श्रीकृष्ण कथामृत - सोळावा सर्ग

संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.


( मोहनिरास )

कर्माकर्मविवेकमूढमनसां बुद्धिं विधाय स्थिराम्
मोहध्वान्तमपाकरोति नितरां यस्यप्रभा चिन्मयी
यस्मिन् ब्रह्मणि राजते जगदिदं सिन्धौ तरङ्गोपमम्
तं विश्वेशमहं नमामो सततं गङ्गाधरं श्रीगुरुम् ॥१॥
सोडा धीर न देवा मागुति उभा धर्मास नाहीं भय
व्हवें उद्धट उद्धटास हरणीं हाची यशाचा नय
ऐसें बोधुन ओतिलें नव पुनःचैतन्य राष्ट्रांतरी
त्या श्रीसद्गुरु रामदासचरणां मी वंदितों आदरीं ॥२॥
यज्ञ सत्र हे कृतांत घाली
कुरुभूमीवर जणु त्या कालीं
धूळ उडाली पदघातानीं
तीच शोभते नभीं वितानीं ॥३॥
वीरवरांच्या रथीं पताका
गुढ्या तोरणें त्याच जणूं का
क्रोध पेटला पांचालीचा
अग्नि तोच या समर - मखाचा ॥४॥
हवि ते सैनिक यूप मतंगज
होता अर्जुन धनु चढवी निज
स्रुवे तेथचीं शस्त्रें नाना
गणा उपाकृत अंधसुतांना ॥५॥
टणत्कार जे शरासनांचे
ध्वनि ते स्वाहा तसे स्वधेचे
कंकण बांधी धर्म युधिष्ठिर
सेना पत्नी व्रतास तत्पर ॥६॥
पार्थसारथी यदुकुल भूषण भगवान् कृष्णमुरारी
यज्ञाचा त्या वेत्ता झाला रचित योजना सारी ॥७॥
विजयरथाच्या बसे धुरेवर
‘ ध्येय मुनींचें ’ असा परात्पर
रश्मी हातीं धरून ह्यांचे,
विनवी अर्जुन त्या मृदुवाचें ॥८॥
दो सैन्याचे घे मध्यावर
रथ माझा हे अच्युत सत्वर
वीर बघूं दे कोण रणींया
उभे खलांचें प्रिय साधाया ॥९॥
मेरू जैसा तमःप्रकाशी
भव्य तसा रथ उभयबलासी
मधें आणुनी कृष्णें म्हटलें
पाहा पार्थ हे कुरुगण जमले ॥१०॥
पुढती पाहुन भीष्म पितामह
गुरु, मातुल सुत बंधु सखे अह
वीराचे त्या मन विरघळलें
ओसरलें बल धनुही गळलें ॥११॥
म्हणे करुण तो कृष्णाबघतां स्वजना युद्धोत्सुक या
तनु थरथरते भ्रमतें मस्तक कवण कांपवी हृदया ॥१२॥
वधुनी वांधव सुख मिळवावे
पाप असे हे मज नच भावे
त्रैलोक्याच्या राज्या करितां
होईन ना मी वडीलां वधिता ॥१३॥
लोभें झालें अंध तयांना
धोर कुलक्षयजरि दिसलांना
ज्ञान सर्वही असुनी आम्हा
उद्यत व्हावें कसें अधर्मा ॥१४॥
जातिधर्म कुलधर्म विनाशुन
वर्णसंकरा व्हावें कारण
पितरांचें वारनें तिलोदक
राज्यसुखासी होउन उत्सुक ॥१५॥
होईल हें न कधीं मम हातें
वधोत कौरव सुखेन मातें
निरयगती तरि टळेल तेणें
पाप नको हें जीवनभेणें ॥१६॥
वदुनी ऐसें सहसा अर्जुन रथांत बसला खालीं
चाप टाकिलें भरले डोळे विषण्णता बहु आली ॥१७॥
वासुदेव म्हणतात तयासी
दुर्बुद्धी ही सुचली कैसी
षंढपणा हा शोभत ना तुज
उठ अर्जुना धनु सावर निज ॥१८॥
वदे धनंजय टाकुं कसे शर
पूजनीय भीष्मद्रोणावर
वडिला मारुं महानुभावा
भीक बरी कीं त्याहुन देवा ॥१९॥
विमूढ झालें चित्त मदीय
समजत ना मजसी हित काय
शिष्य तुझा मी शरण पदासीं
शोक हरी मम हे हृषिकेशी ॥२०॥
शक्य मला ना लढणें तोंवर
देई प्रभु उपहासुन उत्तर
नको तयाचा शोक करीसी
वदसी भाषा प्राज्ञपणेंसी ॥२१॥
राहो जावो प्राण कुणाचा पंडित शोक न करिती
देह विनाशे मरे न आत्मा या ज्ञानें स्थिर वृत्ती ॥२२॥
आत्मा शाश्वत विभु अविकारी
बघतां होती विस्मित सारी
भूतें परि असती क्षणभंगुर
शोक तयांचा व्यर्थ खरोखर ॥२३॥
श्रेय जगीं क्षत्रियास कांहीं
धर्मयुद्धसम दुसरें नाहीं
स्वधर्म तव हा त्याग तयाचा
कारण बहुविध अपकीर्तीचा ॥२४॥
जयापजय वा सुखदुःखासी
सममानुन हो रत युद्धासी
पाप न मग लागेल कशाचें
दोष सर्व हे काम्यकृतीचे ॥२५॥
भोगलोलुपा असतां बुद्धी
स्थिरतेची नच लाभत सिद्धी
टाक सर्वही त्रिगुणोपाधी
सोड फलाशा मिळे समाधी ॥२६॥
“ स्थिर बुद्धीचे लक्षण मजसी सांग केशवा सारें ”
म्हणे हरी “ टाकिता वासना स्थितप्रज्ञ तो वा रें ॥२७॥
अपुला आपण तुष्ट असे जो
वीतराग - भयरोष सदा जो
आवरुनी इंद्रियास मत्पर
विषय न चित्तीं सर्वनाशकर ॥२८॥
निजे जिथें जागे इतरेजन
कामें तृप्ती नच हें जाणुन
निस्पृह निर्मम निरहंकारी
शांतिसुखाचा तो अधिकारी ॥२९॥
स्थितधी पुरुषाचें हें लक्षण
ब्राह्मी स्थिति ही मोहविनाशन
लाभ हिचा होउनही अंती
ब्रह्मरूप त्या मिळते मुक्ति ॥३०॥
बुद्धि श्रेष्ठा जर कर्माहुन
लाविसी कां मग कार्या दारुण
गोंधळ केला अधिकची माझा
एक हिताचें वद यदुराजा ॥३१॥
वदती भगवान् कथिल्या पूर्वीं ज्ञान - कर्म - निष्ठा मी
कर्म टाकून नैष्कर्म्य न ये शक्य न वास निकामी ॥३२॥
देह आवरी ध्यास मनांतें
हें न खरें तूं त्यज संगातें
यज्ञ येत हा जन कल्याणा
ब्रह्मसर्वगत यज्ञीं जाणा ॥३३॥
कार्य नसे जरि आत्मरतासी
झटतो तो परि लोक हितासी
जनकसमांसी याहीं सिद्धी
जनार्थ मीही घेत उपाधी ॥३४॥
चळवावी नच बुद्धि जनांची
मूर्ख समजतो कर्ता मीची
खेळ गुणांचा ज्ञाता मानी
लढ तूं कर्मे मज अर्पोनी ॥३५॥
विनाश होतो त्यजितां मम मत
भला स्वभावा धरुनी वागत
गंवसावे ना रागद्वेषी
गणुन भयावह परधर्मासी ॥३६॥
पापा होतो प्रवृत्त का नर या प्रश्ना हरि सांगे
क्रोध काम हे रजोगुणांचे प्रेरिति त्या बलवेगे ॥३७॥
ज्ञान झाकिती रिपु हे आधी
वास करुन इंद्रिय मन बुद्धीं
मन बुद्धीच्या पर तत्त्वासी
जाणुन या रिपुयुग्मा नाशी ॥३८॥
योग हाच मी कथिला सूर्या
क्रमें जाणती राजर्षी या
रहस्य कथिलें भक्त सखा तू
मनीं अर्जुना आण न किंतू ॥३९॥
तुझें नि माझे जन्म किती तरि
धर्मोद्धारा येतों भूवरीं
मुक्त होत हे तत्व कळे ज्या
ज्ञान - पूत ये रूपीं माझ्या ॥४०॥
जसा भक्त मज तसा तया मी
चार वर्ण रचिले गुणकर्मी
कर्म न लिंपे स्पृहा न मातें
अलिप्त करूनी, म्हणुनी ज्ञाते ॥४१॥
कर्माकर्मी बावरती बुध कथितों शुभकर तुज तें
सर्व परिग्रह टाकुन करितां कर्मचि अकर्म होतें ॥४२॥
यज्ञासाठीं ज्ञा ना व स्थि त
केलीं कर्मे जाति लयाप्रत
बाह्यरूप हा यज्ञ जयाचा
प्रकार कांहीं असो तयाचा ॥४३॥
ज्ञान - यज्ञ हा श्रेष्ठ तयासी
जाणुन घे तो भजुन गुरुसी
ज्ञाना सम ना पवित्र कांहीं
सर्व त्यामधें जळुनी जाई ॥४४॥
अश्रद्धा संशय बहु घातक
लोक न दोन्ही तयें न वा सुख
छेद अर्जुना सत्वर त्यासी
ज्ञान खङ्ग घे ऊठ करासी ॥४५॥
“ संन्यासाची गासी महती
कर्मयोगही कृष्णा ! पुढती
एक सांग ” मग म्हणे मुरारी
सांख्य योग दोन्ही हितकारी ॥४६॥
अज्ञ मानिती भेद तयासी, एकचि फल दोघांचे
कर्मयोग हा सुलभ, कष्ट बहु होती संन्यासाचे ॥४७॥
करणें अपुल्या विषया घेती
लेप तयाचा लव ना चित्तीं
ईश न कारण भल्याबुर्‍यासी
मोह पडे तो अज्ञानासी ॥४८॥
हर्षोद्वेगा वाव न राही
सम - दर्शी ते सर्वांठायी
बाह्यस्पर्शज भोग दुःखकर
तेथ न योगी रमवी अंतर ॥४९॥
द्वंद्व निमे, हृदि उजळे ज्योती
ब्रह्मपदा गतपातक येती
मला जाणतां महेश्वरासी
शांति मिळे त्या यतेंद्रियासी ॥५०॥
कर्म करी सोडूण फलाश्रय
तो योगी तो यती, न अक्रिय
विषय - कर्म - संकल्पा टाकी
पदवी योगारूढ तया कीं ॥५१॥
तारक मारक अपुले आपण आत्मा निज जिंकावा
सोनें माती शत्रुमित्र ज्या सम तो युक्त म्हणावा ॥५२॥
एकांतासी शु भा स ना व र
करून बसावें देह मनस्थिर
ध्यान करावें मम यत - चित्तें
त्या योग्या पर शांती मिळतें ॥५३॥
युक्तवर्तनीं योग सुखावह
आत्मनि होते स्थिर मन निस्पृह
सुख आत्यंतिक मिळे अतीन्द्रिय
मोठें दुःखहि नुपजवि मग भय ॥५४॥
योग निग्रहें हा साधावा
इंद्रियगण हळुहळूं दमावा
यत्नें करणें आत्मसंस्थ मन
ब्रह्मसुखा ये सुटतां चिंतन ॥५५॥
सर्वांभूतीं बघे स्वतांला
आपणांत सर्वहि भूताला
एकपणें मज भजे विभूसी
योग साधला पूर्ण तयासी ॥५६॥
प्रमाथि चंचल दुर्निग्रह हें मन, तरि वश करितां ये
सतताभ्यासें दृढ वैराग्यें म्हटलें श्री यदुरायें ॥५७॥
योग न साधो एक्या जन्मीं
वायापण परि नसे सुकर्मीं
सुकुलीं जन्मे पुण्यबलानें
तेथें मिळवी यश यत्नानें ॥५८॥
ज्ञान कर्म तप या सर्वांहुन
थोर योग हो योगी अर्जुन
योग्यांतहि जो भजतो मातें
मानितसे मी श्रेष्ठ तयातें ॥५९॥
जाणशील तूं पूर्णपणें मज
पार्था देतों ज्ञान असें तुज
जाणायाचें मग ना उरतें
तत्व कुणा मम विरळा कळतें ॥६०॥
प्रकृति मदीया पराऽपरा ही
प्रणव जगा, पर मजहुन नाहीं
वस्तूंचे वस्तुत्व असे मी
काम मी जो वसे सुधर्मीं ॥६१॥
त्रिगुणा आश्रम मीच राहती मयि ते मी नच त्यासी
माया मोहित जाणती न हें कळते मम भक्तासी ॥६२॥
भक्त चतुर्विध मज भजताती
ज्ञानी त्यांतिल माझी मूर्ती
प्राप्ती दुर्लभ परी अशाची
मी श्रद्धा चळवी न कुणाची ॥६३॥
मी मायेनें असे समावृत
जीव सर्वही द्वंद्वें मोहित
क्ळे न माझें रूप कुणासी
कळतें ज्या तें मोक्ष तयासी ॥६४॥
म्हणे किरीटी ब्रह्म कर्म तें
अधिदैवत अधिभूत कोणतें
कशास रे अध्यात्म म्हणावें
कसें शेवटीं तुज जाणावें ॥६५॥
देव सांगती मग पुरूषोत्तम
अक्षर जें तें समजे ब्रह्म
सर्ग कर्म, अध्यात्म स्वभावा
अधिभूते मानी क्षर भावा ॥६६॥
पुरुष तोच अधिदैवत पाही अधियज्ञू मी देही
मत्स्मरणें त्यजितां तनु मिळतो मजसी संशय नाहीं ॥६७॥
अंती स्मरतां तद्भावा ये
लढ तूं स्मरुनी मजसी हृदयें
ध्यान घडे ज्या परात्पराचें
त्या योग्या भय नच जन्माचें ॥६८॥
परंधाम मम अक्षर पार्था
नसे निवर्तन जेथें जातां
अनन्य भक्ता लावतसे तें
अयनें दोन्ही समचि तयातें ॥६९॥
शुक्ल क्रुष्ण या दोन गतीसी
जाणें, होत न मोह तयासी
योग असा हा पार्था साधी
स्थान जयाचें सर्वां आधीं ॥७०॥
ज्ञान ऐक हें म्हणे दयाघन
सुटसी जेणें तूं अशुभांतुन
लिप्त नसे मी प्रसवे माया
आध्यक्षीं मम चराचरा या ॥७१॥
मूढा न कळे तत्व खरें मम मोहित राक्षस भावीं
परी महात्मे अनन्य होती प्रकृति तयांची दैवी ॥७५॥
गाती कीर्ती करिती वंदन
निश्चय करुनी युक्त उपासन
विश्वमुखा मज दुसरे ज्ञानी
भजती भेदाबेद मतींनीं ॥७३॥
सर्वाश्रय मी सर्व गती मी
वेद यज्ञ ओंकार धनी मी
सकाम यज्ञें भजती मातें
भोगितात मग गतागतातें ॥७४॥
सकलहि भजती पर्यायें मज
मिळे गती परि हेत जसा निज
पान फूलही अनन्य भावें
देतां मीं त्या उरीं धरावें ॥७५॥
सम आहें मी सर्वां भूतीं
दुष्टहि भजतां सज्जन होती
परागती मिळते नीचा ही
भक्ता मम नच दुर्लभ कांही ॥७६॥
सर्व समर्पुन मज मन्मन हो मद्याजी मद्भक्त
शरण मला ये होशिल पार्था सर्वमुक्त मद्युक्त ॥७७॥
ऐक भारता हे मम भाषण
म्हणे श्रीहरी तव हितकारण
प्रभव न माझा कळे कुणाही
मज जाणें तो मुक्त मळेंही ॥७८॥
पृथग्भाव बहु मनू महर्षीं
उगम मीच कीं एक तयांसी
हें जाणुन मज भजती ज्ञाते
रमती बोधित परस्परांते ॥७९॥
बुद्धियोग मी देतों भक्तां
विनवी अर्जुन जोडुन हातां
“ परमेशा तुज मुनिगण गाई
तेंच बोधिता स्वयें मलाही ॥८०॥
कुणि न तुला तुजवीण जाणती
सांग तूंच मज आत्मविभूती
“ बरे ” बोलती मग पुरूषोत्तम
“ विस्तारासी अंत नसे मम ॥८१॥
आदि मध्य मी अंत जगाचा आत्मा सर्वांभूती
विद्या मीची अध्यात्माची काल मीच धृतिकीर्ती ॥८२॥
वृष्णी माजी वासुदेव मी
पंडुसुतांसी अर्जुन तो मी
सत्व असें मी सत्ववतांचें
दंड शासनीं स्वरूप माझें ॥८३॥
थोड्या कथिल्या या मुख्यांतिल
कोण विभूती माझ्या मोजिल
वैभव लक्ष्मी प्रभाव जेथें
विशेष दिदतां मदंश तेथें ॥८४॥
लावूं हे पाल्हाळ कशासी
इतुकी उक्ती होय पुरेशी
एकच अंशें सर्वहि विश्वा
व्यापियलें मी जाण पांडवा ॥८५॥
“ अद्भुत तव हें रूप महेश्वर
दाखिव मजसी नयनें श्रीवर
शक्ति जरी मम असेल साची
तव वचनीं मी इच्छित हेंची ॥८६॥
वदती भगवान् पहा अर्जुना विश्वरूप हें माझें
यांत चराचर असे, दिव्य घे दृष्टी, निरख हवें जें ॥८७॥
देव विश्वतोमुख झालासे
सूर्य - सहस्रासम भा भासे
एकवटे जग विभक्त तेथें
वदे धनजंय लववुन माथें ॥८८॥
भूतसंघ तव दिसे शरीरीं
अपार रूपें दिशांस चारी
दीप्त तेज हें दिपवी नयना
अज अव्यय तूं पुरूष पुराणा ॥८९॥
लोकां भिववी रूप भयंकर
स्तविती विस्मित नमुनी सुरवर
कराल - मुख - पद - कर - नयनांची
रूपें उडविति गाळण माझी ॥९०॥
तुझ्या भयानक दाढांखालीं
वीर मंडळी चिरडुन गेली
जळत्या वदनीं शिरतां दिसती
लोक,कोण तूं भैरवमूर्ती ॥९१॥
“ लोकक्षयकृत् काळ असें मी वधिलें सकलहि वीरां
निमित्त हो तूं जय मिळवाया, ऊठ करी रण, धीरा ” ॥९२॥
भीत भीत मग वदला अर्जुन
‘ महिमा योग्यच तुझा जनार्दन
अचिंत्यरूपा अ नं त शक्ते
सहस्रशा तुज नमो नमस्ते ॥९३॥
अजाणतां तुज सलगी केली
अपराधा त्या उदरीं घाली
भ्यालों तव या भीषण रूपें
रूप धरावें पुनरपि सोपें ” ॥९४॥
सौम्य होउनी वदे रमाधव
“ आज तुला जें दिसलें वैभव
तें न दिसे जप यज्ञाध्ययनें
लाभे केवळ अनन्य भजनें ॥९५॥
असंग मत्पर भक्त मदीय
“ मत्कर्मे मद्रूपचि होय
म्हणे धनंजय भक्त तुझा कीं
ब्रह्मोपासक उत्तम लोकीं ॥९६॥
क्लेश तया बहु, उद्धरितों मी मत्पर ज्याची वृत्ती
अव्यक्ताचा मिळे उपासक मलाच येउन अंती ॥९७॥
मज मध्यें मन नच होतां स्थिर
कर फलाचा त्याग तरी कर
त्यागें मिळते अपार शांती
मित्र करुण तो सकलांभूतीं ॥९८॥
आवडतो तो मजसी भारी
सदा असे जो स्थिर अविकारी
धर्म्यामृत हें आचरिती जे
सुभक्त ते प्रिय अतिशय माझे ॥९९॥
क्षेत्र देह हा मी क्षेत्रज्ञ
छंद सूत्र गाती मुनि तज्ञ
भू ता हं का रा व्य क्तें द्रि य
क्षेत्र बुद्धि सविकार नि सविषय ॥१००॥
लोभदंभहिंसा न शिवे वा
क्षमा शौच शम दम गुरुसेवा
असक्त मम सद्भक्त विरागी
ज्ञान उलट अज्ञान विभागी ॥१०१॥
ज्ञान ऐक जें देई अमृत
परब्रह्म हें अतीतसदसत
अनादि अव्यक्त असक्त निर्गुण
विश्वा तरि जें करितें धारण ॥१०२॥
तेजाचें तेज हें ज्ञान हें ज्ञेय हेंच हृदयस्थ
जाणुनिया हें सकल भक्त मम होतो मद्भावस्थ ॥१०३॥
प्रकृति सगुण कारण सर्गासी
पुरुष महेश्वर भोक्ता त्यासी
उभयाधीन स्थावर जंगम
हें कळतां दे मृत्यु न त्या श्रम ॥१०४॥
पुरुष अकर्ता तदीय सत्तें
एकत्वा ना त्यजती भूतें
क्षेत्रासी या प्रकाशवी तो
ज्ञानें बघतां ब्रह्मा मिळतो ॥१०५॥
गर्भ धरीं मी विश्वाचा या
महद्ब्रह्मयोनीं कौंतेया
कळल्यावर हें व्यथा न होते
अव्यय आत्मा त्रिगुणीं गुंते ॥१०६॥
प्रकृति - गुणांनीं सत्व रजस्तम भरले सर्वहि भावीं
प्रकाश सत्वीं कार्य रजासी तमांत जडता व्हावी ॥१०७॥
ज्ञान अनामय सुख सत्वासी
जात तयानें उर्ध्वगतीसी
दुःख लोभ वासना रजाचें
लक्षण, मध्यें स्थान तयाचें ॥१०८॥
तमीं मूढता प्रमाद निद्रा
गती तयानें मिळे अभद्रा
अमृत लाभतें त्यजिलें या जरि ”
म्हणे विजय “ हें घडे कसें परि ” ॥१०९॥
देव सांगती प्रिय भक्तासी
मूळ वरी या अश्वत्थासी
अव्यय हा यच्छखा खालीं
छंद जयाचीं पानें झालीं ॥११०॥
विषयांकुर तरु सर्व दिशांसीं पसरे रूप न कळतें
असंग शकें छेदुनियां जितमोहा स्थिरपद मिळतें ॥१११॥
अंश जीव मम लिंगशरीरीं
वि ष यां से वी करणपुढारी
स्थूल गतागत येणें होतें
मूढा न कळे बघती ज्ञातें ॥११२॥
रवि चंद्रानल भासवितों मी
रक्षि औषधी धरितों भूमी
जठराग्नी मी मी सर्व हृदीं
ज्ञानाज्ञानस्मृतिकर वेदीं ” ॥११३॥
कूटस्थासी म्हणती अक्षर
जाणावें क्षर सर्व चराचर
पर दोन्हीहुन मी पुरूषोत्तम
लोकवेद विख्यात यशें मम ॥११४॥
विगतमोह सर्वज्ञ मलाही
जाणुन भावें मत्पर होई
गुह्य कळे हें जयास सत्य
होत भारता तो कृतकृत्य ॥११५॥
अभय विशुद्धि स्वाध्यायार्जव
सत्य अहिंसा अगर्व मार्दव
धैर्य दान तप धर्मीं आस्था
हीच संपदा दैवी पार्था ॥११६॥
क्रोध दर्प पारुष्य मूढता दंभ आसुरी जाणें
बाधक ही, दैवी उद्धरिते, ती तव शोक न करणें ॥११७॥
द्विविध लोक ते दैव नि आसुर
दैवी कथिले तुला सविस्तर
त्याग योग नकळे असुरांसी
शुचिता सत्य न धर्म तयासी ॥११८॥
नाहीं म्हणती जगास कारण
ओळखती ना कामार्थाविण
मत्त, थोर मानिती स्वतःला
मी त्यां नेतों अधोगतीला ॥११९॥
क्रोध कामहीं नरकद्वारें
वर्ते म्हणुनी शास्त्राधारें
शास्त्र पाहुन निर्णय घ्यावे
म्हणुन पार्थ हें युद्ध करावें ॥१२०॥
“ श्रद्धान्वित जे कर्म करिती सोडुन शास्त्रविधीला
निष्था त्याची कसली कृष्णा ” या प्रश्ना प्रभु वदला ॥१२१॥
स्वभावजा ती त्रिविधा श्रद्धा
सात्विक राजस तामस भेदा
श्रद्धा जैसी तसा होत नर
मददंभें मज कष्टविती खल ॥१२२॥
यज्ञदान तप आहारीं वा
त्रिभेद हेंची धरुन स्वभावा
पवित्र सात्विक दंभी राजस
मूर्ख अमंगळ असती तामस ॥१२३॥
‘ ॐ तत्सत् ’ या निर्देशानें
करिती बुध कर्में श्रद्धेनें
अश्रद्धेनें जें जें होतें
उपभोगी तें इथें न तेथें ॥१२४॥
विजय म्हणे हे रथांगपाणे
तत्व कथी मज पृथक्पणानें
संन्यासाचें त्यागाचेंही
संशय इतुका हृदयीं राही ॥१२५॥
वदे श्रीहरी सकाम कर्में त्यजितां तो सन्यास
त्याग बोलती परी विचक्षण कर्म - फल - त्यागास ॥१२६॥
कर्मे टाका म्हणती कांहीं
त्याग परी तो तामस पाही
यज्ञदान तप नच टाकावें
फलाभिलाषी मत्र नसावें ॥१२७॥
जिवंत तोंवर कर्म सुटेना
म्हणुन म्हणावें भलें बुरें ना
पांच कारणें तया सदैव
कर्तृ करण चेष्टा स्थल दैव ॥१२८॥
अलिप्त बुद्धी निरहंकारी
बाध न त्यासी वधितां सारी
ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशी ही
कर्मचोदना त्रिविधा पाही ॥१२९॥
संग्रह आहे त्रिविध असाची
पुनः कल्पना गुणभेदाची
सात्त्विक कर्ता असंग राही
अनहंवादी विकार नाहीं ॥१३०॥
कामुक हिंसक राजसकर्ता, तामस मूढ विषादी
ज्ञान कर्मही आहे पार्था त्रिविध असे गुणभेदी ॥१३१॥
परिणामीं जें हितकर होतें
सात्विक सुख तें म्हणती ज्ञाते
राजसगोडी मुखास केवळ
आद्यंतीं तामसी अमंगळ ॥१३२॥
वर्णां कर्में दिलीं स्वभावज
सिद्धी मिळते अनुसरतां निज
नच टाकावें सदोष म्हणुनी
कर्म न एकहि, दोषा वांचुनि ॥१३३॥
कर कर्में तूं मदाश्रयानें
सर्व संकटें तरशिल तेणें
ऐकशील ना अभिमानें जरि
सर्वनाश होईल तुझा तरि ॥१३४॥
ईश्वर हृदयीं सर्वांभूतीं
फिरवी जीवा मायाशक्तीं
भावानें जा शरण तयासी
भोग तत्कृपें शांति - सुखासी ॥१३५॥
प्रिय तूं माझा म्हणूण तुला हें गूज जिवींचें कथिलें
सर्वगुह्यतम वाक्य ऐक हें आतां हितकर वाहिलें ॥१३६॥
सकलहि धर्मा दूर करावे
मज एका ये शरण सुभावें
सर्व पातकांतुन मी तुजसी
तारिन रे त्यज शोक भयासी ॥१३७॥
शास्त्र अर्जुना बहु हें पावन
नास्तिकास सांगणें कदापि न
श्रद्धा धर्मीं नसे जयासी
पडों न देई छाया त्याची ॥१३८॥
अभिमान न ज्या परंपरेचा
असे पोसणा जो परक्यांचा
तुच्छ जयासी देव देश कुल
अधिकारी तो येथ नसे खल ॥१३९॥
सज्जनास मम वच सांगावें
चरितहि मम त्या सन्मुख गावें
भाव धरोनी जो परिसे हीं
पुण्य लोक मिळवील विदेही ॥१४०॥
ऐकिलेस ना तूं पार्था हेंमन करूनी एकाग्र
श्वेतवाहना सरलासे ना तव संमोह समग्र ॥१४१॥
श्रुति पावन जणुं जागृत झाली
गंगेचा ये प्रवाह खालीं
उपनिषदांची सुरधेनू ही
आर्थमिषें जगता सुख देई ॥१४२॥
बोधानें या श्रीकृष्णाचे
मोह - पटल हरलें विजयाचें
राख झडावी अंगाराची
कमळ खुले वा हंसतां प्राची ॥१४३॥
भानावर जणु येई मूर्च्छित
धुकें वितळलें रवि प्रकाशत
विद्या विस्मृत जणु का स्फुरली
फुले आम्रवन वसंत - कालीं ॥१४४॥
श्रीकृष्णास करी धनंजय तदा अत्यादरें वंदन
ठाके वीर शरासना चढवुनी प्रेमें करी भाषण
गेला मोह समूळ ये स्मृति विभो बोध प्रसादें तव
आज्ञा मानुन युद्ध हें करित मी आतां न शंका लव ॥१४५॥

‘ मोहनिरास ’ नांवाचा सोळावा सर्ग समाप्त

लेखनकाल :-
आश्विन शके १८७१

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP