श्री संतोषीमातेची व्रतकथा

जगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.
Santoshi Mata, the mother of contentment.

श्रीसंतोषीमातेची व्रतकथा व कहाणी

शान्ताकारं भुजगशयनं पद्यनाभं सुरेशम् ।

विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् ॥

लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।

वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥

"शेषावर सुखाने शयन केलेल्या, त्याच्या नाभीतून कमळ निघाले आहे अशा, देवांच्या देवाला, विश्वाला आधार असलेल्या, आकाशासमान सावळ्या रंगाचे सुंदर अंग असलेल्या, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, ध्यानाने मिळणार्‍या, संसारताप नाहीसा करणार्‍या लक्ष्मीपती लोकनाथ विष्णूला मी नमस्कार करतो."

आदिमाया जगज्जनी महालक्ष्मी श्रीसंतोषीमातेची ही कहाणी आहे.

लक्ष्मी ही चंचल असल्यामुळे एके ठिकाणी फार काळ राहत नाही. एकदा लक्ष्मीने पाठ फिरवली की, मग मनुष्याची वाताहर व्हायला वेळ लागत नाही. पण तीच संतोषीमाता लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर कशाचा तोटा! दारिद्रय, दुःख पार नाहीसे होते. हातामध्ये हरभरे (फुटाणे) आणि गूळ घेऊन हात जोडून मनोभावे तिची प्रर्थना करावी. "माते, लक्ष्मी, तू आदिमाया, महाविष्णूची पत्‍नी आहेस. तुला पार नाही. सृष्टीची उलथापालथ तुझ्यामुळेच होताअसते. तू असलीस तर जीवन आहे, नाही तर जीवनात अर्थ नाही. हे महामाये, तू मला प्रसन्न हो. हा दीन सेवक तुझी प्रार्थना करीत आहे,"

अशी प्रार्थना करून झाल्यावर हातात असलेले हरभरे व गूळ गाईला खावयास घालावे. व्रत करणाराने पहिल्याने एका कलशात पाणी भरून त्यावर एका पात्रात हरभरे व गूळ ठेवावा. वरील प्रार्थना म्हणून झाल्यावर ते प्रसादरूपाने सर्वांना वाटावे व कलशातील पाणी तुळशीला घालावे.

याप्रमाणे चार महिने संतोषीदेवीचे व्रत करावे. यथाशक्ति उद्यापन करावे. सव्वा पैसा, सव्वा आणा अगर सव्वा रुपयाचे हरभरे, गूळ आणून प्रसाद वाटावा.

ब्राह्मणाला जेवायला घालावे. खीर-पुरीचे जेवण करावे. घरातील सर्व मंडळीना आनंदपूर्वक श्रीसंतोषीमातेची प्रार्थना करून प्रसन्न चित्ताने प्रसाद घ्यावा.

*

श्रीसंतोषीमातेची कहाणी

एका नगरात एक म्हातारी राहत होती. तिला सात मुलगे आणि सात सुना होत्या. सर्व जण एकत्र राहत होते. सहा जण पैसे मिळवीत असत. सातवा मात्र बेकार होता. म्हातारी आपल्या सहा मुलांना चांगले-चांगले करुन खायला घालायची व उरलेसुरले सातव्याला द्यायची. तो बिचारा गरीब भोळा होता. जे मिळेल ते खायचा.

थोड्या दिवसानंतर एक मोठा सण आला. त्या दिवशी सहा भावांचे जेवण झाल्यावर त्यांच्या पानांतील राहिलेल्या उष्ट्या लाङवांच्या कण्यांचा आईने एक लाडू केला आणि तो सातव्याकरिता ठेवला. तो घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला ते सांगितले. तेव्हा तो रागावून घर सोडायला निघाला. तो दरिद्री म्हणून आईनेही 'जा' म्हणून सांगितले. त्याबरोबर कपडे गोळा करून तो बायकोकडे गेला व तिला त्याने आपली अंगठी खूण म्हणून दिली. त्याची बायको त्या वेळी शेणी घालत होती. ती म्हणाली, "तुम्हांला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही. हे शेण आहे असं म्हणून आपला शेणानं भरलेला हात त्याच्या पाठीवर उमटवला. तीच आपल्या प्रिय पत्‍नीची खूण असे समजून तो निघाला.

मजल दर मजल करीत तो दुसर्‍या देशातील एका मोठ्या शहरात गेला. तेथे एका व्यापार्‍याकडे नोकरीला राहिला. रात्रंदिवस नेकीने काम केल्यामुळे मालक त्याच्यावर खूष झाला. अशी बारा वर्षे निघून गेली. मालकाने त्याला भागीदार केले. नंतर मालक त्याच्यावर दुकान सोपवून तीर्थयात्रेला गेला.

इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती. सासू वगैरे तिचा छळ करीत. तिला कोंड्याची भाकरी देत आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देत. ती रोज रानात जाऊन लाकडे आणी. घरातील सर्व कामे तीच करीत असे. एक दिवस अशीच ती रानात लाकडे गोळा करण्याकरिता गेली असता तिथे काही स्त्रिया श्रीसंतोषीमातेचे व्रत करीत असलेल्या दिसल्या. ते पाहून तिने विचारले, "बायांनो, तुम्ही हे काय करत आहात? ही कोणत्या देवीची पूजा?"

ते ऐकून त्यातील एक स्त्री म्हणाली, "आम्ही हे श्रीसंतोषीमातेचे व्रत करीत आहोत. हे व्रत केल्याने दुःखदारिद्रय नाहीसे होते. मनातील चिंता नष्ट होते. घर लक्ष्मीने भरून जाते. नवरा परदेशी गेला असेल तर लवकर परत येतो. कुमारीला मनपसंत नवरा मिळतो. कोर्टात आपल्यासारखा निकाल लागतो. रोग बरे होतात. पैसा आणि आरोग्य मिळते. मनाला शांती मिळते. आवडत्या लोकांच्या भेटी होतात. सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात."

ती म्हणाली, "मग हे व्रत कसं करायचे ते मला सांगा."

तेव्हा ती म्हणाली, "आपल्या ऐपतीप्रमाणे दहा पैसे, पन्नास पैसे, सव्वा रुपया यांचे गूळ व हरभरे आणावेत. दर शुक्रवारी संतोषीदेवीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी. त्या दिवशी उपास करावा. गूळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावा. श्रीसंतोषीमातेची कहाणी ऐकणारा कोणी न भेटल्यास आपणच तुपाने निरांजन लावून कहाणी सांगावी. मनोभावे प्रार्थना करावी. आपले काम सिद्धीस जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे श्रीसंतोषीमातेचे व्रत करावे. काम झाले की व्रताचे उद्यापन करावे. चार महिन्यांत श्रीसंतोषीमातेचे आपले मनोरथ पूर्ण करते उद्यापनाचे दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे सव्वा पटीने रवा, तूप घ्यावे. त्याची खीर करावी. हरभर्‍याची उसळ करावी. आपल्या घरातील आठ मुलांना जेवण घालावे. आपल्याकडे आठ मुले नसतील तर शेजारचे बोलावून आणून त्यांना जेवायला घालावे. आपल्या शक्तिप्रमाणे दक्षिणा द्यावी. असे उद्यापन करावे. फक्त त्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये."

ते ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरात गेली तिने लाकडे विकली आणि आलेल्या पैशातून तिने दहा पैशांचा गूळ आणि हरभरे घेतले. मनाशी निश्चय करून ती फिरली. वाटेत तिला श्रीसंतोषीमातेचे मंदिर दिसले. आत जाऊन तिने देवीला नमस्कार केला आणि म्हाणाली, "माते, मी अबला आहे, अज्ञानी आहे. माझे दुःख दूर कर. मी तुला शरण आले आहे" याप्रमाणे तिने चार शुक्रवारी व्रत केले. श्रीसंतोषीमातेला तिची दया आली. तिच्या पतीचे पत्र आले, पैसेही आले. तिला फार आनंद झाला. पण तिचे दीर वैगरे मात्र तिची चेष्टाच करीत होते.

इकडे रात्री तिच्या नवर्‍याच्या स्वप्नात देवी गेली आणि म्हणाली, "मुला इकडे येऊन तुला बारा वर्षे झाली. तुझ्या पत्‍नीची घरी काय अवस्था झाली असेल, याचा कधी विचार केलास काय? मूर्खा, तू तिला विसरलास. पण ती मात्र तुझ्यासाठी, तू परत यावेस म्हणून हाडांची काडे करीत आहे. ती तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे."

तो म्हणाल, "माते, मला हे सर्व समजते. पण मी काय करणार? मी इकडे परदेशात आहे. इथे देण्याघेण्याचा व्यवहार आहे. तो पुरा झाल्याशिवाय मी घरी परत कसा जाणार?"

ते ऐकून देवी म्हणाली, "मुला, उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात जा. माझी प्रार्थना कर. तुपाचे निरांजन लाव. बघता-बघता दुकानाचे देण्याघेण्याचे व्यवहार पुरे होतील."

देवीच्या स्वप्नातील दृष्टान्ताप्रमाणे त्याने सर्व केले. दुसर्‍या दिवशी त्याने अंघोळ केली, तुपाचा दिवा लावला. श्रीसंतोषीमातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला. थोड्याच वेळात देण्याघेण्याचे सर्व व्यवाहार पूण झाले. पैशांच्या थैल्या भरून गेल्या. श्रीसंतोषीमातेची स्तुती करून त्याने रात्री दुकान बंद केले आणि सकाळ आपल्या देशास निघाला.

तो आपल्या गावाजवळ आला. त्या दिवशी त्याची पत्‍नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यासाठी रानात आली होती. वाटेत देवीच्या मंदिरात जात असता तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले. तिने देवीला विचारले, "माते कोण येत आहे?"

देवी म्हणाली, "मुली, तुझा नवरा येत आहे. आता मी सांगते तसे कर. जवळच्या लाकडाच्या तीन मोळ्या कर. एक माझ्या मंदिराजवळ ठेव. दुसरी नदीकिनार्‍यावर ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे. तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवर्‍याला जेवणाची आठवण होईल. तो तुझ्याकडून ती मोळी विकत घेईल, जेवण करील व मग पुढे घरी जाईल. मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण "सासूबाई, सासूबाई लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या. करवंटीत पाणी द्या. पण आज घरी पाहुणे कोण आलेत?"

देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. इतक्यात तिचा नवरा तेथे आला. त्याने मोळी विकत घेतली, जेवण केले आणि तो घरी गेला. थोड्याच वेळात ती घरी आली आणी मोळी टाकून म्हणाले, "सासूबाई, सासूबाई, लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या. करवंटीत पाणी द्या. पण आज घरी पाहुणे कोण आलेत?"

बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला. जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली. तिच्या उजव्या हातात त्याने दिलेली अंगठी होती, त्याला खूण पटली. तो बायकोला भेटला व शेजारीच खोली होती, ती त्याने ताब्यात घेतली.

खोली साफसूफ करून त्यांनी सर्व सामान आणले व ते दोघे जण आनंदात तेथे राहून लागले, इतक्यात शुक्रवार आला. तिने नवर्‍याच्या परवानगीने त्या दिवशी संतोषीमातेच्या व्रताचे उद्यापन केले. जावेच्या मुलांना व सर्व नातेवाइकांना जेवायला बोलविले, जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवले की, काकूजवळ आंबट खायला मागा.

सर्वांची जेवणे झाल्यावर मुले म्हणली, "काकू, गोड-गोड खाऊन वीट आला. काहीतरी आंबट खायला दे."

त्यावर ती म्हणाली," बाळांनो हे श्रीसंतोषीमातेच्या व्रताचे उद्यापन आहे. आज कोणाला आंबट वस्तु खायला मिळणार नाही."

मुले जेवूण उठली आणि पैसे मागू लागली. तिच्या लक्षात आले नाही. तिने मुलांना पैसे दिले. मुलांनी चिंचा, आवळे आणून खाल्ले. त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला. देवी कोपली राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवर्‍याला धरून नेले. ती रडत-रडत संतोषीमातेच्या मंदिरात गेली. नमस्कार करून ती म्हणाली, " माते, तू काय केलेस? आधी हसवलेस आणि आता का रडवतेस?"

देवी म्हणाली, " मुली, माझ्या व्रताचा भंग झाला आहे. पण तू मुद्दाम काही केलं नाहीस. आता पुन्हा उद्यापन कर. आता जराही चूक करू नकोस. जा आता."

त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली. रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला. तो म्हणाला, "मी एवढे पैसे मिळवले, त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला? राजाकडे कर भरूनच मी येत आहे."

ते ऐकून तिला फार आनंद झाला ती दोघे घरी गेली. फिरून शुक्रवार आला. तिने उद्यापनाची तयारी केली. सर्वांना जेवायला बोलाविले. मुले जेवायला आली; पण म्हणाली, "काकू, आम्हांला गोड खीर नको. काहीतरी आंबट दे, नाहीतर चाललो आम्ही घरी,"

"आंबटचिंबट काही मिळणार नाही. सरळ जेवायचं तर जेवा. नाहीतर चालायला लागा. आंबट काही मिळणार नाही." तिने सांगितले.

मुले निघून गेली. मग तिने ब्राह्मणांना बोलावले. पोटभर वाढले. दक्षिणेच्या ऐवजी त्यांना एक एक फळ दिले. अशा तर्‍हेने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडले. व्रत यथासांग पुरे झाले. श्रीसंतोषीमाता प्रसन्न झाली. लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला. ती आपुल्या मुलाला घेऊन रोज देवळात जात असे.

एके दिवशी देवीच्या मनात आले की, आपण हिच्या घरी जावे आणि हिची सासू, दीर, जावा कशा आहेत ते पाहावे. मग देवीने अक्राळविक्राळ रूप घेतले. काळाकुट्ट रंग, चपटे नाक, बटबटीत डोळे, मोठे-मोठे रुंद ओठ, तोंडाभोवती माशा घोंघावताहेत, स्थूल शरीर, स्तन खाली लोंबताहेत, कपड्याच्या चिंध्या, आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे, अशा थाटात देवी तिच्या घराच्या देवडीत गेली. तिला पाहून सासूची बोबडीच वळली. ती मोठ्याने ओरडू लागली, "धावा, धावा, मुलांनो धावा. कोणी पिशाच्च, डाकीण, शाकीण घरात येते आहे. तिला हाकलून लावा. नाहीतर ती आपणा सर्वांना खाऊन टाकणार."

तो आरडाओरडा ऐकून मुले तिला हाकलायला धावली, पण देवीचे रूप पाहून तीही घाबरली. घरात जाऊन त्यांनी दरवाजे, खिडक्या घट्ट लावून घेतल्या. धाकटी सून हे सर्व खिडकीतून पाहत होती. ती आनंदाने म्हणाली, "आज माझी आई माझ्याकडे येत आहे."

असे म्हणत असताच तिने अंगावर पीत असलेला आपल्या मुलाला बाजुला ठेवले आणी ती घरभर आनंदाने नाचू लागली. ते पाहून सासू संतापली, तिला वाटेल ते बोलू लागली, शिव्या देऊ लागली, सून म्हाणाली, "सासूबाई, घरात येत आहे ती कोणी डाकीण किंवा पिशाच नाही. मी जिचे व्रत करते ती देवी आहे."

असे म्हणून तिने सर्व दरवाजे, खिडक्या उघडल्या. श्रीसंतोषीमाता घरात आली. सर्व जण तिच्या पाया पडले. तिची क्षमा मागितली. " हे माते, आम्ही सर्व मूर्ख आहोत. अज्ञानी आहो, पापी आहोत. तुझे व्रत कसे करावे हे आम्हांला समजत नाही. तुझ्या व्रताचा आमच्याकडून जाणूनबुजून भंग झाला. आम्ही तुझा फार मोठा अपराध केला. माते, आम्हांला क्षमा कर. आमच्यावर दया कर."

याप्रमाणे सर्वांनी प्रार्थना केली. श्रीसंतोषीमाता प्रसन्न झाली. तिने सर्वांना आशीर्वाद दिले आणि ती अंतर्धान पावली. ज्याप्रमाणे त्या सुनेला श्रीसंतोषीमातेचे वरदान मिळाले तसे वरदान ही कहाणी ऐकणारालाही मिळो.

*

अन्नपूर्णेची कहाणी

काशी नगरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्रह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा. त्यांच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य होते. एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयाला वाईट वाटले. व त्याने शंकराची तपश्चर्या करावयाला सुरुवात केली. तीन दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ 'अन्नपूर्णा, अन्नपूर्णा', अन्नपूर्णा,' असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणुन त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा शंकरांनी त्याला रात्री दृष्टान्त दिला, "मुला, तू पूर्व दिशेला जा. तुझे मनोरथ पूर्ण होतील." दुसर्‍या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या. त्याने त्यांना विचारले. "हे तुम्ही काय करता?"

अप्सरा म्हणाल्या, "आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करू शकतो.२१ दिवसांसाठी २१ गाठी असलेला दोरा घ्यावा. एकवीस दिवस उपास करावा. एकवीस दिवस जमत नसल्यास एक दिवस तरी उपवास करावा आणि हेसुद्धा शक्य नसेल, तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही, तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा आणि शंकर-पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्नग्रहण झाल्यास दुसर्‍या दिवशी परत उपवास करावा. व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये. खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते, लुळ्याला पाय येतात, निर्धनाला पैसा मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्रलाभ होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जीजी इच्छा धरून हे व्रत करील त्याची तीती इच्छा पूर्ण होते."

ब्राह्मण म्हणाला, "बाई, मला खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही. मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल काय?"

अप्सरा म्हणाल्या, "देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नये. त्याची हेळसांड करता कामा नये. हे घे ते पवित्र सूत."

धनंजयाने मग हे व्रत केले. व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून २१ पायर्‍या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला. शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्यासमोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्रचामरे ढाळीत होत्या. यक्षस्त्रिया सशस्त्र पाहारा करीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले.

देवी हसून म्हणाली, 'वत्सा धनंजया, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तू सुखी होशील. सारे जग तुझी वाहवा करील. तुला काही कमी पडणार नाही.'

देवीने आपल्या वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर विद्यादेवी त्याच्या जिव्हेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यानेच त्याला मूर्च्छा आली. शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशीविश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो घरी गेला, सर्व हकिकत बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली. त्याचे दुःख, दारिद्र्य दूर झाले. त्याच्या मानसन्मान वाढल्या. त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले. पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला.

एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवर्‍याला म्हणाली, " महाराज, आपल्याशी माझे एकच मागणे आहे. आपणाला हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये."

तिचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला. दुसरीला त्यातले काहीच माहिती नव्हते. ती आपल्या नवर्‍याची वाट पाहत बसली. एक दिवस झाला, दोन झाले. असे १८ दिवस झाले तरी धनंजय परतला नाही. शेवटी तिला समजले की, आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे. तो तिच्याकडे अठरा दिवस राहिला आहे, तिच्या अंगाचा तिळपापड झाला. ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणले. व्रताचे अजून तीन दिवस शिल्लक होते. घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला. बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला. अन्नपूर्णा कोपली. त्यामुळे धनंजयाचे घर सामानासुमानासकट जळून भस्म झाले. सुलक्षणा समजली की, हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले. सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली.

सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठी गेला. त्याने पुन्हा व्रत केले. पहिल्याप्रमाणे शिडी वर आली. तो देवीच्या मंदिरात गेला. त्या परत आलेला पाहून देवीचे नोकर त्याला मारावयास धावले. त्यावर देवी म्हणाली, "थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे. तो अवध्य आहे. त्याने माझे व्रत केले आहे," नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, "मला सर्व काही समजले आहे. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे. हिची दरोरज पूजा कर. तू फिरून सुखी होशील. माझा तुला आशीर्वाद आहे. तुझी प्रथम पत्‍नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे. व्रत केले आहे. तिला सर्वगुणसंपन्न असा मुलगा होईल."

प्रसन्न अंतःकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले.

धनंजय त्यांना म्हणाला, "बाबांनो, मी माता अन्नपूर्णेचे व्रत केले. देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव, मानसन्मान आणि पुत्रलाभ मला झाला."

ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेटजीने देवीचे व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांदले. मोठ्या सामांरभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयालाच तेथे पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायकोमुलांसह त्या मंदिरात राहू लागला. त्याला खूप धनदौलत मिळू लागली.

इकडे दुसर्‍या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून नेले.तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली. तिच्या अन्नान्नदशेची हकिकत सुलक्षणेच्या कानावर आली. तिने तिला घरी आणले. न्हाऊमाखू घालून चांगले कपडे दिले, आणि तिला आपल्याजवळ ठेवून घेतले. मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मानमान्यता मिळाली. ती सर्व सुखी झाली. तसेच सुख आपणा सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळो.

तात्पर्य हेच की, आपण जशी करणी करतो, तसेच फळ आपल्याला मिळते. आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख, दारिद्रय, नाना तर्‍हेच्या व्याधिउपाधींनी भोगावे लागते.

N/A

References : N/A


Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP