा वरदानी ॥६॥

ज्याच्या आज्ञेनें निश्चित । भक्तलीलामृत होत ।

तो आपल्या दासाची रुक्मिणीकांत । सत्कीर्ति प्रख्यात करितसे ॥७॥

मागिले अध्यायीं कथा अद्भुत । चांगदेव जाहले समाधिस्थ ।

द्वादश वर्षे लोटतां तयातें । मागुतीं पुत्रा तें भेटले ॥८॥

आतां पंजाब देशामध्यें जाण । परमज्ञानी नानक सुजाण ।

वैराग्य होतांचि त्याजकारणें । तों आडवें विघ्न एक दिसे ॥९॥

तें म्हणाल जरी कवणे रीतीं । तरी पदरीं बहुत धन संपत्ति ।

ते खर्चेल आतांचि कवणे रीतीं । मग विचार चित्तीं करीतसे ॥१०॥

द्रव्यापासीं अति अनर्थ । द्रव्यापासीं प्राणघात ।

द्रव्य मिळतांचि विरक्त । तरी विषयासक्त तो होय ॥११॥

द्रव्य आशा धरिली जरि । तरी सुखे बंधु होती वैरी ।

द्रव्यें मित्र होतसे दुरी । विकल्प अंतरीं शिरतसे ॥१२॥

द्रव्यापासीं होतसे कुबुद्धी । द्रव्यें भ्रंशे साधकाची बुद्धी ।

द्रव्यासि चोर जपती आधीं । प्राणांत संधी ते करिती ॥१३॥

द्रव्यासि परचक्राचें भय । द्रव्यवानासि राजा नागविताहे ।

द्रव्यवान संसारिक आहे । तरी दरवडा येत यावरी ॥१४॥

द्रव्य आशा धरितां मनें । तरी विरक्तासि निंदिता जन ।

द्रव्य प्रतिग्रह घेतांचि जाण । तरी पदरींचें पुण्य तें वेंचे ॥१५॥

बहुत काय विस्तार । भाविक प्रेमळ वैष्णव वीर ।

त्यांसि द्रव्य मिळतां साचार । पडतसे विसर देवाचा ॥१६॥

द्रव्यवानासि चित्तीं तळमळ । द्रव्य जतन व्हावयाची हळहळ ।

द्रव्यवान अतृप्त सर्वकाळ । विघ्नदायक सबळ द्रव्यचि कीं ॥१७॥

ऐसें म्हणोनि नानक सधन । म्हणे कैसें खर्चेल धन ।

तेव्हां उपाधि विरहित होऊन । श्रीहरि भजन करावें ॥१८॥

ऐसें चित्तीं विचारुनी । मग देवालयासि काम लाविलें त्यांनीं ।

हे अविंध राजें देखोनि नयनीं । द्वेष त्या मनीं उपजला ॥१९॥

कळिकाळ हा दुर्धर केवळ । यवन राजा दुर्बुद्धि खळ ।

देउळें पाडुनी सकळ । न चलेचि बळ कोणाचें ॥२०॥

ब्राह्मण बैरागी विष्णुभक्त । तयांसि उपद्रव करिती बहुत ।

नानकाच्या कानासि आली मात । कीं देऊळें समस्त विध्वंसिली ॥२१॥

ऐकोनि विक्षेप पावलें मन । म्हणे यासि उपाय करावा कवण ।

नानापरीचें त्रिविध जन । प्रकृति भिन्न सकळांच्या ॥२२॥

सृष्टींत अनंत जडजीव किती । त्यांचे स्वभाव नाना रीतीं ।

मनुष्य विष्ठेची चिळस घेती । ते पशु भक्षिती प्रीतीनें ॥२३॥

बचनाग खातां जिवें मरती । हे तो सकळांस असे प्रतीती ।

तरी त्या माजीं जे किडे निपजती । ते कैसे वांचती सुरवाडे ॥२४॥

कोणाचा आहार असे पवन । कोणी प्रीतीनें सेविती अन्न ।

कोणी खावोनि वांचलें तृण । जळापासोन एक होती ॥२५॥

जीव मारोनि सायासें । तमोगुणी ते भक्षिती मांसें ।

जीव जीवाचा आहार असे । संशय नसे यांत कांहीं ॥२६॥

चैतन्य बिंबलें सर्व देहीं । हा सिद्धांतीं निर्णय केला पाहीं ।

परी प्रकृति भिन्नाकार दावी । हेचि नवायी अगाध ॥२७॥

मोहरी कांदा ऊंस सत्वर । एक्याच वाफ्यांत पेरिती नर ।

परी त्याज ऐसें होऊनि नीर । उठे अंकुर बीज ऐसा ॥२८॥

तैशाच परी चैतन्यनाथ । प्रकृति ऐसा देहीं दिसत ।

ज्याचा तया सारिखा होत । आग्रह किंचित करीना ॥२९॥

ज्याचा स्वभाव जैशा रीतीं । आपणहीं धरावी तैसीच स्थिति ।

ऐसा निश्चय करोनि चित्तीं । मग नानक पुसती लोकांतें ॥३०॥

अविंधासि देऊळ नावडे पाहे । द्वेष मनीं उपजत आहे ।

तरी त्याच्या चित्तासि आवड काये । हेंचि लवलाहें सांगावें ॥३१॥

लोक म्हणती तये संधीं । यवनासि आवडे मसीदी ।

तरी ते आपण नेईजे सिद्धि । आग्रह बुद्धी कासया ॥३२॥

हिंदूसि आवडती सगुण मूर्ती । अविंध निर्गुण मसीदी स्थापिती ।

तरी आपण कोणती करावी गती । नानक चित्तीं विचारित ॥३३॥

म्हणे देउळें रचितां मोडिती खळ । आणि मसीदी राहती चिरकाळ ।

तरी यवनाच्या मनींचा भाव केवळ । तेंचि तत्काळ करावें ॥३४॥

ऐसा विचार करुनि बरा । बोलाविलें पाथरट कारेगरां ।

म्हणे आतां मसीदी सिद्ध करा । आज्ञा सत्वरा केली असे ॥३५॥

मसीदीसि काम लाविल्यावर । यवन चित्तीं हर्षले थोर ।

म्हणे नानक द्रव्य वेंचूनि समग्र । होईल फकीर आमुचा ॥३६॥

आपुला संप्रदाय भला साचा । प्रारंभ मांडिला मसीदीचा ।

ऐसेंच खळ बोलती वाचा । भाव अंतरींचा नकळती ॥३७॥

स्वयातीचे लोक निंदिती देख । म्हणती भ्रष्टला नानक ।

देउळें मोडोनि सकळिक । मसीदी अनेक बांधितो ॥३८॥

किंकर्‍यासि बैसतां दोन घाय । तैसेंचि जीवासि वाटताहे ।

म्हणे आतां उभयतां बैसेल सोय । तैसाचि उपाय रचावा ॥३९॥

मग देउळें मसीदी मोडून । बहुत बांधिले सेतखाने ।

ऐसी युक्त देखोनि जनें । मग सकळ जन हांसती ॥४०॥

हिंदु मुसलमान मिळोनि पाहे । नानकासि म्हणती केलें काय ।

म्हणे उभयतांची होईल सोय । तोचि उपाय म्यां केला ॥४१॥

ज्ञानी निर्गुण लक्षिती कोडें । भक्तांसि आवडे सगुण रुपडें ।

स्वमतेम उभयतां करिती बडबड । परी सर्वथा न निवडे वाद यांचा ॥४२॥

एक म्हणती थोर शंकर । त्यासि उपासि जे निरंतर ।

एक म्हणती मिथ्या विचार । रचिलें चराचर ब्रह्मयानें ॥४३॥

विधातयाची सृष्टी आवघी । हे तों पुराणीं येतसे गाही ।

त्या ब्रह्मयासि ध्यातांचि पाहीं । मनोरथ सर्वही पूर्ण होती ॥४४॥

तंव वैष्णव म्हणती सप्रेम बळें । विधाता विष्णूच्या पोटिंचें बाळ ।

तो देवाधिदेव घननीळ । सर्वकाळ भजावा ॥४५॥

सौर म्हणती सूर्यचि थोर । प्रकाश पाडितो जगावर ।

हा नसता तरी साचार । अंधकार सर्वदा ॥४६॥

याज्ञिक म्हणती तयें क्षणीं । वासव श्रेष्ठ सर्वांहुनी ।

तयाच्या आज्ञे करोनी । मेघ धरणी निववीतसे ॥४७॥

मेघापासूनि अन्न निपजत । अन्नापासोनि निपजती भूतें ।

कर्म कांडाचेनि मतें । याज्ञिक घालिती वाद ऐसा ॥४८॥

कर्म उपासना आणि ज्ञान । विभागित वेदो नारायण ।

तीन कांडेंही महर्षी मिळोन । वेगळीं निवडोन काढिती ॥४९॥

जें कां जयाच्या मुखोद्गत । तोंचि साच तयासि भासत ।

न पाहतांचि सिद्धांत । वाद घालीत परस्परें ॥५०॥

ऐसा त्रिविध जनाचा विचार । बोलों जातां आयुष्य न पुरे ।

आतां सकळ धर्म टाकोनि सत्वर । चित्तीं ईश्वर भजावा ॥५१॥

द्रव्याची उपाधि होती पाहे । तेथेंचि गुंतोनि मन राहे ।

म्हणोनि देवालयाची रचिली सोय । परी ते मनासि न ये यवनाच्या ॥५२॥

त्याच्या मनोगतास्तव साचें । काम लाविलें मसीदीचें ।

तव चित्त क्षोभोनि स्वयातीचें । निंदिती वाचें आम्हांसी ॥५३॥

इकडे आड इकडे विहिर । मग आणिक विचार योजिला सार ।

तुम्हां उभयतांसि साचार । सेतखाने फार बांधिले ॥५४॥

तुम्हां उभयतांच्या उपयोगी पडे । तैसेंचि आम्ही पुरविलें कोडें ।

सेतखाने बांधिलें उदंड । निज निवाडे त्यांत हगा ॥५५॥

नानक बोलतां ऐशा रीतीं । हिंदु मुसलमान दोघे हांसती ।

आश्चर्य करोनियां चित्तीं । मग घरासि जाती आपुल्या ॥५६॥

शुद्ध सात्त्विक वैराग्य बळ । नानकें षड्‌वैरी जिंकिले सकळ ।

शांति क्षमा होवोनि अचळ । वेष तत्काळ पालटला ॥५७॥

आभरणें ऐसीं लेतसे आंगीं । नव्हे फकीर ना बैरागी ।

दोहींच्या समान मध्यभागीं । ऐसाचि जगीं वेष दावी ॥५८॥

अविनाश भक्ति जे निर्गुण । तेचि स्थापिली असे त्यानें ।

आपणचि स्वरुप होऊन । सकळ देहभान सांडिलें ॥५९॥

आठरा वर्णांचे शेष निश्चिती । सद्भावे कोणी शरण येती ।

कांहीं अनुमान न करितां चित्तीं । अनुग्रहचि देती तयासी ॥६०॥

देखोनि निंदिती जनलोक । म्हणती आपला धर्म टाकिला सकळिक ।

या वेगळा वेष आणिक । घेवोनि सुखें वर्तत असे ॥६१॥

एक म्हणती मंत्रें चळला । म्हणोनि ऐसा विदेही झाला ।

सत्कर्मीं पैका नाहीं लाविला । सेतखाने त्याला आवडती ॥६२॥

उदंड झाले भाग्यवान । हिंदु आणि मुसलमान ।

परी नगरांत सेतखाने बांधिले कोणें । यांजवांचोन सर्वथा ॥६३॥

तंव कोणी एक उत्तर देती । व्यर्थ का निंदितां तयाप्रती ।

हगावयाची अडचण होती । उत्तम युक्ति केली यानें ॥६४॥

बाया बापुडया शौचासि जाती । कोणी न उठवी तयांप्रती ।

तेव्हां नानकासि आशिर्वाद देती । ऐसें दुर्मती एक म्हणे ॥६५॥

संतांचा अघटित विचार । कोणासि न घडेचि साचार ।

ऐसें न जाणोनि पामर । मग दुरुत्तरें बोलती ॥६६॥

परी नानकासि त्याचें सुख दुःख नाहीं । अलक्षीं लक्ष सर्वदाही ।

म्हणोनि देहींच असतां विदेहीं । जनापवाद कांहीं न गणी तो ॥६७॥

वारण जातां बिदींतून । मागें पुढें भुंकती श्वान ।

परी तो तेथेंच न घाली मन । स्थिर गमन चालतसे ॥६८॥

कां आगस्त मुनीसि देखून । समुद्र अट्टाहास्यें करी गर्जन ।

परी तो चित्तीं धरोनि मौन । करीत अनुष्ठान निज निष्ठे ॥६९॥

तेवीं जननिंदेचें येती लोट । शांतिसागरीचें भरिती घोंट ।

काम क्रोंधांचीं मोडली वाट । करणी अचाट तयाची ॥७०॥

असो आतां तये वेळ । स्वयातीचे लोक सकळ ।

अविंध राजा दुष्ट खळ । गेला तत्काळ त्यापासीं ॥७१॥

म्हणती हिंदु धर्म टाकोनि देख । आणिकचि पंथ धरिला नानके ।

तरी तयासि सांगोनि तात्कालिक । स्वधर्म अनेक आचरावें ॥७२॥

ऐसें सांगतां खळ दुर्जन । क्रोधें कांपतसे तो यवन ।

मग मठासि सांगोनि पाठविलें त्यानें । स्वधर्म आपुला चालवी ॥७३॥

नानक रायाचें नायके वचन । साकी पाठविली एक लिहून ।

तेचि ऐका संत सज्जन । सिद्धांत कथन त्यामाजी ॥७४॥

साकी । एक मट्टीके भांडे । वासे कवण शुद्ध कवण पांडे ।

कब कबीरा पढो गायत्री । कब रोहिदास पुराणा ।

कवण वेदसो नामा उद्धरे । जीनो आत्माराम पच्छना ॥१॥

धनपति अवर धना जाट । सेना जातको न्हाई ।

महा पातकी अजामेळ उद्धरो । जिणें पुत्र सौहेत लगाई ॥२॥

झूटे करम करे सो झूटा । हरि सुमरे सो साचा ।

नानक सबनीच सोनीचा । हरि सुमरण सो साचा ॥३॥

ओवी ॥ एक माती पासोन जाण । घागरी वेंळण्या आणि रांजण ।

त्यांत दृष्टि पाहतां उघडोन । तों मृत्तिकेवांचोन अन्य नसे ॥७५॥

तैसे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य याती । शूद्रादिक अठरा वर्ण होती ।

नामें भिन्न परी एक चैतन्य मूर्ती । द्वैत चित्तीं न भासे ॥७६॥

मुकुट कुंडलें कर कंकण । ही वेगळाली नामाभिधानें ।

अंतर दृष्टीनें पाहतांचि जाण । तंव ते सुवर्ण एकचि ॥७७॥

कां वटबीज तो अल्प लहान । परी त्याज पासोनि शाखा पल्लव जाण ।

खोलीं व दृष्टीं विचारोनि घेणें । तरी ब्रह्मरुपपणें विश्व सर्व ॥७८॥

सर्व विष्णुमयं जगत्‌ । हें श्रुति वाक्य असे निश्चित ।

ते मज अनुभवा आली प्रचीत । कल्पना द्वैत नसेची ॥७९॥

श्रीहरीसि रिघतां शरणागत । सकळ स्वधर्म आले त्यांत ।

नामस्मरण करोनि निश्चित । अनंत भक्त उद्धरिले ॥८०॥

कबीर तो जातीचा यवन । गायत्री मंत्र सर्वथा नेणे ।

करितां श्रीरामाचें भजन । ब्रह्मरुप पूर्ण तो जाहला ॥८१॥

रोहिदास तो चर्मक निश्चितीं । शिकला नाहीं पुराण व्युत्पती ।

करुनि श्रीकृष्ण प्राप्ती । तरला क्षिती वैष्णव तो ॥८२॥

नामा तो शिंपी जातीचा पाही । तयासि वेदाचा अधिकार नाहीं ।

हरि कीर्तनेंचि तरला तोही । माया वैष्णवी अनिवार ॥८३॥

धना जाटाचें शेत आलें । न पेरीतांचि उगवले ।

तेणें हरि स्मरणावीण साधन भलें । नाहीं केले सर्वथा ॥८४॥

सेना न्हावी जातीचा नीच । तयासि संकट पडतां साच ।

श्रीहरीनें रुप धरुनि त्याचें । दासत्व रायाचें केलें कीं ॥८५॥

महा पातकी अजामिळ । त्यांचा मांडिला अंतकाळ ।

नारायण स्मरतांचि बाळ । तोही तत्काळ उद्धरिला ॥८६॥

खोटें कर्म करितसे जनीं । तोचि लटका सर्वांहूनी ।

श्रीहरीस स्मरे निशिदिनीं । तरी श्रेष्ठ त्याहोनी अन्य नसे ॥८७॥

पत्र पाहतां यवन भूपती । परम संतोषला चित्तीं ।

परी कांहीं पहावी करामती । म्हणोनि मागुतीं क्रोधावला ॥८८॥

म्हणे मी सार्वभौम नृपनाथ । आमुचें वचन नायके सत्य ।

मग सहस्त्र पठाण पाठविलें तेथें । म्हणे तयाते धरोनि आणा ॥८९॥

ऐसी आज्ञा होतांचि सत्वरी । मग शस्त्रें अस्त्रें घेवोनि करीं ।

रायाचें सैन्य ते अवसरीं । मठा बाहेरी पातलें ॥९०॥

आंत प्रवेशावया निश्चितीं । पठाण चित्तीं विचार करिती ।

हें नानकासि समजलें चित्तीं । मग काय युक्ती करीतसे ॥९१॥

वैष्णवी मायेचें करितां चिंतन । तो अघटित जाहले विंदान ।

प्रगटलें दहा सहस्त्र सैन्य । शस्त्रें आभरणें घेवोनियां ॥९२॥

उल्हट यंत्राचे भडिमार । असंख्यात सोडिती शर ।

रायाचे आले परचक्र । तें भिऊनि सत्वर पळाले ॥९३॥

यवनापासीं पठाण समस्त । जावोनि सांगती वृत्तांत ।

दहा सहस्त्र सैन्य तेथ । अकस्मात प्रगटले ॥९४॥

नानकाच्या मठा बाहेर । येऊनि आम्हांसि दीधला मार ।

ऐसा देखोनि चमत्कार । मग आलो सत्वरा पळोनि ॥९५॥

ऐसें ऐकोनि भूपती । परम अनुतापला चित्तीं ।

म्हणे दुर्जनाची ऐकोनि कुमती । सिद्धपुरुषा प्रतीं छळिलें म्यां ॥९६॥

इतुके म्हणवोनि राजा यवन । हात बांधोनि रुमालानें ।

नानकाच्या मठासि येऊन । केलें नमन सद्भावे ॥९७॥

म्हणे मी अपराधींच पुरा । तुम्हांसि छळिले या अवसरा ।

ते क्षमा करोनि योगेश्वरा । अभय सतरा मज द्यावें ॥९८॥

तुम्ही तिसरा स्थापिला पंथ । तो सुखें करावा संप्रदाय युक्‍त ।

ऐसें म्हणवोनि नृपनाथा । मंदिरा त्वरित तो गेला ॥९९॥

इतुकी सिद्धाई दाखवितांचि त्यांनीं । बहुत सत्कीर्ति प्रगटली जनीं ।

सकळ वर्णयाती येऊनि । अनुग्रह कानीं संपादिती ॥१००॥

कोणी धनवंत सावकार । त्यांनीं मठ बांधोनि दीधला थोर ।

अन्न शांति होतसे फार । पदार्थ भरपूर ते ठायीं ॥१॥

शिष्य संप्रदायी बहुत जन । परीं प्रपंच्याकडे त्यांचें मन ।

त्यांमाजी निधडे निवडले दोन । नामाभिधान तें ऐका ॥२॥

एकाचें नाम असे सुत्रा । मर्दाना शिष्य तो दुसरा ।

चित्तीं अनुताप धरोनि बरा । सर्व संसारा त्यागिलें ॥३॥

तन मन आणि सकळ धन । केलें सद्गुरुसि अर्पण ।

प्रपंच्याकडे न वळेचि मन । निश्चय परिपूर्ण तयांचा ॥४॥

जाणोनि स्वामींचें मनोगत । सेवेसि तिष्ठती दिवस रात ।

इच्छिला पदार्थ आणोनि देत । कृपा बहुत संपादिली ॥५॥

कांहीं दिवस लोटतांचि जाण । नानक जाहले उदासीन ।

म्हणे थोर उपाधि वाढली गहन । तरी त्याग करणे सत्वर ॥६॥

घराश्रम परिस निश्चित । मठाश्रम दुर्घट बहुत ।

उपाधि टाकितां अधिक वाढत । फळ संचित देतसे ॥७॥

ऐसें म्हणोनि ते अवसरीं । मग तेथोनि निघाले सत्वरी ।

सुत्रासि ठेविलें मठाभीतरीं । मर्दाना बरोबरी घेतला ॥८॥

नानक म्हणतसे आपुलें चित्तीं । मक्केंत आहे श्रीविष्णुमूर्ती ।

ती यवनानें घातली पालथी । वार्ता बोलती जनलोक ॥९॥

तरी आपण जाऊनियां तेथ । दृष्टीनें पाहावा वैकुंठनाथ ।

ऐसें म्हणवोनी चित्तांत । पंथ क्रमित लवलाहें ॥११०॥

गुरु शिष्य मार्गीं चालतां । तों वाटेवर लागली एक सरिता ।

नदी तुंबळ भरोनि जातां । मर्दाना चिंताक्रांत मनी ॥११॥

अलख निरंजन बोलोनि उत्तर । नानक चालती उदकावर ।

शिष्य मागेंचि राहिला दूर । मग जोडोनि कर विनवीतसे ॥१२॥

म्हणे मज तरणोपाय कांहीं । स्वामी सांगिजे लवलाहीं ।

परम भय वाटतें जीवीं । तरेन केवी जळांत ॥१३॥

ऐकोनि सच्छिष्याची ग्लांती । सरिते माजी उभे राहती ।

म्हणे सद्गुरुस्मरण करावें चित्तीं । मग उदक निश्चितीं बुडविना ॥१४॥

ऐकोनि नानकाचे बोल । सद्गुरुस्मरण करीत चाले ।

भांडया इतुकें निर जाहलें । मध्यभागी गेले सरितेच्या ॥१५॥

अलख निरंजन म्हणवोनि । नानक बोलिले तये क्षणीं ।

तयासि घोटया इतुकें पाणी । शिष्य देखोनि विस्मित ॥१६॥

म्हणे मज साधारण मंत्र सांगोन । आणिकचि स्मरण करिती आपण ।

मग सद्गुरुचें स्मरण टाकोन । अलख निरंजन म्हणतसे ॥१७॥

तों एकाएकीं तये क्षणीं । कंठा इतुकें जाहलें पाणी ।

बुडालों बुडालों म्हणवोनि । सद्गुरुलागोनी हांक मारी ॥१८॥

नानक पाहती परतोन । म्हणती करावें सद्गुरु भजन ।

आम्हीं करुं तें तुज कारणें । नये होवोनि सर्वथा ॥१९॥

मग गुरुगुरु म्हणवोनि सत्वरा । मर्दना गेला पैलतीरा ।

स्वामीनें संकेत सांगितला खरा । विश्वोद्धारा लागोनी ॥१२०॥

सद्गुरु सांगती तें करावें । परी त्याज ऐसें आपण न करावें ।

सवेंचि फळ येतसे बरवें । जीवें भावें अनुसरतां ॥२१॥

असो आतां ते अवसरीं । गुरु शिष्य गेले पैलतीरीं ।

म्हणे स्वामींनीं सांगितली बरी । युक्ति थोरी मजलागीं ॥२२॥

समुद्र जीवनीं याच युक्तीं । बेटावरी जावोनि उभयतां बैसती ।

तों मक्केंत अविंधें विष्णूची मूर्ती । घातली पालथी कलियुगीं ॥२३॥

पुढें मसीद करोनि थोर । तेथें ठेविले मुजावर ।

तेथें गेलिया हिंदु फकीर । तरी जीव सत्वर ते घेती ॥२४॥

वेगळी करुनि यवन यात । जरी तेथें गेला विष्णुभक्त ।

तरी श्रीविष्णु मूर्ति उठेल निश्चित । जाऊं न देत यासाठीं ॥२५॥

अटके पासोनि पुढें जाण । बिकों न देती हिरवें अन्न ।

गुरांच्या अस्थि मेळवून । विहिरी बांधोन काढिल्या ॥२६॥

वोहोळ नदींच्या तीरीं पाहीं । हडकें रोवलीं ठायीं ठायीं ।

सिजल्या अन्नावीण पाही । विकत कांही मिळेना ॥२७॥

ऐसें यवनांचें प्राबल्य बहुत । तरी नानक कैसे पातले तेथ ।

हे आशंका वाटेल चित्तांत । तोहीं वृत्तांत अवधारा ॥२८॥

सिद्ध पुरुषाची अकळलीला । अदृश्य जातां न दिसती डोळां ।

यास्तव मक्केंत प्रवेश झाला । गुप्त रुपें प्रगटला ते ठायीं ॥२९॥

मसीदींत मुजावरी ठेविले यवनें । तों नानकासि देखतां आश्चर्य मन ।

म्हणती तुम्ही कोठील कवण । आम्हां कारणें सांगिजे ॥१३०॥

नानक म्हणतसे तयांप्रतीं । ज्यांपासोनि प्रळय उत्पत्ति स्थिती ।

त्या सर्वांचें कारण मीच निश्चितीं । प्रकाश ज्योती अवतरलों ॥३१॥

जो सर्व करोनि अकर्ता । त्रिगुणती तमा ये परता ।

तोचि मी जाण तत्वतां । येथें अवचिता प्रगटलों ॥३२॥

अक्षर तें व्यापक सर्वांत । अक्षर वेगळें मायातीत ।

तोचि मी लोकांच्या हितार्थ । मृत्युलोकांत अवतरलों ॥३३॥

जो निर्गुण निराकार जाण । अवतार धरि भक्ताकारणें ।

तो लीला विग्रही जगज्जीवन । अद्वैतपणें मी असें ॥३४॥

ऐकोनि म्हणती मुजावर । गोष्टी बोलतां थोर थोर ।

आम्हांसि अजमत दाखवाल जर । तरी सत्य उत्तर हें मानूं ॥३५॥

हिंदूंचें दैवतचि विष्णू मूर्ती । ये स्थळीं होती जाण निश्चितीं ।

ती यवन राये घालूनि पालथी । मसीद भिंती रचियेल्या ॥३६॥

सर्वांचें कारण म्हणतां आपण । तरी मूर्ति उलटी करुन दावणें ।

तरीच सत्य मानूं बोलणें । ऐसें तें वचन बोलिले ॥३७॥

हें नानकें ऐकोनि वचनोक्ति । मग विष्णुमूर्तीची करितसे स्तुती ।

जय क्षीराब्धिवासा श्रीलक्ष्मीपती । व्यापक त्रिजगतीं तूं एक ॥३८॥

जय जय हरिहरेश्वरा । विधिजनका दीनोद्धारा ।

तुज वांचोनि चराचरा । वस्तीस थारा नसेची ॥३९॥

रोमरंध्रीं अनंत ब्रह्मांडें । येव्हडें विराट स्वरुप गाढें ।

तो तूं निजभक्तांचे पुरवावया कोडें । सगुण रुपडें होतोसी ॥१४०॥

उत्पत्ति स्थिति निदानें । हीं होत असती तुझीया सत्तेनें ।

तो तूं कळिकाळासि देऊनि मान । लपतोसि भेणें यवनांच्या ॥४१॥

तूं अभक्तांसि देखोनि दीनोद्धारा । होत अससी पाठमोरा ।

आतां आमुची करुणा ऐकोनि सत्वरा । दीनोद्धारा भेट वेगीं ॥४२॥

ऐसी नानाकाची एकोनि स्तुती । उठोनि बैसे श्रीविष्णु मूर्ती ।

सांवळा सुकुमार श्रीपती । शंक चक्र हातीं मंडित ॥४३॥

मानस पूजनीं ते अवसरीं । सर्वोपचारि श्रीहरी ।

दर्शन घेऊनि ऐशा परी । तेथूनि सत्वर निघाले ॥४४॥

ऐसा चमत्कार देखोनियां । मुजावर नानकाच्या पडती पायां ।

म्हणती हा वृत्तांत कळतांचि राया । तरी प्राणा आमुचिया घेईल तो ॥४५॥

म्हणेल हिंदु मनुष्य आलें कोणी । यास्तव मूर्ती बैसली उठोनी ।

आमुच्या जीवासि करितील जांचणी । लागती म्हणोनी पायास ॥४६॥

तूं सर्वात्मक ईश्वर जाण । मनुष्य रुपें अवतार पूर्ण ।

हें सत्यचि भासलें आम्हां कारणें । परी विनंति परिसणें एक आतां ॥४७॥

पहिल्या सारिखी मूर्ति करावी । म्हणजे आम्हासि यातना नव्हे कांहीं ।

ऐसे म्हणवोनि ते समयीं । मुजावर पायीं लागले ॥४८॥

नानक किंचित आग्रह न करी । म्हणे ईश्वर इच्छा प्रमाण खरी ।

मग देवास म्हणे ते अवसरी । पूर्ववत सत्वरी होय आतां ॥४९॥

पुढें म्लेंछ मर्दना कारणें । कल्कि अवतार तुम्हांसि घेणें ।

करोनि धर्माचें संस्थापन । भक्तजन रक्षावे ॥१५०॥

आतां अभक्त यवनासि पाठमोरा । पूर्ववत होई दीनोद्धारा ।

नानकाच्या ऐकोनि उत्तरा । विष्णुमूर्ति सत्वरा निजतसे ॥५१॥

इतुकें चरित्र करोनि सत्वर । तेथोनि निघे योगेश्वर ।

बोट उल्लंघोनि सत्वर । समुद्र नीर उल्लंधिलें ॥५२॥

मार्गीं चालतां वाटेवर । सरितेसि आला अपार पूर ।

तेथें सैन्यासहित साचार । कोंडला नृपवर ते ठायीं ॥५३॥

नानक स्वामीसि देखोनि त्यानें । सद्भावें दृढ धरिले चरण ।

मग कागदाची नौका करुन । त्याज कारणें उतरिलें ॥५४॥

सैन्यासहित भूपती । ऐलतीरीं आला सत्वरगती ।

मग नानकासि करि विनंती । देव मजप्रती भेटवा ॥५५॥

तयासि म्हणे योगेश्वर । जो कां निर्गुण निराकार ।

त्रिगुण रहित सर्वेश्वर । पाहे साचार नृपनाथा ॥५६॥

परब्रह्म गोरें ना काळें । सांवळें ना पिवळें ।

आरक्त ना नव्हे ढवळें । सप्तरंगा वेगळें निरायम ॥५७॥

ज्याच्या सत्तेनें साचार । व्यापार करिती चरणकर ।

अचेतन चेतवी निरंतर । तोचि श्रीधर ओळखावा ॥५८॥

आत्मसत्तेनें नेत्र पाहती । आत्मसत्तेनें श्रवण ऐकती ।

तोचि ओळखे आपुल्या चित्तीं । कासया खंती करतोसी ॥५९॥

घ्राणासि ज्याचेनि सुगंध कळे । जिव्हा जाणेचि रसाळ ।

तो देवाधिदेव घननीळ । देहींच तत्काळ ओळखावा ॥१६०॥

पिंड ब्रह्मांडीं सकळ ठायीं । त्याजवीण सत्ता आणिकाचि नाहीं ।

आपआपणातें समजोनि घेयीं । उपदेश नाहीं या परता ॥६१॥

ऐकोनि नानकाची वचनोक्ती । सद्भावें नमस्कार करी भूपती ।

ह्मणती स्वामीची वचनोक्ती निश्चितीं । बिंबली मजप्रती मनांत ॥६२॥

ऐसें ह्मणवोनि त्या अवसरा । राजा गेला आपुल्या नगरा ।

नानक मर्दानासि घेउनि सत्वरा । पंथ बरा क्रमती ॥६३॥

तों योगियांचा मुगुटमणी । विष्णु अवतार बोलती जनीं ।

तो गोरक्षनाथ तये क्षणीं । अकस्मात नयनीं देखिला ॥६४॥

नानक तयासि आदेश करीत । नानकासि म्हणतसे मत्स्येंद्रसूत ।

तुम्हीं जनांत सिद्धाई दाखविली बहुत । आतां सांगतों कार्यार्थ तो करा ॥६५॥

चार लक्ष यात्रा या अवसरीं । मिळाली असें हरिद्वारीं ।

तितुकीयांसी भोजन दे सत्वरी । योगेश्वर तरी तूं साच ॥६६॥

ऐकोनि गोरक्षाची मात । नानक तयासि अवश्य म्हणत ।

पुढें जावोनि त्वरित । आमंत्रणें सकळातें द्या तुम्ही ॥६७॥

सामर्थ्य पाहावया तेथ । हरिद्वारासि गोरक्ष जात ।

तो नानकें कवतुक केलें अद्भुत । तें ऐका निजभक्त भाविकहो ॥६८॥

चार लक्ष यात्रा ते अवसरीं । मिळाली असे हरिद्वारीं ।

नानक गुप्त रुपें जावोनि सत्वरी । तृप्ती करी सकळांची ॥६९॥

सर्व सिद्धी अनुकूळ असत । इच्छा भोजन सकळांसि देत ।

तों मागुति येवोनि गोरक्षनाथ । आमंत्रण देत तयांसी ॥१७०॥

लोक म्हणती गोरक्षनाथा । नानक सिद्ध येवोनि आतां ।

इच्छाभोजन दीधलें समस्तां । गेला मागुता तीर्थासी ॥७१॥

ऐसी आयिकतांचि मात । आश्चर्य करी मत्स्येंद्रसुत ।

तों नानकही तेथें प्रगट होत । नमस्कार करित गोरक्षा ॥७२॥

परस्परें भेटोनि प्रीतीं । गोरक्ष बहुत करी स्तुती ।

म्हणे तुज ऐसा सिद्ध मूर्ती । त्रिजगतीं दिसेना ॥७३॥

स्वरुप प्राप्तीचें लक्षण । योगेश्वराची जितुकीं चिन्हें ।

तीं तुझ्या अंगीं बाणलीं लेणें । निश्चय पूर्ण कळों आला ॥७४॥

ऐसी गोरक्षें करुनि स्तुती । गगन पंथें उडोनि जाती ।

नानक शिष्यासमवेत सत्वर गती । मठासि येती आपुल्या ॥७५॥

जैसी ईश्वराची लीला । तैशाच योगियांच्या आंगीं कळा ।

दाखवोनि नाना सिद्धींचा सोहळा । दंडन खळां तिहीं केलें ॥७६॥

भक्त अथवा योगेश्वर । ज्यानें दाखविला चमत्कार ।

त्याची सत्कीर्ति वाढे थोर । संप्रदाय इतर चालविती ॥७७॥

नानक पंथी बैरागी निश्चितीं । तद्देशी अद्यापि उदंड असती ।

उपदेश देवोनि जनाप्रती । स्मरणीं लाविती जड मूढां ॥७८॥

संत चरित्र ऐकतां कांनीं । महादोषांची होतसे धुणी ।

तयासि तुष्टोनि कैवल्यदानि । वैकुंठभुवनीं ठेवितसे ॥७९॥

जो दीनदयाळ करुणाकर । अक्षय अभंग रुक्मिणीवर ।

तो महीमतीचें वसवोनि अंतर । वदवीत चरित्र संतांचें ॥१८०॥

स्वस्ति श्रीभक्तिलीलामृत ग्रंथ । श्रवणेचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविकभक्‍त । एकादशाध्याय गोड हा ॥१८१॥

अध्याय ॥११॥ओव्या॥१८१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP