मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ३० वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३० वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम:
गुरु म्हणे शिष्यासी । असा कोपोनी पत्नीसी ।
राजा बोले अविचारेंसी । प्रवृत्तिमार्गनिरत जो ॥१॥
तें तसें त्याचें वचन । मदालसा परिसून ।
म्हणे कान देऊन । ऐकावें भाषण माझें हें ॥२॥
हा उपदेश केला उचित । यानें पितर समस्त ।
निश्चयें होतील मुक्त । हें वेदमत खास असे ॥३॥
पंथा नाहीं याहून । मोक्षा जावया दुजा जाण ।
अतएव हाच श्रेष्ठ म्हणून । वेदवचन ऐकिलें ॥४॥
पितृभूतादि जे असती । ते स्वकर्में वांचती ।
काय जीवित मनुष्याचे हातीं । केवळ भ्रांन्ति घेती नर ॥५॥
जरी स्त्रीधनादि भोगावें । तरी वैराग्या नेंवागावें ।
या वेदवचना दोष द्यावें । मग पाखंड व्हावें वेदबाह्य ॥६॥
जो वेदमार्गें जाई । तो कसा देवद्रोही होई ।
तोचि तरोनि जाई । तोचि घेई कैवल्य ॥७॥
वैराग्यें संतान्य घेतां । भिक्षार्थ परद्वारीं जातां ।
केंवी येईल हीनता । संतोश धरितां काय शीण ॥८॥
जरी पूर्वी येथें क्लेश वाटे । तरी पुढें सुख होईल मोठें ।
प्रवृत्तिमार्गीं जरी सुख वाटे । तरी मोठें दु:ख पुढें ॥९॥
आत्मा हाची मुख्य लोक । हा मिळाया नको लेंक ।
प्रबोधपुत्र होतां एक । मिळे आत्मलोक निश्चयें ॥१०॥
तेव्हां मीं केले उचित । हें जरी तुम्हां वाटे विपरीत ।
तरी आतां प्रवृत्तिनिरत । चौथा सुत होईल हा ॥११॥
मी सर्व विद्या सांगतसे ह्यासी । जरी विश्वास वाटे तुम्हांसी ।
तरी हा असो मजपासीं । नातरी ह्यासी तुम्हीं न्यावा ॥१२॥
असें वचन ऐकून । म्हणे तूं करवी अध्ययन ।
पुन: य़ेऊन पाहीन । ठेवीन खात्री झालिया ॥१३॥
असें सांगूनी जाई राजा । माता म्हणे ह्या आत्मजा ।
पुढें उद्धरी अधोक्षजा । अत्रिजा जा तुझ्या वांट्याचा ॥१४॥
याला पांच उच्चग्रह आले । म्हणोनी हें विघ्न आलें ।
आतां माझा उपाय न चाले । कर्म आले आड याचें ॥१५॥
कोण अनादरील ग्रहां । सहासष्ट हजार वर्षें हा ।
राज्य भोगितां सोडील मोहा । तंव न हा विरक्त होय ॥१६॥
याचें दैव असें म्हणुनीयां । हा म्यां अर्पिला तुमच्या पायां ।
ह्यावरी मग दत्तात्रेया । करावी दया निश्चयें ॥१७॥
असी दत्ता प्रार्थूनी । मग अलर्का बोलावूनी ।
वेदशास्त्र पढऊनी । करी ज्ञानी व्यवहारी ॥१८॥
धर्मार्थकामसाधन । वर्णाश्रमाचरण ।
षड्विधराजनीतिलक्षण । प्रजारंजनकर्म सांगे ॥१९॥
धनुर्विद्या सांगून । केला व्यवहारनिषुण ।
तया चतुरा पाहून । भूपाचें मन हृष्ट झालें ॥२०॥
मग अलर्क स्वयंवरीं । अनेक कन्या वरीं ।
प्रख्यात झाला भूमीवरी । धनुर्धारी धुरंधर ॥२१॥
राजा पाहूनी पुत्रासी । ह्रुष्ट झाला मानसीं ।
यौवराज्य देई त्यासी । स्वयें वनासी चाले तो ॥२२॥
मदालसा म्हणे रायासी । मी येतें वनासी ।
असतां समागमासी । होईल मनासी आनंद ॥२३॥
राजा तथास्तु म्हणे । मग निघतां ती म्हणे ।
अलर्का राज्य करी धर्मानें । पुत्राप्रमानें प्रजा पाळी ॥२४॥
सहासष्ट हजार । वर्षें घेसी भूभार ।
अलर्का मग या उपर । शत्रु उठेल दुर्धर ॥२५॥
तेव्हां तुझें व्हावया हित । मी ठेवितें हें लिखित ।
तंववर पेटींत ठेवी गुप्त । जंववरी शत्रू न उठतील ॥२६॥
तंववरी करी जतन । नित्य ठेवी पूजन ।
शत्रू उठतांची स्मरून । हें वाचून पाहे तूं ॥२७॥
तेव्हां हें वाचून । तसें करितां आचरण ।
शत्रू जातील मित्र होवून । साम्राज्य पावून सुखी होसी ॥२८॥
असें अलर्का सांगून । आशीर्वचन देऊन ।
माता करी प्रयाण । चरण धरून पुत्र रडे ॥२९॥
माता म्हणे सुता । तूं मागें उलट आतां ।
मी धरूनी पतीच्या व्रता । सार्थकता करीन ॥३०॥
सदा एकत्र सहवास । घडे नित्य जीवांस ।
कर्माधीन खास । असे निवास जाण बा ॥३१॥  
आतां तुमचा योग सरला । म्हणोनी हा वियोग झाला ।
काय उपाय याला । आपुल्या मनाला सांवरावें ॥३२॥
असें तयासी सांगून । माता जाई निघोन ।
पतीसह वनीं येऊन । राहिली समाधान पावुनी ॥३३॥
मग अवसर पाहुनी । पतीस बोध करूनी ।
पूर्ण विज्ञान ठसवूनी । धन्य मानी आपणासी ॥३४॥
असी धन्य ती सती । पतीला देई सद्गती ।
आपण घे विदेहमुक्ती । देव मानिती आश्चर्य ॥३५॥
मदालसा धन्य सती । स्वयें सेवूनी जीवन्मुक्ती ।
पुत्रा देई सद्गती । दे सद्गती पतीला जी ॥३६॥
सती चूडाला जसी । तारी निजपतीसी ।
मदालसाही तसी । नारी असी विरलची ॥३७॥
प्रात:काळीं उठोन । ज्याचें करितां कीर्तन ।
सर्व पाप जाऊन । अंत:करण शुद्ध होईल ॥३८॥
असो इकडे अलर्क । प्रतापाचा जो अर्क ।
न वर्णवे ज्याचा तर्क । अधर्मसंपर्क न करी जो ॥३९॥
करी प्रजारंजन । न दुखवी लोकांचें मन ।
ज्याला खुषी प्रजाजन । नित्य दान दे विप्रां ॥४०॥
नाम घेतां ज्याचें । चित्त कांपे शत्रूचें ।
अलंघ्य शासन ज्याचें । करी दुष्टांचें खंडन ॥४१॥
जो धर्में दंड्या दंडी । अदंड्याते न दंडी ।
लोभें क्रोधें द्रव्य न जोडी । धर्म जोडी सदैव ॥४२॥
करी शिष्टाचें पालन । दीनां देई धन ।
पंग्वंधांचें रक्षण । करी सदय मन ज्याचें ॥४३॥
अर्थें धर्म संपादी । धर्मे अर्थ संपादी ।
कोणा न करी भेदी । राहे आनंदी सदैव ॥४४॥
धर्मार्थाविरोधेंकरून । करी काम पूर्ण ।
सदा राहे प्रसन्न । ज्याचें मन खिन्न नसे ॥४५॥
तो करी सांग याग । कधीं न होती व्यंग ।
परी वाढे ज्याचा राग । तया विराग न होईल ॥४६॥
ऋतुकाळीं भार्यागमन । यज्ञशेष मद्यमांससेवन ।
हें अपूर्व वेदवचन । असें मानून वागे तो ॥४७॥
असा तो राजवर्य । नेणें विधीचें तात्पर्य ।
मानी स्वर्ग ऐश्वर्य । कार्याकार्य न विचारी ॥४८॥
मद्यमांसभक्षण । आणि स्वभार्यागमन ।
हें सर्वां मनापासून । आवडे पूर्वसंस्कारें ॥४९॥
फिरावें यापासून । निवृत्ति व्हावी म्हणून ।
वेदें संकोच करून । हें विधान सांगितलें ॥५०॥
सर्वकाल सर्व स्त्रियांतें । भोगितील म्हणूनी नरातें ।
ऋतुकालीं स्वस्त्रीतें । सेवावें असें वेद वदे ॥५१॥
वर्जितां इतर स्त्रियांसी । भोगितां स्वस्त्रियेसी ।
हा एक संकोच नरासी । वेद दावी निश्चयें ॥५२॥
माझी स्त्री म्हणोन । अहोरात्र करितील गमन ।
ऋतौ भार्यामुपेयात् म्हणोन । दुसरा संकोच केला हा ॥५३॥
भय वाटावें म्हणून । शास्त्रें केलें शासन ।
ते उल्लंघितां दारुण । नरकभय येतसे ॥५४॥
( श्लोक ) ॥ येsपि गच्छंति रागांधा नरा नारीं रजस्वलां ।
पर्वण्यप्सु दिवा श्राद्धे ते वै न्रकगामिन: ॥५५॥
जरी द्वेषादिकेंकरून । किंवा अप्रीती मानून ।
न करी भार्यागमन । तया दोष वदे शास्त्र ॥५६॥
( श्लोक ) ॥ ऋतुस्नातां तु यो भार्यां संनिधौ नाधिगच्छति ।
घोरायां भ्रूणहत्यायां पच्यते स न सशंय: ॥५७॥
ही केली व्यवस्था । हा अपूर्व विधी नसतां ।
मूढ तत्त्व नेणतां । आसक्तता ठेविती ॥५८॥
मद्यमांसमैथुनापासून । निवृत्त व्हावा जन ।
असें शास्त्राचें प्रतिपादन । भूपनंदन नेणे तो ॥५९॥
अनेक स्त्रिया वरून । ऋतुकालीं करी गमन ।
पशुसंस्था करून । मांस भक्षन करी तो ॥६०॥
अभिष्टोमादि करून । नित्य करी सोमपान ।
म्हणे मी अमर होऊन । स्वर्ग भोगीन निरंतर ॥६१॥
असी ज्याची कुबुद्धी । नोहे तयासी शुद्धी ।
वांया जोडी उपाधी । जाणे सुधी सुबाहु हें ॥६२॥
सुबाहू म्हणे भ्राता । संसारी बुडाला आतां ।
याला काढावा वरता । तरीच बंधुता साजेल ॥६३॥
हा न्यायें राज्य करी । यज्ञ याग दान करी ।
धर्में वागे जरी । तरी बहिर्निष्ठ सर्वथा ॥६४॥
पशुभोग्य जे विषय । ते सुख देतील काय ।
तरी ही भ्रांती होय । याला उपाय करावा ॥६५॥
अनर्थ करवी धन । विषय भोगवी धन ।
गर्व ताठा करवी धन । एक धन घात करी ॥६६॥
तरी आतां ध्यान सोडावें । त्याच्या समीप जावें ।
त्याचें धन लुटावें । मग विरागी होईल हा ॥६७॥
असा निश्चय करून । जडमूढता सोडून ।
सुबाहू नगरीं येऊन । बोले वचन राजाप्रति ॥६८॥
म्हणे मी ज्येष्ठ भ्राता । मी राज्य करीन आतां ।
हें नये तुझ्या चित्ता । तरी वांटा दे मला ॥६९॥
अलर्क म्हणे तयाला । पितयानें राज्य दिल्हें मला ।
तें मी न देईन तुला । तूं जा तपाला वनांतरीं ॥७०॥
भूतळीं राजा मी एक । तुला देवूं काय भीक ।
तुला जड म्हणती लोक । राज्यालायक तूं न होसी ॥७१॥
जरी तूं क्षत्रिय अससी । तरी युद्ध करी मजसी ।
घेई आपुल्या भागासी । नातरी तपासी चाल वनीं ॥७२॥
तुम्ही कपटी कळलें आतां । हेंचि पूर्वीं कळतां ।
तुमची बरीच व्यवस्था । करितां येती यथार्थ ॥७३॥
तुम्ही दीन म्हणून । करीत होतों पाळण ।
हें तुमचें कपटी मन । आतां कळोन आलें मज ॥७४॥
तूं आतां येथून । शीघ्र जा निघोन ।
असें निर्भर्त्सवचन । सुबाहू ऐकून फिरला ॥७५॥
काशिराजापाशीं जाऊन । तया सर्व सांगून ।
सुबाहू म्हणे साह्य करून । द्या मिळवून माझा भाग ॥७६॥
आम्ही एकापासून । चार झालों उत्पन्न ।
आम्हां तिघां अव्हेरून । राहे राज्य करून एकला ॥७७॥
मागतां माझाही । मला भाग देत नाहीं ।
याला शिक्षाही । द्यावी मही हिसकूनी ॥७८॥
तरी तूं सहाय करी । मी होतो पुढारीं ।
तूं किमपि अंतरीं । भय न धरी सर्वथा ॥७९॥
मी योगी असें । मनीं आणीन जसें ।
सिद्धीस नेईन तसें । जय वसे बरोबर ॥८०॥
तया म्हणे काशीराजा । मी मांडलीक राजा ।
सार्वभौम बंधू तुझा । तेथें माझा काय पाड ॥८१॥
सुबाहु म्हणे तयासी । साह्य करावें दीनासी ।
हा धर्म तुम्हांसी । दिला असे ईश्वरें ॥८२॥
तो धर्म स्वीकारितां । जरी धर्मयुद्ध करितां ।
रणीं ये पंचता । तरी मुक्तता मिळेल ॥८३॥
युद्धीं शत्रु जिंकितां । सर्व राज्य ते हातां ।
स्वर्ग मिळे रणीं मरतां । उभयतां तोटा नाहीं ॥८४॥
मला राज्य मिळतां । तुला न विसरेन सर्वथा ।
असें तया सांगतां । म्हणे आतां ऐक सुबाहो ॥८५॥
पूर्वीं मी जाऊन । अलर्कासी भेटेन ।
बुद्ध्या शिष्टाई करीन । भाग घेई मागून ॥८६॥
जरी तो न ऐकेल । भाग तुझा न देईल ।
तरी युद्ध होईल । हा बोल आवडे कीं ॥८७॥
मग सुबाहु बोले । हें मज आवडलें ।
मग दोघे चालिले । चतुरंग सेना घेऊनी ॥८८॥
पूर्वीं काशीराजा जाऊन । त्या अलर्का भेटून ।
शिष्टाई करून । म्हणे भागून दे राज्य ॥८९॥
अलर्क म्हणे युद्धावांचून । न दे राज्य भागून ।
असें वचन ऐकून । ये परतून काशीराजा ॥९०॥
सुबाहूसी कळवून । युद्धाचा निश्चय करून ।
चतुरंग सेना घेऊन । नगरा वेढून राहिला ॥९१॥
अलर्क तें पाहून । स्वयें ये सेना घेऊन ।
म्हणे करीन कंदन । मी बांधीन दोघांस ॥९२॥
अचाट सामर्थ्य योग्याचें । स्वल्प सैन्य काशीराजाचें ।
परी पाहतां अलर्काचें । मन खचे सर्वथा ॥९३॥
वाटे समुद्र लोटला । अलर्क मनीं खचला ।
म्हणे हा नावरेल मला । पूर्वींच झाला अविचार ॥९४॥
या वेळीं आतां । याला शरण रिघतां ।
तरी जाईल श्लाघ्यता । उपहास्यता होईल ॥९५॥
आतां मागे न हटावें । यावरी सैन्य लोटावें ।
यत्नें सैन्य मारावें । मग धरावे हे शत्रु ॥९६॥
असा निश्चय करून । पुढें सैन्य लोटून ।
अलर्क करी दारुण । त्याशीं रण जोरानें ॥९७॥
दृष्टी पडतां सुबाहुची । सेना काशीराजाची ।
परवा न धरी शत्रुंची । गणना बाणांची न करी ॥९८॥
अलर्काची सेना । धाडिली यमसदना ।
सर्व मुकती प्राणा । नसे कोणा सामर्थ्य ॥९९॥
सर्व किल्ले फोडून । खंदक भरून ।
तटबंदी तोडून । दरवाजे मोडून टाकिले ॥१००॥
राजवाडे पाडून । रक्षकां झोडून ।
सैन्यांतें दवडून । ध्वज तोडून टाकिती ॥१०१॥
कित्येक भेदानें फोडिले । कित्येक दानें वळविले ।
कित्येक सामें मेळविले । धाकें पळविले कित्येकां ॥१०२॥
योगाचें सामर्थ्य अचाट । फोडविले किल्लेकोट ।
घाली कोशांची लूट । पाडूनी फूट सुबाहू ॥१०३॥
जे जे आपुले मानिले । ते ते सर्व उलटले ।
अलर्काचें मन भ्यालें । म्हणे हें झालें विपरीत ॥१०४॥
( श्लोक ) ॥ विपाको दारुणो राज्ञां शत्रुरल्पोप्यरुंतुद: ॥
उद्वेजयति सूक्ष्मोsपि चरणं कंटकांकुर: ॥१०५॥
जो आपुल्या पदरचा । काशिराजा मानिला साचा ।
तो मित्र हा शत्रूचा । केला आमुचा विश्वासघात ॥१०६॥
सेनाही तिकडे वळली । ही वार्ता मला कळली ।
माझी शक्ती गळली । मर्यादा टळली सत्याची ॥१०७॥
प्रधानादिक फुटले । सर्व कोश लुटले ।
आतां बळ खुंटलें । मन विटलें आतां माझें ॥१०८॥
हा आला कर्माचा भोग । हा मोठाच हृद्रोग ।
रणीं होतां भंग । कासया मग रहावें ॥१०९॥
संभावितांची अपकीर्ती ॥ होतां जाणावी तीच मृती ।
अलर्क म्हणे आतां स्थिती । होतां भीती वाटते ॥११०॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये त्रिंशोsध्याय: ॥३०॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP