प्रासंगिक कविता - प्रसंग ७

समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.


( सामनगडचा किल्ला ( प्रांत हुक्केरी ) बांधण्याचें काम श्रीशिवछात्रपतींनीं सुरू केलें असतां कामकरी लोकांकडे पाहून इतक्यां लोकांचें पालनपोषण करणारा मी आहें अशी अहंभावाची कल्पना शिवरायांच्या चित्तांत उत्पन्न झाली; त्यावेळीं श्रीसमर्थांनीं तेथें प्रकट होऊन वाटेंतील खडक फोडून त्यांत असलेली सजीव बेडकी शिवरायास दाखविली; आणि या बेडकीचें पोषण कोण करतो म्हणून विचारलें; त्या प्रसंगीं पुढील गोड पद रचिलें आहे. )

पद
( राग - खमाज; ताल - धुमाळी )
आम्ही काय कुणाचें खातों ।
श्रीराम आम्हांला देतो ॥ध्रु.॥
बांधिले घुमट किल्याचे तट । तयाला फुटती पिंपळवट ।
नाहीं विहीर आणी मोट । बुडाला पाणी कोण पाजीतो । तो राम. ॥१॥
पाहा पाहा मातेचिये स्तनीं । चिंतिता मांस - रक्त - मल - घाणी ।
तयांमध्यें विमल दुग्ध आणोनी । कोण निर्मीतो । तो राम. ॥२॥
खडक फोडितां सजिव रोडकी । पाहिली सर्वांनीं बेडकी ।
सिंधु नसतां तिये मुखीं पाणी । कोण पाजीतो । तो राम. ॥३॥
नसतां पाण्याचे बुडबुडे । सदासर्वदा गगन कोरडें ॥
दास म्हणे जीवन चहुंकडे । घालुनी सडे पीक उगवीतो । तो राम. ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP