मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र पंधरावी

श्यामची आई - रात्र पंधरावी

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे . निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज ह्यदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते . शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या , साधुसंतांच्या गोष्टी सांगायचा . मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते . लहानसे मखर केले होते . त्याला बेगड वगैरे लावून ते सजविले होते . सुंदर शाळिग्राम या देवळात मी ठेविला होता . तो शाळिग्राम फार तेजस्वी दिसत असे . चंद्रहासप्रमाणे तो शाळिग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा , असे मला वाटे .

रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू . कधी कधी आम्ही कथाकीर्तनही करत असू . आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्ये थोडीच होती ! घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू . आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई .

विठोबाला वाहिली फ़ुले । भजन करिती लहान मुले ।

विठोबाला वाहिली माळ । भजन करिती लहान बाळ ॥

वगैरे किती तरी भजने म्हणत आम्ही नाचत असू . भक्तिविजयातील निरनिराळ्या प्रसंगींचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू .

गजेंद्राची ऐकून करूणा । सत्वर पावलासे , जगज्जीवना

प्रल्हादरक्षका मनमोहना । पावे आता सत्वर

द्रौपदीलज्जनिवारणा । पांडवरक्षका , मधुसूदना

गोपीजनमानसरंजना । पावे आता सत्वर

अनाथनाथा रूक्मिणीवरा । भीमातीरवासी विहारा

जगदवंद्या जगदुध्दारा । पावे आता सत्वर

वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सदगदित होते .

आम्ही त्या वेळेस फार मोठे नव्हतो . मराठी पाचवीत मी होतो . वय अकरा वर्षांचे होते नव्हते . परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्या वेळेस मी मोठा होतो . त्या वेळेस ना शंका , ना संशय . गोड श्रध्दाळू भावमय भक्ति निर्जळी एकादशी मी करावयाचा . परमेश्वराचा जप करायचा , कार्तिकस्नान , माघस्नान , वैशाखस्नान वगैरे करावयाचा . कथासारामृत या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे . स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली , तर अमृत होते , असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे . एका राजपुत्राला कोणी ब्राह्यणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले , अशी कथा दिली आहे . मला ते खरे वाटे . आमच्या गावात कोणीतरी मेले होते . मी आईला विचारले , " मी पहाटे अंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन . मग तो उठेल . नाही का ?"

आई हसली व म्हणाली , " तू वेडा आहेस ."

त्या वेळची ते भोळी श्रध्दा चांगली , की आजचा संशय चांगला , मला काही सांगता येत नाही . परंतु जाऊ द्या . मी गोष्ट सांगणार आहे , ती निराळीच .

चातुर्मास्यात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे . कोणी तरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत . सायंकाळी चार , साडेचारच्या सुमारास पोथी सुरू होत असे . गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते . त्या वेळेस आजोळच्या घरी आम्ही राहात होतो . देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले , तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे . पुराणाला दहा - पाच पुरूष व दहा - वीस बायका बसत असत .

त्या दिवशी रविवार होता . देवळात पुराण सुरू झाले होते . आई पुराणास गेली होती . ती पुराणाला फार वेळ बसत नसे . थोडा वेळ बसून , देवदर्शन घेऊन ती परत येत असे . घरात कोणी नव्हते . आम्ही मुले जमलो होतो . भजन करण्याचे ठरले . घरातील रिकामे डबे आणले . टाळ घेतले व भजन सुरू झाले . आम्ही नाचू लागलो , गाऊ लागलो . तो डब्यांचा कर्कश आवाज आम्हांला गोड वाटला . लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते . मुलांना ड्बा बडविण्यात आनंद वाटतो . परंतु मोठ्या माणसांस ती कटकट होते !

श्रीराम जयजयराम

असा घोष दुमदुमून गेला . आम्ही मत्त झालो होतो .

प्रेभुसवे लढू आम्ही कुस्ती

प्रेमाची चढली मज मस्ती रे

प्रेमाची चढली मज मस्ती

आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला . शास्त्रीबोवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना . " काय शिंची कार्टी ! असे कोणी म्हणू लागले . " हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे येथे पुराण चालले , समजू नये का ?" पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे ? त्यांनी बंद नको का करायला !" " अहो , पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवितात ." अशी भाषणे देवळात होऊ लागली . आमचे भजन जोरात चालूच होते . आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो .

देवळातील मंडळींनी गुरवाला बोलाविले व त्याला ते म्हणाले , " जा रे , त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर . येथे पुराण चालले आहे . " परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती . मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते . ती वेगाने घरी येत होती . आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते .

आई आल्याचे आम्हांला भान देखील नव्हते . ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो . शेवटी आइ रागाने म्हणाली , " श्याम !" तिच्या त्या आवाजात क्रोध होता . मी चपापलो . भजन थांबले , टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले . आई रागावली होती .

" काय झाले , आई ? " मी विचारले .

" तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला ’ आई रागाने बोलली .

" आई , हा काय धुडगूस ? आम्ही आमच्या देवासामोर भजन करीत आहोत . तूच ना हा शाळिग्राम मला दिलास ? बघ , कसा दिसतो आहे ! छत्रीच्या पांढर्‍या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे . तू रागवलीस होय ? " मी प्रेमाने पदर धरून विचारले . इतक्यात देवळातील भिकू गुरव आला व म्हणाला , " श्याम , देवळात पुराण चालले आहे . तुमचा धांगडधिंगा बंद करा . पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने ."

" आम्ही नाही बंद करणार जा . त्यांचे पुराण चालले आहे , तर आमचे भजन चालले आहे , " माझा एक मित्र म्हणाला .

" अरे श्याम , जरा ह्ळू भजन करा . हे डबे कशाला वाजवायला हवेत ? आणि ह्या झांजा ? मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो , असे नाही . आपल्यामुळे जर दुसर्‍याला त्रास होत असेल , तर ते रे कसले भजन ? " आई शांतपणे म्हणाली .

" साधुसंतसुध्दा टाळ वाजवीत व भजन करीत . " मी म्हटले .

परंतु मुद्दाम दुसर्‍याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत . इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबविले असते . श्याम , तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविणे प्रिय आहे ? " आईने विचारले .

" वाजविले म्हणजे आई , रंग चढतो . नुसते नाव कंटाळा आणील . " मी म्हणालो .

" हळूहळू टाळ्या वाजवा . ताल धरा , म्हणजे झाले . मुद्दाम अडून बसू नये . वाजविणे ही महत्त्वाची गोष्ट नाही . तुम्हांला देवाच्या नावापेक्षा . आरडाओरडा व वाजविणे हेच आवडते ? श्याम , ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसर्‍याला त्रास होतो . ती कसली रे पूजा ? माझी पूजा दुसर्‍याला पूजेच्या आड येऊ नये , माझी प्रार्थना दुसर्‍याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये . तुम्ही हळूहळू भजन केलेत , तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल . भिकू , जा तू हे नाही हो गलका करणार ." असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला .

आम्हां मुलांत वादविवाद सुरू झाला . " मोठे आले डुढ्ढाचार्य आम्हांस बंद करायला ! त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल . पुराण ऐकाताच व पुराण संपताच त्याच जागी गावच्या कुटाळक्या करीत बसतात ! " वगैरे आम्ही बोलू लागलो . परंतु काय करायचे , ते ठरेना शेवटी मी म्हटले , " आपली चूक झाली . आपण हळूहळू भजन म्हणू या व नुसत्या टाळ्या वाजवू या . मोठ्याने वाजविण्यात काय आहे ?"

" श्याम ! तू भित्रा आहेस . आपल्याला नाही हे आवडत . ’ बापू म्हणाला .

" यात भित्रेपणा कोठे आहे ? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे . अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे ? " मी विचारले .

माझ्यावर रूसून माझे मित्र निघून गेले . त्यांना रामनामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते . मी एकटाच राहिलो . मी भित्रा होतो का ? मला काही समजेना . मी रडत रडत देवासमोर ‘ रघुपती राघव राजाराम ’ करीत बसलो .

लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले . त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन . लहानप्रमाणेच आजही रडत रामराम म्हणत बसेन . रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे :

" तुला एकटेच जावे लागेल . जा , तू आपला कंदील घेऊन जा . लोकांच्या टीकेचा झंजावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल . परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक . तुला एकाट्यानेच जावे लागेल ."

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP