सिद्धारुढस्वामी - प्रकरण १८

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


शुद्धकामदा

सगुण रुपका निर्गुणात्मका । निगमवंद्य तूं विश्वव्यापका ॥

त्वरित तारि बा त्वत्पदांशका । सदय आरुढा शिष्यतारका ॥३३॥

ते गेल्यावर त्यांच्यापैकी तीन शिष्य पुनः परत येऊन स्वामीस सांगू लागले की , तुम्ही आम्हास ब्रह्मोपदेश करणे योग्य नाही ; कारण अप्रत्यक्ष असलेली व कधी न ऐकलेली वाक्ये ऐकून आमचे मन अभावरुप होते . सद्भावरुप होत नाही . अवधूत म्हणाले मन शून्यात लय होते किंवा ज्ञानशून्यात लय होते ? ज्ञानशून्यात लय होते असे म्हणू नये , ते लय होते असे म्हणू नये , ते लय होते असे म्हटले तर समजलेली गोष्ट नाहीशी होईल . तसे अनुभवास येत नाही . याकरिता ज्ञानलयरहित आहे म्हणून शून्यभाव सदभाव म्हणावा . हे ऐकून शिष्य म्हणाले तुमचे सांगणे असे आहे की आम्ही गरीब आम्ही राजासारखे होऊ . अवधूत सांगू लागले की पित्त झालेल्या राजाला आपणच तळवार ( रामोशी ) अशी भ्रांती होते ; तशी तुमची भ्रांती आहे . तेव्हा ते म्हणाले तुमची स्थिती निराळी व आमची स्थिती निराळी , आरुढ म्हणाले ह्या दोन्ही स्थितीला विशेषण नसल्यामुळे असलेल्या निर्विशेषण स्थितीतला आत्मा , उजेड आणि अंधार न समजणार्‍या आकाशाच्या निर्मलत्वाप्रमाणे निर्मलरुप आहे . हे ऐकून ते आम्हाला अनुभव आला नाही असे म्हणाले . अवधूत म्हणाले सांगितले एवढे विसरु नका . ते असो . विद्यपंडित का होऊ नये म्हणाल तर पांडित्य अभिमानाला कारण होते ते म्हणाले अभिमान असला तर काय झाले ? अवधूत म्हणाले विद्यागर्वापासून पंडित ब्रह्मराक्षसाच्या जन्मास जातात . ते समजून घेऊन काही पंडित भयाने विद्यागर्व सोडून देतील तर बरे हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले , आणि आम्हाला ब्रह्मस्थिती मिळेल असा आशीर्वाद द्यावा असे म्हणाले . तेव्हा तुमची भावना चांगली असेल तर तसे होईल , असा आशीर्वाद देऊन अभयहस्त त्यांचे शिरी ठेवून चालते झाले .

अवधूत हे तेथून निघून अहिल्याघाटावर येऊन तेथे क्षणभर विसावा घेऊन नंतर नारदघाट पाहून , तेथून चौसत्तीघाटावरुन पांडेश्वरघाटाला येऊन चक्कीघाट पाहून महास्मशान घाटास जाऊन तेथे शिवालयात महादेवाची मूर्ती पाहून तेथून यक्षराजाच्या घाटास येऊन नंतर लोलार्क घाट पाहून , काशीसंगमघाटास जाऊन आनंदाने थोडा विसावा घेऊन नंगा घाटावर जाऊन बसले . तेथे एक नंगा बैरागी येऊन विचारु लागला की , वस्त्रे धारण करणाराला काळजी असते , सुख नसते . तू साधू असून तुला वस्त्रे कशाला पहिजेत ? अवधूत म्हणाले , वस्त्रें वर्ज्य केलेल्या तुला स्पर्श जाणणार्‍या इंद्रियविषयाच्या संयोगापासून सुखदुःख होते किंवा नाही ? नंगा म्हणाला , प्रारब्धाने व्यवहार चालला असता शांतता असेल तर सुख -दुःख नाही . सिद्धारुढ म्हणाले , तर मग शांतताच सुखाचे साधन होय . पांघरुण घेणे न घेणे हे सुखाचे साधन नव्हे . बैरागी म्हणाला , " मू दिवाणा दिल शियाना " म्हणजे वर खुळ्यासारखा दिसतोस , पण आत शहाणा असून ब्रह्मनिष्ठा आहेस . असे म्हणत निघून गेला .

अवधूत तेथून निघून व्यासकाशी म्हणतात , त्या रामनगरास जाऊन राजाच्या पक्क्या तलावावर बसून क्षणभर विश्रांती घेऊन गिरिजादेवीच्या देवालयात जाऊन निर्विकार -समाधिस्थ होऊन राहिले . इतक्यात देवीचा पुजारी येऊन आरुढास पाहून म्हणाला , हा अतिथी कित्येक दिवसांचा उपाशी असावा . कारण याचे पोट अगदी पाठीस लागले आहे . हे ऐकून आरुढ मनात म्हणाले की , व्यासमुनींनी काशीत तीन दिवस भिक्षा मागितली , भिक्षा मिळाली नाही . म्हणून काशीला नानाप्रकारांनी तुच्छ केल्यामुळे काशीबाहेर जा , असा परमात्म्याने त्याला शाप दिल्याने , ते जसे उपाशी बाहेर पडले त्याप्रमाणेच मी आज तीन दिवस उपाशी असून , आज इथे आलो आहे . इथे प्रारब्धपरिचारक काय करतो पाहू . असा विचार करीत आहेत , इतक्यात पुजारी म्हणाला , हे अतिथी , तू कोण आहेस ? अवधूत म्हणाले , तुला तू जाणलेस तर तू जो कोण आहेस तोच मी आहे . तर मग जेवण करतोस काय ? तू जेवलास तर मी जेवतो . पुजारी म्हणाला , मला भूक लागली आहे . घरी जाऊ या . पुजार्‍याने घरी जाऊन मालपुवा वगैरे पक्वान्ने राजाच्या भोजनशाळेत पाहिजे तेवढी आणली . ते दोघे भोजन करीत बसले आहेत , इतक्यात आसपासचे बरेच अतिथी गोळा झाले . तेही त्यांच्या बरोबर जेवून तृप्त झाले . मग स्वामी पंचक्रोश यात्रेस निघाले .

कामदा

अन्य वृत्तिदृक धीर होसि तूं । अन्यमुक्तिदृक देसि इष्ट तूं ॥

मी तुझ्या पदीं नम्र होई गा । सिद्धआरुढा मोक्ष देइ गा ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP