मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
कृष्णशिष्टाई

गीत महाभारत - कृष्णशिष्टाई

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


संजयाने कौरवांना निरोप देताना सांगितले की पांडवांना अनेक राजे येऊन मिळाले आहेत. द्रुपद, कृष्ण व विराट तर आहेतच पण युयुधान, काशीपती, शिशुपालपुत्र धृष्टकेतू, जरासंधपुत्र, कैकेय, शिखण्डी असे अनेक वीर त्यांच्याबाजूने आहेत. हे ऐकल्यावर पांडवांची शक्‍ती खूप वाढल्याचे पाहून धृतराष्ट्राने आपल्या मनातील भय व्यक्‍त केले. त्यावर दुर्योधनाने विरोध करीत म्हटले की पांडवांच्या तुलनेने आपण अतिबलाढय आहोत. भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, कर्ण, कृप, सोमदत्त, बाल्हिक, शल्य यातला एकेक पांडवांना पुरेसा आहे. यांच्यासमोर पांडवाचा टिकाव लागणार नाही. आपली अकरा अक्षौहिणी सेना आहे तर त्यांची फक्त सात अक्षौहिणी ! भीम अर्जुन यांच्याबद्दल भय वाटण्याचे काही कारण नाही. कर्ण आणि मी त्यांना पुरेसे आहोत. युधिष्ठिर पाच नगरे नव्हे पाच खेडी मागतो आहे याचे कारण काय ? तर तो माझ्या पराक्रमाला, सैन्याला भीतो आहे. कौरवसभेत या चर्चा सुरु असताना कृष्ण हस्तिनापुरासाठी निघाला होता. तो राजाच्या स्वागताची पर्वा न करता विदुरगृही राहिला. विदुराने दुर्योधन राज्य देऊ इच्छित नसल्याचा संकेत कृष्णाला दिला. कृष्ण समेट घडविण्याच्या उद्देशाने आला होता. हा युद्ध टाळण्याचा शेवटचा प्रयत्‍न होता. त्याने सांगितले की कुरकुल हे श्रेष्ठ कुळ आहे; समेट होणे फार आवश्यक आहे. करार पूर्ण झाल्यावर पांडवांना त्यांचे राज्य मिळायला हवे. कुलक्षय व प्राणहानी टाळली पाहिजे. युद्धाचा मार्ग योग्य नव्हे, त्याने प्रजेची होळी होईल. राजकर्तव्य व न्यायाला स्मरुन निर्णय घ्या.

कृष्णशिष्टाई

या कुरुकुळातिल अंत करा कलहाचा

संदेश घेउनी आलो मी शांतीचा ॥धृ॥

सोशिले वनीचे कष्ट राहुनी मूक

धृतराष्ट्रा त्यांनी खूप भोगिले दुःख

पांडवे राखिला मान तुझ्या शब्दाचा ॥१॥

जे राज्य गमविले धर्माने द्यूतात

ते त्यास देउनी होऊ देत समेट

प्रस्ताव मांडतो सभेत मी शेवटचा ॥२॥

जे हितकर दोघा पक्षांना ठरणार

नीतीच्या नियमा धरुन जे असणार

ते नृपा सांगणे हेतू हाच मनीचा ॥३॥

हे कूळ गुणांनी युक्‍त असे विख्यात

परि कपट, वैर जे घडले ते तुज ज्ञात

तू घ्यावा निर्णय सभेत सर्वहिताचा ॥४॥

होतील एक जर धर्म सुयोधन दोन्ही

कुरु-पांडव ठरतिल बलाढय सार्‍या भुवनी

होईल पराजय तुम्हापुढे देवांचा ॥५॥

जो ठरला होता करार त्यासी स्मरुनी

राज्यार्ध पांडवा द्यावा कुरुश्रेष्ठांनी

दोघांनी घ्यावा सुखे भोग पृथ्वीचा ॥६॥

लोभात बुडाला गांधारीचा पुत्र

दुर्वर्तन हेची त्याचे जीवन-सुत्र

सोडून दिला त्या विचार धर्मार्थाचा ॥७॥

हे संकट मोठे उभे ठाकले पुढती

वैराने होइल हानि कुळाची मोठी

तू आवर त्याला, आवर लोभ सुताचा ॥८॥

सत्याची ज्यांना रुची नसे तिळमात्र

मानिती अनर्था अर्थ तुझे रे पुत्र

हे सुयोधना धर, अता मार्ग शांतीचा ॥९॥

धर्माचा भोक्‍ता धर्मतनय गुणवान

तो मागे शांती आज सर्व विसरुन

अन्यथा येतसे प्रसंग तो युद्धाचा ॥१०॥

हे युद्ध नसे रे केवळ बंधूंमधले

चारही दिशातुन लढण्या राजे जमले

हा नाश भयंकर ठरेल पृथ्वीवरचा ॥११॥

मनि माझ्या नाही पक्षपात कुठलाही

शम करण्या पांडव तयार युद्धालाही

स्वीकार शमाचा मार्ग नृपा श्रेयाचा ॥१२॥

द्वेषाच्या सत्वर दूर करा मेघांना

त्या नितळ नभातुन येऊ द्या किरणांना

तो किरण ठरावा युगास या सौख्याचा ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP