श्रीगणेशाय नमः ।

शके सत्राशेंसत्रामाझारीं । राक्षसनामसंवत्सरीं । श्रीमाधव गेले कैलासपुरीं । राज्यभार सोडोनियां ॥१॥
गणपतीच्या रंगमहालावरी । उभे ठाकले क्षणभरी । ते समयीं तो मोंगलारी । काय करिता जाहला ॥२॥
धर्मराज्य होतां अखेर । पुढील जाणोनि सर्व भविष्योत्तर । तो श्रीनारायण कुमर । अवतार आपुला संपवी ॥३॥
आश्विन शुद्ध द्वादशी । उडी टाकिली ते दिवशीं । श्रीमंत शुद्ध पौर्णिमेशीं । कैलासवासी जाहले ॥४॥
एकाएकीं उडी आपुल्या सुखें । टाकिली त्या घाशीरामांतकें । प्रयत्‍नें ही केलीं बहुतेकें । परंतु असाध्य जाहलीं ॥५॥
नानाशीं कळलें वर्तमान । श्रीमाधव पावले मरण । चिंताक्रांत बाळाजी जनार्दन । गोड कांहीं न लागे ॥६॥
म्हणें हें काय उलटें जाहलें । आम्हांस कां येथें ठेविलें । अर्थातचि स्वराज्य संपलें । चांगलें न केलें श्रीमाधवें ॥७॥
एकचि जाला हलकल्लोळ । नाना पिठीत वक्षस्थळ । जीवजंतु समस्त पक्षीकुळ । शोकार्णवीं पडियलें ॥८॥
प्रजा लोकपाळ जितुके । शोकार्णवीं पाडील तितुके । श्रीमाधवें केलें इतुकें । पुढें दुःख कितुकें कळेना ॥९॥
असो यापरी दुःख झालें जना । रुद्रभूमीस नेलें माधव नारायणा । सवें बरोबर मुख्य नाना । दहन करविलें रायाचें ॥१०॥
शहराचा करोनि बंदोबस्त । लोकपाळ घरा गेले समस्त । नाना आपुलें सदनीं स्वस्थ । चिंताक्रांत बैसले ॥११॥
म्हणें आतां कैसा करावा विचार । बोलावुनि शिंदे होळकर । अष्‍ट उमरावही समग्र । बोलाविले नानांनीं ॥१२॥
आतां दत्तक घ्यावा म्हणे नाना । हें योग्य मानवलें समस्तजना । परंतु शिंद्याच्या नये मना । नानाशीं बोलतां जाहला ॥१३॥
नानाशीं म्हणे दवलतराव शूर । धनी असतां उभयतां वीर । एकापरीस एक धुरंधर । मग दत्तक तो कासया ॥१४॥
अदुग्ध नसतां मुलाची माय । मग दुधाचें कारण काय । जरी नसते आपा बाजीराय । मग दत्तक घेणेंचि प्राप्त ॥१५॥
पदरीं असतां लाखों धन । मग कासया व्याजीं ऋण । टाकुनियां गंगाजीवन । कूपोदक तें कासया ॥१६॥
सागवानी मोडूनि घर । उभे करावे येरंड शेर । जिवंत असतां लग्नवर । मग कां करावा पाटाचा ॥१७॥
टाकुनियां धुवासाकर । गुळ कां व्हावा प्रियकर । पोळी असतां भाकर । कदन्नें कां भक्षावीं ॥१८॥
हातें वस्त्र फाडोनि आपुलें । तुणवीत असावें देऊनि मोलें । क्षुधेनें पीडिलीं घरचीं मुलें । इतरां सांगे भोजना ॥१९॥
मिळत असतां दुग्ध मांडे । मग कां खावे खोंडेक्रोंडे । बोलतां येत असतां तोंडें । मग मुक्यानें कां खुणवावें ॥२०॥
लोणकढें सांडोनि वायां । मग वासाचें तें कासया । घरचा दीप विझंवुनियां । परगृहीं अग्नि कां मागावा ॥२१॥
नवें वस्त्र असोनि नेटकें । दाटोनि कां नेसावें फाटकें । घरचीं असोनि भारतीं कटकें । मग मर्कटकें कां ठेवावीं ॥२२॥
घरीं सुवर्ण असतां विपुल । मग कासया ल्यावें पितळ । असोनि वाळ्याचा पंखा शीतळ । मग रुमाल कां वारावा ॥२३॥
टाकोनियां उत्तम चंदन । मग कां धुंडावें बाभुळवन । हिरा टाकोनियां दैदीप्यमान । मग कां गारा वेचाव्या ॥२४॥
असतां अयसीं धोरणें । मग दंत तो कासया कोरणें । पळी असतां खोरणें । कासयाला पाहिजे ॥२५॥
असो यापरी शिंद्यानें । केलें नानाशीं बोलणें । या वंशावांचूनि म्हणे । इतरास मुजरा हें ना घडे ॥२६॥
ऐसा ठेवतांचि दस्त । मग नाना जाहले चिंताग्रस्त । जबरी पाहोनि टेंकले हस्त । केवढें प्रस्थ नानाचें ॥२७॥
ऐशी लावूनिया निकट । शिंद्याचें सामर्थ्य पाहूनियां बिकट । नाना निस्तेज होऊनि फिकट । चिंताज्वरें व्यापिला ॥२८॥
मग मनीं विचार करी नाना । जर दत्तकाची करावी योजना । तर शिंदा आमुच्या शहाणपणा । चालों नेदी सर्वथा ॥२९॥
फौजही शिंद्याची महाबळ । चाळीस पलटणें पायदळ । राज्यांत होईल गोंधळ । शिंद्यापुढें बळ चालेना ॥३०॥
तशांत जुन्नरास शिंद्याचीं पलटणें । दो चौ रोजा जाणार त्वरेनें । आणावया त्रिवर्गाकारणें । हें गुह्य समजलें नानाला ॥३१॥
कीं शिंदा घेऊन येणार तिघांतें । मग संकट पडेल मातें । मग नानानीं परशुरामभाऊतें । मिरजकरातें बोलाविलें ॥३२॥
कीं शिंद्याचीं पलटणें न पोंचतां । तुम्हीं जुन्नरास जावें आतां । घेऊनि यावें राघवसुतां । अमृतराय तेथेंचि ठेवावा ॥३३॥
नानाची आज्ञा घेऊन । दिवसां दोनप्रहरीं पटवर्धन । करिते जाहले प्रयाण । माघ शुद्ध षष्‍ठीस सुमुहूर्तें ॥३४॥
त्वरित भाऊ गेले जुन्नरातें । रथसप्तमींत पोंचले तेथें । अष्‍टमीस भेटोनियां त्रिवर्गातें । एकांतस्थानीं बैसले ॥३५॥
परशुरामभाऊ जोडोनि कर । अमृतरायजीच्या समोर । विनंती करीत वारंवार । रावसाहेबाशीं आयका ते ॥३६॥
कीं पुण्यास हीं दोन्हीं मुलें । नानांनीं सत्वर बोलाविलें । मग अमृतरायें उत्तर केलें । परशुरामभाऊशीं तेधवां ॥३७॥
जैसें मला ठेवितां येथें । या दोघांस घेऊनि जातां तेथें । फूट पाडूं नका उभयांतें । दोघे एकत्र ठेवावे ॥३८॥
मी जरी म्हणतों नका नेऊं । तरी तुम्ही बळें न्यावयास आलांत भाऊ ।
थोर नयातीत वृद्ध बहू । तुम्हाशीं मी काय सांगावें ॥३९॥
नानाचे व तुमचे ओटींत मुलें । घालितों मी तुमच्या बोलें । आजपावेतों सांभाळिलें । आतां तुम्ही सांभाळा ॥४०॥
मीं केले रजाचे गज । आतां सोडोनि जाताति मज । डोळां अश्रु आले सहज । साहेबांच्या तेधवां ॥४१॥
मग भाऊ म्हणे मुलांची चिंता । तुम्ही न करावी सर्वथा । मी सेवक जिवंत असतां । मुलांस धक्का लागों न दे ॥४२॥
उभयतांस मी वाजतें वारें । लागों न दे या राघवकुमारें । ऐशीं ऐकोनि भाऊचीं मृदूत्तरें । अमृतरायजी संतोषले ॥४३॥
अमृतरायें उभयतां लागुनि । विडे दिधले तेच क्षणीं । आपुल्या हस्तें गुलाबपाणी । अमृतरायें शिंपिलें ॥४४॥
विडे घालुनि मुखामाजीं । सजवोनि उभे केले वाजी । जातेसमयीं आपा व बाजी । निरोपास आले बंधूकडे ॥४५॥
मग दोघे बंधू धरिले पोटीं । आतां तुमच्या आमच्या भेटी । तो घडवील तेव्हां जगजेठी । तेव्हांच खेटी होतील ॥४६॥
पायांवरी ठेविली डोयी । आपा बाजी उभयतांही । दादासाहेब आनंदीबाई । त्यांचे ठायीं तुम्ही आहां ॥४७॥
तूर्त काळीं आपुल्यावर । कोपला असे जगदीश्वर । परस्परें गहिवर । एकमेकांस समजाविती ॥४८॥
तेरा वरुषें एकत्र । दादा साहेबाचे पुत्र । हे ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र । एकेठायीं होतों तिघे ॥४९॥
आतां पडों पाहे अंतर । मला येथें ठेवितां दूर । असो होईल जयजयकार । जा अशीर्वाद दीधला ॥५०॥
अमृतराय अमृतोत्तरें । समजाविलीं राघवकुमरें । निघतां जैसें रघुविरें । दशरथातें त्यागिलें ॥५१॥
गोकुळीं टाकुनि तातमात । मथुरेसी गेला सिंधुजामात । मागें यशोदा आक्रंदत । तैसेंच येथें जाहलें हो ॥५२॥
अथवा लहू घालुनि रथीं । घेउनी गेलासे शत्रुघ्ननृपति । गडबडां लोळे सीता सती । वाल्मीकाचे आश्रमीं ॥५३॥
असो वाढेल कथा फार । उभयतां जाहले अश्वस्वार । परशुरामभाऊ बरोबर । घेउनी आले दोघांतें ॥५४॥
खडकी पुलाजवळिकें । आणिलीं सुमुहूर्त पाहुनि निकें । नानांसीं भाऊ सांगतां मुखें । हर्ष न माये अंतरीं ॥५५॥
ही कथा बाजीराव रघुनाथें । लिहोनि दिधली आपुल्या हातें । त्या पत्राबरहुकूम टीका येथें । कवित्व केलें कवीनें ॥५६॥
याचा मागील कैसा दोरा । हें माहीत राघवकिशोरा । सारी सर्वत्रां लहान थोरां । आनंदफंदी ठाउका ॥५७॥
स्वस्ति श्रीमाधवकवन सुंदर । संमत बाजीरघुनाथपत्राधार । त्या पत्रावरोनि हा विस्तार । प्रथमोध्याय गोड हा ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP