शेख महंमद चरित्र - भाग २८

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


एकनाथांनी आपल्‍या परमगुरूचा (गुरूंच्या गुरूचा) उल्‍लेख एका ठिकाणी स्‍पष्‍ट असा केला आहे, तो अभग असाः

‘‘जनार्दनाचा गुरू । स्‍वामी दत्तात्रय दातारू ॥१॥
त्‍यांनी उपकार केला । स्‍वादंनाचा बोध दिला ॥२॥
सच्चितसुखाचा अनुभव । दाखविला स्‍वयमेव ॥३॥
एकाजनार्दनी दत्त । वसो माझ्या हृदयांत ॥४॥
(क्र. १७८९ एक. गाथा).

एकनाथी गाथेंत गुरूपरंपरेखाली अकरा अभंग येतात. त्‍यांतील पहिल्‍या नऊ अभंगांत मुक्ताईपर्यंतची नेहमीची परंपरा येते. त्‍यापुढील दोन अभंगांत जनार्दनपंतांचा संबंध दाखविलेली परंपरा दिली आहे. या दोन अभंगांवरून जनार्दनस्‍वामींचा व मुक्ताईच्या परंपरेचा ज्ञानबोध किंवा आत्‍मबोध सारखा असला तरी त्‍यांची ती गुरूपरंपरा नव्हे हे स्‍पष्‍ट आहे. शेवटच्या अभंगांत

‘‘दत्तात्रय परंपरा । सहस्रार्जुन यदु दुसरा । जनार्दन शिष्‍य तिसरा । केला खरा कलियुगी ॥३॥
जनार्दन कृपेस्‍तव जाण । समूळ निरसले भवबंधन । एका जनार्दना शरण । झाली संपूर्ण परंपरा ॥४॥’’
(क्र. १८८३ ज. भागवत स्‍कंध ११, अध्याय ९, ओवी ४३०) व
दत्तात्रयकृपे पूर्णं । जनार्दनीं पूर्ण ज्ञान । जगचि संपूर्ण । एकरूप तयासी ॥४॥
एकाजनार्दनीं पूर्ण। ब्रह्मज्ञानाची खूण । बोधोनिया संपूर्ण । मेळविलें आपणियां ॥५॥’’
(क्र. १८८४).

असे म्‍हटलें आहे. हा ‘दत्तात्रय’ म्‍हणजे ‘अत्रिनंदन’ हें या अभंगांचे पूर्वार्धात सांगितलें आहे. एकनाथ भागवतावरील (११ वा स्‍कंध) टीकेच्या पहिल्‍या अध्यायांत ॠषि वाल्‍मिकादीनां नमन केल्‍यानंतर लिहितातः

‘‘आतां नमूं दत्तात्रया । जो कां आचार्याचा आचार्या । तेणें प्रवर्तविलें ग्रंथकार्या । अर्थवावया निज बोधू ॥१४२॥
तो शब्‍दांनें दावितु । अथु अर्थे प्रकाशिवितु । मग वक्तेपणाची मातु । स्‍वयें वदवितु यथार्थ ॥१४३॥
तो म्‍हणे श्रीभागवत । तें भगवंताचें हृद्गत । त्‍यासीचि होय प्राप्त । ज्‍याचें निरंतर चित्त भगवंती ॥१४४॥
तें हें ज्ञान कल्‍पादि । चतुःश्र्लोक पदबंधी ।  उपदेशिला सद्‌बुद्धि । निजात्‍मबोधी विधाता ॥१४५॥’’.

हें नमन ज्ञानेश्र्वरादि संत व मातापितरानंतर आलें आहे. यांत दत्तात्रयामागें श्रीकरहि नाही; आणि चतुःश्र्लोकी भागवतावर चंद्रभटानें विवरण करून त्‍यास अनुसरून जी एकनाथास टीका लिहावयास म्‍हणजे प्रथम ग्रंथकार्यास प्रवर्तविलें त्‍याचा यांत उल्‍लेख आला आहे. हा दत्तात्रय आचार्याचा आचार्य असें म्‍हटलें आहे. या उल्‍लेखावरून जनार्दपंत आचार्य कीं ज्‍यांनीं ही भागवतावरील टीका बोलविली त्‍याचा आचार्य जो दत्तात्रय त्‍यानें एकनाथास प्रथम ग्रंथकार्यास प्रवर्तविलें असा निष्‍कर्ष काढणें युक्त होईल. येथें अत्रिनंदन श्रीदत्ताचा संबंध नाहीं; कारण हें नमन कुळगोत्र मातापितरांनंतर आलें आहे.

एकनाथशिष्‍य मुकुंदराजानें आपली गुरुपरंपरा एका अभंगांत वर्णिली आहे. तो अभंग पूर्वार्धात संपूर्ण दिला आहे. त्‍यांत ‘‘दौलताबादचे योगिराज चंद्र बोधले यांचा शिष्‍य जनार्दनपंत, जनार्दनपंतांचा एकनाथ कीं ज्‍यानें गोदातिरीं समाधि घेतली तो, एकनाथाचा आपण म्‍हणजे योगी मुकुंदराज, हें त्‍यांनी आपला शिष्‍य रामनाथ’’ यांस सांगितलें आहे. त्‍याबरोबर जनार्दनस्‍वामींना ‘‘जाला निजलाभ प्रसाद उच्छिष्‍टाचा’’ हेंहि लिहिलें आहे. हा मुकुंदराजहि फार थोर योगी होऊन गेला. याच्या वर्णनपर एक ‘मुकुंदराज पंचक’ जुन्या बाडांत आढळले. तें असेः

‘‘मुकुंदराज सद्‌गुरु संत पंचाक्षरी गाभा । स्‍मरतां आसनीं शयनीं दर्शनांत उभा ॥धृ०॥
मूळाधारापासुनि सहस्र दळिचा विश्रामु । मुळिंचा अजपजपाचा साक्षि हा तारक रामु ॥
मुनिजन मानस लयलक्षाचा समाधिचा कामु । मूर्तिमंत सकळांतर व्यापक निर्गुण निष्‍कामु ॥१॥
कुंठित वेदवाणी स्‍तविता अनुभव काय बकु । कुमन सुमन स्‍वरूपांत विराला निःशब्‍द निःशंकु ॥
कुतर्क मतवादी चिंतनि हारपला तवकुं । कुशळ कृपादृष्‍टीनें फिटला विषयाचा पंकु ॥२॥
दश इंद्रियांत दषवे द्वारीं वर्ते स्‍वच्छंद । दशहि नादकळा सकळा जिवन हा कंद ॥
दशदिशा भरूनी उरला ग्रासुनिया द्वंद्व । दर्पणीं विश्र्व देखणा आपण सिच्चिदानंद ॥३॥
रात्र दिवस ठाउकाची नाहीं जेविं दिनकरा । राजित पूर्ण प्रतापि आपला आपण एक खरा ॥
राजस योगासाठी याचा भाव नसे दुसरा । राबति मुक्ति चारी पाईं शांत उदार खरा ॥४॥
जडित चिद्रत्‍नांचे भूषण अमोल्‍य निज तेज । जडलें हृदयीं त्‍या अर्थाचें ‘विवेकसिंधु’ चें गुज ॥
जगीं जीवन केसरीनाथ अवतरले सहज । जयतपाळ सिवदिन उद्धरिला घेतली पैज ॥५॥
मुकुंदराज सद्‌गुरु ॥धृ०॥’’

याच मुकुंदराजाचा रामनाथाखेरील आणखी एक केशव नांवाचा शिष्‍य होता. त्‍याचेंहि एक पद आपला गुरु मुकुंदराज याला अनुलक्षून असल्‍याचें संग्रहांतून सापडते. ते पद असेः

‘‘तो मज आठवितो गुरुराजा । प्राणविसांवा माझा ॥धृ॥
अखंड देऊनियां स्‍मरणासी । द्वैतभयातें नाशी ॥१॥
विवेकसिंधुचीं चिद्रत्‍नें । लेवविली मज यत्‍नें ॥२॥
अक्षईं प्राप्तीचा सुखदाता । केशव कवि म्‍हणे आतां ॥३॥’’.

या केशवाबद्दल आत्‍मारामबुवा रामदासी यांनीं आपल्‍या ‘दासविश्रामधामां’त (ओवी ७३-७५, कांड ९२) असें म्‍हटलें आहे की, ‘‘धन्य
ब्रह्मवेत्ते सत्‍पुरुष गोसावी । मुकुंदराजाचा सांप्रदायी । ‘विवेकसिंधु’ आदि अर्थ हृदयीं । जडलासे पूर्ण निपुण योगी ॥७४॥
शिष्‍यजन तयाचे प्रविण ।..... ॥७५॥’’.

टीपः
नं. १९९, बाड क्रमांक ७५६, श्रीसमर्थवाग्‍देवता मंदिर संग्रह, धुळे.
नं. ११४, बाडांक ६, राजवाडे संशोधन मंदिर संग्रह, धुळें; व बाडांक २६२, श्री समर्थ वाग्‍देवता मंदिर संग्रह, धुळे. या केशवाची ‘केशव कवि म्‍हणे’ म्‍हणून आणखीहि बरीच कविता या बाडांत व इतरत्र आढळते.


N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP