मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र दुसरी

श्यामची आई - रात्र दुसरी

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली . सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात . आश्रम होता त्या गावी नदी होती . नदीचे नाव बहुळा ! नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते . देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते . त्याला पार बांधलेला होता . त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत .

गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते . ते टेकडीवर जाऊन बसले होते . लहनगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे . त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती . व तो वाजवीत होता . कविह्यदयाचा श्याम ऐकत होता . एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले . श्यामचे डोळे मिटलेले होते . तोंडावर गोड व मधुर असे तेज होते .

’ चलता ना आश्रमात . प्रार्थची वेळ होईल ."

श्यामने डोळे उघडले . श्याम म्हणाला , " गोविंदा ! बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे . कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी , दगड - धोंडे विरघळून जात , ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन :

’ यमुनाबाई वाहे स्थिर लुब्ध समीर रे । हालविना तरूवर पुष्प फळ पान रे ।

गोपीनाथा आल्ये आल्ये सारूनीया काम रे । वृंदावनी वाजविशी वेणू , जरा थांब रे "

गोविंदा ! लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पातळ्यात मी गोवार्‍यांबरोबर रानात जात असे . गाईगुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत . माझे चुलते छान अलगुजे करीत . लहानशी बांबूची नळी ; पण तिच्यात केवढी शक्ति ! हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात . दोन रूपये त्यांना पडतात ; परंतु खेड्यापाड्यांतील गोरगरिबांना ही बासरी आहे . मधुर , सुलभ व सुंदर ! बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे . श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व सात लाख खेड्यात ते वाजविले जात आहे ! वाजव , आळव ते गीत . "

" परंतु ती पहा घंटा वाजत आहे ! प्रार्थनेस चला , " गोविंदा म्हणाला .

" हो चलो . काय रे गोविंदा ! काल मी बराच वेळ सांगत बसलो का ? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहीजे होती . आज लौकर आटपीन , " श्याम म्हणाला .

" काल दहाबारा मिनिटेच तुम्ही सांगत होता . उगीच आखडते नका घेऊ . मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात , त्यात आमचा फायदा असतो . तो वेळ व्यर्थ का जातो ? " गोविंदा म्हणाला

बोलत बोलत दोघे आश्रमात आले . गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली . सारे जमले . गावातीलही काही मंडळी आली होती . घंटा वाजली . प्रार्थना सुरू झाली .

स्थिरावला समाधीत । स्थितप्रज्ञ कसा असे .

वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली . ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे .

प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली . श्यामने गोष्टीस सुरूवात केली .

" माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडांत आमच्या बहिणीवर जरा जास्त होते . माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती आहे . तिला सासरी प्रथम सासुरवास झाला ; परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही . तिने स्वत : च्या मुलास एक चापटही मारली नाही . मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते .

माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे . अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते तिला मंगळ होता . त्यामुळे अडचणी येत . शिवाय हुंड्याची अडचण होतीच . आमचे नाव होते मोठे . बडे धर पोकळ वासा , अशातली गत झाली होती . पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे व कर्ज वाढत होते . माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचविली , कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई . हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडाच तो ! या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही . त्यांना आतून चिंता जाळीत असते . " मुलगी वाढत चालली एकदा लवकर उरकलेच पाहिजे , कोठे बयेचा नवरा असेल कोणाक माहीत ! " असे शब्द मुलिंच्या कानावर येत असतात . त्यांना जीवन नकोसे होते . आपल्या देशातील तरूणच नादान !

या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वत : ला जाळून घेतले . त्या वेळेस क्षणभर तरूणांनी हुल्लड केली . सभा भरविल्या , ठराव केले ; परंतु पुन्हा सारे थंड . हुंडे पाहिजेत , शिक्षणाचा खर्च पाहिजे , दुचाकी पाहिजे , घड्याळ पाहिजे . मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे , दोन्ही गोष्टी सारख्याच निद्य . गाइसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म ; परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलांमुलीसही विकासात यापरता अधर्म कोणता ? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात ; पण कृतीने धर्माची थट्टाच आहे . उदार ह्यदये ज्यांची असावीते ते तरूणही मेलेलेच ! निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारर्ण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही . आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणार्‍यारूढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे , हे मी कसे म्हणू ? असे जगाने कसे म्हणावे ? परंतु जाऊ दे , मी भावनाभरात कोठे तरी वहात चाललो .

" तुम्ही भलतीकडे वाहवत चाललेत तरी आम्हांला मधच मिळ्णार ! आडरानात शिरलात तरी फुलेच दाखविणार , तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो . " नामदेव म्हणाला .

" तुमचे काहीही असो ते गोड लागते . तुम्हीच ती शाहूनगरवासी नाटकमंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती ? हॅम्लेटचे नाटक जाहीर केलेले असावे ; परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत ! प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे . गणपतरावांचे सारेच छान . तसेच तुमचे . तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या . आम्हाला आनंदच आहे . " गोविंदा म्हणाला .

" मग आक्कच्या लग्नाचे काय झाले ? " रामने विचारले .

श्याम म्हणाला , " रामची आपली मुदद्याशी गाठ . बरे तर ऐका पुष्कळसे हिडल्याफिरल्यावर जमले एकदाचे लग्न . लग्न रत्नागिरिस व्हावयाचे होते . आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावयाचे होते ; मी तेव्हा सहा - सात वर्षांचा असेन . मला फारसे आठवत नाही ; गावातील व घरची पन्नास - पाऊणशे मंडळी निघाली . बरोबर गडी - माणसे होती . बैलगाड्या हर्णे बंदराला लागल्या . त्या वेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती . हर्णेला धक्का नव्हता . पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत . तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावयाचे . नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे !

हर्णे बंदर जरा त्रासाचे होते . तरीतेथील देखावा फार सुंदर आहे . हर्णेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग , हर्णेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकांत रूढ आहेत .

हर्णेच्या किल्ल्यावरी । तोफा मारिल्या दुहेरी । चंद्र काढिला बाहेरी । इंग्रजांनी

चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला , असे ही ओवी सांगते . हर्णेच्या समुद्रतीरावर नारळीची घनदाट वने आहेत . समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या माना सारख्या नाचवीत असतात . समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू जाते , हर्णेला दीपगृह आहे . उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे . येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो . संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात . संत हे भवसागरातील दीपस्तंभच .

" संत कृपेचे हे दीप । करिती साधका निष्पाप ॥ "

अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंड ळीं पैकी एकाने म्हटला . खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग , ओव्या वगैरे असतात . त्यांना जितके पाठान्तर असते तेवढे आम्हा सुशिक्षितांस नसते . सुशिक्षितांस इंग्रजी कवी माहीत असतात . त्यांची वचने त्यांना पाठ ; परंतु ज्ञानोबा - तुकाराम यांची आठवण नसते .

श्याम म्हणाला , " तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो ! रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी , त्या वेळेस समुद्राच्या वक्ष : स्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात . आपल्या गोजिरवाण्या गो र्‍या गोमट्या मुलाचे शेकडो समुद्र काढून घेत आहे , असे वाटते !"

" समुद्राचा का चंद्र मुलगा ?" एका लहान मुलाने विचारले .

" हो . समुद्रमंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे . " परभारे नामदेवनेच उत्तर दिले .

श्याम वर्णनाच्या भरात होता . " आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते किंवा चंद्रच शेकडो रूपे घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे , असे वाटते . सारी मौज असते . वारे वहात असतात . नारळी डोलत असतात . लाटा उसळत असतात , दीप चमकत असतो . चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो . तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते . कोणाचे सामान राहून जाते . कोणाचे बदलते , कोणाचे हरवते ! कोणाला पडाव लागतो , कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो . हिदुस्थानातील सारी अव्यवस्था , सारा गोंधळ , सारा उदासीनपणा , सारी सहानुभूतिशून्यता तेथे दिसून येते .

आम्ही पडावात बसलो : पडाव चालू झाले . वल्हवणारे वल्ही मारू लागले . चुबुक चुबुक पाणी वाजत होते . वा ~ यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते . ‘ शाबास , जोरसे ’ असे वल्हवणारे म्हणत होते , पडावात खेचाखेच होती . माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती . माझी एक आत्याही तेथे बसली होती . आत्यचेही अंगावर पिणारे मूल होते . आत्य आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते . वरचे दूध मुलाला पाजीत ; परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही . आईच्या दुधाची चव न्यारीच असते . ते नुसते दूध नसते . त्यात प्रेम व वात्सल्य असते . म्हणून ते दूध बाळाला बाळासे देते . तजेला देते . ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारे व घेणारा दोघांस परमसुख होते .

किना र्‍या वरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता . बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते . बोट दूर दिसावयास लागली होती . तिचा वरचा दिवा दिसू लागला होता . तरी बोट बंदरात येऊन तिला पडावे लागावयास अर्धा तास लागला असता .

" अरे चावतोस काय असा ? काय आहे प्यायला त्यात ?" असे आत्या आपल्या मुलावर ओरड्ली . तो मुलगा अधिकच रडू लागला . काही केल्या राहीना . पडवातही गर्दी होती . इकडचे तिकडे व्हावयास जागा नव्हती . आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात , तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखे होते . आपल्या मुलाने हसावे व खेळावे , सर्वांनी त्याचे कौतुक करावे , त्याला घ्यावे , नाचवावे , मुके घ्यावे , यात आयांना परमानंद असतो . ते पाहून कृतार्थ वाटते ; परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती ! हसर्‍या मुलाला सारे घेतात , रडणार्‍याला कोण घेणार ? वास्तविक रडणार्‍याला घेण्याची जास्त जरूरी असते ; परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात . जगात सारे सुखाचे सोबती , दु : खाला कोणी नाही . दीनाला जगात कोणी नाही , पतिताला कोणी नाही . ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरूरी त्यालाच त्याची अत्यंत वाण .

‘ दीनको दयालू दानी दूसरा न कोई ’

मूल रडू लागले तर ती कटकट होते . " झालं काय कार्ट्याला रडायला " अहो , ‘ असाच रोज रडतो ’ वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते की , मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे ! च्यावच्याव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या फार .

माझ्या आत्याला त्या वेळेस तसेच झाले . मूल तर राहीना . माझी आई जवळच होती . माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली , " वन्सं माझ्याजवळ द्या त्याला . मी त्याला घेत्ये हो . " आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले . तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला ; हसू खेळू लागला .

आई त्या लग्नात स्वत : च्या मुलासही रडवी परंतु वन्संच्या मुलाला अगोदर शांत करी . मुलांना काय , गोड दूध आईचे मिळाले की , राजेच ते ! आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे , पाजावे . आईने कधी कुरकुर केली नाही ; उलट तिला त्यात परमधन्यता वाटे , परमसुख व समाधान वाटे .

माझी आई ती गोष्ट एकादे वेळेस सांगे व म्हणे , " श्याम , अरे जवळ असेल ते दुसर्‍यास द्यावे . दुसर्‍याचे अश्रू थांबवावे , त्याला हसवावे , सुखवावे . या आनंदासारखा आनंद नाही . स्वत : च्या मुलाचे , श्याम कोणीही कोणीही कोड्कौतुक करील ; परंतु दुसर्‍याच्या मुलाचेही करील , तितक्याच प्रेमाने करील तोच थोर ."

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP