पंढरीची माहेरवाशीण

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


बायकामाणसांनी आपल्या माहेरच्यांनी केलेल्या या माहेरच्या गोष्टी आणि चंद्रमौळी झोपडीत पाहिलेलं लंकेचं वैभव मी आजवर अनेकदा ऐकल आहे. असले सुखसोहाळे पाहिले आहेत. आणि त्याकारणाने होणारे सुखासमाधानाचे सोपस्कारही ऐकले आहेत. पण बाई पंढरीच्या माहेरवाशिणीचं काही निराळंच हं सगळं. विठूरायानं जनाईच्या बाबतीत केलेलं अखंड सौभाग्याचं माहेर खरंच भारी अपूर्वाईचं.  तसलं सुख जसं काय तिचं एकटीचंच म्हणावं अशी ही गोष्ट सांगण्याजोगी न् मी म्हणते ऐकण्यासारखी देखील !
पंढरीच्या राऊळात आजवर तशी खूप माणसं आली न् विठूरायाचं दर्शन घेऊन माघारी गेली. पण जनाई आली ते मुळी ‘ विठाई माउली ’ करीत न् विठूदेवाला ‘ माझे पंढरीचे आई ’ अशी हाक देतच, असं म्हणतात की, बाळपणीच तिच्या मनानं छंद घेतला म्हणून ती आईवडिलांच्याबरोबर पंढरीला आली. पण देवाचं दर्शन घडलं मात्र न् तिनं तिथंच राहायचा हट्ट घेतला. तिची मनीषा पुरी झाली. विठूदेवातच आईवडिलांचं सुख तिनं पाहिलं. आणि सांगायचं म्हणजे वानराच्या पिल्लासारखी ती विठूदेवाला बिलगली. तिचं म्हणणंच मुळी की, मी देव खाईन, देव पिईन आणि देवाघरी झोपेनही ! जिथं देव तिथं मी अशीच तिची भावना.
पण विठूरायाच्या रुक्मिणीला कुठलं हे कोडकौतुक सहन व्हायला ! जनीला पाहिलं की तिचा राग उफ़ाळून वर यायचा. तिला वाटायचं की, ही कोण माझ्या सुखात आलेअए ? म्हणून तिचं न् विठूदेवाचं हे भांडण नेहमी !! जेवायला बसला विठूदेव तरी खातेली पोळी जनीला लापवून ठेवील मांडीच्या आड ! मोतीचूर खायला लागला तरी निम्मा घास काढून ठेवील जनीला. आणि नेमकं हेच त्या रुक्मिणीला खपायचं नाही. तिचं म्हणणं ही कुनाची कोण तेव्हा एवढा तिचा लाड !
परंतु विठूदेव मोठा हुशार. त्यानं रुक्मिणीचं हे गार्‍हाणं कधीच मनावर घेतलं नाही. तो आपला जनाईच्या मागं मागं सावलीसारखा असायचा. घरी आलेली लेकबाळ जिवापाड सांभाळावी ही त्याची मनापासूनची भावना. त्यामुळं तिच्यासाठी स्वत: काबाड घेऊन चंद्रभागेचं पाणी आणताना न् ते तापवून जनीला न्हायला घालताना त्याचा ऊर वात्सल्यानं दाटून यायचा. आपल्या हातानं जनीची वेणी उकलताना त्याला आनंद व्हायचा. आणि हे बघून रुक्मिणी देवावर भडकली की, जनी मनातून संतापायची. तिला वाटायचं की, विठूदेव माझा माबाप तर ही कोण मधे मधे येतेय ! अशी ती संतापली की मग रागारागानं झाडलोट करायला लागायची. विठूदेवाचा जीव घाबरा व्हायचा ते बघून.  म्हणताना तो नेहमईच जनीचे हात दुखतील म्हणून तिच्या वाटचे केरवारे काढायचा, दळणकांडण करायचा न् पडेल त्या कामाम्चा वाटेकरी व्हायचा.
तर एकदा काय झालं की, जनी चंद्रभागेवर धुणं धुवायला गेली. तुळशीबनात डागाळलेला देवाचा शेला तिनं पायावर घेऊन हलक्या हातांनी धुवायला घेतला हं ! तशी काय चमत्कार झाला की, अबिराच्या वासानं सारी चंद्रभागा दरवळून गेली न् पंढरी नगरीत जनीच्या कौतुकाचा कडेलोट झाला !.... जनीच्या हातातील गोवर्‍या स्वत: विठूदेवानं उचलल्या न् त्यांचे ढीग करीत ते सोन्याच्या पाटीत भरले ! देवानं त्या वेळी मग मोत्यांचे किल्ले रचले आणि जनाईच्या कामाचा भार हलका केला. हत्तीच्या दातांची फ़णी आणून देवानं तिचे केस विंचरले न् रेशमी गंगावन लावून तिची वेणी घातली. म्हणजे देव न् जनी यांत जसा काय दुजाभाव उरलाच नाही.
जनाबाईची कळण्याकोंड्याची भाकरी चवीची लागती म्हणून देवानं पाची पक्वान्नांची नैवेद्याची ताटं झिडकारली म्हणतात ! आणिक जनीच्या तवा चोरीला गेला तर नामदेवाला दवंडी पिटवायला लावली ते ! अहो, तुळशीच्या काड्या गोळा करून देवानं जनीची माडी बांधली. आणिक स्वत: राउळाभोवताली मातलेल्या पवन्याची काडी न् काडी गोळा करून त्यानं जनीच्या गवताचा भारा बांधून दिला तर ! म्हणून त्याचं म्हणणं के, रुक्मिणीनं नणंद म्हणूनच ह्या जनीकडे पाहावं न् राग राग सोडून द्यावा.
पण रुक्मिणी एवढी समंजस असती तर मग कशाला हो ? राउळातील वडाव्या लोकांचं ऐकून तिनं जनीवर देवाचा नवलाखी हार चोरल्याचा आळ घेतला न्  तिला सुळावर चढवली ! पण जनीचं देवावर नितांत प्रेम होतं न् देवाचा जनीवर जीव होता. म्हणताना तिनं विठूदेवाच्या नावानं हाकारा घालून डांगोरा पिटला तशी त्या सुळाचं पाणी झालं ! जनीवर आळ कुठल्या कुठं धुवून निघाला.
म्हणून बाई जनाई, तुला माझं एकच सांगणं की, तू निचींतीनं ऐस. देव तुझा पाठीराखा आहे. लोक काय म्हणतील याची पर्वा न करता देव तुझी कामं बिनबोभाट करीत राहातो. आणिक त्यानं तुला चांगली सांभाळायची म्हणजे करायचं तरी काय ग जनाई ? परवा मी एके ठिकाणी पाहिलं. आमच्या शेजारी मुलं सांभाळायला एक बाई हं ! तर तिनं त्या मुलांच्या आळ नाही ग असा काढला विठूदेवागत ? छे बाई ! जरा कुठं पोरांनी दमवलं तर लहानग्याला त्या बाईनं बद्ददिशी खाली आपटला न् मर मेल्या म्हणाली ! का तर म्हणे तिच्या कमरेला न् हातांला कढ आला !!
जनाई, विठूदेवानं तुझा फ़ार फ़ार आळ सोसलाय ग. तुझी आईच झालाय तो. म्हणून तर तुझी आठवण झाली तरीदेखील हातातील टाळवीणांच्यासह तो तुझ्या घरी चटकन् येऊन उभा राहतो. खरं ना ग ? मग ? रुक्मिणी आई तुझ्याएकी देवाला बोलणार नाही असं वाग बाई.
विठूदेवाला लेकुरवाळा म्हणालीस ना ग तूच ? होय ना ? मग ? त्या लेकुरवाळ्याची कामं आता तू करीत जा गडे. आणिक त्याला तू मागं एकदा म्हणाली होतीस ना, तसं एकदाच सांगून टाक हं ! म्हणावं की --
विठोबा मला मूळ धाडा । धावत येईन दुडदुडा ।
चरणी लोळेन गडगडा । माझा जीव झाला वेडा ॥
बस्स ! मग त्या नादात नामदेवाच्या घरची कामं बाजूला सरू देत नाही. तर तुझं आणखी काही असू दे ! काय ? आलं ना ध्यानात ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP