मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|
अध्याय विसावा

ग्रामगीता - अध्याय विसावा

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते.


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण । उद्याचें राष्ट्र आजचें संतान । यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन । राष्ट्रनिर्माते ॥१॥
विद्यागुरुहूनि थोर । आदर्श मातेचे उपकार । गर्भापासोनि तिचे संस्कार । बालकांवरि ॥२॥
’ जिच्या हातीं पाळण्याची दोरी । तीच जगातें उध्दरी ।’ ऐसी वर्णिली मातेची थोरी । शेकडो गुरुहूनिही ॥३॥
मातेच्या स्वभावें पुत्राची घडण । त्यास उज्ज्वल ठेवी तिचें वर्तन । स्त्रीच्या तेजावरीच पुरूषाचें मोठेपण । ऐसें आहे ॥४॥
म्हणती जरी ’ बाप तैसा लेक ’ । परि माऊलीचें महत्त्व अधिक । मातृशक्तीनेचि वाढती सकळीक । मुलें चारित्र्याने ॥५॥
पुरूष सर्वकाहीं करी । परि बांधला राहे घराबाहेरी । सर्व विचार घेवोनि आचरी । तरीच शांति त्यासहि लाभे ॥६॥
उत्तम महिला हेंचि करी । आपुलें घर ब्रीदासह सावरी । मूलबाळ आदर्श करी । वरि प्रेमळपण सर्वांशीं ॥७॥
याच गुणें ’ मातृदेवो भव ’ । वेदाने आरंभीच केला गौरव । नररत्नांची खाण अपूर्व । मातृजाति म्हणोनिया ॥८॥
प्रल्हादाची कयाधु आई । छत्रपतींची जिजाबाई । कौसल्या देवकी आदि सर्वहि । वंदिल्या ग्रंथीं ॥९॥
कांही पुराणीं सांगितली दीक्षा । करावी स्त्रीजातीची उपेक्षा । ती होती साधनाची शिक्षा । सर्वतोपरीं ॥१०॥
वियोगाने वैराग्य दृढ करावें । मन इंद्रियसुखांतूनि परतवावें । म्हणोनि विषयप्रवृत्तीचे गोडवे । निषेधिले त्यांत ॥११॥
वैराग्यांत न कथिलें दोषविरोधा । नसली साधनांत आपदा । कीर्तीत नसली कांही निंदा । तरि पूर्ण नोहे साधन ॥१२॥
म्हणोनि इंद्रिय-विषय-दोषदर्शन । देहाचें नश्वरत्व ओंगळपण । हें वैराग्यार्थ केलें कथन । व्यक्तिनिंदा नव्हे ती ॥१३॥
जेथे जेथे मन मोहूनि धावे । तेथूनि त्यास परतवोनि लावावें । लहान मुलापरी सांगावे । छीः छीः ऐसें म्हणोनि ॥१४॥
हें पुरुषास कथिलें स्त्रियेसाठी । तोच भाव पुरुषाविषयीं तिचें पोटीं । तेथे कवणाची तुच्छता मोठी ? छीः छीः विषयांसि शास्त्र म्हणे ॥१५॥
परि छीः छीः नेहमीच म्हटलें । तरि पालनपोषणचि बिघडलें । संसारचक्रचि थांबोनि गेलें । त्यांतूनिहि फुटती हीन मार्ग ॥१६॥
म्हणोनि विधीने सेवन उचित बोलिंलें । महिलेविण विश्व न चाले । काय होतें पुरुषाने केलें ? अभद्र झालें घर सारें ॥१७॥
घरचा उत्तम कामधंदा । हें महिलेचेंचि लक्षण सदा । आलिया-गेलियासि आपदा । महिला असतां न वाटे ॥१८॥
खस्ता सोसूनि परिचर्या । प्रेमळपणें बारीक कार्या । करूं जाणती उत्तम भार्या । न कंटाळतां काळजीने ॥१९॥
पुरुष-हृदया नाकळे जेवढें । स्त्रियेचें समजणें तितुकें गाढें । तियेच्या भावनागंगेचे पवाडे । वर्णिले न जाती माझ्याने ॥२०॥
सर्वांगीण एकतानता । तिजसीच घडे एकात्मता । जें जें  ठरवील तें सर्वथा । करोनि सोडिल माऊली ती ॥२१॥
जगांत असती नाना जीव । सकळांस जाहीर त्यांचा भाव । परि मायाळुपणाचा गौरव । माऊलीसरिसा नाही ॥२२॥
देवाने निर्मिली ही क्षिति । तिचे उदरी खाणी किती । परि माऊलीजैसी प्रेमळ दीप्ति । कोठेच नाही ॥२३॥
माऊलीचें स्वभावकर्म । तोचि जगी म्हणविला मानवधर्म । माऊलीचें उत्कट प्रेम । म्हणोनीच देव प्रिय लोकां ॥२४॥
संती माऊलीचें रूप धरिलें । तरीच ते देवपणासि पावले । नाना साधनें करोनि फिरले । त्यांना न गवसलें देवरूप ॥२५॥
तें हें स्वतःसिध्द माऊलीपण । स्त्रियेअंगी सहजचि घडण । त्याचा विकास करावया पूर्ण । उत्तम शिक्षण पाहिजे ॥२६॥
स्त्री-दक्षता विचित्रचि आहे । तेथे माणसाचें लक्षचि न जाय । तेवढें शिक्षण मुलाबाळांस ये । तरीच सोय संसाराची ॥२७॥
पुरुष आहे पिंडवर्णी । स्त्री आहे दक्ष कारुणी । दोघांचे स्वभाव मिळतांक्षणीं । होय मेदिनी वैकुंठचि ॥२८॥
उत्तम पुरुषासवें उत्तम नारी । तरि त्यांचा संसार स्वर्गापरि । पुरुषाहूनि काकणभरि । महिला वरीच राहतसे ॥२९॥
जेव्हा पुरुष होय चिंतातुर । तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार । हें मी पाहिलें घरीं अपार । प्रसंग येतां जाण्याचे ॥३०॥
निरीक्षोनि जीं जीं घरें पाहिलीं । तेथे सरसता अनुभवा आली । चातुर्य-लक्षणें अधिक दिसलीं । महिलांमाजीं ॥३१॥
मानवी स्वभावांचें अनुमान । प्रसंग पाहोनि अवधान । पुढील काळाचें अनुसंधान । स्त्रियांचे ठायीं ॥३२॥
स्त्रीलाच भक्ति स्त्रीलाच ज्ञान । तिलाच संयम शहाणपण । तिच्यानेच हालतीं वाटे संपूर्ण । संसारचक्रें ॥३३॥
म्हणजे पुरुषाचें कांहीच नाही । ऐसें म्हणणें नोहे कांही । सहज स्वभावाची रचनाचि ही । विशद करोनि सांगितली ॥३४॥
हें सर्व जरी सांगितलें । तरी त्यांत भावनेनेचि रंग भरले । कारण, मी नाही अनुभवलें । सुखदुःख संसाराचें ॥३५॥
माझा संसार विश्व आहे । सर्व स्त्री-पुरुष मायबाप । व्यवहारदृष्टीने समजून काय । पाहिजें तें तें बोललों ॥३६॥
परि यांतूनि एकचि घ्यावें । स्त्रियेसि कोठे अव्हेरावें । कोठे माऊली म्हणोनि पाय धरावे । ओळखावें हें तारतम्यें ॥३७॥
कोठे वागवावें मित्रभावें । कोठे देवी म्हणोनि पुजावें । कोठे वैरिणीसारखे बघावें । स्थलकालपात्रभेदाने ॥३८॥
हें ज्या पुरुषांना नाही कळलें । ते जरी रानीवनी पळालें । तरी काय होतें केलें । सोंग ऐसें वरपंगी ? ॥३९॥
ते जिकडे जातील तिकडे । स्त्रीचि आहे मागेपुढे । अंतरी-बाहेरी प्रकृतीचे वेढे । जीवापाडें पडले हे ॥४०॥
केवळ आपुल्या वृत्तीकरितां । केली स्त्रीनिंदा तत्त्वता । तेथे माऊलीपणाचिया माथां । दोष देतां पाप लागे ॥४१॥
म्हणोनि वैराग्यें स्त्री अव्हेरली । त्यांनी  विवेकें साधना केली । त्यापुढे त्यांनीच संबोधिली वंदिली । माऊली तीस म्हणोनि ॥४२॥
परि हें एकांगीपणें नोळखती । स्त्रियांची अनास्था करिती । यानेच झाली घोर दुर्गति । समाज-जीवनाची ॥४३॥
हीन-दुबळें केलें स्त्री-समाजा । तैसीच पुढे वाढली प्रजा । म्हणती स्त्रीजात तेवढी पशूच समजा । पाशवी झालें जग सारें ॥४४॥
कोणी भोगवस्तु समजोनि भली । सजवोनि ठेवती नुसती बाहुली । त्याने घरोघरीं शिरला कली । अबला बनली मायभूमि ॥४५॥
म्हणती स्त्री ही गुलामचि असते । तिला हक्क नाहीत उध्दरायापुरते । हें म्हणणें शोभेना शहाण्यातें । स्वार्थांधतेचे ॥४६॥
म्हणती स्त्री ही कार्यांत धोंड । म्हणोनि तिच्या प्रगतींत पाडावा खंड । ऐशापरी जाणोनि वाढविती दगड । मार्गी आपुल्या ॥४७॥
वास्तविक दोन्ही संस्कारें जन्मती । अपुल्या प्रयत्नेंच उन्नत होती । शेवटी उध्दारही तिच्याच हातीं । असे तियेचा ॥४८॥
काय देवें देवता भिन्न केल्या ? ऋषि-पत्न्या नव्हत्या सांभाळिल्या ? काय महिलात साध्वी नाही झाल्या ? पहा पुराणी मागच्या ॥४९॥
काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद ? नाही केला ब्रह्मवाद ? नाना विद्याकला भेद । यांत प्रवीण कितीतरी ॥५०॥
काय स्त्रियांनी युध्द नाही केलें ? पतिपुत्रां नाही प्रोत्साहन दिलें ? काय स्त्रियांनी प्राण नाही अर्पिले । ब्रीदासाठी ? ॥५१॥  
हजारो स्त्रिया फुलांहूनि नाजूक । ब्रीदासाठी जाहल्या राख । त्यांचें करावें तेवढें कौतुक । थोडेंचि आहे ॥५२॥
स्त्रियेसारिखी मोहिनी नाही । स्त्रियेसारिखी वैरागिणी नाही । स्त्रियेसारिखी मुलायम नाही । आणि कठोर रणचंडिका ॥५३॥
परि तिचें लक्ष कोणीकडे न्यावें । काय संस्कार तिच्यांत भरावे । काय शिकवोनि तयार करावें । हें आहे संगतीहातीं ॥५४॥
संगती विषयासक्तीची असली । तरि वेडीबावरी स्त्री बनली । तिच्यांत वैराग्यऊर्मी भरली । तरि न गवसे गुंडांसहि ॥५५॥
प्राण देईल आपुल्या हातें । परि भ्रष्ट न होईल लोभें-भयें ते । ऐसे विचारचि पाहिजे तेथे । बिंबविले धीरपुरुषें ॥५६॥
त्यासाठी तिला तैसेंचि ठेवावें । सुसंगति द्यावी आणि शिकवावें । नातेंगोतें सर्व तैसेंचि राखावें । स्त्रीचेप्रति ॥५७॥
अगदी मूलवयापासोनि । उत्तम चालीरीतींची राहणी । कार्यी चपल, सावध जीवनीं । शिक्षण देवोनि करावी ॥५८॥
कांही मुली शक्ति-शिक्षण घेती । मुलांपेक्षाहि धीट असती । नाही गुंडाचीहि छाती । हात घालील त्यांचेवरि ॥५९॥
तेथे कासयासि पडदा । परावलंबनाची आपदा । आत्मसामर्थ्यानेच सदा । स्त्रिया मर्दिती असुरांना ॥६०॥
परि इकडे करोनि दुर्लक्ष । आपुला राखोनि वरपक्ष । लोक स्त्रियांचें जीवन रुक्ष । करोनि ठेविती स्वार्थाने ॥६१॥
कांही लग्न होतां गुंतविती घरीं । नसे बोलण्याचीहि उजागरी । ’ चूल आणि मूल ’ हीच चाकरी । सांगती तिज ॥६२॥
कांही घरांतचि कोंडून ठेविती । बिचारीला जगचि नसे जन्मजातीं । जरा दिसली सूर्याप्रति । मारूनि करिती सरळ तिला ॥६३॥
मुलीने सदा लपोनि राहावें । मुलाने गांवीं रागरंग पाहावे । ऐसे हे दुष्ट रिवाज ठेवावे । न वाटती आम्हां ॥६४॥
अरे ! तुझ्याहूनि ती उत्तम वागते । समाजीं उत्तम भाषण देते । तुलाहि शहाणपण शिकवूं जाणते । मग ती मागे कशाने ? ॥६५॥
ऐसें असतां दाबून ठेवावें । आजच्या युगीं शोभा न पावे । जेथे समान हक्क असती बरवे । वर-वधूंना ॥६६॥
ईश्वरानेचि निर्मिलें हें सूत्र । दोन्ही ठेवावेत समान पवित्र । मुलांनीच काय केलें सर्वत्र । राहाया पुढे जगामाजीं ? ॥६७॥
वेगळे नियम प्रतिष्ठेसंबंधीं । विधवा होतां विवाह-बंदी । निर्वाहाचीहि नाही संधि । ही भेदबुध्दि कशासाठी ? ॥६८॥
कांही स्त्रिया विधवा होती । केश काढूनि विद्रुप करिती । त्याने कैसी साधे संन्यासवृत्ति । मला नसे ठावें हें ॥६९॥
आपुला झांकोनि दुबळेपणा । करावी दुसर्‍याची विटंबना । हा तों आहे दुष्टपणा । अमानुष जैसा ॥७०॥
संन्यास घेणें असेल विधवेला । तरि वनीं आश्रमीं ठेवावें तिला । सेवाशिबिरीं अभ्यास केला । पाहिजे तिने स्वइच्छें ॥७१॥
आपण खावें ल्यावें साजिरें । तिला जन्मवरि दु:खांचे भारे । त्याहूनि तिचें मरणें बरें । होतें पति-चितेमाजी ॥७२॥
तिने वृत्तीने राहावें उदास । करावा परमार्थाचा अभ्यास । विद्रूप करूनि आपणास । काय फायदा समजेना ॥७३॥
विधवेसि मानावें अभद्र । मुलगी जन्मतां ती दळभद्र । वय वाढतां समजावी क्षुद्र । हा तो दुष्टपणा समाजाचा ॥७४॥
जैसा पुरुष राहे ब्रम्हचारी । तैसी स्त्रीहि असूं शकते कुमारी । अधिकाराची उणीव सारी । घालविली पाहिजे ॥७५॥
स्त्रीजातीस संततिनियमन-बेडी । परि पुरुषास नाही कांही बेरडी । हें म्हणणें नव्हे अविचारी खोडी । वाटते मज ॥७६॥
नियमन असावें तें सर्वासि । अभ्यास द्यावा तो दोघांसि । विशाल करावें विचारशक्तीसि । देशक्लेश समजावोनि ॥७७॥
समाजीं जो पुरुषासि आदर । तैसाचि महिलांशि असावा व्यवहार । किंबहुना अधिक त्यांचा विचार । झाला पाहिजे समाजीं ॥७८॥
येथेच समाजाचें चुकलें । एकास उचलोनि दुसर्‍यास दाबलें । याचें कटुफळ भोगणें आलें । कितीतरी स्थानीं ॥७९॥
परि लक्ष नाही आज तिकडे । नाहीत मुलीबाळींना उत्तम धडे । कुरण वाढूं द्यावें ढोरांसाठी पुढे । तैसें झालें समाजाचें ॥८०॥
यास पाहिजे आता वळविलें । ठिकठिकाणीं शिक्षण दिलें । मुलीमहिलांचें जीवन जागविलें । तरीच जगलें गांवराज्य ॥८१॥
शहाण्यांनी हें विसरूं नये । गांवीं सर्वांची करावी सोय । जेणें पुरुषांचें तैसेंचि स्त्रियांचें होय । उत्थान आता ॥८२॥
तरीच ग्राम शोभूं लागे । पुरुष-नारी दोन्ही विभागें । जेणें स्वर्गचि उतरेल कार्यायोगें । विकासाच्या ॥८३॥
महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास । करील ऐसें शिक्षण खास । जरि दिलें जाईल त्यांस । तरीच भावी जग पालटे ॥८४॥
महिलांचें उच्चतम शिक्षण । शिक्षणांत असावें जीवनाचें स्थान । जीवनांत असावें स्वारस्य पूर्ण । शांतिदयादि भावनांचें ॥८५॥
समाजविकास ज्यास आवडे । त्याने शिकवावे मुलींना धडे । लिहितां-वाचतां येईल एवढें । तरी शिक्षण आवश्यक ॥८६॥
तैसीच शिकवावी टापटीप । गाणें बोलणें वागणें अनुरूप । घर पाहतांचि कळावें आपोआप । कैसी येथील महिला तें ॥८७॥
मुलीबाळीस उत्तम ठेवणें । हें तों मातापित्यांचें कर्तव्य प्रमुखपणें । त्यानेच राष्ट्राचें फेडील पारणें । घर संतानें आपुलिया ॥८८॥
मीं पाहिलें मुलें फार शिकती । यंत्रविद कारागीर होती । परि मुलींसाठी योजना अति । मंद आहे शिक्षणांची ॥८९॥
ऐसें समाजीं न व्हावें । मुलांपरीच मुलींना शिकवावें । त्यांचें स्थानमान नेहमी असावें । सहकारितेचें  ॥९०॥
मुलांस विविध उच्च ज्ञान द्यावें । तैसेंचि मुलींनाहि शिकवावें । हेळसांड करूं नये हें जाणावें । समाजाने ॥९१॥
परि स्वतंत्र असावें मुलीचें शिक्षण । स्त्रीपुरुषांचे उद्योगहि भिन्न । जेथे होतें दोघांचें मिलन । प्रसंग कठिण ओढवती ॥९२॥
विचारें जें जें कांही होतें । त्यांत योजनाबध्दता राहते । अविचाराने जातां मोहपंथें । धोका मागुतां पावती ॥९३॥
म्हणोनि समजोनि शिक्षण द्यावें । दोन्ही रथचक्रां सारखें करावें । शक्तियुक्तींनी भरावें । गांव सारें आपुलें ॥९४॥
परंतु नेहमी भयभीत करावें । प्रत्येकाचें स्थान भिन्न ठेवावें । मग स्वभावास वळण कोणीं द्यावें । संसर्ग येतां ? ॥९५॥
स्त्रीपुरुषांच्या विकृत कल्पना । भ्रमविती परस्परांच्या मना । यासाठी वाढवावा बंधुभिगिनीपणा । योग्य संबंधें ॥९६॥
शिक्षणांत अशीच करावी व्यवस्था । न होईल परस्परांची अनास्था । या दृष्टीने शिकवोनि समस्तां । वळण द्यावें नैतिकतेचें ॥९७॥
दोघांनाहि आपुलें ब्रीद कळे । तरीच सगळा अनर्थ टळे । एरव्ही पिंजर्‍यांत जरी वेगळे । तरी गोधळे वृत्ति त्यांची ॥९८॥
म्हणोनि सहशिक्षणहि नाही वाउगें । जरि नैतिकभाव राहती जागे । शिक्षणीं जागृति ठेवणें सर्वांगें । काम नेत्या वडिलांचें ॥९९॥
शिक्षणीं सांभाळोनि तनुमन । करावें मुळीबाळीस विद्वान । अंगीं असावें शौर्य पूर्ण । ब्रीद आपुलें रक्षाया ॥१००॥
जेव्हा पुरुष पावतो पतना । त्यास स्त्रीप्रकृति सहन होईना । तेव्हां महिलांत असावी संघटना । त्याची सुधारणा करावया ॥१०१॥
जैसी मुलांची संघटित सेना । तैसी स्त्रियांची असावी संघटना । आपुल्या सुखदु:खांच्या भावना । प्रकटवाव्या सभासंमेलनीं ॥१०२॥
पुरुषांचें जैसें स्फूर्तिस्थान । तैसेंचि महिलांचें असावें उन्नतिभुवन । त्यांत सभा प्रार्थना कथाकीर्तन । उपक्रम पूर्ण महिलांचे ॥१०३॥
दूर सारोनि जातीय आदि भाव । जमवोनि महिलासमुदाय सर्व । तिळगूळ हळदीकुंकू शारदोत्सव । सहभोजनादि करावे ॥१०४॥
उत्सव साध्वीपतिव्रतांचे । जयंति-पुण्यतिथी पर्व तयांचे । वाचनालयादिक महिलाविभागाचें । जेथे तेथे आवश्यक ॥१०५॥
स्त्रियांचे स्वतंत्र मेळे-समुदाव । त्यांच्या उन्नतीचा कला-गौरव । प्रतिकाराचीहि त्यांना जाणीव । अवश्य असावी ॥१०६॥
माझें म्हणणें श्रोतयांतें । जें जें सुख असेल पुरुषातें । महिलांसीहि असावें अभिन्नपणें तें । स्वातंत्र्य सुखसाधन ॥१०७॥
सर्व सोयी पुरुषांकरितां । स्त्रियांसाठी सर्व व्यथा । हें कोण बोलतें शास्त्र आता ? द्यावें हातां झुगारोनि ॥१०८॥
पुरुष उन्नतीस चढला । परि कांहीच न कळे महिलेला । तरि तो गांवहि एक कल्ली झाला । नशीबीं आला र्‍हास त्रास  ॥१०९॥
म्हणोनि रथाचीं दोन्ही चाकें । मजबूत करावी कांतोनि सारखें । तरीच संसारगाडी सुखें । सुखावेल ग्रामजीवनाची ॥११०॥
आदर्श ऐसे मातापिता । जन्म देतील आदर्श सुतां । ते वैकुंठ बनवितील भारता । तुकडया म्हणे ॥१११॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । ग्रामोद्वार कथिला महिलोन्नतींत । विसावा अध्याय संपूर्ण ॥११२॥

   ॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*

अभंग
दळूं कांडू खेळूं । सर्व पाप ताप जाळूं ॥
सर्व जीवांमध्ये पाहूं । एक आम्ही होऊनि राहू ॥
जनी म्हणे ब्रह्य होऊं । ऐसें सर्वांघटीं पाहूं ॥

---श्रीसंत जनाबाई

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP