फाल्गुन वद्य ८

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


इंद्रजिताशीं युद्ध सुरु !

फाल्गुन व. ८ रोजीं लक्ष्मणाचें आणि इंद्रजिताचें युद्ध सुरु होऊन इंद्रजिताचा वध झाला. निकुंमिलेकडे इंद्रजित निकुंभिलेकडे इंद्रजित यज्ञ करीत होता. इकडे रामाची आज्ञा घेऊन लक्ष्मण, बिभीषण, हनुमान व जांबवान हे सर्व निकुंभिलेस आले. हनुमान आणि जांबवान यांनीं इंद्रजिताच्या सैन्यावर निकराचा हल्ला केला. इंद्रजितानें आपलें यज्ञकर्म सोडलें व रथावर आरुढ होऊन त्यानें मारुतीवर बाणाचा वर्षाव सुरु केला. लक्ष्मणानें जोराची आरोळी मारुन इंद्रजिताला द्वंद्वयुद्धासाठीं पाचारण केलें. तेव्हां मारुतीस सोडून देऊन इंद्रजित लक्ष्मणाकडे धांवला. प्रथम त्यानें बिभीषणास कठोर शब्दांनीं धि:कारल्यावर बिभीषण बोलला, "धर्मापासून परावृत्त झालेल्या पापी मनुष्यास - मग तो स्वजन असला तरी सोडलाच पाहिजे. परद्रव्याचें हरण करणारा व परस्त्रीचा अभिलाष धरणारा या दोघां पाप्यास जळत्या घराप्रमाणें टाकून जावें असें शास्त्र सांगतें. -" इंद्रजितानें रागानें लाल होऊन लक्ष्मणावर चाल केली. दोघांचें द्वंद्वयुद्ध सुर झालें. तीन दिवसपर्यंत एकसारखे युद्ध होऊन शेवटीं लक्ष्मणानें इंद्रजिताचें डोकें उडविलें ! "तेव्हां देवांनीं आकाशांत दुंदुभि वाजविल्या व लक्ष्मणावर पुष्पवृष्टि केली. इंद्रजितासारख्या महान्‍ पराक्रमी व मायावी राक्षसाचा लक्ष्मणानें नाश केल्यामुळें सर्व पृथ्वीचा भार हलका झाला. आणि तीनहि लोकांना आनंद झाला." बिभीषणानें लक्ष्मणाचा मोठा गौरव केला. सर्व जण विजयी होऊन रामापाशी आले. श्रीरामांनीं लक्ष्मणास पोटाशीं धरुन मोठ्या ममतेनें कुरवाळलें आणि म्हटलें, "लक्ष्मणा, तूं आज एक दुष्कर कर्म केलेंस, आतां रावण मेलाच असें मी समजतो. त्याचे कुंभकर्ण व इंद्रजित हे दोनहि हात तुटले." इंद्रजित हा लंकेचा राजा रावण व मंदोदरी यांचा ज्येष्ठ पुत्र. याचें मेघनाथ असेंहि नांव होतें. यानें इंद्राला जिंकिलें म्हणून याला इंद्रजित हें नांव प्राप्त झालें. ‘जर श्रीराम धर्मात्मा आणि सत्यनिष्ठ असेल तर इंद्रजित मरेल’ असें म्हणून लक्ष्मणानें ऐंद्रास्त सोडलें व त्याचा वध केला.

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP