मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
सुकलेलीं फुलें

सुकलेलीं फुलें

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


अंजनीगीत

आयुष्याच्या प्रभातकालीं
चित्ताच्या क्षितिजावर आलीं,
सुस्वप्नें तीं क्षण लकलकलीं -
विलयाला. गेलीं. १

कालतरूचीं गलित फुलें तीं
पुनरपि फुलतिल का मजभोंतीं ?
स्मरतां त्यांना अहा उसळती -
हृदयाच्या वृत्ती. २

स्मरणाच्या थडग्यांतुनि या रे !
सुमनांनो भूवरती सारे !
खेळ करूं ते पुन्हां एकदां
पूर्वीं जे केले. ३

दिव्य माझिया नक्षत्रांनो !
बाल्यवनींच्या वनविहगांनो !
या चिमण्यांनो ! या छकुल्यांनो !
या, या, या आतां, ४

प्रेमपूर्ण मधु बाल्य अहा तें
तुम्हांसंगतीं येइल येथें;
मींही सोडुनि तारुण्यातें
होइन बाल पुन्हां. ५

प्रेमावांचुनि अन्य न कांहीं,
दुष्टपणाचाअ स्पर्शहि नाहीं,
अंधाराचा मागमूसही
न दिसे ज्या ठायीं, ६

त्या वाल्याच्या सीमेवरते
दुष्ट मत्सरी जगतापरते
प्रेमाचें साम्राज्य सभोंतें
बनवोनी राहूं. ७

स्वानंदाच्या त्या रानांत
मृदु हास्याचें पेरुनि शेत,
परस्परांचे धरुनी हात
नाचूं स्वछंदें, ८

सत्त्वविशिष्ट प्रेमावरतीं
स्वर्गाची जर आहे वसती
नयनरज्जुंनीं बांधुनि आणूं
तर तो भूवरतीं, ९

ज्या प्रीतीच्या मंजुळ नादें
बाल्याच्या मोहोनी छंदें
वाजविली मुरली गोविंदें -
सर्वांनी ठावें १०

ती मुरली घेवोनी हातीं
दिव्य नाद तो भरित दिगन्तीं
या बाल्याच्या सीमेवरतीं
आपणही राहूं. ११

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP