सिद्धारुढस्वामी - प्रकरण ११

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


कामदा

अल्पवस्तुला श्रेष्ठता पहा । देशि तूं अशी शक्ति त्वन्महा ॥

प्रार्थितों तुला जोडुनी करा । हे दयानिधे आरुढेश्वरा ॥१९॥

नंतर एक शास्त्री ही गोष्ट ऐकून तेथे येऊन सिद्धारुढाला विचारु लागले की , मुमुक्षूला येते तो धर्म किंवा गुण ? आरुढ स्वामी म्हणाले दोनही नव्हत . कारण धर्म असेल तर उष्णता अग्नीमध्ये नेहमी असते . त्याप्रमाणे नेहमी मुमुक्षुत्व राहिले पाहिजे . गुण असेल तर अभ्यासवृत्ती होणार नाही या करिता अभ्यासजनित भाव म्हणावा . हा भाव कोठपर्यंत असतो म्हणाल तर गुरुप्राप्तीपासून महावाक्यश्रवणापर्यन्त असतो मग मुमुक्षुदशेची वृत्तीच ‘ अहं ब्रह्मास्मि ’ असा ज्ञानाकार परिणाम होऊन अपरोक्ष मानून देहभाव नाहीसा होऊन ब्रह्मात्मैक्य भावना स्थायिक झाल्यावर त्याच अखंड चैतन्यात , हा समुद्रात पडलेल्या पाण्याचे बिंदूप्रमाणे समरस होतो . हे बोलणे ऐकून त्याला आनंद झाला .

ही झालेली हकीकत पिच्चंडय्या नावाच्या वेदांत्याला समजली . तेव्हा तो या महात्म्याजवळ येऊन साष्टांग नमस्कार करुन विचारु लागला की , हे भौतिक चराचर व पृथ्वी आश्रयावर आहे तर पृथ्वीला आश्रय कोणता ? तेव्हा गुरु म्हणाले मोठ्या जलाशयात पृथ्वी आहे कारण ‘ तद आप्य पृथिविरपांशर ’ असे श्रुतीत सांगितले आहे . त्याप्रमाणे पाण्याच्या आश्रयावर पृथ्वी . तर मग पाणी कशाच्या आश्रयावर असावे ? ते अग्नीच्या आश्रयावर आहे , कारण " अग्नेरापः " अशा श्रुतीमुळे अग्नीच्या आश्रयाने जल आहे तर अग्नीही कोणावर तरी अवलंबून असला पाहिजे . तो वायूवर अवलंबून आहे , कारण " वायोरग्निः " या प्रमाणाने वायूच्या घर्षणापासून अग्नीची उत्पत्ती होते . तर वायूला काय आधार , आकाश कारण " आकाशाद्वायुः " या श्रुत्युक्तीप्रमाणे आकाशाचा श्वास वायू झाला . कारण आकाशात वायूचे चलन नाही , म्हणून आकाश कोणत्याही अधिष्ठानावर आहे असे म्हटले तर अक्षर रुप परमात्म्याचे अधिष्ठानी कल्पित आहे . का म्हणाल तर " तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः " या श्रुतिप्रमाणाने परमात्म्याचे अपरोक्ष ज्ञानाकरिता आकाश कल्पित आहे , असे सिद्धाचे वाक्य श्रवण करुन ते सप्रमाण आहे असे पाहून त्या वेदांत्यास फार आनंद झाला . व त्याने महात्म्याला यथाशक्ती अन्नोदक देऊन संतुष्ट केले . नंतर पुनः एकाने विचारिले . मन सर्वदा चंचल होते , याला कारण वायू व रजोगुण होय . यात वायू चंचलतेला कसा कारण म्हणाल , तर आकाशाचा पाव भाग व वायूचा अर्धा भाग मिळून मन झाले आहे म्हणून एक दळ सोडून एका दळाला वायू आहे . वायूने येणारे चंचलत्व आणि एका विषयात असणार्‍या स्थानी असलेला निर्धाराचा विकल्प करविणे हा रजोगुण धर्माचे चांचल्य होत . त्यांपैकी तुमचे कोणते चांचल्य ? पूर्वीच्या स्थानी असलेले दळ सोडून दुसर्‍या स्थानी जाणारे चांचल्य असले , तर पतंजली योगशास्त्राच्या नियमाप्रमाणे मात्रादिक्रमाने प्राणायाम निर्दोष केला तर स्थानभ्रष्ट होणार्‍या चांचल्याचा परिहार होईल . अथवा द्वितीय अनिर्धाररुप विकल्पाची बाधा झाली तर आत्मानात्म , दृगदृश्य विवेक केला तर तोही परिहार होईल . असा विवेक तुला कसा फलित होईल म्हणशील तर सत्कथन , सच्चिंतन , सत्समागम ह्यांच्या योगाने होईल . तर मग सत्संग कोठे शोधावा ? ह्यावेळी सुदैवाने प्राप्त झालेल्या ह्या महात्म्याच्या संगाने आताच विवेक करावा , असे म्हणून . तर मग अवधूता , दृक म्हणजे काय ? दृश्य म्हणजे काय ? अवधूत म्हणाले कूटस्थाचे चित प्रतिबिंब युक्त असलेले अंतःकरणवृत्तीला इंद्रियाचे सहाय्याने शब्दादि अवलोकन त्याला दृश्य म्हणतात ; व त्याला पहाणारे इंद्रियाला अंधपणाचे वगैरे दोष असले तरी त्याचे दोष जाणणारी वृत्ती दृक म्हणावी . ह्या वृत्तीला संशयादि दोष आले तर ह्या वृत्ति -दोषांचा विचार करणार्‍या चिदाभासाला दृक असे म्हणतात . तर मग हे महात्मन , चिदाभास बुद्धीच्या आधीन आहे . आता बुद्धी झोपेत लय पावली मग दृक कोण ? तर चिदाभासाचे परमार्थ रुप कूटस्थ आत्माच खरे दृक मानावे . त्याला पाहणारा दुसरा कोणी असला पाहिजे , तर मग दृक याला निराळे दृक नाही म्हणून तेच खरे दृक . ह्या निजदृकला आत बाहेर असा भेद नाही . म्हणून समान भासणारा सर्व प्रपंच एक काली प्रयत्न न करिता पूर्ण होईल . असहाय , चिन्मात्र , कूटस्थ , परब्रह्म , परमात्म , परतत्त्व निर्लेप , नित्यानंदघन , शंभुलिंगरुपी दृक तूच असून तुला आणखी निराळे दृक नाही असे सांगितले . तेव्हा मलयनाथ म्हणाला दृकला इतकी लक्षणे कशाला सांगितली , तेव्हा हे मलयनाथा , न्यायशास्त्र जाणणार्‍याला अतिव्याप्त्यादि दोष आले तर ते निवारण करण्यास हे विशेषण रुपी खड्ग होय . असे म्हणाले . तेव्हा हे महात्म्या , तुझे वाक्यामृत ऐकून कृतार्थ झालो ; इतकेच नाही तर माझे पूर्वज सुद्धा धन्य झाले . मी धन्य आहे , मी धन्य आहे , मी धन्य आहे , असे म्हणून जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून चालता झाला .

कामदा

स्वप्निही बहू ताप होतसे । जागरुकता दुःख देतसे ॥

तूझिया गुणी मन्मती जडो । भो गुरो तुझा संगही घडो ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP