मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
बाराव्या दिवसाची क्रिया

बाराव्या दिवसाची क्रिया

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


सपिंडीश्राद्ध :- प्रेतास एक पिंड, व मृताचा पिता, पितामह, व प्रपितामह. ( मृतमाता असल्यास कर्त्याची पितामही, प्रपितामही, व वृद्धप्रपितामही ) यांस प्रत्येकीं एक एक पिंड देऊन प्रेतपिंडाचे तीन भाग करून दरेक भाग क्रमानें मृताचा पिता, पितामह, व प्रपितामह यांचे पिंडांत मिळवितात, व त्या योगानें प्रेताचें पितृत्रयीशीं ‘ सपंडन ’ होतें. या श्राद्धांत ही मुख्य क्रिया असल्यामुळें त्यास ‘ सपिंडीकरण - श्राद्ध ’ असें म्हणतात.
प्रयोजन :- सपिंडीश्राद्ध होईपर्यंत मृताचा जीवात्मा प्रेतलोकी वास करितो व ‘ सपिंडन ’ झालें म्हणजे पितृलोकी जाऊन पूर्वजांशी मिळून जातो व तेथें वास करितो, अशी समजूत आहे. यासाठी प्रेतत्वापासून मृताचे जीवास मुक्त करण्याचे हेतूनें हें श्राद्ध करितात.
प्रयोग :- देव, प्रेत व पार्वण ( तीन पितर ) यांचे स्थानी बसविण्यासाठी अनुक्रमें दोन, एक व तीन असे सहा ब्राह्मण सांगावे. व असमर्थ असल्यास एकेक ब्राह्माण असला तरी चालेल
“ प्रेताचें प्रेतत्व जाऊन त्यास पितृलोक प्राप्त व्हावा, म्हणून अमुक नांवाच्या वसु, रुद्र व आदित्यरूपी प्रेतपिता, प्रेतपितामह, व प्रेतप्रपितामह यांच्याशीं बारावे दिवशीं पार्वण व एकोद्दिष्टविधीनें सपिंडीकरण करितों ” असा संकल्प करावा. नंतर देवस्थानीं व पितृस्थानीं ब्राह्मणांस आणून बसवावें; आणि काम - कालसंज्ञक देवांचें आसनादि यथाविधि पूजन करावें; व प्रेतपितृस्थानी बसविलेल्या ब्राह्मणांची पूजा करितों, त्यास अनुमोदन द्या, अशी देवस्थानी बसलेल्या ब्राह्मणांची प्रार्थना करून, अनुमोदन मिळाल्यावर, अर्ध्यापर्यंत प्रेतपितृस्थानीय ब्राह्मणांची यथाविधि पूजा करून, प्रेतासाठी एक अर्घ्यपात्र मांडून व पितरांसाठी तीन पात्रें मांडून प्रेतपात्रावर चार दर्भ ठेवावे, व पितृपात्रावर प्रत्येकीं तीन तीन दर्भ ठेवावे, व पाणी घालून त्यांत तीळ टाकावे. नंतर पात्रावरील एक दर्भ घेऊन प्रेतस्थानचे ब्राह्मणाचे हाती द्यावा, व प्रेतपात्रांतील थोडें पाणि घेऊन प्रेताचा नामोच्चार करून ब्राह्मणाचे हातावर अर्घ्य द्यावें. नंतर पितरांची आज्ञा घेऊन प्रेतपात्रावर राहिलेले तीन दर्भ पितरांच्या तीन पात्रांवर अनुक्रमानें मिळवावें. त्यावेळी “ जे पितर यमराज्यांत आमच्या बरोबरीचे व एकचित्ताचे आहेत, त्यांचें वसतिस्थान आनंदमय असो; आणि हा आमचा यज्ञ त्यांच्या यज्ञामध्यें मिळो. ”
“ जे आमच्या बरोबर उत्पन्न होऊन आमच्याशीं एकचित्त झाले असून आमच्यांतच राहिले आहेत, त्यांचें ऐश्वर्य माझामध्यें या लोकीं मिळून जावो. जसा पूर्वीं देवांनीं हविर्भाग एकमतानें स्वीकारला, तसे तुम्हीं एकत्र जा, एकमेकाशीम गोडीनें बोला, तुमचा सर्वांचा एक विचार करा. ” “ यांचें स्तवन एकत्र असो, यांचें द्रव्यार्जन एकत्र असो, च चित्तहि एक असो; मी तुमची एकत्र स्तुति करितों, व हविर्भाग तुम्हांस एकत्र देतों. ” “ तुमचा सर्वांचा भाव एक असो; तुमची सर्वांची अंतःकरणें एक असोत; आणि सर्वांचा विचार एक रहावा, म्हणून तुमचे सर्वांचें मत एक असो. ” ( ऋ. ८-८-४९)
हे मंत्र म्हणावे. व सर्व मंत्राचे अंती ‘ हे प्रेता, तूं वसुरूप पित्यासह सायुज्यता पाव; ’ असें म्हणून उदक प्रेतपितृपात्रीं घालावें. पुनः तसेच मंत्र म्हणून ‘ रुद्ररूपी पितामहासह सायुज्यता पाव; ’ व पुनः मंत्र म्हणून ‘ आदित्यरूपी प्रेतप्रपितामहासह सायुज्यता पाव ’ असें म्हणून प्रेतपात्रांतून घेतलेलें उदक पितरांचें अर्घ्यपात्रांत घालावें. नंतर पुढील भोजनान्त कृत्य यथाविधि पावर्ण विधीनें करावें. नंतर बाकी राहिलेल्या भाताचे, एक मोठा व तीन लहान असे चार पिंड करून त्यापैकी मोठा प्रेतास, ब्राह्मणांचे उच्छिष्टपात्रासमीप एक दर्भ ठेऊन त्यावर द्यावा व त्याचे दक्षिण अगर पश्चिम बाजूस पावर्णविधींत सांगितल्याप्रमाणें यथाविधि कर्म करून प्रेताच्या ( मृताच्या ) पितृपितामहप्रपितामहांस तीन पींड द्यावे, व विसर्जनान्त पुढील विधि पावर्णश्राद्धाप्रमाणें करावा. नंतर ब्राह्मणांची आज्ञा घेऊन “ मधुर वारे वाहात आहेत, नद्यांतून मधुर पाणी वहात आहे. तशा औषधी मधुपूर्ण आहेत; रात्र व पहाट मधुर असते. पृथ्वीवरील धूळ मधुपूर्ण असते; आकाश मधुपूर्ण असो; सूर्य मधुमान् असो; आणि आमच्या गाई मधुमान् होवोत. ”
ह्या मंत्रानें दर्भाचे दोरीनें प्रेतपिंडाचे तीन भाग करून एकेक भाग अनुक्रमानें पितरांचे पिंडांत मिळवावा. अर्ध्योदक मिळवितानां जे मंत्र म्हटले वेळीहि म्हणावे. व अर्घ्यसंयोजनाचे विधीनेंच पिंडसंयोजन करावें, हें केल्यानंतर ‘ अन्न पितरो मादरध्वं, ’ पासून पिंडपरवहणापर्यंत पार्वणश्राद्धविधीप्रमाणेंच विधि करावा.
बारा दिवसपर्यंत धारण केलेलें उत्तरीय वस्त्र पिंडावर घालावें. नंतर करावयाचे प्रार्थनेचा मंत्र. “ प्रेताच्या आत्म्यानें तुमचे मागून गगन केलें असोन तो पितृत्व पावला आहे, आतां जे मागें राहिले आहेत, त्यांचें कल्याण होऊं ते चिरंजीव होवोत ” नंतर विकिरादि ब्राह्मणविसर्जन कृत्य पार्वणविधीनें करावें. गांवाचे सीमेपर्यंत जाऊन पिंड नदीच सोडावे, अगर गाईस खाऊ घालावे. व स्नान करून घरीं येऊन वैश्वदेवादि कृत्य करावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP