मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|
अध्याय चोविसावा

ग्रामगीता - अध्याय चोविसावा

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते.


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

श्रोतयाने केला प्रश्न । गांवीं संप्रदाय असती भिन्न । वेगवेगळे त्यांचे एकूण । देवधर्म उत्सवादि ॥१॥
ते सार्वजनिक उत्सवींहि येती । तरी आपणांसि वेगळे समजती । आपापली भिन्न मानूनि संस्कृति । चालती सर्व ॥२॥
त्यांचे फड निरनिराळे । साजविती भिन्न देवळें । कोठे प्रतिमापूजेचे सोहळे । कोणी मूर्तिविरोधक ॥३॥
कित्येकांची तीर्थी धाव । ते इतरांसहि देती उठाव । इकडे ओस पडलें गांव । तरी पर्वा नाही ॥४॥
या सर्वांचीं मतें वेगळीं । भिन्न त्यांची संतमंडळी । एकएकाची करितो टवाळी । आपाआपुल्या गोटांत ॥५॥
वेगवेगळया शिष्यशाखा । वेगवेगळे गुरु देखा । कोणी न मिळती एक-एका । करिती उत्सव आपुले ॥६॥
खरें-खोटें ज्ञान कांही । अंधरूढया शिकविती पाही । गट पडले भिन्न भाविकांचेहि । मिरविती द्वाही आपुलाली ॥७॥
हे जोंवरी एक न होती । तोंवरी संघटनेची फजीती । यासि उपाय करावा कोणेरीतीं । तेंचि आम्हां सांगावें ॥८॥
श्रोतयांचा प्रश्न मार्मिक । उत्तर ऐका आवश्यक । गांवापासोनि विश्वापर्यंत देख । जरूरी याची ॥९॥
भिन्न भिन्न झाले गट । वेगवेगळे पडले तट । आकुंचित मतें शिकविती रोगट । समाजासि ॥१०॥
अंधश्रध्देस आणोनि पूर । लोकीं रुजविती मिथ्याचार । त्यांच्या उत्सवांचे प्रकार । विचित्रचि असती ॥११॥
अपार धनाची धुळधाणी । अनिष्ट प्रथांची पेरणी । फुटीर वृत्ति वाढेल जनीं । ऐसी करणी कितीकांची ॥१२॥
कित्येक बुवा वेषधारी । जगती ऐशा गटांवरि । खरें ज्ञान न देती स्वार्थभरीं । जनतेलागी ॥१३॥
ऐसें हें जोंवरि चाले । तोंवरि गांव भ्रमीं बुडालें । सुधारणेच्या मार्गी आले । दरी-दरकुटे ॥१४॥
यासाठी एकचि उपाय । आपण न ठेवावे अलग ठाय । त्यांच्यांत जावें मिळोनि निर्भय । समुदाय साधाया ॥१५॥
असो कोणाचा कोणता पंथ । असो कोणीहि बुवा महंत । सर्वा आपुलेचि मानोनि सतत । जावें मिळोनि सर्वांशीं ॥१६॥
पंच महोत्सवचि आपुले । येर ते तुच्छ मानतां चुकलें । आपण अलग पडतां कसलें । साधेल ऐक्य ? ॥१७॥
म्हणोनि निर्वाळा सांगतो । जेव्हा संतजयंति पुण्यदिन येतो । तेव्हा सगळयांमिळोनि करावा तो । सार्वजनिक स्थानीं ॥१८॥
मग तो असो कोण्या पंथाचा । वेगळी न ठेवावी वाचा । संतसज्जन सखा विश्वाचा । म्हणोनिया ॥१९॥
सर्व पंथांचे उत्सव । ज्यांत दिसेल सत्यगौरव । त्यांतूनि विशालतेचे भाव । भरावे लोकीं ॥२०॥
एकलकोंडे राहूं नये । घरींच उत्सव करूं नये । सर्वांचें सहकार्य घ्यावें । हेंचि मर्म संघटनेचें ॥२१॥
उत्सवाचा व्हावा परिणाम । म्हणोनि प्रभावी ठेवावे कार्यक्रम । थोरांचें भाषण भजन उत्तम । करावें तेथे ॥२२॥
करितां संतांचा गुणगौरव । सांगूं नये चमत्कारलाघव । पाडवा उत्तम वागणुकीचा प्रभाव । समाजावरि ॥२३॥
संत ज्ञानेश्वर, तुकाराम । नामदेव, सांवता, चोखा अनुपम । एकनाथ, दामाजी भागवतोत्तम । वर्णावे लोकीं ॥२४॥
सजन कसाई, रविदास चांभार । सेना, संताजी, गोराकुंभार । कृष्णदयार्णव, वामन, श्रीधर । संतकवीहि ॥२५॥
रामदास, तुलसीदास । केशवदास, कबीरदास । सुंदरदास, विष्णुदास । सूरदासादि ॥२६॥
शंकराचार्य, रामानुजाचार्य । मध्वाचार्य, वल्लाभाचार्य । राधास्वामी, बसवाचार्य । रमणमहर्षि, श्रीचक्रधर ॥२७॥
शहादत्त, गोरखनाथ । गोविंदनाथ, दयाळनाथ । नरसी मेहता, रामतीर्थ । श्रीसमर्थ आडकोजी ॥२८॥
महात्मा मंसूर, महंमद । कवेंरराम, शेखफरीद । झरतुष्ट्र आणि गौतमबुध्द । विवेकानंद प्रभावी ॥२९॥
गुरु गोविंदसिंह, नानकदेव । महाचैतन्य गौरांगदेव । रामकृष्ण परमहंसदेव । जैन महावीर स्वामी ॥३०॥
महात्मा येशु, टालस्टाय । मार्क्स, साक्रेटीस निर्भय । महात्मागांधी, राममोहनराय । दयानंदादि महाज्ञानी ॥३१॥
भक्त मीराबाई, मुक्ताबाई । कान्होपात्रा, जनाबाई । रंगनायकी, बहिणाबाई । एनिबेझंट, निवेदिता ॥३२॥
ऐसे जे जे योग्य प्रभावें । त्यांचें चारित्र्य समजोनि द्यावें । त्यांनी समाजकार्या गौरवें । काय दाविलें जनतेसि ॥३३॥
ऐसियांची पुण्यतिथि आदि करावी । सर्वांची प्रार्थना घ्यावी । उत्तम वक्त्यांनी चरित्रें बोलावीं । परिणाम होईल त्या शब्दीं ॥३४॥
त्यांची विशालता समजोनि द्यावी । समान भावना अनुसरवावी । समाजानेहि तैशीच करावी । प्रगति आपुली म्हणोनि ॥३५॥
संत देहांनी भिन्न असती । परि ध्येयधोरणानें अभिन्न स्थिति । साधनें जरी नाना दिसती । तरी सिध्दान्तमति सारिखी ॥३६॥
ऐसें सांगतां अभ्यासें वर्णूंन । भिन्न संप्रदायांचें होईल मिलन । होईल बुवाबाजीचेंहि खंडन । सर्वतोपरीं ॥३७॥
नाहीतरि पंथांचे पडती गट । सहकार्याचा भंगे तट । पोटभरू दांभिकांचे पोट । चालतसे तयावरि ॥३८॥
आपापल्या भाविक जना । भुलविती उत्सवादिकीं नाना । अंधश्रध्देने होय धिंगाणा । ग्रामजीवनाचा ॥३९॥
म्हणोनि आणावे मैदानावरी । आकुंचितपण सारोनि दुरी । मग सत्यचि बोलेल वैखरी । सर्वामुखीं मंगल ॥४०॥
गांवीं येवोत संत कोणी । बोध करवावा प्रार्थनीं । अथवा सार्वजनिक स्थानीं । सर्वांसाठीं उत्सवादिकीं ॥४१॥
तेथे न सांगवेल भाकडकथा । न पाळवेल अनिष्टप्रथा । मार्ग लाभेल आइता । लोकां सत्य ज्ञानाचा ॥४२॥
ज्ञानाचिया भूमिकेवरि । फारशा भेदासि न उरे उरी । मिळते जुळते बोल बहुपरी । निघती सर्वांचे ॥४३॥
तेणें निरसेल भेद-कल्पना । तात्त्विकताचि कळेल जना । पंथबाजीच्या उच्चाटना । उपाय हा अमोलिक ॥४४॥
जेथे लोक समभावनेने बैसले । तेथे यथार्थचि चर्चा चाले । देव-संत-धर्म-ऐक्य साधे भलें । हळुहळू तेणें ॥४५॥
म्हणोनि ऐसे वारंवार । प्रसंग आणावे गांवीं सुंदर । साधुसज्जन जुळवावे अपार । भिन्न भिन्न पंथांचे ॥४६॥
ऐक्य दृष्टीने संतोत्सव । करावे उत्साहें गांवोगांव । जेणें तीर्थाचा गौरव । लाभेल गांवा ॥४७॥
तीर्थी निर्मल साधुवृंद । तेथे तत्त्वचिंतानुवाद । जनास होईल तत्त्वबोध । म्हणूनीच महत्त्व तीर्थाचें ॥४८॥
एरव्ही ’ तीर्थी धोंडापाणी । देव रोकडा सज्जनीं ’ । ऐसीच वदली संतवाणी । गर्जोनिया ॥४९॥
तैसें आज मार्गदर्शन । जया तीर्थी न होय पूर्ण । तेथे धाव घेवोनि कोण । लाभ या जना ? ॥५०॥
यात्रेस जावें तरि सेवेसाठी । विचारस्फूर्ति आणाया गांठीं । तेणें गांव करावें उठाउठीं । यात्रारूप आपुलें ॥५१॥
परंतु यात्रा करिती चारोधाम । लोकां मागती न करितां काम । यांत न घडे पुण्यकर्म । वाउगा भ्रम अहंकार ॥५२॥
गांवीं उपाशी ठेवोनि बाळां । जावें कासया कुंभमेळां ? देव गांवीं थोडा तीर्थी निराळा । ऐसें नाही ॥५३॥
परि लोक सती पडाया जाती । पंडयादिकांच्यां जाळीं गुंतती । मेंढरापरी धांवोनि मरती । रूढीमागे ॥५४॥
पंढरीपासून सहा कोसांवरि । सांवता राहिला जन्मभरि । देव मिळविला न करितां वारी । गांवींच त्याने ॥५५॥
जनता-जनार्दनाच्या सेवेचें । काम करितां इमानें साचें । गांवींच पुण्य पंढरीचें । धांव घेंई आपैसें ॥५६॥
वसती जेथे ऐसे संत सेवक । तें गांवचि तीर्थ होय सुरेख । स्फूर्ति घेवोनि जाती लोक । कराया गांवें भूवैकुंठ ॥५७॥
जेथे प्रेम आणि पावित्र्य । त्यासीच नाम तीर्थक्षेत्र । कासया जावें गोंधळ विचित्र । बघाया तीर्थी ? ॥५८॥
गांवाचें सार्वजनिक स्थान । तेंचि समजावें तीर्थ महान । तेथेचि लागावें तन-मन-धन । दानशूरांचें ॥५९॥
तीर्थी कोणी खर्च न करावा । आधी गांवमार्ग सुधारावा । तरीच तीर्थाचा पुण्यठेवा । गांवीं मिळेल सेवेने ॥६०॥
वांचवूनि ग्रामसंपत्ति । गांवाची पवित्र घडवावी मूर्ति । मग न जातांहि क्षेत्रीं तीर्थी । पुण्य लाभे ग्रामोध्दारें ॥६१॥
सप्ताह, एक्के, यज्ञ, उत्सव । यासाठी वर्गणी होते ती सर्व । कांही वर्षें सुधाराया गांव । याच कामीं लावावी ॥६२॥
जयंति असो वा पुण्यतिथि । सप्ताह असो वा हवनें, पंगती । पाहावी गांवाची राष्ट्राची स्थिति । तैसेंचि करावें पुण्यकर्म ॥६३॥
सर्व पंथीयांनी मिळावें । सर्वांच्या हिताचें कार्य उभारावें । हेकटपणें भरी न भरावें । भलतियाचि ॥६४॥
नाहीतरि महानुभाव पळे रानीं । देवीभक्त सज्ज होती बलिदानीं । कोणी द्रव्य उधळती शिगर रचोनि । एकलकोंडे ॥६५॥
कोणी वर्गणी गोळा करून । देवीसि देती पशूंची दावण । परि रोग न जाती ग्रामसफाईविण । ऐसे उत्सव केलियाने ॥६६॥
कोणी गांवच्या यात्रेमाजीं । नाना अनिष्ट कामकाजीं । पैसा उधळोनि पेरती समाजीं । जहरचि जैसें ॥६७॥
त्यासाठी करावी यात्रा-कमेटी । यात्रा-मेळा-उत्सव-पर्वणी-हाटीं । करावया सुधारणा उठाउठीं । राष्ट्रीयतेच्या ॥६८॥
ग्रामोन्नतीचीं आयोजनें करावीं । शक्तिबुध्दीने राष्ट्रीयता भरावी । आपुल्या गांवाची कीर्ति जावी । दिगंतरीं तीर्थाऐसी ॥६९॥
गांवीं अथवा गांवाजवळी । यात्रा-मेळा असे ज्या काळीं । तेथे सेवा करावी सगळी । स्वयंसेवक होऊनि ॥७०॥
तैसेंचि आपुल्या गांवचें वैशिष्टय । तें जगापुढे मांडाया स्पष्ट । प्रदर्शन, संमेलन, यात्रादि इष्ट । सुरू करणें आपुल्या गांवीं ॥७१॥
सुंदर मार्ग सरळ निर्मळ । स्वच्छ आरोग्यदायी जळ । ग्रामरचनेंतील आदर्श सकळ । वर्तावेत तेथे ॥७२॥
शौचकूप मुत्र्या चहूं बाजूंनी । नाना वस्तूंच्या ठेवाव्या श्रेणी । जेणें देश चढे उच्च स्थानीं । वैभवाच्या ॥७३॥
नाना मनोरंजनें चालवावीं । परि व्यसनें तमाशे येऊं न द्यावीं । लोकांस हळुहळु लावीत जावी । रुचि राष्ट्रीयतेची ॥७४॥
उद्योगाच्या सुंदर कला । वाद्यकलादि व्यवहारकला । माणुसकीच्या आचारकला । योजाव्या तेथे ॥७५॥
माणसाने मार्गी कैसें चालावें । कैसें बसावें कैसें बोलावें । आपुलें वर्तन कैसें ठेवावें । घरांत आणि समुदायांत ॥७६॥
याचा सुंदर पाठ द्यावा । सर्वांचें ऐक्य शिकवावें गांवा । यात्रा-उत्सवें संचार व्हावा । नवतेजाचा सर्वांमाजीं ॥७७॥
अनिष्ट प्रथा बंद कराया । सेवकें झिजवावी काया । यात्राशुध्दीच्या नाना उपाया । अवलंबावें ॥७८॥
स्वामी दयानंद महाराज । तैसा त्यांचा आर्यसमाज । यांनीहि केलें झटूनि काज । सुधारणेचें यात्रिकांच्या ॥७९॥
गाडगे बाबा वैराग्यमूर्ति । तैसीच सेवामंडळ-समिति । यात्राशुध्दीसाठी उत्तम रीतीं । प्रयत्नशील सर्वदा ॥८०॥
त्या प्रकारें गांवचे सज्जन । मिळवोनि करावें यात्रा-नियोजन । यात्रा म्हणतां ’ या तरा ’ ही खूण । पटावी लोकां ॥८१॥
प्रचंड समुदाय जमवावा । उत्तम सदुपदेश करावा । संत-नेत्यांनी लौकिक वाढवावा । लोक-जीवनाचा ॥८२॥
हजारो लोक जरी जमले । तरी आरोग्य जराहि नाही भंगलें । लोक सहजपणें आले-गेले । ऐसी व्हावी व्यवस्था ॥८३॥
गेले ऐकोनि कथा-कीर्तन । घेतलें जीवनाचें सामान । भेटले परस्परांशीं आदरें पूर्ण । देवाण-घेवाण उत्तम ॥८४॥
याची असावी रूपरेषा । कराव्या नाना समित्या ऐशा । जनतेमाजीं सुधारणा आपैशा । घडोनि यावया ॥८५॥
नाना प्रदर्शनें उपयुक्त । नाना चढाओढीहि त्यांत । तैसेचि लोकशिक्षणाचे समस्त । कार्यक्रम योजावे ॥८६॥
यात्रादिकांच्या निमित्ताने । घ्यावीं भिन्न पंथीयांचींहि संमेलनें । संत-विद्वानांचीं ठेवावीं भाषणें । निर्भेळ विचारांचीं ॥८७॥
न दुखवितां कोणाचा भाव । त्यांच्या सत्तत्त्वाचा करावा गौरव । समारोप करावा लक्षूनि एकत्व । मूळचें सत्य ॥८८॥
तेथे भिन्नपण विरोन जाय । दांभिकतेचा न चले उपाय । विचित्रपणें वेगळा राहे । वाहोनि जाय प्रवाहीं तो ॥८९॥
हिरा आणि कांचवटी । कळों लागेल खरीखोटी । जाहीरपणें विचार-कसोटी । लागतां ऐसी ॥९०॥
कोण संत कोण असंत । काय मिथ्या काय सत्य । तें जाणोनि धरितील पंथ । समन्वयाचा सर्व जन ॥९१॥
हत्ती दिसों लागतां सगळा । मग कोणीहि एकांगी आंधळा । भुलवूं न शके वेगवेगळा । भागचि हत्ति म्हणवोनि ॥९२॥
ज्या संत-देवांच्या नांवांवरि । पंथ वाढले परोपरी । त्यांचे सत्य संदेश घरोघरीं । पोहोचतांचि सर्व साधे ॥९३॥
जैसा गुरु गोविंदसिंहानी । ग्रंथसाहेब रचिला जनीं । भिन्न संतांची एकत्र वाणी । झाली संघटनीं पोषक ॥९४॥
महिपतींनी संत-चरित्र । मांडोनि सदभावें एकत्र । भाविकजनीं ओविलें सूत्र । एकपणाचें जयापरी ॥९५॥
ज्ञानेश्वरादि संतीं केला । पंढरपुरीं गोपालकाला । सर्व पंथांच्या संतांचा झेला । गुंफियेला ज्या भावें ॥९६॥
तैसें संतांचें संमेलन । आणि सर्व संत-स्मृतिदिन । पाळतां गांवीं जन-ऐक्य पूर्ण । सहजचि साधतसे ॥९७॥
सर्व नद्या सागरीं मिळोन । पावती महान तीर्थपण । तैसे सर्व पंथ ऐक्य साधून । करिती गांवा तीर्थरूप ॥९८॥
कोणत्याहि संतांचा करावा उत्सव । परि चमत्कारांचा नको गौरव । द्यावा कर्तव्यमार्गासि उठाव । त्यांच्या जीवना स्मरोनि ॥९९॥
ऐसे कार्योत्सव चालतां गांवीं । तीच भू पंढरी समजावी । जेथे नरनारी प्रसन्न बरवीं । दु:खी कोणी असेना ॥१००॥
ऐसें न करितां आपुल्या गांवीं । तीर्थी घडलीं जरी आघवीं । तरी मुक्ति न पावे जीवीं । तुकडया म्हणे ॥१०१॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । यात्रा-मेळयांचा शुध्द संकेत । चोविसावा अध्याय संपूर्ण ॥१०२॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*

" जो लोगोंको ऐसी भाषामें उपदेश देता है जिसे साधारण समाज समझ नहीं सकता, उसका बडप्पन खेदका विषय है ।
उठो जागो ! देशका उपकार करो ! मतमतान्तरोंके आडम्बर को मिटाओ सदधर्मका प्रकाश फैलाओ ! "

---स्वामी दयानंद सरस्वती

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP