मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
कवीनं सोडून दिलं आहे हल्ल...

अभिजित पाटील - कवीनं सोडून दिलं आहे हल्ल...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


कवीनं सोडून दिलं आहे हल्ली
आपल्याच धुंदीत राहणं
तो वागतो आता
तीर्थक्षेत्राहून परत आल्यासारखा

रोज दिसतो सकाळी
दुधासाठीच्या रांगेत
कापडी पिशवी घेऊन

‘ आपण कवी आहोत, ’ असं सांगत नाही तो
कोणत्याच कार्यक्रमात

बायको - मुलांची ओळख करून देतो
सगळ्याच आप्त - स्वकीयांना

अंगणातल्या वेलीही ओळखतात
आता रोजच कवीला

खूप दिवसांनी फेरफटका मारला
त्यानं आपल्या शेताकडं

सायकलही चालवली कवीनं
नव्यानंच शिकल्यासारखी

घराच्या भिंतींना आता आनंद आहे
चौकटीवर उत्सव आहे
पण...कविता नाही

चारचौघांचं जसं असतं तसंच आहे
आता कवीचंही घर...
गर्दीत !

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP