एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एवमप्यङ्ग सर्वेषां देहिनां देहयोगतः ।

कालावयवतः संति भावा जन्मादयोऽसकृत् ॥१६॥

म्हणें आइकें बापा उद्धवा । हा मिथ्या मतवादु आघवा ।

म्हणसी कैसेनि जाणावा । विवेक करावा मतांचा ॥४२०॥

निवृत्ति ते केवळ कष्ट । म्हणती प्रवृत्ति अतिश्रेष्ठ ।

प्रवृत्तीमाजीं परम कष्ट । मरण अरिष्ट अनिवार ॥२१॥

धरोनियां जन्ममूळ । अखंड लागलासे काळ ।

लवनिमिष पळपळ । काळ वेळ साधित ॥२२॥

जैसें संवचोराचें साजणें । तैसें काळाचें जोगवणें ।

वेळ आल्या जीवेंप्राणें । नाहीं राखणें सर्वस्वें ॥२३॥

काळु न म्हणे हाट घाट । न म्हणे अवसी पहांट ।

न म्हणे देश विदेश वाट । नाशी उद्‍भट निजतेजें ॥२४॥

करितां प्रवृत्तीचे कष्ट । अवचितां मृत्यूचा चपेट ।

अंगीं वाजे जी उद्‍भट । अहा कटकट ते काळीं ॥२५॥

जीवीं वासनेच्या थोर हांवा । म्हणे गेलों मेलों धांवा पावा ।

कोण निवारी मृत्युप्रभावा । उपावो तेव्हां चालेना ॥२६॥

काळु मारोनि नोसंडी । यातना भोगवी गाढी ।

सवेंचि गर्भवासीं पाडी । जेथ दुःखकोडी अनिवार ॥२७॥

मातेच्या जठरकुहरीं । विष्ठामूत्रांच्या दाथरीं ।

अधोमुख नवमासवरी । उकडी भारी जठाराग्नी ॥२८॥

विष्ठालेपु चहूंकडे । नाकी तोंडीं कृमी किडे ।

गर्भवासींचे कष्ट गाढे । कोणापुढें सांगेल ॥२९॥

कट्वम्ललवणमेळें । गर्भवतीचे पुरती डोहळे ।

त्वचेवीण गर्भांग पोळे । तेणें दुःखें लोळे अतिदुःखी ॥४३०॥

ते गर्भोदरींची व्यथा । नेणती माता आणि पिता ।

तेथ नाहीं कोणी सोडविता । जीवींची व्यथा जीव जाणे ॥३१॥

ज्या ठायाची करूं नये गोठी । प्रकट दावूं नये दिठी ।

ते योनिद्वारें अतिसंकटीं । जन्म शेवटीं जीवासी ॥३२॥

जे नित्य मूत्राची न्हाणी । कीं नविया नरकाची खाणी ।

जे रजस्वलारुधिराची श्रेणी । जन्म तेथोनी पावती ॥३३॥

अपवित्र विटाळशीचें रुधिर । तें गोठोनि झालें जी शरीर ।

निंद्यद्वारें जन्मोनि नर । आम्ही पवित्र म्हणविती ॥३४॥

गर्भावासाहूनि गाढें । दुःख कोण आहे पुढें ।

मतवादी बोले तें कुडें । सुख नातुडे प्रवृत्तीं ॥३५॥

एके जन्में जन्म न सरे । एकें मरणें मरण नोसरे ।

कोटि कोटि जन्मांचे फेरे । काळ योनिद्वारें करवितु ॥३६॥

पुढतीं जन्म पुढतीं मरण । अनिवार लागलें जाण ।

प्रवृत्तीमाजीं सुख कोण । दुःख दारुण भोगवी ॥३७॥

जन्ममरणांमाजिले संधी । आणिकही थोर दुःख बाधी ।

त्या दुःखाची दुःखसिद्धी । ऐक त्रिशुद्धी सांगेन ॥३८॥

धाडीभेणें पळतां थोर । आडवे नागवती चोर ।

तैसें जन्ममरणांचें अंतर । षड्‌विकार राखती ॥३९॥

षड्‌विकारांच्या पतिव्रता । षडूर्मी लागल्या जीविता ।

एवं प्रवृत्तीमाजीं परम व्यथा । सुख सर्वथा असेना ॥४४०॥

कर्मवादियांच्या मतां । जीवु स्वतंत्र कर्मकर्ता ।

म्हणती ते मिथ्या वार्ता । परतंत्रता प्रत्यक्ष ॥४१॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP