मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|
अध्याय एकोणचाळीसावा

ग्रामगीता - अध्याय एकोणचाळीसावा

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते.


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

सर्व जनांचें समाधान । याहूनि स्वर्ग नाही महान । नांदती द्वेष-मत्सराविण । बंधुभावें सर्व जेथे ॥१॥
गरीब-श्रीमंत कोणी नाही । नाही दारिद्रय रोगराई । उंचनीच कामें सर्वहि । करिती लोक प्रेमभरें ॥२॥
पक्ष नाही पंथ नाही । जातिभेद विरोध कांही । एका कुटुंबापरी राही । गांव आपुलें आनंदें ॥३॥
ऐसें व्हावें कोठेतरी । त्यासीच आम्ही म्हणतों वैकुंठपुरी । जेथे नाही भावनाच दुसरी । परकेपणाची ॥४॥
ग्रंथीं स्वर्ग-वैकुंठ-वर्णन । वाचतां तल्लीन होतें मन । त्यांत वर्णिले हेचि गुण । ते कां आपण न घ्यावे ? ॥५॥
सत्य युगाची ऐकावी कथा । परि आपुली न सोडावी प्रथा । याने समाजाच्या व्यथा । चुकतील कैशा ? ॥६॥
वैकुंठींचा प्रेमानंद । सत्ययुगाचा समतावाद । आपुल्या गांवीं करावा सिध्द । हेंचि कर्तव्य सर्वांचें ॥७॥
देवाने जगीं अवतार घ्यावा । ऐसें कां वाटतें जीवा ? त्रास अन्याय अनाचार नसावा । कोठेहि लोकीं ॥८॥
जरि हें आपणांसि आवडे । तरि आपणचि व्हावें कराया पुढे । न करितांचि देवानांवें ओरडे । तें सर्व वाया ॥९॥
सर्वचि भगवंताचे सखे । देवाचिया न्यायाने सारखे । मग व्यवहारींच पारखे । कां ठेवावे ? ॥१०॥
देवाचा न्याय जगीं आणावा । तरीच मिटे दु:ख-गवगवा । यासि टाळील तो जाणावा । भक्त कैसा ? ॥११॥
जें एकास तेंचि सकळांस । हेंचि सत्य जीवनाचें रहस्य । सर्वांच्या सुखीं दु:खीं समरस । भावना राहती सकळांच्या ॥१२॥
उणा-अधिक गुणापाशी । नको जाति वा धनापाशी । अधिकार समानचि सर्वांसि । जीवनाचा ॥१३॥
सर्वांनी करावें शक्तिभर काम । अधिकारपरत्वें उपक्रम । सर्वांसि मिळावें सौख्य सम । गरजांप्रमाणे जरूर त्या ॥१४॥
ऐसीच सर्वांची योजना करावी । पूर्ण वर्ष चिंताचि नसावी । अन्नवस्त्र धंद्यांची बरवी । योजना व्हावी सर्वांमिळोनि ॥१५॥
वर्षाचें बजेट ठरवावें । माणसीं लागेल तें योजावें । अन्नवस्त्र अलंकार बरवे । सर्वांलागी घरदार ॥१६॥
वेगळा नफा वेगळी संपत्ति । वेगळें वैभव वेगळी महती । वेगळे चोचले कोणाप्रति । उरोंचि न द्यावे ॥१७॥
एकचि वस्त्र एकचि अलंकार । एकचि आदर एकचि शृंगार । एकचि भोजन एकचि अधिकार । आपुलाल्या कामाचा ॥१८॥
सर्वांना सारखाच सणवार । सर्वांचे एकचि मेजवानी-प्रकार । एरव्ही न मिळो खानपान इतर । भिन्न कोणा ॥१९॥
सणावारीं कोणी वारला । तरि गोडधड नसावें गांवाला । तो दिवस सोडोनि पाहिजे नेमला । दुजा सर्वांनी ॥२०॥
सर्वांची उठण्याची एक वेळा । घरकाम करण्या हुरूप आगळा । सफाई, ध्यान, प्रार्थना सगळा । कार्यक्रम सामुदायिक ॥२१॥
सर्वांस ठेवावें सारखें । राहणी, खाणें, कपडे नेटके । सर्वांच्या मुलांस शिक्षण निकें । योग्यता-भेद बघोनि ॥२२॥
शिक्षणाची एकचि शाळा । राहणीचा एकचि सोहळा । प्रेमाचा सर्वभावें लळा । जेथे तेथे सर्वांशी ॥२३॥
समान व्यवस्था आरोग्याची । सारखीच उन्नति स्त्री-पुरुषांची । एकाची ती सर्वचि गांवाची । जबाबदारी ॥२४॥
जैसे, कोणी येती पाहुणे । ते त्या आदर्श गांवाचेचि म्हणे । वाटून द्यावेत आपुलाले कोणें । ऐसेंहि होतें ॥२५॥
परि त्यासि आहे मर्यादा । तेवढाचि नसावा धंदा । पाहुण्याची वेळ, सीमा सर्वदा । निश्चितचि असावी ॥२६॥
एरव्ही करावा पत्रव्यवहार । जेव्हा नसेल काम जरूर । दिवस घालवूं नयेत भराभर । पाहुणेबाजींतचि ॥२७॥
तैसेचि लग्नादि उत्सव । त्यांसि झटावें गांवाने सर्व । परंतु नेहमीच धावाधाव । न व्हावी तीहि ॥२८॥
गांवच्या मुलामुलीचें लग्न । सामुदायिक पध्दतिच प्रमाण । तेथे तिथि-मुहूर्ताचें कारण । कांहीच नाही ॥२९॥
असोत लग्नें दहा-पन्नास । गांवचीं शंभरहि त्या वर्षास । एकाच वेळीं सावकाश । उरकवावीं एके जागीं ॥३०॥
गांवीं असावें विवाहस्थान । भांडीकुंडीं बिछायत पूर्ण । सर्वांसाठी ठेवावी जमवोन । गांवातर्फे ॥३१॥
पवित्र विशाल सुंदर स्थान । जेथे प्रसन्न राही मन । सर्व वरांनी एकचि ठिकाण । पसंत करावें लग्नासि ॥३२॥
प्रसन्न वेळ आणि सज्जन । तोचि मुहूर्त सुखसंपन्न । प्रसन्न हवापाणी पाहोन । कार्य करावें सर्वांनी ॥३३॥
गांवचे सर्व जमोनि मित्र । सहकार्य अर्पावें सर्वत्र । बसवोन वधुवरांना एकत्र । करावें लग्नकार्य ॥३४॥
लग्नादिकासाठी कोणा । उडवूं न द्यावें गांवच्या धना । कराव्या ग्रामोध्दार-योजना । सर्व मिळोनि ॥३५॥
सर्वांनी आपलें सर्वस्व द्यावें । आदर्ह्स गांवाचें बनोनि राहावें । कोणींहि वेगळें न व्हावें । ऐसी घ्यावी दक्षता ॥३६॥
जरी सर्वांनी संसारी असावें । तरी संततिनियमन सांभाळावें । तीन पुत्रांवरि पुत्र व्हावे । ऐसें इच्छूं नये कोणी ॥३७॥
पुत्र तान्हपणीं वाढला । दुसर्‍या दूधावरि लागला । की आईपासोनि सोडविला । पाहिजेचि तो ॥३८॥
गांवाने करावें शिशुसंगोपन । म्हातार्‍या प्रेमळ बायांकडोन । जयांचेनि काम भिन्न । होत नाही कष्टाचें ॥३९॥
संपत्ति आणि संतति । सगळी गांवाची ठेव निश्चिती । वाढवोनि साधावी उन्नति । योग्य मार्गे गांवाची ॥४०॥
आपुल्या गांवाचें सुखदु:ख । सकळांसीच कळावें नि:शंक । येतां परस्परांची हांक । धावोनि जावें जिव्हाळयाने ॥४१॥
ज्याची कोणास जरूर पडे । त्यास त्याने बोलवावें निर्भिडें । कोणीहि घेऊं नयेत आढेवेढे । आपुले अडथळे सांगोनि ॥४२॥
कामाचें महत्त्व पाहोनि । हांकेस त्वरित जावें धावोनि । तोहि येईल तैसाचि समजोनि । कामास माझ्या ॥४३॥
जैसें आपण कोणाचें करावें । तैसेंचि आपुल्या वाटयास यावें । ऐसेंचि आहे स्वरूप बरवें । सहकार्याचें मानवांच्या ॥४४॥
म्हणोनि संकटीं धावोनि जावें । सर्वांनी कष्ट वाटूनि घ्यावे । जेणेंकरूनि सर्वांस वाटावें । कुटुंब माझें विश्वव्यापी ॥४५॥
जीव जगीं जन्मासि आला । ऐसेंचि सहकार्य द्यावयाला । अज्ञानी प्राणी सेवेसि मुकला । त्यास करावें सावधान ॥४६॥
कोणास नाही उद्योगधंदा । कोण लागला भलतिया छंदा । पाहावी निरीक्षोनि आपदा । दूर कराया गांवाची ॥४७॥
कोण कोणाशीं वितंडतो । कोण कोणाला छळीत बसतो । कोण स्वार्थासाठी दंडतो । पाहणें काम आमुचें ॥४८॥
व्यसनाधीन कोण राहे । कोण जुगारीं बसलाहे । चिंतातुर कोण कां आहे । पाहणें काम आमुचें ॥४९॥
कोणी स्त्रियांना जाच करिती । कोणी आईबापा कष्ट देती । कोणी मुलीच न पाठविती । कोणी नेती पळवोनि ॥५०॥
हे सर्व दोष सारावया । जबाबदार आम्हीच तया । गांवचे रहिवासी म्हणोनिया । काळजी असो आम्हांसि ॥५१॥
आमुचें करणें आमुचें नव्हे । त्या जामीन सर्व गांव आहे । हें समजोनि करावें होय-नोहे । सर्व कांही सर्वांनी ॥५२॥
आम्ही गांवीं दारू प्यालों । म्हणजे ’ दारूडे लोक ’ झालों । तेणें ’ दारूबाज गांव ’ नांव चालो । ऐसें होतें ॥५३॥
मग सांगा सर्व दारूबाज । होतां कैसें चालेल राज्य ? म्हणोनि व्यसनादिकांचें बीज । येऊं न द्यावें शिवेआंत ॥५४॥
कोणी गांवीं तमाशा करी । मनोरंजनाचा प्रचार विषारी । तेणें मुलें नाचती दारोदारीं । नाचे जैसे ॥५५॥
नृत्यकलेच्या नांवाखाली । विषयांध भावना पसरली । ऐसी नको सुधारणा-भुली । आमुच्या गांवीं ॥५६॥
ही कला नव्हे, विडंबन । पैसे लुटायाचें स्थान । ऐसें नाटक, पथक, गायन । असों न द्यावें ॥५७॥
असेल ज्यांत जनहित । त्यासीच राहावें सहमत । वाढूं न द्यावा वाईट पंथ । कोणताहि गांवीं ॥५८॥
उत्तम कार्यासि जे निघाले । रामधून भजन कलापथक चाले । व्यायाम खेळ मनोरंजन भलें । सर्वकांही ॥५९॥
कोठेचि नाही कुटिलता । तमाशे-दंडारींची हीनता । विचारल्याविण पुढारी येतां । भय वाटावें तयासि ॥६०॥
परका कार्यक्रमासि घुसे । विचारल्याविण मुख्यासि सहसें । कधीहि घडणार नाही ऐसें । गांवीं आमुच्या ॥६१॥
गांवाच्या बुध्दीची उच्च पातळी । लोकां कळावें तत्त्वें सगळीं । भाषणें चालावीं  वेळोवेळीं । ग्रामोन्नतीचीं यासाठी ॥६२॥
आपण कोणी भिन्न आहों । ऐसी स्वप्नींहि भावना न येवो । यासाठी ज्ञानपाठ जागता राहो । गांवीं आमुच्या ॥६३॥
आमुच्या गांवीं प्रार्थना-मंदिर । जेथे सर्व धर्मांचा आदर । विश्वांतील जे असतील थोर । ते आम्हांसि देवतुल्य ॥६४॥
त्याच मंदिरीं थोरांची जयंति । उत्सव आणि संत-पुण्यतिथि । जागती राहे सामुदायिक वृत्ति । बौध्दिक-बळें ॥६५॥
साधुदेवतांची जयंति । पुण्यतिथि आदि उत्सव किती । इच्छा असेल ती सत्कृति । करावी गांवीं ॥६६॥
पण सर्वांचें असावें मत पवित्र । गांवाने होऊनि एकत्र । सामुदायिकचि सर्वत्र । उत्सव करावे ॥६७॥
गांवचा उत्सव तो सर्वांचा । त्यांत हर्ष अति आदर्शाचा । तेथे आपापल्या मनाचा । तोल नसावा विपरीत ॥६८॥
नाहीतरि वाढे सांप्रदायिकता । जातीयता, व्यक्तिनिष्ठता । तेणें गांवाचे तुकडे होतां । वेळ न लागे ॥६९॥
म्हणोनि भेदचि नको कांही । सर्वांमनीं उत्साह राही । एक कुटुंब ऐसें सर्वहि । ग्राम आमुचें प्रेमळ ॥७०॥
आपुलें प्रेमचि अमोल संपत । आपुले श्रमचि महान दौलत । आपुलें सहकार्यचि खरी इज्जत । समजावोनि द्यावें सर्वांसि ॥७१॥
गांवीं तेंचि सर्वांनी करावें । कीर्तिस्फूर्तीने गांव भरावें । घराघरांत शांतिसुख पावे । जनता जेणें ॥७२॥
कोणी एक मागे पडला । त्यास दुसर्‍याने सांभाळिला । ऐसें करितांच गांव झाला । सर्व गुणीं संपन्न तो ॥७३॥
गांवांत नाही झगडा तंटा । कोणी नाही बोलणार उफराटा । सरळ सालस स्वभाव चोखटा । प्राणियांचा दिसावा ॥७४॥
जरी मत भिन्न झालें । तरी पाहिजे गांवांतचि मिटविलें । आपुल्या गांवाविण नाही उरलें । कोर्टकचेरी-काम कोठे ॥७५॥
गांवचा झगडा गांवींच मिटे । निवडणुकीचें काम नव्हे खोटें । लंदफंद गांवांत नाही कोठे । ऐसें ग्राम सुंदर हें ॥७६॥
ऐसें सांगाया वाटावा अभिमान । तेंचि खरें गांवाचें भूषण । गांवांतील सर्व लोक सज्जन । परस्परांवरि अति मोह ॥७७॥
यांत कोणी उनाड दिसला । त्यासि उपदेश द्यावा चांगला । एवढें करोनि नाही वागला । तरि तो झाला बहिरंग ॥७८॥
ज्याने गांवांत धिंगाणा घातला । तो गांव-घातकीच ठरला । त्यास पाहिजे सरळ केला । शांति-प्रयत्न करोनि ॥७९॥
मग सर्वांनी मिळोनि ठरवावें । याचें पुढे काय करावें । निरुपाय होतां पाठवावें । निर्णय करोनि परगांवीं ॥८०॥
मग त्यास न मिळे सामान । अथवा त्याचें असलेलें धन । त्याने पळावें जीव घेवोन । आपुला कोठे ॥८१॥
ऐसें बळकटपण जंव नाही । तंव आदर्श गांव तमाशाच राही । त्यांत स्थिरताच येणार नाही । कांही केल्या ॥८२॥
यावरि श्रोता प्रश्न करी । गांवांत अडचणी नानापरी । सर्व लोक जनोनि कोठवरि । सोडवतील सर्वचि त्या ? ॥८३॥
सर्वचि पाहती कारभार । तरि केव्हा करावें काम इतर ? याने ग्रामजीवन स्थिर । होईल कैसें सांगाना ? ॥८४॥
ऐका याचें समाधान । करावी एक समिति निर्माण । सर्वांनी आपले प्रतिनिधि म्हणून । नेमावे कांही कारभारी ॥८५॥
ज्यांनी आपुलें सर्वस्व द्यावें । तेचि समितीचे घटक बरवे । तनमनधन समर्पावें । ग्रामासाठी जयांनी ॥८६॥
त्या सर्वांना सभासद करावें । त्यांतून पांचजण निवडावे । सर्वांनीं प्रांजळ मनें पाहावे । इमानदार न्यायनिष्ठ ॥८७॥
सर्वांचें मालधन एक करावें । सभासदांचें मोजमाप घ्यावें । मग सर्वांचेंचि जीवन बनवावें । एकसारिखें ॥८८॥
सर्वांना भरपूर कामें द्यावीं । उत्पन्नाची व्यवस्था लावावी । सर्व व्यवहार-उपाधि पाहावी । त्याच पंचांनी ॥८९॥
सर्वांनी आपापलें काम करावें । विकणें घेणें पंचांनी पाहावें । आणि उद्योगासि सामान पुरवावें । पंचांनीच ॥९०॥
गांवाकरितां मार्ग जोडावा । गांवाकरितां व्यापार पुढे न्यावा । हरतर्‍हेचा संबंध आणावा । सुखी कराया गांव हें ॥९१॥
गांवांतून जें द्रव्य जावें । माल, मनुष्यबल, सामान बरवें । तें प्रथम पूर्ण निरीक्षोनि घ्यावें । गांवासाठी पंचांनी ॥९२॥
सर्वचि योजना पंचांवरती । कोणाचेंचि नाही इतराहातीं । इतर निश्चिंत राहती । कराया प्रगति अधिकाधिक ॥९३॥
एकदा येथें अनन्य झाले । ते व्यापारचिंतेपासूनि सुटले । नि:स्पृह भगवत्प्रेमी झाले । काम आपुलें करोनि ॥९४॥
पंच म्हणजे परमेश्वरदूत । सर्वांची चिंता करी निश्चित । याविषयीं कोणाचें दुमत । असूंचि नये ॥९५॥
तयांनी सर्व काळजी घ्यावी । गांवची जनता सुखी ठेवावी । निर्णय देतांचि ऐकावी । हांक जनतेने पंचांची ॥९६॥
ग्रामीं जनता असेल मोठी । परि ती पंचापुढे धाकुटी । सदा तत्पर सेवेसाठी । प्राण पणा लावोनि ॥९७॥
पंच बोलले तें वेदप्रमाण । हीच गांवधर्माची खूण । यांतचि ग्रामाचें आदर्शपण । आमुच्या मतें ॥९८॥
आमुचें गांव एक कुटुंब । पंच तयाचा मूळस्तंभ । सर्वांवरि न्यायाचा दाब । हाचि कळस विकासाचा ॥९९॥
नसतां कोणाचेंहि शासन । न्यायाने वागती सत्ययुगीं जन । त्याचेंचि रूपांतर पंचायतन । लोकशाही लोकतंत्र ॥१००॥
या योजनेचें एकचि मरण । तेंहि देतों लक्षांत आणोन । पंच म्हणोनि निवडाल गौण । तरि ये धोका जीवनासि ॥१०१॥
सेवाहीनांची पंचायत । ती गांवास करील पंचाईत । लोकशाही म्हणजे लोकांचें मनोगत । सिंहासनीं चढावें ॥१०२॥
लोकशाही म्हणजे लोकांचें हित । लोकांकडूनि व्हावें हातोहात । सर्व मालक म्हणोनि सत्य । जबाबदारी ओळखावी ॥१०३॥
तीच म्हणावी लोकाशाही । जेथे कोणी कामचुकार नाही । सेवातत्पर सर्व उत्साही । न्यायी जन ॥१०४॥
लोकशाहींत जो सत्ताधारी । तो मालक नव्हेचि निर्धारी । लोकसेवेचा कारभारी । जबाबदारी हे त्याची ॥१०५॥
सर्व लोक कार्यतत्पर । त्यांहूनि विशेष जो धुरंधर । तोचि ग्रामाधिकारी खरोखर । पंच वा नेता ॥१०६॥
पंच तो असे आमुच्यांतील । अधिक कामकर्ता आचारशील । ज्यासि संडास-सफाईचेंहि नवल । नसे कांही ॥१०७॥
अधिक सुरळीत काम करील । नेमाने निष्ठेने राहील । तोचि अधिकारी होईल । या गुणांनी गांवाचा ॥१०८॥
येथे महत्त्व सदगुणांचें । धाडसाचें, स्वार्थत्यागाचें । तेचि पुढारी होती गांवाचे । जे गांवास देव मानती ॥१०९॥
ज्याने गांवचि देव मानिला । सेवाकार्याचा मंत्र जपला । त्याचाचि असावा बोलबाला । गांवामाजीं आपुल्या ॥११०॥
तोचि पंच अतिसात्विक । गांव मानी जगन्नायक । एक सेवाचि महापूज देख । इतर नाही त्यासि भक्ति ॥१११॥
त्याला नाही दुसरा धर्म । त्याला नाही दुसरें कर्म । एक सेवाचि त्याचा उपक्रम । सर्वकाळ गांवलोकीं ॥११२॥
त्याचें सर्वस्व आमुच्या करितां । म्हणोनीच तो आमुचा पिता । जेथे जातिधर्मपंथमता । महत्त्व नाही ॥११३॥
तोचि पंच निवडावा । श्रध्दाविचारें ओळखावा । गटबाजीचा होवो न द्यावा । तमाशा कोठे ॥११४॥
करावें सकळांच्या हिताचें । तेथे व्यक्तित्वचि नको आमुचें । जो करि सर्वांहूनि हित लोकांचें । तोचि नेता मानावा ॥११५॥
सज्जनांचें असावें पंचमंडळ । जें गांवा चालवी सर्वकाळ । आपुलें कुटुंबचि गांव सकळ । मानावें त्यांनी ॥११६॥
परस्परांना घेऊनि चालावें । परस्परांचें हृदय एक व्हावें । कोठे उणें पडतां आपणचि समजावें । उणे असों ॥११७॥
आपुल्या व्यक्ति-कुटुंबा करितां । न व्हावी गांवाची अव्यवस्था । ऐसी दृष्टि असावी समस्तां । कार्यकर्त्यासि ॥११८॥
अन्यायें पीडा न होवो कोणास । न व्हावा मुंगीलाहि त्रास । याची जाणीव असावी प्रमुखास । सर्वकाळ ॥११९॥
सार्वजनिक वस्तु घरीं भोगणें । आप्तजनांसि सवलती देणें । हें टाकूनि करावी चोखपणें । तत्परतेने जनसेवा ॥१२०॥
आपुला दुराग्रह दूर सारावा । बहुजनांचा मागोवा घ्यावा । शक्यतों कारभार चालावा । एकमताने गांवाचा ॥१२१॥
पांचामुखीं परमेश्वर । परि नको सत्तेचा अहंकार । नियम पाळतां वाटावें सुखकर । ठरलियावरि ॥१२२॥
सर्वांनी सर्वांसाठी झटावें । सर्वांच्या हितांत स्वहित पाहावें । थोरांनी याचे धडे दाखवावे । आचरोनि निश्चयाने ॥१२३॥
यांतचि आहे मोठेपण । ग्रामजीवन होई स्वयंपूर्ण । हीच आहे खरी खूण । आदर्श ग्रामराज्याची ॥१२४॥
ग्रामराज्यचि रामराज्य । स्वावलंबन हेंचि स्वराज्य । बोलिले महात्मा विश्वपूज्य । विकास त्याचा सुंदर हा ॥१२५॥
आमचें ग्रामचि एक राज्य । सर्वांचें माहेर अविभाज्य । ऐसे आदर्श होती जे जे । नातें आमुचें त्यांच्याशी ॥१२६॥
दुसरें गांव शत्रु नोहे । परि आमुचा संबंध कामीं राहे । सहकार्य देती पंच निश्चयें । चांगुलपण वाढवाया ॥१२७॥
पंचमंडळ निष्ठेने राही । तें तें गांव भूवैकुंठ होई । त्याच्या प्रभावें  पवित्र मही । आपोआप होतसे ॥१२८॥
ऐसें जंव गांव साधलें । तंव तें प्रांतांत प्रमुख झालें । ऐसे प्रांत प्रभावी ठरले । तरीच तें भूषण देशासि ॥१२९॥
देश ऐसा उन्नत होय । तोचि विश्वाचा घटक शांतिमय । एरव्ही जो स्वार्थे पुढें घे पाय । घातक होय विश्वासि ॥१३०॥
म्हणोनि ऐका लक्ष लावून । स्वर्ग कराया जगीं निर्माण । करा कुटुंब समर्पण । सामुदायिक तत्त्वासि ॥१३१॥
घ्या वाचून, करा तातडी । मग मनन करोनि आवडीं । घाला या आदर्शयोजनेंत उडी । आपुलें सर्वस्व देवोनि ॥१३२॥
श्रोतेहो ! ऐकिलें काय वचना ? मग वेळ कासयासि पुन्हा ? आजचि तनमनधन समर्पाना । या कार्यासि ॥१३३॥
यानेच थोरांची इच्छा सफळ । सार्थकीं लागे ज्ञानभक्ति सकळ । मिटेल अंतर्बाह्य तळमळ । तुकडया म्हणे सर्वांची ॥१३४॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । आदर्श ग्रामराज्य कथित । एकोणचाळिसावा अध्याय संपूर्ण ॥१३५॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*

" ही पृथ्वी परमेश्वराची आहे. इथे राहणारे सर्व मानव एक आहेत. प्रत्येक गांव स्वयंपूर्ण व समानतेने सुखी व्हावें हेंच माझ्या स्वप्नांतील रामराज्य ! "

---राष्ट्रपिता पूज्य महात्मा गांधी

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP