फाल्गुन वद्य १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


वासोटा किल्ल्यावर हल्ला !

शके १७४० च्या फाल्गुन व. १० रोजीं इंग्रजांच्या फौजेनें प्रसिद्ध अशा वासोटा किल्ल्यावर हल्ला केला. वासोटा किल्ला पूर्वीपासूनच प्रसिद्ध होता. शिवाजीनें यास वज्रगड असें नांव दिलें होतें. ताई तेलीण आणि बापू गोखले यांच्या पराक्रमानें या किल्ल्याचें नांव अजरामर झालें आहे. हा वासोटा किल्ला उंचावर असून फार मजबूत होता. कर्नल ह्यूएट याच्या हाताखालील फौजेनें या किल्ल्यास वेढा दिला. एकंदर तीन ठिकाणीं इंग्रजी सैन्याचे तळ होते. थोड्याच अवधींत वासोट्यावर तोफांचा भडिमार सुरु झाला. याच किल्ल्यांत सातारच्या महाराजांच्या कुटूंबांतील कांहीं माणसें अटकेंत होतीं. शिवाय कॉर्नेट हंटर कॉर्नेट मॉरीसन या दोन इंग्रज अधिकार्‍यांना पेशव्यांच्या सैन्यानें पकडून याच किल्ल्यावर ठेविलें असल्यामुळें या वेढ्यास विशेष प्रकारचे महत्व प्राप्त झालें होतें. प्रथम किल्ला स्वाधीन करण्याविषयीचें पत्र किल्लेदाराला पाठविण्यांत आलें. तें त्यानें धुडकावून लावलें. आणि बाणेदारपणानें किल्ला लढविण्याचें ठरविलें. किल्ल्यावरुनच मराठ्यांच्या सैन्यानें शत्रूला तोंड दिलें. परंतु इंग्रजांची युद्धसामग्री अति प्रभावी असल्यामुळें मराठ्यांना पड खावी लागली. दि. ५ एप्रिल रोजीं किल्ल्यावर भराभर तोफांचे गोळे येऊन पडले आणि मुख्य इमारतीस आग लागली, तरी किल्लेदार दाद देईना. दुसर्‍या दिवशीं फरुन तोफांचा भडिमार सुरु झाला; अत्यंत नेटानें तोंड देत असतांहि किल्लेदाराचा नाइलाज झाला आणि वासोटा इंग्रजांच्या ताब्यांत आला. या वासोटा किल्ल्याबद्दल कै. शिवरामपंत परांजपे लिहितात, "सृष्टिदेवता सह्याद्रीच्या उंच शिखरावर जोंपर्यंत वासोट्याच्या किल्ल्याचे बुरुज धारण करुन राहील तोपर्यंत त्याची स्मृति महाराष्ट्रीयांच्या अंत:करणांतूण केव्हांहि नाहींशी होणार नाहीं. गरीब शेतकर्‍यांच्या निरुपद्रवी स्वतंत्रतेला शांततेनें रहातां यावें यासाठींच सृष्टिदेवतेनें आपल्या स्वतंत्रतारुपी प्रिय कन्येला हें माहेरघर बांधून दिलें असावें."

- ३१ मार्च १८१८

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP