मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय चौथा

आदिपर्व - अध्याय चौथा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


शौनक पुसे, तयाल असौति म्हणे, चरित आयिका चारु;
होता यायावरकुलतिलक प्रथमाश्रमी जरत्कारु. ॥१॥
यतचित्त ऊर्ध्वरेता, जितनिद्राहार, तरुतळीं राहे;
गर्तांत पूर्वजांतें करितां तोर्थाटनासि तो पाहे. ॥२॥
त्यांसि जरत्कारु पुसे, ‘ कोण तृणस्तोमलग्नपाद असे ?
गर्तीं अधोमुख तुम्हीं लोंबतसा ? पावलां विपत्ति कसे ? ॥३॥
ज्याचा अवलंब तुम्हां, त्याहि तृणस्तोममूळकासि महा -
मूषक खंडितसे कीं, हा शीघ्रचि गर्तपातहेतु, अहा ! ’ ॥४॥
भूलोक गर्त, मूषक काळ, तृणस्तंब वंश, हा भाव;
संतति नसतां,स अर्गीं पितरांसि वसावया नसे ठाव .॥५॥
ते पितर म्हणति, ‘ आम्हां यायावरनाम ऋषि जनख्यात;
आहों पतनोन्मुख; हा होत असे संततिक्षयें घात. ॥६॥
आहे वंशीं एकचि पुरुष, जरत्कारुनामक, ज्ञानी;
परि तेणें, स्त्री न करुनि, केली हे संततिक्षयें हानी. ॥७॥
एक तपचि करितो तो मंद, करीनाचि यत्न संतानीं;
संतानोत्पादन जरि निंदित, केलें कशसि संतानीं ? ॥८॥
आम्हींच मंदभाग्य, स्वर्गापासूनि होतसों भ्रष्ट;
तूं कोण साधु ? दुःखितवृत्तें होसील विव्हळ स्पष्ट. ’ ॥९॥
त्यांसि म्हणे, ‘ तो मींच. स्वोद्धाराचा प्रयत्न मज सांगा. ’
ते म्हणति, ‘ जरत्कारो ! वत्सा ! पुससी कळोनियां कां गा ? ॥१०॥
स्त्री संपादुनि जोडीं तीचा ठायीं विशुद्ध संततिला;
तारील तीच आम्हां; म्हणति ‘ व्यसनांत नाव ’ संत तिला. ’ ॥११॥
येरीं म्हणे, ‘ जरि मला नामें, शीलें, वयें, समा कन्या
देतील बंधु भिक्षेपरि, तरि मान्या असे; नसे अन्या. ॥१२॥
पोषण न करीन तिचें; स्वल्पहि न तदर्थ वित्त जोडीन;
होतांचि गर्भधारण संग तिचा मीं स्वतंत्र सोडीन. ॥१३॥
विधि हाचि मान्य आहे, याहुनि विधि मान्य मज नसे इतर. ’
ऐसें ऐकुनि म्हणती, ‘ आम्हांला हेचि लक्ष ’ ते पितर. ॥१४॥
मग पृथिवीवरि फिरला, परि कोठेंही न काम तो घडला.
दारकरग्रहणार्थी साधु जरत्कारु, वचन माना, व्हा ॥१५॥
‘ कन्याभिक्षार्थी मीं विप्र जरत्कारु, वचन माना, व्हा
सिद्ध, मला द्या विधिनें परि तीहि असेल जरि समानाव्हा. ’ ॥१६॥
यापरि वनांत हाका मोट्यानें तीन विप्र जों फोडी,
तों भगिनीतें आणुनि वासुकि तत्काळ कर तया जोडी. ॥१७॥
‘ नाम जरत्कारु ’ असें पुसतां कथिलें; दिली यथाविधिनें.
वरुनि तिला, हर्षविलें निजपूर्वजचित्त त्या तपोनिधिनें. ॥१८॥
‘ जनमेजयसत्रीं निजजननीशापें हुताश भक्षील;
त्या व्यसनीं तेजस्वी भगिनीसुत आपणांसि रक्षील. ’ ॥१९॥
या अर्थें वासुकिनें दिधली अनुजा तयासि आणूनि.
शापाचा परिहार श्रीविधिच्या आननेंचि जाणूनि. ॥२०॥
आस्तीकनामक तिला सुत झाला; अग्नि जेधवां भक्षी,
जनमेजयसत्रीं, तो जावुनि, हुतशेष मातृकुळ रक्षी. ॥२१॥
आतां अहिशापाचें कारण सूतात्मजोक्त बोलावें;
संक्षेपविस्तरज्ञ श्रोत्यांचें मस्तकाब्ज डोलावें. ॥२२॥
कद्रू विनता कन्या दक्षाच्या, कश्यपर्षिच्या जाया;
पतिनें दोघींस दिले वर, झाल्या मागत्या प्रिया ज्या या. ॥२३॥
कद्रू समवर्चस दशशत सुत मागे तिला म्हणे तो ‘ घे. ’
विनतेसहि दे कद्रूतनुजाधिकशक्ति पुत्रमणि दोघे. ॥२४॥
‘ यत्नें गर्भ धरावे ’ ऐसा उपदेश आदरें केला.
मग तो भगवान् कश्यप तप साधाया तपोवना गेला. ॥२५॥
प्रसवे अनल्पाकळें कद्रू अंडें सहस्र वरदानें.
विनता दोनि प्रसवे. दिधलीं पतिनें अभीष्टवरदानें. ॥२६॥
वृद्ध्युचितोष्णस्थानीं दासीनीं, पूर्ण पांचशत वर्षें
केली अंडें जतन, प्राणांसम, कृपणवित्तसम, हर्षें. ॥२७॥
अंडें भेदुनि झाले प्रकट अहिसहस्र; माय सुख पावे;
विनता म्हणे, ‘ अहा ! सुत कां न उपजले ? वरें मजहि व्हावें. ’ ॥२८॥
फोडी अंडाप्रति तों पाहे पूर्वार्धसिद्ध देहातें;
ताप अधैर्यें विनता आपुलिया आपणासि दे हातें. ॥२९॥
क्रोधें तो पुत्र म्हणे, ‘ त्वां जीची धरुनि मानसीं स्पर्धा,
करुनि त्वरा, अधीरे ! केला मद्देह हा असा अर्धा. ॥३०॥
या अन्यायें तीची दासी होसील पंचशत अब्द;
देवविला शाप तुझ्या कर्मे; लावूं नको मला शब्द. ॥३१॥
जरि दुसर्‍याहि सुताचा घात असा न करिसील, तरि मुक्त
दासीत्वापासुनि तुज करिल, असों दे मनांत हें उक्त. ॥३२॥
पंचशताब्दानंतर उपजेल दुजा तुजा सुत, न तूर्ण;
जरि रक्षिसील तोंवरि, करिल मनोरथ समस्त परिपूर्ण. ’ ॥३३॥
विनतेचा प्रथम तनुज अरुण; तरणिसूत जाहला आहे.
दुसरा गरुड उपजतां भरला गगनीं; न मंदिरीं राहे. ॥३४॥
झाला क्षुधित प्रलयानळसा, तेजस्विवर्य तो पक्षी
क्षुत्पीडाशमनर्थ ब्रह्म्यानें अन्न कल्पिलें भक्षी. ॥३५॥
त्या कद्रूची विनता दासी, सुतशापकारणें, झाले,
तीच कथा सांगावी, म्हणुनि, अमृतमथनसत्कथा आली. ॥३६॥
चतुराननमुख्यामर सर्व कनकनगशिरीं बसोनि, ‘ कसें
अमृतोत्पादन करणें ? ’ चिंतिति नारायणासमक्ष असें. ॥३७॥
हरिनें विधिला केलें अमृतप्राप्त्यर्थ युक्तिचें कथन.
‘ मंदरनगें करावें लवणोदधिचें सुरासुरीं मथन. ’ ॥३८॥
प्रभुमंत्रें संधि करुनि, झाले एकत्र देवदैत्य, मग
यत्न करिति, परि त्यांच्या वीर्यें नुचलेचि मंदराख्य नग. ॥३९॥
अकरासहस्र योजन तो वरि, तितुकाचि भूमिच्या पोटीं.
उचलेना गिरि, देवांदैत्यांचीं भागलीं बळें मोटीं. ॥४०॥
नारायणासि अचलोद्धरणाची युक्ति तेधवां सुचली;
आज्ञापितां अनंता, तो भगवान् तत्क्षणीं तया उचली. ॥४१॥
नेला नग सिंधुप्रति, झाला आधार कूर्मराज तळीं,
वासुकि मंथनरज्जु, भ्रमविति सुरअसुर त्यासि अब्धिजळीं. ॥४२॥
मुख जिकडे वासुकिचें धरिती तिकडेचि ते असुर मानी;
तद्गरळज्वाळांनीं प्राणांची निश्चिताचि जरि हानी. ॥४३॥
दैत्यानीं वासुकिचें त्यजिलें जें काय मानुनीं तुच्छ,
तें धरिलें देवानीं, स्वहितकरप्रभुवरोदितें पुच्छ. ॥४४॥
विषधूमार्चिस्पर्शश्रांतां करि शांत शक्र जळदानीं.
त्या श्रमशिथिलभुजांतें प्रभु झाला मुक्तहस्त बळदानीं. ॥४५॥
मथितां सिंधूंतूनि प्रथम प्रकटे कळानिधी सोम;
तो धवळात्मा धवळी स्वांशुपटेंकरुनि दिङ्महिव्योम. ॥४६॥
झाली प्रकट मग श्रीदेवी; देवी सुरा मग निघाली;
प्रकटे धवल तुरग मग, झगमग जो आपुली गगनिं घाली. ॥४७॥
कौस्तुभ मणि प्रकटला, श्रीसह घे श्रीपति स्वयें त्याला;
मग अमृतकमंडलुकर, भगवान् धन्वंतरि प्रकट झाला. ॥४८॥
श्वेत, चतुर्दंत, करी ऐरावण जन्मला, तया हरि घे;
हयपतिसहि घे; तैसें कवणाच्या रत्न मानसीं न रिघे ? ॥४९॥
अतिनिर्मथनें प्रकटे अतिदारुण काळकूटनाम गर,
तद्गंधें विश्व विकळ झालें, जैसें दवानळें नगर. ॥५०॥
दहनव्यसन शमाया, प्रार्थावा जलद त्या जसा नगरें,
शंभु विनविला विश्वें, कीं खावें आपणासि या न गरें. ॥५१॥
ब्रह्मप्रार्थित शंकर, त्या त्रिजद्ग्राससिद्धपाप्याला,
तत्काळचि, लीळेनें, विश्वावरि करुनियां कृपा प्याला. ॥५२॥
कंठींच विष धरि प्रभु; त्यास्तव आणी निका मनीं लाभ;
कीं अतुळ यश मिळालें; कंठहि शोभे निकाम नीलाभ. ॥५३॥
धन्वंतरिपासुनि तो अमृतकमंडलु बळें असुर हरिती;
करिती चिंता निर्जर; जाणे त्यांचा अभीष्टकर हरि ती. ॥५४॥
अद्भुत ललनारूप स्वीकारुनि, विश्वरूप हरि, त्यांचें
प्रथम हृदय, मग अमृतहि हरि, अप्रार्थित बळेंचि हरित्यांचें. ॥५५॥
प्राप्तहि अमृत, करींचें स्त्रीसंगें जाय हें जना कळवी.
प्रभु दृक्पातें, हसितें, भुलवुनि, सर्वस्व जोडिलें पळवी. ॥५६॥
जे जे साधु, स्वाश्रित, त्यांतें तें अमृत मोहिनी वाढी.
तात्पर्य अमृतमथनीं ऐसें मणिगर्भकार हें काढी. ॥५७॥
सुररूप असुर राहु प्राशी अमृतासि, तें तरणि इंदु
सूचविति तोंचि हरि हरि अरिनें अरिशिर, गिळों न दे बिंदु. ॥५८॥
गुरुचा प्रसाद नसतां अमृत न पावे असाधुजन कपटें.
हें कळविलें बुधांतें अमृत पितां वधुनि राहु कनकपटें. ॥५९॥
तें गगनग राहुशिर द्वेषें अद्यापि रविविधुग्रास
करितें, कवि अघभीरुचि बहु भीति अघां तयाचि उग्रास. ॥६०॥
राहून्मथनीं झाला अतुल, तुमुल, दितिजदनुजनाकिरण.
रविचे शररेणुपटलपटधिक्कृत न दिसती जना किरण. ॥६१॥
नरशरगणें, चतुर्भुजचक्रें, झाले असंख्य असु-रहित.
अमृतें न तसें होतें, रणमरणें होय फार असुर-हित. ॥६२॥
अमृतार्थ युद्ध दारुण केलें, ती बहु कथा असो, यत्नें
सिंधूंतूनि चतुर्दशसंख्याक प्रकट जाहलीं रत्नें. ॥६३॥
‘ त्यांतिल हरि किंवर्ण ? ’ स्वसपत्नीला असें पुसे कद्रू.
निजमत्सर वृद्धिंगत सत्वर व्हाया, जसा सुसेक द्रु. ॥६४॥
विनता म्हणे ‘ भगिनि ! त्या हयपतिचा वर्ण निश्चयें धवळ;
तूं तर्कें वद कैसा ? पाहूं जावूनियां तयाजवळ. ’ ॥६५॥
कद्रू म्हणे, ‘ नसे तो धवळ, असे काळवाल हें साचें. ’
विनता म्हणे, ‘ दुधाच्या मित्रचि तें अश्वरत्न फेंसाचें. ’ ॥६६॥
कद्रू ह्मणे ‘ करीं पण. ’ तेव्हां विनता ह्मणे, ‘ जिचें लटिक
होईल, तिणें व्हावें, जीचें तर्कित खरें, तिची बटिक. ’ ॥६७॥
व्याळांची माय ह्मणे, ‘ बहु बरवें, आजि तों असो, राहूं;
दोघीं उद्यांचि जावुनि उच्चैःकर्णाप्रति स्वयें पाहूं. ’ ॥६८॥
निश्चय करूनि ऐसा, कद्रू सांगे सुतांसि गूढ पण;
सिकवी कुमति, स्वमुखें प्रकट करी आपुलेंचि मूढपण. ॥६९॥
‘ अंजननिभ केश तसे होऊनि शिरा तुरंगपतिपुच्छीं. ’
ऐसें कपट सिकवितां, जे स्वमतीं घालिती न मन तुच्छीं. ॥७०॥
त्यांसि म्हणे, ‘ जनमेजयसत्रांत जळाल, ’ तों ‘ तथास्तु ’ तिला
विधिहि म्हणे; करि, करितां पूर्ण स्वमहामनोरथा, स्तुतिला. ॥७१॥
विधि कश्यपासि सांगे; ‘ जगदहितभुजंगशप मज रुचला;
खेद तुवां न करावा; होणारासारिखा तिला सुचला. ’ ॥७२॥
प्रातःकाळीं कद्रूविनता लंघूनि जलधिला, खपथें
गेल्या अश्व पहाया, दासीपण करुनि दृढ पुन्हां शपथें. ॥७३॥
जातां, विनता अश्वीं कद्रूक्ता कालवालता पाहे;
पावे वल्ली, भरितां जेंवि विषें आलवाल, तापा हे. ॥७४॥
हयपुच्छवर्ण फिरवुनि, ऐस्या कपटेंकरूनि लटिक पण,
कद्रूनें आत्मोचित विनतेसि दिलें बळेंचि बटिकपण. ॥७५॥
तेव्हां विनतेमागें झाला उत्पन्न गरुड पावकसा.
त्रस्त सुर म्हणति, ‘ अग्ने ! आटोपीं स्वोग्रतेज, पाव कसा. ’ ॥७६॥
अग्नि म्हणे, ‘ तो विनतासुत, गरुड, खगेंद्र; जाणतां अरुणा.
तदनुज तो साधु तुम्हां देवांवरि करिल सर्वदा करुणा. ’ ॥७७॥
सुरमुनि दूरुनि विनतापुत्राला मग करूनियां प्रणति,
स्तवुनि यथामति, जोडुनि कर, ‘ जगदभयार्थ सौम्य हो ’ म्हणती. ॥७८॥
होउनि सौम्यतनु गरुड त्यांसि म्हणे, ‘ म्यां स्वतेज आवरिलें,
सोडावें तें, तुमच्या हृदयानीं, न समजोनि, ज्या वरिलें. ’ ॥७९॥
देतां अभय असें, ते वंदुनि गेले तया सकरुणातें;
सिंधुपरतटा गेला पृष्ठीं वाहोनि गरुड अरुणातें. ॥८०॥
पूर्वोदधिपरपारीं गरुडें नेऊनि ठेविला अरुण;
रवि जैं झाला होता, करावया विश्व भस्म, निष्करुण. ॥८१॥
रविचा क्षोभ असा कीं, ‘ सूचविला सुरहितार्थ जो अरि तो
राहु, स्ववध करविला म्हणवुनि, पीडा सुदुःसहा करितो. ॥८२॥
सर्व उदासीनपणें पाहति, आम्हांसि देवुनीं भरिला;
प्राशाया अमृताला आपण सिद्ध, न सहावया अरिला. ’ ॥८३॥
या क्षोभें, अस्ताप्रति गेल्यावरि, सर्वलोक तापवुनीं,
बहु विकळ करी रात्रौ; ग्रीष्मींच्याही तसा न ताप वुनीं. ॥८४॥
कथिति महर्षि सुरांला, ‘ ताप नुगवतांहि देतसे अर्क;
भस्क करील जगत्रय उदयानंतर असा दिसे तर्क. ’ ॥८५॥
सुर म्हणति, ‘ चला जावूं, कळवूं विधिला. ’ तसेंचि मग करिती.
सूर्याभिप्राय कथुनि, विधि सांगे युक्ति जी तिला वरिती. ॥८६॥
भानुपुढें अरुणाचें स्थापन, गरुडासि सांगवुनि, करवी;
पात्र अकाळत्रिजगन्नाशापयशासि होय तो न रवी. ॥८७॥
जलनिधिच्या परपारीं गेला मातेसमीप मग पक्षी.
आधिमलिन मुख न तिचें, नतिचें भाजन पदांबुजचि, लक्षी. ॥८८॥
दासी होवुनि, कद्रूचरणयुगीं सर्वदा असे विनता.
कपटजिता दक्षसुता खगपतिमाता महासती विनता. ॥८९॥
तीतें दे ताप सदा सर्वांगीं जेंवि वाढली दद्रू.
एके दिवसीं सांगे न्याया द्वीपांतरासि ती कद्रू. ॥९०॥
घे स्कंधीं कद्रूला विनता, नागांसि गरुडही वाहे.
तेजस्वी परि मातृस्नेहें स्वातिक्रमासि तो साहे. ॥९१॥
नागांसि रामणीयद्वीपा नेतां नभःपथें, पक्षी
सूर्यासमोरचि उडे, व्याळांची विकळता न तो लक्षी. ॥९२॥
तेव्हां इंद्रासि म्हणे कद्रू, जोडूनियां स्वकर, ‘ पावें. ’
इंद्रहि वृष्टि करी कीं, अहिकुळ तीव्रातपें न करपावें. ॥९३॥
गेली द्वीपा ससुता कद्रू; तें स्थान, जेंवि नाकवन,
दे सुख त्यांला; जैसें साधूचें सर्व सज्जना कवन. ॥९४॥
गरुडाला अहि म्हणती, ‘ याहुनिहि स्थळ असेल जें रम्य,
तेथें आम्हांला ने; सामर्थ्यें सर्व तुज असे गम्य. ’ ॥९५॥
गरुड म्हणे मातेला, ‘ ऐकावें पन्नगोक्त म्यां कां ? गे ! ’
अश्रुमुखी ती विनता पुत्राला वृत्त सर्वही सांगे. ॥९६॥
नागांला गरुड पुसे, ‘ उक्त कराया असेंचि उद्युक्त;
सांगा तुमच्या दास्यापासुनि होईन मीं कसा मुक्त ? ’ ॥९७॥
अहि म्हणति, ‘ अमृत जरि तूं आणुनि देसील, मुक्त होसील;
नाहीं तरि तुजसह तव माता हें दास्य नित्य सोसील. ’ ॥९८॥
तें मान्य करुनि, सांगे मातेला; मग म्हणे, ‘ न कुत्सा हें
भुजयुग पावो, जातों अमृतानयनार्थ आजि उत्साहें. ॥९९॥
परि भक्षावें काय ? क्षुद्बाधा दारुणा, वदें युक्ति;
तनुमतिसामर्थ्याचें कारण सर्वांसि पाहिजे भुक्ती. ’ ॥१००॥
विनता म्हणे, ‘ पयोनिधिकुक्षींत निषाद फार आहेत,
ते खा; आणुनि अमृत, क्षिप्र करीं मुक्त, पुरविं हा हेत. ॥१०१॥
ब्राह्मण मात्र न खावा; तद्धातें होय आपुला घात;
दहन, रवि, शस्त्र, विष, तो; जोडावे त्यासि सुमतिनें हात. ॥१०२॥
चिन्ह पुससि तरि कंठीं जाळील, तयावरूनि वळखावा.
विप्र करूनि निराळा, त्वां सर्व निषादलोक खळ खावा. ॥१०३॥
तव पक्षांतें मारुत, पृष्ठातें चंद्रसूर्य रक्षूत;
वन्हि शिरातें; तनुतें वसु; वत्सा ! विघ्न तुज न लक्षूत. ’ ॥१०४॥
आशीर्वादें सुखउनि, आज्ञा दे पादपंकजीं विनता;
मग तो तैसेंचि करी वदली होती जसें सती विनता. ॥१०५॥
वृंदावनीं अजगरें मोहुनि गिळिले निषाद सर्व, तसे
जठरानळांत झाले भस्म, प्रळयानळांत पर्वतसे. ॥१०६॥
जेव्हां गरुडें, पसरुनि मुख, गिळिले बहु सहस्र ते कोळी,
तेव्हां कंठीं एक ब्राह्मण अंगारराशिसा पोळी. ॥१०७॥
त्याला खग ‘ नीघ ’ म्हणे, परि न निघे, विप्र तो विषादी तें
मरण तसें मान्य करी; मग सोडी तत्प्रिया निषादीतें. ॥१०८॥
भक्षूनि निषादांतें, वंदी जावूनि कश्यपासि मग.
आशीःकुशलप्रश्नें तातें केला प्रहृष्टचित्त खग. ॥१०९॥
वृत्त कथुनि, गरुड म्हणे, ‘ आलों ताता ! त्वदघ्रि देखाया;
अमृताहरणा जातों, क्षुत्परिहाराथ अन्न दे खाया. ’ ॥११०॥
कश्यप म्हणे, ‘ सुता ! या कासारीं एक कूर्म जो राहे,
तो उन्नत त्रियोजन दशयोजनमंडल स्वयें आहे. ॥१११॥
गजहि वनीं एक असे, सा गावें उच्च, आयतहि बारा;
ते भक्षावे; म्यां हा तुज वत्सा ! अंडजा ! दिला चारा. ॥११२॥
गज सुप्रतीकनामा मुनि, जो कच्छप विभावसू तो, ते
झाले असे स्वशापें धनलोभें, अनुजाग्रजनि होते. ॥११३॥
अद्यापि पूर्ववैरें कलह करिति, उठति त्या गजीं, कूर्मीं,
दृक्पातवातयोगें क्रोधविषाब्धींत तापकर कूर्मी. ’ ॥११४॥
आशीर्वाद निरोपही दे, मग खगपति तसेंचि करि तो, घे
एकेंचि नखें कच्छप, गजही एकेंचि, उचलिले दोघे. ॥११५॥
करिकच्छपधरखगवर तो जाय उडोनि मेरुच्या शिखरीं.
आश्रय द्याया भ्यालीं त्याचीं गुरुतरुवनेंहि त्यासि खरीं. ॥११६॥
आश्रय वृक्ष न देती, कांपति; मग खग म्हणे, ‘ करूं कैसें ? ’
तों एक वट वदे, ‘ ये, मच्छाखेवरि खगेश्वरा ! बैसें. ’ ॥११७॥
शतचर्मतंतुमाजि न मायाची, आणि लांब शत गावें,
भंगे बसतांचिल तिचें त्या गुरुभारें स्वधैर्य न तगावें. ॥११८॥
पाहे जों शाखेला तों तीच्या आश्रयें अधस्तुंडें
श्रीवालखिल्यवृंदें लोंबत होतीं, तपोग्निचीं कुंडें. ॥११९॥
नाश न पावावीं तीं दिव्यतपःश्रीविलासिनीसदनें,
म्हणउनि पडतांचि धरी शाखेला वैनतेय तो वदनें. ॥१२०॥
गजकच्छपशाखाधर गरुड उडाला, नभीं बहु भ्रमला;
मुन्यवनाधिभरेंचि, न शाखादिभरें करूनि, तो श्रमला. ॥१२१॥
मग, गंधमादनाप्रति जातां, पाहे पिता, म्हणे, ‘ बा ! हें
साहस न करीं, तुजला भस्म न मुनिवर करूत हे, राहें. ’ ॥१२२॥
प्रार्थुनि म्हणे मुनींप्रति, ‘ मजवरि करुणा करूनि, हे शाखा
सोडा, सद्यश जोडा, व्यसनीं विनताप्रजा तुम्हीं राखा. ’ ॥१२३॥
ते मुनि त्या शाखेला सोडुनि गेले हिमालया, मग, ती
तातकथित विजयनगीं गरुडें त्यजितांचि, कांपिली जगती. ॥१२४॥
ज्यावरि शाखा त्यजिली, ताचि नगशिरीं बसोनियां, पक्षी
त्या स्वचरणनखरशिखरलग्नद्विपकच्छपांसि तो भक्षी. ॥१२५॥
भोजन करुनि उडे तो अमृत हरायासि, तेधवां झाले
भूकंपाद्युत्पात, त्रिदश महेंद्रादि सर्वहि भ्याले. ॥१२६॥
उत्पातबीज पुसतां, हरिसि गुरु म्हणे, “ करीं स्मरण, मागें
वदले, त्वां स्वबळमदें अपमानित, वालखिल्य जें रागें. ॥१२७॥
पूर्वीं करीत होता पुत्रार्थी कश्यप स्वयें यजन;
साहित्य देत होते सुर, ऋषि, गंधर्व, सर्व भव्य जन. ॥१२८॥
समिधांचा गिरिसम गुरु भुजलीळेंकरूनि आणितां भार,
मार्गांत वालखिल्यै तुज येतां भेटले निराहार. ॥१२९॥
अंगुष्ठोदरमितवपु ते, एक पलाशवृत्तिका, वाटे
आणित असतां श्रमले होते; गोष्पदहि सिंधु ज्यां वाटे. ॥१३०॥
त्या गोष्पदांत पडतां, बुडतां, श्रमतां, तयांसि पाहूनिं,
तूं हांसलासि; नाहीं झालासि सहाय, जवळि राहूनीं. ॥१३१॥
त्या अपमानें चित्तीं कोपातें धरुनि, यज्ञ ते धन्य
करिते झाले स्वतपें निर्माया इंद्र तूजहुनि अन्य. ॥१३२॥
कामगम, कामरूप, स्वाधिकबळ इंद्र निर्मितील मुनी,
करितील पदच्युत मज, हें त्वां स्वपित्यासि कळविलें नमुनीं. ॥१३३॥
त्यांप्रति कश्यप वदला, ‘ मुनि हो ! स्वतपें नवी जगद्रचना
शक्यचि तुम्हां असे परि विधिच्या मिथ्या करू नये वचना. ॥१३४॥
मिथ्या संकल्प नसो तुमचाहि, करा खगेंद्र, विप्रभ या
हरिचें वदन पहा हो ! वारा याच्या तुह्मीं सुविप्र भया. ’ ॥१३५॥
ते सुप्रसन्न होउनि, वदले ऐसें, ‘ प्रजापते ! साधो !
तरि हा त्वत्पुत्र असो, त्वसंकल्पतहि या फळें साधो. ’ ॥१३६॥
तो विनताकुक्षुद्भव काश्यपि, पक्षींद्र, गरुड, बळशाली,
जातो अमृत हराया, उत्पातोत्पत्ति तद्भयें झाली. ” ॥१३७॥
हें ऐकुनि इंद्र म्हणे ‘ सुर हो ! पक्षी हरो न सोमातें;
रक्षा खगकृतपरिभवनूत्नमषीलेप हा नसो मातें. ’ ॥१३८॥
झाले सिद्ध सुर सकळ, नेले अमृतासमीप अशनिकरें.
म्हणति, ‘ करावाचि सुधाहरणेच्छु विहंग काळवश निकरें. ’ ॥१३९॥
तो तेथें गेला तो खगकुळचूडमहामरीचिमणी.
भ्याली त्यासि सुरचमू, श्येनाचें जेंवि भय धरी चिमणी. ॥१४०॥
नखपक्षतुंडपातें बहु मूर्च्छित होय विश्वकर्मा; तें
वर्णावें किति ? त्याच्या वाखाणी फार विश्व कर्मातें. ॥१४१॥
उडवूनि पक्षपवनें धूळि, करी अंध देवसेनांतें;
जें धैर्य मनीं होतें, वीरांला पाठि दे, वसेना तें. ॥१४२॥
शक्रें पवनाकरवीं रज वारवितांचि, देवकटकांहीं
बहु शस्त्रवृष्टि केल्या, परि नाटोपेचि पक्षिभट कांहीं. ॥१४३॥
मग गगनग खग त्यांतें जर्जर करि पक्षतुंडनखरानीं.
सुरकटकीं तो तैसा, जैसा प्रज्वलित वायुसख रानीं. ॥१४४॥
पळवुनि सुर सकळ, वधुनि अश्वक्रंदादि यक्ष, नव धरणी
रंगविली; सर्वांचा केला तेणें द्रवोनि न वध रणीं. ॥१४५॥
कोटचि होय अनळ, जैं जाय हरायासि गरुड सोमातें.
गर्वें म्हणे, ‘ विदारू खरनखराघात करु, डसो, मातें. ’ ॥१४६॥
विझवी त्यासि गरुड, बहुमुख होउनि, करुनि बहुनदीपानें.
दावावा झंझानिळ - सूर्यांतें अर्व बहु न दीपानें. ॥१४७॥
क्षुरपर्यंत, सुदारुण, चक्र वरि भ्रमतसे; तळीं दोघे
अमृतघटप चक्षुर्विषअहितें पाहूनि, सूक्ष्म वपु तो घे. ॥१४८॥
शिरला अरांतरें तो वायु तसा, मग अनल्प रज उडवी;
अंध करुनि ते काळव्याळ, न भरतां निमेष, तो तुडवी. ॥१४९॥
घेउनि अमृतघट, करुनि चक्राचा भंग, जाय कवि; त्याचें
तेज अतुळ; म्हणति, ‘ नभीं तैं मंडळ लोपलेंचि सवित्याचें. ’ ॥१५०॥
प्याला अमृत न लेशहि, केवळ सदतिक्रमासि तो भ्याला;
म्हणउनि, निस्पृहजनधन भगवान् दे भेटि त्या अलोभ्याला. ॥१५१॥
विष्णु म्हणे, ‘ विहगवरा ! तूं माग मला अभीष्ट वर दात्या. ’
मागे सुधेविणें अजरामरता, केतुवास, वरदा त्या. ॥१५२॥
आपणहि म्हणे प्रभुला, ‘ मजपासीं तूंहि इष्ट वर मागें. ’
देव म्हणे, ‘ मद्रथ हो. ’ सरले नाहींच शिष्टवर मागें. ॥१५३॥
स्वपराभव करुनि, बळें जातां घेवूनि सोमकलश, मन
क्रोधासि होय वश; मग ताडी व्रज्रें तयासि बळशमन. ॥१५४॥
विहगेंद्र म्हणे, ‘ जेणें निजतेजें सकळ अचळ कांपविला,
दाटुनि मजवरि सोडुनि, अपयश दिधलें रणांत कां पविला ? ’ ॥१५५॥
विप्रास्थिचा अनादर न करावा, म्हणुनि सोडिलें पत्र;
हें तुमच्या दृष्टींला हो साक्षात् दिव्यरुचि सुधासत्र. ॥१५६॥
सुरपति म्हणे, ‘ सुपर्णा ! सांग मला स्वबळ, आयकों दे गा !
वरिचेवरि तें तुझिया श्रितजयदभुजांत काय कोंदे गा ! ’ ॥१५७॥
तार्क्ष्य म्हणे, ‘ आत्ममुखें न करिति आत्मप्रशंसन ज्ञानी;
परि कथितों संकोचें, कीं हें घ्यावें मनीं न अज्ञानीं. ॥१५८॥
सनगवनसमुद्रा हे क्षिति पक्षाग्रीं सदैव वाहेन;
ब्रह्मांडकंदुकें मीं क्रीडेन; असीं सहस्र साहेन. ’ ॥१५९॥
शक्र म्हणे, ‘ विहगेंद्रा ! घे, देतों, तूं सुपात्र सख्यातें. ’
गरुड म्हणे, ‘ तृप्त असें मीं सुरसें याचि, सुरसिकख्यातें. ’ ॥१६०॥
इंद्र म्हणे, ‘ जरि अमृतप्राशनवांछा नसेचि, मग मातें
खिन्न करुनि, काशाला नेसि ? न देसी फिरोनि खगमा ! तें ॥१६१॥
तूं देणार जया हें, ते आम्हां पीडितील; या सुरसा
भलता उचित नव्हे, बा ! तूं पी; अससी महाशया ! सुरसा. ’ ॥१६२॥
गरुड म्हणे ‘ हें, कांहीं कारण आहे, म्हणोनियां, मात्र
नेतों; त्वां आणावें ठेविन तेथूनि निजसुधापात्र. ’ ॥१६३॥
गोत्रारि म्हणे, ‘ झालों त्वत्साधुत्वें सुतुष्ट; वर माग. ’
वीश म्हणे, ‘ मज हें, दे भक्षावे म्यां समस्त खळ नाग. ’ ॥१६४॥
इंद्रें ‘ दिधलें ’ म्हणतां, जाउनि सर्पांसि तो म्हणे, ‘ उक्त
केलें; हें घ्या; आम्हीं दास्यापासूनि जाहलों मुक्त. ॥१६५॥
म्यां ठेविला कुशांवरि हा तुमचा अमृतघट; पहा; सेवा;
स्नान करा; सुचि व्हा; हो ! उद्योगांतर मुहूर्तभरि ठेवा. ’ ॥१६६॥
अहि गेले स्नाना, तों अमृत हरुनि, हरि म्हणे ‘ धुवा वपु, न्हा;
खळ हो ! पहाल पुष्कळ निजनेत्रांतील अमृत, हें न पुन्हां. ’ ॥१६७॥
न्हाले, भूषित झाले, आले त्या लेखजीवना प्याया.
अन्योन्यातें म्हणती, ‘ व्हा अजरामर, करा त्वरा, प्या, या. ’ ॥१६८॥
कलश न दिसतां, सोडिति निश्वासा, तळमळोनि, अहिमा; या
हानीच्या हेतूतें समजति ते आपुलीच अहि माया. ॥१६९॥
तो घात त्यांसि दुःसह; सर्वस्वाविनाश साहता शतदा.
‘ चुकलों, मुकलों स्नानें; ’ म्हणती ते सर्प ‘ हा ! हताश तदा. ॥१७०॥
‘ लटिक बटिक, फटि कपटें हें दुःसह, सह्य वैर वरचील.
खाय चरारां चावुनि, उग्रत्व तसें न भैरव रचील. ’ ॥१७१॥
चुकवी कुगति, यशें उत्सुकवी सन्मन, असन्मुखें सुकवी;
सुखवी मातेला निजमुखवीक्षामृतरसेंचि, तो सुकधी. ॥१७२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP