मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
शाळा सुटली कटकट मिटली बाळ...

बाल-वृद्ध संवाद - शाळा सुटली कटकट मिटली बाळ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


शाळा सुटली कटकट मिटली बाळे मग जमली
वदने तेजाने फुलली
शाळा सुटते कधी अशी ते वाट बघत होते
बाळक तेजस्वी हो ते
सगळे जमले एके ठायी रांग झालि नीट
दिसती उल्हासी धीट
झेंडा घेउन नायक झाला सर्वांच्या पुढती
मग मिरवणूकीस निघती
हुकूम झाला कूच कराया मग वानरसेना
निघाली गात दिव्य गाना
उत्साहाने उल्हासाने बाळे ती निघती
मुखाने मातगीत म्हणती
जो निघाली तोच भेटला वृद्ध एक त्यांस
विचारी प्रश्न बालकांस

वृद्ध: कुठे, मुलांनो! जाता तुम्ही? निशाण हे कसले?
सांगे काम कोण असले?
लहान तुम्ही बाळ मजेने हासत खेळावे
मांडीवरती लोळावे
खावे प्यावे मौज करावी चिंता ना करणे
हसुनी इतरां हासविणे
बाल वय असे अजुनी तुमचे हसण्या रडण्याचे
क्षणात रुसण्याफुगण्याचे
कुठे जातसा निशाण घेउन? दिसता मज वेडे
परता मागे घ्या पेढे
मुलामुलींनी घरी बसावे आईशेजारी
जावे कधी न बाहेरी
चला सकळही परता तुम्ही माझे ऐकावे
वृद्धा सदैव मानावे
परता, बघता काय असे रे ऐकावे माझे
तुम्हि तर गोड बाळराजे’

एक मुलगा: अमुचा आहे नायक हा हो तुम्हा सांगेल
कसला खेळतसो खेळ
बोलत नाही आम्ही कोणी शिस्त असे अमुची
आज्ञा ऐकतसो याची
सांग गड्या रे यांना सारे यांना समजावी
शंका त्यांचि न ठेवावी
आम्ही सगळे उभे राहतो रांगेमधि नीट
त्यांना सांग, तूट धीट॥
==
वृद्ध: नायक तुमचा? काय बोलता? पाळितसा शिस्त? ठेउन त्याच्यावर भिस्त?
शिपायीच जणु झाला? करता थट्टा वृद्धाची नसावी बुद्धि अशी साची?

नायक: अहो खरोखर आम्ही सगळे आहोत शिपायी खोटे सांगुन करु कायी?
शिस्त पाळतो, नीट वागतो, जातो खेळाया
कसला खेळ सांगतो, या
गाणी गावी सुंदर सुंदर भारतमातेची
चित्ते हरण्या लोकांची
देशभक्तिची स्वदेशिची ती दिव्य गाणि गातो
रस्त्यांतून गात जातो
निशाण अपुल्या देशाचे हे झेंडा राष्ट्राचा
सुंदर अपूर्व तेजाचा
तीन रंग हे पहा केशरी हिरवा हा धवल
वरती चरका हा विमल
धर्मैक्याचे स्वातंत्र्याचे झेंडा हे चिन्ह
झेंडा समानता-खूण
थोरामोठ्यांनी हा केला झेंडा निर्माण
भारतसेवेची खूण
या झेंड्याची गाणी गातो करितो तत्पूजा
तेव्हा वाजवितो बाजा
लोकां करणे जागृत, जागृत करणे व्यापारी
म्हणुनी अमुचि निघे स्वारी
दुकानदारापाशी जाउन जोडुन त्या हात
वदतो काय अम्ही गोष्ट
नका विकू हो नका विकू तो परदेशी माल
होती बंधूंचे हाल
नका खरेदी करू नव्याने परदेशी माल
होती देशाचे हाल
परदेशातील मोहक वस्तू वस्त्रे न विकावी
भारतमाय न रडवावी
घरोघरीही जातो आम्ही आळीआळीत
गातो देशभक्ति- गीत
जो जो आम्हां वेळ सापडे सांभाळुन शाळा
देतो तो या कार्याला
खेळ अमुचा हाच, अम्हाला यातच आनंद
नाही इतर अम्हां छंद
कशास पेढे देता? त्यातहि साखर परदेशी
वाइट वाटे आम्हांसी॥

वृद्ध: मला वाटते भय, बाळांनो! साहस न करावे
झडकर तुम्ही घरि जावे
वाट तुमचि ते पहात असतिल घरी आइबाप
होइल त्यांस किती ताप
जा परतुन माघारे, ऐका आगित न शिरावे
स्वगृही शांतपणे जावे
जा माघारे म्हाता-याचा ऐकावा बोल
मन निज ठेवा समतोल॥

नायक: भीती न शिवे थोडी देखिल अमुच्या चित्ताला
न भितो जगात कोणाला
नि:शंक अम्ही सारे जातो गात देशगीते
आम्ही नाहि मुळी भित्रे
गांधीजींचे नाव नाचते ओठांवर नित्य
नाही कळिकाळा भीत
भारतमातेचे हो आम्ही छोटे सरदार
न रुचे खेळ, न घरदार
भारतमातेचे हो आम्ही भावी आधार
घेऊ कधी न माघार
अमुच्यामध्ये असे पहा हा सुभान त्या नाव
त्याचे तेज किति अपूर्व
लहान आहे तरि तो आहे सिंहाचा छावा
भीति न शब्द त्यास ठावा
लहान दिसतो तरि तो आहे दिव्य बालवीर
अदभुत त्याचा तो धीर
पलीकडे तो बालक दुसरा नामे शिवराम
मोठा निश्चयि अभिराम
पलीकडे तो बाळ हासतो ‘साधु’ त्यास म्हणती
त्याच्या निश्चयास ना मिति
प्रल्हाद, भिका, रामदास तो त्रिंबक तो चौथा
त्यांची स्मृति राहो चित्ता
कितिकांची मी सांगू नावे बालवीर सारे
काळहि त्यांच्याशी हारे
भीतीच्या ना सांगे गोष्टी आम्हां भय नाही
हृदयी देशदेव राही
गांधीजींचे नाव मुखी मग भीति कशी राही
भीती सर्व पळुन जाई
तीन रंगी हा झेंडा अमुचा तिम्ही जगी फिरवू
याला तेजाने मिरवू
लयास सारी चित्तामधली भयभीती जावी
सेवक देशाचे भावी
अम्ही भयाचे गिरवित बसलो धडे जरी आज
होइल पुढे केवि काज
स्वातंत्र्याला मिळवायाला मिळले राखाया
झिजवू आम्हि मुदे काया
नसे मोह तो आता आम्हां खाण्यापिण्याचा
मोह न उरला नटण्याचा
 ==
गाणी गावी झेंडा घ्यावा यातच आनंद
आम्हां इतर नुरे छंद
खेळायाला जरी आवडे वेळ नसे त्याला
करणे स्वतंत्र देशाला
स्वस्थ न आता अम्हां बैसवे आम्ही जरि बाळ
होऊ काळाचे काळ
बाळच होता धृव परि सोडुनी अन्यायी बाप
जाई देवाचे समिप
अढळपदावर नेउनिया बसवू
त्याला स्वातंत्र्ये नटवू
रोहिदास तो बाळच होता सोशी किती कष्ट
छळि जरि कौशिक तो दुष्ट
सत्त्व न त्याने ते हारविले तेजे तळपतसे
होऊ बाळहि आम्हि तसे
लहान होते किती लवांकुश तरि ना डगमगले
लढण्या रामाशी सजले
लहान होता चिमणा चिलया सत्त्वास्तव मेला
भूषण भारतास झाला
कड्यावरुन लोटिती घालिती जळत्या खाईत
परि तो प्रल्हाद न भीत
तप्त तैल कढईत टाकिती बाळ सुधन्वा तो
हसतो कृष्ण कृष्ण म्हणतो
मान न लववी श्रीशिव भूपति परक्या सत्तेला
नव्हती वर्षे ते सोळा
लहान होते समर्थ तरि ते त्यागिति घरदार
त्यांच्या धृतिस नाहि पार
जनकोजी विश्वासराव ते ते माधवराव
देती भीतीस न ठाव
सोळा सतरा वर्षे त्यांची सेनापति होती
लाखो लढायांत लढती
लहान आम्ही तरि ना भीती, काळाचे काळ
ना अळुनाळ न लडिवाळ
म्हणू नये की लहान आहे छावा सिंहाचा
घेइ प्राण गजेंद्राचा
म्हणू नये की लहान पिल्लू तल्लख नागाचे
चावे कडकडून साचे
स्फुलिंगकण तो लहान न म्हणा लहानशी ठिणगी
लाविल आग समस्त जगी
लहान न म्हणा त्वेषे सणणण करित जाइ तीर
तोडित रिपुचे झणि शीर
लहान म्हणुनी अम्हां भिवविता भिणार ना आम्ही
येऊ देशाच्या कामी
डी व्हॅलेरा होता म्हणती तीनच वरषांचा
तुडवी ध्वज रिपुचा वाचा
असे मॅझिनी बाल्यापासुन देशास्तव दु:खी
राहे सदोदित सुतकी
काळा पट्टा शोकनिदर्शक हातावर बांधी
वाचा गोष्ट त्याचि आधी
लहान म्हणुनी गोंजारुनी घरात ठेवून
फळ ते काय? जाउ मरुन
मरावयाचे तुम्हां आम्हां आहे सगळ्यांते
किमर्थ धरणे भीतीते
कर्तव्याचा रस्ता दिसतो आम्हांस समोर
येवो संकटेहि घोर
कर्तव्य अम्ही करणे त्यातच आम्हां आनंद
नाही रुचत इतर छंद

वृद्ध: मरावयाचे असे एक दिन जरि ते सगळ्यांते
आजच का जा मरण्याते
लहान तुम्ही, करा तयारी, धष्ट पुष्ट व्हावे
खावे प्यावे खेळावे
अभ्यास करा ज्ञाना मिळवा उतावीळ व्हा न
अजुनी बाळ तुम्ही सान
कर्तव्यच्युत व्हा न सांगतो, कर्तव्य कराया
आहे वेळ अजुनि राया!
मोठे व्हावे तनामनाने ज्ञानहि मिळवावे
मग ते कर्तव्य करावे
अपक्व बुद्धी अजुनी तुमची, तुम्हास ते म्हणती
मर्कट वानरसेना ती
खोड्या करणे, गंमत करणे, स्वभाव हा तुमचा
काळ प्रसन्न बाल्याचा
करा तयारी, धरुन हुशारी, भावी कार्याची
ठेवा स्मृति चित्ती त्याची
नका हट्टाला पेटू त्याने न घडे कल्याण
अंती रडतिल हे नयन
कमवायाची वेळ असे तनु ना गमवायाची
मिळवा जोडहि ज्ञानाची
घाई न करा सकळ नासती कार्ये घाईने
घ्यावे सकळहि धीराने
जा माघारे हात जोडतो होतिल रे हाल
माते बघवतिल न बाळ
राजस सुंदर बाळ तुम्ही रे मृदु जणु नवनीत
माझे अंतरंग भीत
फुलापरिस सुकुमार अरे कुणि येउन तुडवील
पाये तुम्हा कुसकरिल
सदगुण मिळवा, ज्ञाना मिळवा, करा निजविकास
यावे पुढती कामास
सुंदर शरिरे मने सुंदर करा आधि तुम्ही
पूजा पुढे मातृभूमी
भविष्य आहे अपार तुमच्या समोर का घाई
मन्मन कळवळोन जाई
अविचार नका करु मुलांनो वृद्धाचे ऐका
सोडा सर्व तुम्ही हेका
जा माघारे आईबाप ते अपुले हसवावे
त्यांच्या सन्निध नाचावे
 ==
नायक: पोक्त असे जरि सल्ला तुमचा न रुचे हृदयास
न पटे अमुच्या बुद्धीस
केवळ वाचुन घरात बसुनी ज्ञान ते न मिळते
ज्ञान प्रसंगानेच कळते
देशभक्तिचे धडे वाचुनी केवळ ना अर्थ
पुस्तक केवळ ते व्यर्थ
आली आहे संधि शिकाया देशभक्ति चीज
घेऊ केवि धरि नीज
वस्तुपाठ हा देशभक्तिचा समोर असताना
वाचिल कोण पुस्तकांना
प्रत्यक्षाचे ज्ञान असे जे महत्त्व त्या फार
उपयोगी न ग्रंथभार
भावी कार्या करण्यासाठी आजपासुनीच
मिरवू धडे जे महोच्च
धैर्य, धडाडी, त्याग, अभयता, बाणा सत्याचा
शिकतो ओनामा त्याचा
घरात बसुनी मोठा झाला कोणी ना केव्हा
बसता फसे, समय जेव्हा
वानर म्हणती! चेष्टा ना ती, तो ना अपमान
अमुचा तोच खरा मान
वानरांस त्या संगे घेई प्रभू रामचंद्र
जिंकी बलाढ्य असुरेंद्र
पालाखाऊ वानर करिती जगताला चकित
करुनी रावण रणि चित
पालाखाऊ वानर करिती करणीस अचाट
घाली जग तोंडी बोट
वानर होते परी तयांनी सुरवर सुखवीले
स्वयश त्रिभुवनि मिरवीले
वानर झाले पूज्य तयांचा नायक हनुमंत
झाला देव थोर संत
वानर नावाची न वाटते आम्हां तिळ लाज
करणे मातृभूमि-काज
गांधि महात्मा करितिल अमुचे प्रेमे कवतूक
अमुचे तेच सर्व सूख
लहान आम्ही तरी जागवू देशभक्ति हृदयी
सुखवू भारतभू- मायी
लहान तारा असे तरी तो चमके तेजाने
तिमिरा अल्प तरि लया ने
लहान असले फूल तरी ते करुनी छायेला
रक्षी मृदु दवबिंदुला
लहानासहि यथाशक्ति ये करावया काम
नलगे कीर्ति नको नाम
क्षमा करा हो मदवज्ञेची, हेतु असे शुद्ध
व्हावे अम्हावरि न कृद्ध
तुम्ही जाहला वृद्ध परि असे उल्हासी अमुची
वृत्ती निर्भय तेजाची
नका रोखु हो स्वदेशकार्या अडथळा न आणा
अमुचा निश्चय तुम्हि वाना
आशीर्वादा द्या आम्हाते अमुच्या हातून
होवो दूर माय-शीण
आशीर्वादा द्या भय न शिरो अमुच्या चित्तांत
देऊ मातृभूस हात
आशीर्वादा द्या की निश्चय राहो अविचलित
निर्मळ असो सदा चित्त
त्रास, हाल ही अम्हां भूषणे थोर अलंकार
सांगू काय तुम्हां फार
मनी शुभेच्छा तुम्ही बाळगा ‘स्वतंत्र हा देश
करु दे लौकर जगदीश’
जगदीशाला स्मरा अम्हाला उत्तेजन द्यावे
अमुचे कौतूक करावे
जरी आमुचे आइबाप ते विरोध करितील
आम्हां ओढुन नेतील
त्यांना वळवा कथुन शब्द ते धीराचे चार
की हे ‘दिव्य बाळ वीर
घडो स्वभूमीसेवा यांचे हातुन हे हीर
देऊ यांस चला धीर’
 ==
नायक वृद्धाला हे ऐसे बोलत जो बोल
जे स्फूर्तीचे कल्लोळ
तोच तिथे तो पिता तयाचा अकस्मात आला
पकडी घट्ट नायकाला

बाप: अरे कारट्या! येथे अससी शोधुन मी दमलो
वणवण करुनी मी श्रमलो
डोळा चुकवुन अहो कारटा निसटुन की आला
नाही धाक मुळी याला
कितीदा तुला बजावले की सांड सकल फंद
असेल नकोतची छंद
नको गळ्याला लावू अमुच्या फास घरी नीघ
नीघच उचल पाय शीघ्र

नायक: बाबा! बाबा! नका असे हो बोलु नका माते
होते दु:ख मन्मनाते
कटु विष वमता मला ताडिता या वाग्बाणांनी
येते मन्नयनी पाणी
घरी न बाबा मला राहवे करु तरी काय
मारी हाक देशमाय
घरी बैसणे नरक वाटतो मला मूर्तिमंत
तगमग होते चित्तात
मारुन टाका मुलगा तुमचा, तुमचा अधिकार
जावा जरि ना बाहेर
घरी बैसण्यापेक्षा मरणे रुचे तात! माते
मारा तुमच्या पुत्राते
अनेक निघती मजसम मुलगे कसा घरी राहू
माझे तोंड कुणा दावू
बाबा! राग न तुम्ही करावा, धरितो मी पाय
सांगा मी तरि करु काय?

(गाणे)

हृदयि मम भरतभूमि ‘जा’ वदे मला
‘जा’ वदे मला
घरि बसणे हा न गमे मार्ग मज भला
मार्ग मज भला
भारतभू मारि हाक
‘ये सेवेसाठि ठाक
करी मद्दास्यास खाक
पुसुन टाक मत्कलंक
उठूनिया मुला’
हृदयि मम भरतभूमि ‘जा’ वदे मला
‘जा’ वदे मला
भारतमातेच्या हाकेला ओ न कसा देऊ
कैसा घरामध्ये राहू?

बाप: तत्त्वज्ञाने तुझी नको तू मजला शिकवाया
येथून शीघ्र काढ पाया
मोठ्या गप्पा नकोत मजला येथुन चल निमुट
ऐके वदतो जी गोष्ट
बापाचा ना राग तुझ्या का ठाउक रे तुजला
चल निघ उचल पाऊलाला
खपणार मुळी नाही मजला तव वेडे चाळे
चल तू घरी ब-या बोले
गाठ असे बघ माझ्यापाशी ध्यानी धरि नीट
चल, बघ घरास तू थेट

नायक: ठार करा परि मी ना येइन घरास माघारा
तनु ही तुमची तुम्हि मारा
देहास तुम्ही माराल परी मना न माराल
तनुचे करा हालहाल
घरे सोडशुनी असली जाऊ भारतभूमीत
हिंडू स्वतंत्र अम्हि मुक्त
चला, मुलांनो! गीत म्हणा रे, मी ना जाणार
होवो जे जे होणार.

बाप: फरफटीत मी नेइन ओढुन गुरापरी तुजला
तमाशा दिसेल जगताला
घरी ये खरा थोबाड तुझे पहा रंगवीन
इंगा तुला दाखवीन
बांधुन ठेविन माळ्यावरती चार दिवस तुजला
काहि न देइन खायाला
धरुन बकोटी नेइन ओढुन काय पाहतोसी
चल बघ अपुल्या भवनासी
चल घरि, पोरा! कुठे जाशि रे पोरा! फिर मागे
आता शेवटचे सांगे
==
नायक: गांधि महात्मा पिता आमुचा सकळहि बाळांचा
धरितो पंथ अम्ही त्यांचा
भरतभूमि ही माय माउली आम्हां बाळांची
सेवा सदैव करु तीची
चला, मुलांनो! गीत म्हणा रे देशाचे दिव्य
करु या कृति सुंदर भव्य
चला, काय रे बघता? बाबा जातील माघारे
म्हणु या दिव्य गीत सारे

बाप: तमाशा न मी जगास इच्छित दावाया पोरा
परि करि विचार मनि सारा
पुन्हा न तुजला घरात घेइन दावु नको वदन
माझे बंद तुला सदन
मी न कुणि तुझा, तू न माझा, ऐसे समजावे
ध्यानी नीट, आणि जावे
मेला माझा मुलगा म्हणुनि साखर वाटीन
माझे बंद तुला सदन

नायक: बाबा! तुम्ही पूज्य मला जरि मज ना राहवते
जाणे भाग मला पडते
दारावरुनी झेंडा जाई तो मज बोलावी
जणु तो बोटाने खुणवी
झेंडा मजशी किती बोलतो, मारी मज हाक
माझे मलाच ठाउक
घरात आता ना माझ्याने बसवे क्षणभरही
डसती विंचु तसे होई
रागावा, ना बाबा! घ्या ना घरात, परि हृदय
राहो सदैव ते सदय
मनी तरि म्हणा, जनात न जरी ‘बाळक गुणवंत
माझा धृवचिलयामित्र’
भीती तुम्हां जरि माझी वाटे, तरि सत्संबंध
सोडा असो प्रेमबंध
‘मिळो न खाया परी असो हा चित्ती भगवान’
वदला तुकाराम धन्य
‘मिळो न खाया मरु उपाशी सत्त्व न परि गमवू’
वदला हरिश्चंद्र राऊ
परि जाऊ दे त्या हो गोष्टी, मी ना येईन
तुमचे घर न बाटवीन
हृदयसदन परि असो मोकळे, द्यावी ही भीक
मागत मी ना आणीक
नका घेउ हा बाळक अपुल्या घरात माघारा
देऊ नका तिथे थारा
मी न तुम्हाला सतावयाला घरात येईन
घेतो चरणांची आण
सांगा आईस, बाबा! माझे प्रणाम सप्रेम
करितो मातृभूमिकाम
आईची मज आइ बोलवी काय वदू फार
येई लोचनांत नीर
मनात तुमचे कृतज्ञतेने भक्तीने स्मरण
करिन स्त्रवतिल मन्नयन
कुठे तरी मी बसेन जोवर जीवन राहील
थारा भारत देईल
विशाल अंबर वरी, धरित्री खालि पसरलेली
प्रेमे स्नेहे भरलेली
दमलेले हे मदंग, बाबा! तिजवर टाकीन
जाइन आनंदे निजून
कंदमुळे मी खाइन देतिल फळे वृक्षराज
माझी राखितील लाज
कधी कधी मी गोड कोवळ्या बोख्या खाईन
चिंता काही न मी करिन
अडुळशाचि ती फुले तशी ती फुले अगस्त्याची
देतिल मधु मज मध साची
भारतभूमी समृद्ध सुंदर देइल खायास
फळमुळ अथवा पाल्यास
खाइन पाला कृतज्ञतेने मानिन मोदास
कंठिन सुखे जीवनास
नद्या, झरे ते देतिल पाणी स्फटिकासम छान
सांभाळितील मत्प्राण
वारा मजला वारा घालिल हरील मम शीण
पल्लव सुंदर पांघरिन
भारतमाता पडू न देइल कसलीही वाण
घरि परतून न येईल
घरात घ्यावे न मला,वाटे जरि मी अपराधी जो मी देशकार्य साधी
माघारा मज घेउ नका जरि तुमचे नुकसान
उघडे असो हृदयसदन
मातेहूनी स्वपित्याहूनी देव देश थोर
मजला देशाचा घोर
मातृभूमिची सेवा करिता तुमचीही सेवा
होते, कळे देवदेवा
मुलावरी या प्रेम असू दे, माया ठेवावी
माझी स्मृती असो द्यावी
काय किती मी सांगू, बाबा! उघडा मम हृदय
तेथे दिसेल भूमाय
हनुमंताच्या हृदयामाजी सदा रामराय
हृदयी मम भारतमाय
तुमच्यास्तवही आहे हृदयी भरलेले प्रेम
पहिले परी देशकाम
घ्या शेवटचा नमस्कार हा सविनय सप्रेम
धरितो भवत्पादपद्म
चला, मुलांनो! म्हणा गीत रे भारतमातेचे
आपण तत्सुत तेजाचे
चला, म्हणा रे ध्वजगीताते, जनता-चित्तांत
निर्मू स्फूर्तीचा झोत
मुले लागली गीत म्हणाया बाप बघे रागे
नायक परि न बघे मागे

‘झेंडा भारतमातेचा हा आला फडफडत
झळकत तेजे विक्रांत
झेंडा उन्मत्तांना नमविल दीना सुखवील
झेंडा जुलुम संहरील
झेंडा देइल राष्ट्राला या दिव्य स्वातंत्र्य
झेंडा हरिल पारतंत्र्य
झेंडा भारतमातेचा हा भाग्यवंत आला
बोला जय भारत बोला’
==
मुले निघाली गात, राहिला पिता तेथ बघत
गात्रे क्रोधे थरथरत
वृद्ध तिथे तो होता तो मग पित्याजवळ गेला
बोले सौम्य वचे त्याला
“आपण झालो पिकली पाने उपयोग न अपुला
आता राम राम बोला
नवी पिढी ही पुढेच जाइल, त्यातच आनंद
मानू, घालु न निजबंध
गुलाम न करू प्रेमे अपुल्या, देऊ मोकळीक
करोत उड्डाण विशंक
आशीर्वादा त्यांना देऊ करोत सत्कार्य
आपण भारतीय आर्य
चला, फिराया जाऊ आपण दोघे म्हातारे
बोलू मनातील सारे
दिन मावळला टेकडीवरी बैसू जाऊन
झालो पिकलेले पान”

म्हातारे ते गेले, गेली मुले गीत गात
आला भाग्योदय खचित
बाळे जी जी गाणी गातिल, गोष्टी करितील
जे जे खेळ खेळतील
भविष्यकाळाचे ते असते त्यातच सदबीज
आली जवळ भाग्यबीज
स्वतंत्र होइल, सुंदर होइल भारत हा खचित
लवकर सत्य सत्य सत्य

-अमळनेर, सप्टेंबर १९३१

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP