यशवंतराय महाकाव्य - सर्ग दुसरा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


सूर्यास्त - सायंकाळच्या शोभेचें वर्णन - यशवंतराय - त्याची पूर्वीची हकीकत - शहरांतील लोकांचें पत्र - यशवंतरायाचे विचार - माता आणि पुत्र - कमळाबाई यशवंतरायास धीर देते - कमळाबाई वियुक्त पतीचें स्मरण करून दुःख करिते - यशवंतराय तिचें समाधान करतो.

श्लोक
[ वसंततिलका ]
साम्राज्य भू - जलनिधींवर चालवून ।
अंधार हाच रिपु या दुर घालवून ॥
चंडप्रताप भगवान् दिनराज चाले ।
अस्ता, सवें किरण सेवक ही निघाले ॥१॥
अस्तास जाय निजनायक हेंबघून ।
भू - मंडळावरुन वृक्षशिरीं तिथून ॥
हे उंच डोंगरिं गिरींवर राहताती ।
तेथून सूर्यकिरण क्षणिं नष्ट होती ॥२॥
अर्घ्य - प्रदान दिधलें नियमें द्विजांनीं ।
संध्येंत भक्ति - रस - पूरित - मानसांनीं ॥
पाथेय तें क्षितिज - मंडल - वासि घेतो ।
लोकातरास मग सिद्ध रवी निघे तो ॥३॥
होता नभीं तपत जोंवरि सूर्यकांत ।
दिव्य प्रभा धरून शोभत वस्तुजात ॥
काल - क्रमें बघुन अस्त - गता तयास ।
शोकें जणो विकल स्रुष्टि दिसे उदास ॥४॥
अस्ता प्रताप - निधि भास्कर जात आहे ।
हें विस्मयें जग चराचर पाहताहे ॥
येतां समीप तम भीति - भरें समस्त ।
झाडें नद्या गिरि - शिरें दिसती तटस्थ ! ॥५॥
आकाश हें विमल नील छतासमान ।
त्या झालरीसम कडेवरि पिंगवर्ण ॥
कांहीं स्थळीं मलिन त्यावरि मेघ दाटे ।
नक्षत्र - दीप - शत कज्जल - पुंज वाटे ॥६॥
सूर्यांशुंनीं निबिड दुर्गम काननांत ।
होता दिला हटवुनी गिरि - गव्हरांत ॥
तो अंधकार निज सोडुन आश्रयातें ।
धैर्यें पुढें सरून आक्रमितो जगातें ॥७॥
गेल्या सकाळिंच वनांत चरावयास ।
त्या धेनु धांवति गृहाप्रत यावयास ॥
सप्रेम वत्स हृदयांमधिं आठवीती ।
पान्हा फुटे स्वपय भूमिस ओपिताती ॥८॥
चारा धरून वदनांत विहंग - जाती ।
अत्यंत उत्सुक जवें घरट्यांस जाती ॥
“ चीं चीं ” पिलें करिति पाहुन एकदांची ।
माया पिलांवर किती तरि पांखरांची ! ॥९॥
नेणोनि ऊन अणि भूइक तहान यांतें ।
काबाडकष्ट करितात धन्यासवें ते ॥
शांत स्वभाव हितकारि नरास मोठे ।
या वेळिं बैल जवळी करितात गोठे ॥१०॥
घोड्यांवरी किति पदीं किति गाडियांत ।
चालोनि लांबवर मार्ग निज क्रमीत ॥
विश्रांति अन्नउदका मिळवावयाला ।
पांयस्त शोधिति उताविळ धर्मशाळा ॥११॥
भाजी फुलें फळफळावळ जे पदार्थ ।
होते अनेक बसले दिवसा विकीत ॥
झाली कशी विकरि होय नफा कशानें ।
जाती घरा पुसत लावुनियां दुकानें ॥१२॥
काश्मीर, दिल्लि, मथुरा आणि नागपूर ।
अन्यस्थळांहुनहि येति लमाण फार ॥
तो माल सांठवुन शोभति त्या वखारी ।
दाटी जमे गजबजाट नभा विदारी ॥१३॥
गंभीर शब्द करूनी करि लोक जागे ।
व्हाया तयां स्वहित - तत्पर नित्य सांगे ॥
तो चौघडा झडतसे सुर - मंदिरांत ।
जो लांब दूरवर ही श्रवणांत येत ॥१४॥
आनंद शोक - भय - दुःख - सुखीं वसेना ।
कोण्या स्थितींत हि मनुष्य जगीं असेना ॥
हृद्भाव - हारि करुणा - रस मिश्र फार ।
ऐकेल तो सनइचे अति गोड सूर ॥१५॥
होता तया नगरिं राजपथीं अफाट ।
वाडा प्रचंड मजबूत जसें कपाट ॥
सोई सुखास्तव विराजति जेथ नाना ।
होता तिथे बहुत भव्य दिवाणखाना ॥१६॥
तेथें असें पुरुष एक बळी विशाळ ।
लोडास टेंकुन, गमे नव्हता खुशाल ॥
गंभीर सुंदर दयाळु दिसे स्वभावें ।
आकृष्ट पाहुनच तन्मुख चित्त व्हावें ॥१७॥
रम्याकृती नयन सुंदर थोर काळे ।
ज्यांतून तेज भंवते बघतां झळाळे ॥
बाहू बळी सरळ नाक कपाळ थोर ।
छाती विशाळ विलसे तनु - वर्ण गौर ॥१८॥
हा आपुला चरित - नायक सुस्वभाव ।
संमानिला पुरजनीं यशवंतराव ॥
हा कोण कोठिल असा इतिहास सारा ।
मी सांगतो परि न फार करीं पसारा ॥१९॥
कोट्यामधें किसनदास पवित्रचित्त ।
होता महाजन सुखें वसती करीत ॥
संपत्ति होय अनुकूल तयास भारी ।
आयुष्य घालवि झिजून परोपकारी ॥२०॥
एके दिनीं बघत तो अतिरूपवंत ।
स्त्री एक दीन बहु राजपथांत जात ॥
शोकें जिचें वदन विव्हळ काळजीनें ।
केला प्रवास गमलें बहुकाळ जीनें ॥२१॥
मागून डोलकर चार घरीति डोळी ।
माथां, हळू हळु गती मधिं चालवीली ॥
स्वच्छंद हांसत सुरम्य तयांत बाळ ।
ज्या बापुड्या न कळला सुख - दुःख - काळ ॥२२॥
मल्हार होळकर घेउन सैन्य चंड ।
त्या देशिं येउन बळी बसवीत खंड ॥
गांठून त्यास अजमीर पुरासमीप ।
युद्धांमधें विजय पावति जाट भूप ॥२३॥
झाली पळापळ तदा बहु लोक आले ।
कोटापुरीं अभय तेथ तयां मिळाले ॥
रस्त्यांत दीन बलहीन पडून मेले ।
जाटीं कितीक लुटिले हि धरून नेले ॥२४॥
होता असें समजुनी मनिं सावकार ।
झालें कृपार्द्र मन पाहुन तीस फार ॥
जीतें न ठाउक तिरीप कधीं उन्हाची ।
स्त्री थोर संकटिं असे पडली कुणाची ॥२५॥
बोलावुनी जवळ तो वदला तियेला ।
“ वत्से प्रसंग बहु दुर्धर हा उदेला ! ” ॥
निःशंक तूं वस गृहीं मम दुःख टाकीं ।
बैसूं नको गहन - शोक - नदी - तटाकीं ॥२६॥
कोणाचि ही अससि तूं लडिवाळ कन्या ।
कोणाहि तूं वरियलें असशील धन्या ॥
जन्में विराजित असो भलता हि देश ।
संगोपनीं तव उणें न करीन लेश ॥२७॥
युद्धांत या बहुत लोक विपत्ति पावे ।
इच्छा अशी मजसिं सर्व सुखी असावे ॥
एकास देउं तरि मी शकलों विसावा ।
हा श्लाघ्य योग्य अभिमान मला असावा ॥२८॥
नाहींच मूल घरिं यास्तव सर्व भासे ।
माझ्या मना गृह उदास अरण्य जैसें ॥
मातें सुलक्षण तुझा शिशु लाडका हो ।
वाढून तो निजशिरीं मम भार वाहे ! ” ॥२९॥
ऐसें वदोन तिजला मग जाय सांगे ।
पत्नीस जी स्वपतिच्या वचनांत वागे ॥
कन्या तुला सुखद नातु असा मिळाला ।
ईश - प्रसादच अम्हांवर आज झाला ॥३०॥
होता प्रसिद्ध सरदार मराठियांत ।
आनंदराव डफळे सुगुणी सुजात ॥
होऊं सहाय भट होळकरा निघाला ।
तो नर्मदा तरून उत्तर देशि गेला ॥३१॥
त्याची सुलक्षण सुता कमला हठानें ।
गेली सवें समर - वीक्षण - कौतुकानें ॥
तेचें कधीं न वच वत्सल तात मोडी ।
माता नसे समजुनी पुरवीत कोडी ॥३२॥
होतां पराजय पळे मग सैन्य सारें ।
कंठी प्रवास कमलाहि सुदुःख - भारें ॥
सोडोनि नूतन विवाहित कांत गेला ।
झाली तुटातुट पिता हि दिसे न तीला ! ॥३३॥
वीरात्मजा न ढळली लव संकटांत ।
होते हि चाकर सवें क्रमणार पंथ ॥
पुत्राचिया न चवथा महिना वयाला ।
वाटेंत कष्ट तिस यास्तव फार झाला ॥३४॥
त्रासून या समयिं सोडिति भृत्य - वर्ग ।
गेले त्वरें धरून दक्षिण - देश - मार्ग ॥
संपत्तिचें सकळ खेळ जगत्प्रचारीं ।
क्लेशांत कोण हि कुणास न कीं विचारी ॥३५॥
देशांत दिल्लिपतिच्या लपले मराठे ।
कोटापुरीं म्हणून आश्रय साध्य वाटे ॥
ती शेवटीं किसनदास - गृहास पावे ।
बाळासवें तदुपकार - भरें सुखावे ॥३६॥
पुत्रावरी किसन आवड फार दावी ।
त्या नाम सुंदर असें यशवंत ठेवी ॥
तो वाढ घे हळु हळू शशितें समान ।
आशांस ही जननिच्या करि वर्धमान ॥३७॥
त्या काळिं शिक्षण म्हणून अवश्य होतें ।
पुत्रास थोर सरदार - कुळांत जें तें ॥
पावे परंतु यशवंत विशेष दावी ।
शस्त्रीं स्वभाव - रुचि वीर बलाढ्य भावी ॥३८॥
व्यासंग फार करि बालक संस्कृतांत ।
झाला प्रवीण बहु गायन - वादनांत ॥
घोड्यावरी बसुन नेम निशाण मारी ।
कुस्ती करी चपल दावित शक्ति भारी ॥३९॥
शास्त्रें पुराण इतिहास - कथा समस्त ।
या होति माहित जुन्या बखरी अनंत ॥
चोथाटि तो फिरवि खेळत दांडपट्टा ।
मारी निशाण न करूनहि यत्न मोठा ॥४०॥
त्याच्या वयास जंव षोडश वर्ष लागे ।
तो हा शिपाइ सरदार जनांत वागे ॥
घे प्रीति तो सतत साहस संकटांत ।
ये तेज तें सहज जन्म जया कुळांत ॥४१॥
होती विलक्षण कुशाग्र - समान बुद्धी ।
व्यासंग - योग तिस होउन होय वृद्धी ॥
ज्या ज्या कलांत किसनें गुरू आणवीले ।
त्या त्या कला स्व - वश हा करि अल्प - काळें ॥४२॥
झाले सुपुष्ट बलशालि विशाल दंड ।
विस्तार छातिसहि मान भरे उदंड ॥
झालें तयार जणु चित्रच तें शरीर ।
आस्था धरून करितां श्रम नित्य फार ॥४३॥
लोकांमधें मजसिं मान कसा मिळेल ।
लक्ष्मी तिची बहिण कीर्ति कशी वळेल ॥
चिंतेस या उगम होय सवें जयाच्या ।
तारूण्य लागत मुखीं उमलों तयाच्या ॥४४॥
नाहीं ठिकाण जनका न पतीस कोठें ।
जावें स्वदेशिं न असें कमलेस वाटे ॥
कीर्ती वरील गमलें यशवंत हातें ।
आशा धरी विधि असो अनुकूळ यातें ॥४५॥
जाती सुखी असुखि सर्व़च लोक जेथ ।
स्वीकारि तो किसन सज्जन मृत्यु - पंथ ॥
ओपोनि सर्व हि धनें यशवंत - हस्तीं ।
त्यांची प्रिया सहगती करी पुण्य - मूर्ती ॥४६॥
आयुःपथीं किसनदास करी प्रचार ।
ज्या रीतिनें धरि तिला यशवंत धीर ॥
या कारणास्तव न कोणि तयास निंदी ।
गायास तद्गुण - गणां जन होति बंदी ॥४७॥
तो हा पहा गढुन जाय महा विचारीं ।
सत्पत्र एक दिसतें पडलें पुढारीं ॥
तें घे करें मधुन वाचुन ठाकि खालीं ।
सोडी सुदीर्घ सुसकार फिरे महालीं ॥४८॥
बोले मधेंच कमला - सुत आपणाशीं ।
थांबे बघे निरखुनी मग आसपाशीं ॥
पत्रांत काय मजकूर असे लिहीला ! ।
ज्यानें गढूळ यशवंत - समुद्र केला ॥४९॥
“ श्रीमंत सद्गुण - निधी यशवंत राया ।
विज्ञापिती तुजसिं लोक पुरांतलें या ॥
तें जाणण्यास्तव तुवां निजचित्त द्यावें ।
वाटेल जें विहित तें मग आचरावें ॥५०॥
साहूं शको छळ न मोंगल दुर्जनांचा ।
विश्वास जीवित - धनीं न धरों पळाचा ॥
त्रासें म्हणों म्हणुन बंड उभें करावें ।
जावें मरून परतंत्र कधीं नसावें ॥५१॥
जी आज भूषण - गती अमुची उद्यां ती ।
झाले अनावर न मोंगल सौख्य देती ॥
सर्वस्व जाउन सुखा मुकली प्रजा ही ।
गेला स्वदेश परकीय - करांत पाहीं ॥५२॥
दे साह्य, ये म्हणुनि आमुचिया कटांत ।
आम्हीं जिवावर असों उठले समस्त ॥
तूं शूर साहसि कृतज्ञ महानुभाव ।
वाखाणिती नवरवासि तुझा स्वभाव ॥५३॥
हें पत्र यास्तव लिहू शकलों उदारा ! ।
तूतें, तुझा भरंवसाचि अम्हांस सारा ॥
दे सूचना जरि न हें तुजला रुचेल ।
वागूं तसे मग उपाय जसा सुचेल ॥५४॥
जाऊं समस्त जन रोहनसिंग - गेहीं ।
ये मध्यरात्रिस करूं मग चिंतना ही ॥
सर्वस्व नाशुन हि देश करीन मुक्त ।
ऐशी जरी तुजसिं हिंमत येइं तेथ ” ॥।५५॥
होताच भूषण - वधें खवळून गेला ।
हें पत्र पाहुन मनांत असे म्हणाला - ॥
“ मी आजपासुन करीन अनेक यत्न ।
आणीन सोडवुन सुप्रिय देश - यत्न ॥५६॥
झाले न काय विजयी समरीं मराठे ? ।
जाईन मी तरून जाउन त्याच वाटे ॥
जिंकी न काय यवनां भट बाजिराय ? ।
मी यत्न ही जरि करीन अशक्य काय ? ॥५७॥
गेली प्रजा पिळुन देश धुळी मिळाला ! ।
हा दुर्मती मुसलमान छळी अम्हांला ॥
पाहोनि हेंमन कसें करपून जातें ! ।
घ्यावा यथेच्छ तरि सूड मनांत येतें ॥५८॥
हा भूषणा ! प्रियसख्या ! किति तूं उदार ! ।
कोट्यास भूषण च तूं अतिरम्य शूर ॥
घेईन सूड जरि मी न तुझ्या वधाचा ।
माझा जगीं जगुनिया पुरुषार्थ कैंचा ? ॥५९॥
हा हा ! परंतु फिरली जरि दैव - सत्ता ।
होईल केंवि तरि नेणतसें अवस्था ॥
प्राआण मुकेन धन होइल राज - दाय ।
भीतों न यास - परि माय करील काय ? ॥६०॥
पाहे विहंग गगन - स्थित लांब देश ।
तैसा विचार धरि धांव न शांति लेश ॥
आवेश आस भय हर्ष असे विकार ।
होती मनीं वदनिं बिंबित दीसणार ॥६१॥
माता प्रवेश इतक्यांत करी महालीं ।
साध्याच शुभ्र परि जी वसनास व्याली ॥
गोरा सुवर्ण न सुवर्णन होय ज्याचें ।
आकार उंच मुख वर्तुळ रम्य तीचें ॥६२॥
होतें जरी तिजसिं वर्ष न चाळिसावें ।
दुःखें उतार वय जीस परी दिसावें ॥
साध्वी सुशील कमला यशवंत - माता ।
प्रेमें वदे बहु सचिंत सुता पहातां ॥६३॥
“ बाळा ! असा करिसि तो कसला विचार ? ।
चिंता कशास्तव ? उदासपणा हि फार ॥
ये सांग बैस जवळी यशवंतराया ।
सांगेन युक्ति कुशली तुजला कराया ॥६४॥
बाळा असेल जरि जीव तुझा खुशाल ।
अत्यंत सौख्य मज होइल सर्वकाल ॥
भोगीन हाल विसरेन हि दुःख - जाळ ।
राहीन ठेविल जसें प्रभु तो दयाळ ” ॥६५॥
तो बोलला, - “ हुसकुनी यवनां यमांतें ।
द्याया करीति कट बाहति लोक मातें ॥
मी वीर - पुत्र असल्या बिकट प्रसंगीं ।
राहूं सुखे घरिं बसून कसा पलंगीं ? ॥६६॥
तूंबोलसी मम पिता अति शूर होता ।
संग्रामसिंह निजशत्रुस भीति देता ॥
मागें सरेल तरि हा सुत कां तयाचा ? ।
या वेळिं कां न अभिलाष धरी यशाचा ? ॥६७॥
धिक्कारूनी सकळ ऐहिक जाण सौख्य ।
माते ! रणीं मरण जें गणितात मुख्य ॥
तें प्रप्त या जरि तुझ्याच सुतास झालें ।
व्हावें कसें मग तुझें ? मनिं हेंच आलें ” ॥६८॥  
दावी तदा जननिला यशवंत पत्र ।
की पौर ज्यांत करुं इच्छिति शत्रु - सत्र ॥
बोले तदा मधुर ती कमला स्वरानें ।
आनंदजा पुसुनि अश्रु जला करानें ॥६९॥
“ मी वीर- दार म्हणवीं आणि वीर - कन्या ।
झालें तुझ्यासम सुता प्रसवून धन्या ॥
निश्चिंत जा कर सुखी तव देश - बंधू ।
मी वारिलें म्हणुन लोक मला न निंदू ! ॥७०॥
जन्मास जे भुवनि वीर - कुळांत ये ती ।
त्यां स्वस्यता घरिंबसून कुठून ये ती ? ॥
कर्तव्य साधु - जन - संमत तें तयांचें ।
लोकोपचार - सुख - रक्षण पाहण्याचें ॥७१॥
माझी किमर्थ करितोस बसून चिंता ।
संतान तूं मम असें निज - शत्रु - हंता ॥
आम्हीं मुली न डफळे - कुळिंच्या अजाण ।
या संकटा सुविषमास मनांत आण ॥७२॥
जाईल कीर्ति करुनी जरि बाळ माझा ।
लावून नश्वर शरीर अशाच काजा ॥
नेलें न जोंवरि अचिंत्य सुखांत काळें ।
तत्कीर्ति - देह बघुनी निववीन डोळे ॥७३॥
येतां वयांत धरिता कुल - पद्धती तें ।
तूं पुत्र भूषण विराजसि सत्कुलातें ।
नाहीं पिता जवळ हें तव पाहण्यास ।
आयास फार घडती म्हणुनी निवास " ॥७४॥
हें बोलतां वचन सद्गद कंठ झाला ।
अश्रु - प्रवाह नयनांतुन थोर आला ॥
तेव्हां रडे सुत हि बोलतसे तियेला ।
“ तूं व्यर्थ शोक - गहनीं बुडसी कशाला ? ॥७५॥
येईल तो सुदिन भेट यदा पित्याची ।
होईळ हीच मम धांव असे मनाची ॥
जे वायु - वेग - वश मेघ दिगंतरास ।
गेले न काय मिळतात परस्परांस ? ॥७६॥
मी काल रात्रिं निजलों असतां प्रभातीं ।
स्वप्नीं पिताबघितला मम दिव्य - कांति ॥
आलिंगुनी मजसि आश्वासनास देई ।
तूंतें हि पाहुन सद्भाद - कंठ होई ॥७७॥
बोले ‘ असें घडविलें हत - दैव - योगें ।
व्हावा अम्हां विरह काय उपाय सांगें ? ॥
राहेल जीव मम जोंवरि या शरीरीं ।
दोघां तुम्हां त्यजुन जाइन मी न दूरी ’ ॥७८॥
आशांकुरोद्भवन जें हृदयांत झालें ।
येईल काय तरि सत्फळ त्यास काळें ॥
कां तें न येइल ? जरी परमेश्वराची ।
इच्छा असेल तसली करुणाकराची ॥७९॥
दुःखें न काय मम मानस याच पोळे ।
दैवापुढें परि न कांहि उपाय चाले ॥
दीर्घ - स्वरें तुज न दुःख असो म्हणून ।
एकांति बैसुन किती रडलों असेन ? ॥८०॥
तूं देसि धीर मम केवळ धीट आई ।
तेणेंचि निश्चय जयीं मम चित्त होई ।
माझा परंतु असता जरि बाप येथ ।
तो दाविता सरळ एकचि नीट पंथ ॥८१॥
कर्त्यव - कर्म - करणीं उपदेश - कर्ता ।
येतां महव्यसन तारून पार नेता ॥
तो एक देउं शकणार असाध्य अर्थ ।
तस्मात् पिता न जरि सर्व असून व्यर्थ ! ” ॥८२॥
सुमहित कमला ती निर्मलानर्घ्य - शील ।
सदय - हृदय तीचा श्लाघ्य विख्यात बाळ ॥
करिति विविध गोष्टी या प्रकारें विचित्र ।
स्मरुन रात - कथा तो जाहली मध्य - रात्र ॥८३॥
नर खग मृग घेती शांत निद्रा सुखाची ।
किरकिर सुरु झाली रात्रि - कीट - स्वरांची ॥
दुमदुमत नगारा जाहला थोर कर्णा ।
ध्वनि हळुहळु येतां तोषवी प्राणि - कर्णा ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP