सिद्धारुढस्वामी - प्रकरण ८

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


कामदा

वेद गोचरारुढ श्रीपते । तूच या जगा निर्मुनीच ते ॥

रक्षिसी तसा करिसि नाशही । तंत्र हें गुरो सहज होतही ॥१३॥

सिद्ध पुढे काही दिवसांनी गुरुची आज्ञा घेऊन महातीर्थे फिरावयास निघाले कारण त्या ठिकाणी महात्म्ये असतात व त्यांच्याशी संवाद करण्यास मिळावा अशी यांना इच्छा उत्पन्न झाली होती . त्याप्रमाणे हे तीर्थाटनास निघाल्यावर प्रथम किष्किंधा नगरीस जाऊन ; विरुपाक्षाचे दर्शन घेऊन हेमकूटावरील करस्थल नागलिंगाचे गुहेत तीन महिने सगुण ,सविकल्प समाधी साधित राहून , निर्विकल्प समाधिस्थ झालेल्या साधूचे दर्शन घेऊन महापंपासरोवर पाहून , वसिष्ठऋषीच्या आश्रमात तीन दिवस राहून मातंग ऋषीच्या आश्रमास गेले . तेथून स्फटिकशिला नावाच्या तपोभूमीस गेले . तेथे वीस दिवसपर्यंत राहिले . पण क्षुधा , तृषा वगैरेची बाधा झाली नाही ; अखंड ब्रह्माकार , प्रवाहधाराकार अविच्छिन्न , तैलधाराकार वृत्ती राहिली , यावरुन खरोखर ही तपोभूमी आहे , असे समजून पुनः एकवेळ पंपासरोवरावर येऊन मानससरोवरात स्नान करुन , रामाच्या देवळात बसून चक्रतीर्थ पाहून , वालीभंडार गावच्या रोखाने निघून त्यांनी चिंतामणी आश्रम पाहिला . तेथल्या महात्म्यांशी थोडावेळ संभाषण करुन त्याच्याशी आत्मविचार चालला असताना तेथे असलेल्या एका अधिकार्‍याने आत्मा म्हणजे काय ? म्हणून विचारिले . तेव्हा शास्त्र न जाणणार्‍या एकाने त्याला उत्तर दिले की , मी अशी बुद्धी प्रत्येकाला आपल्या देहाविषयी असते , याकरिता देहच आत्मा . तेव्हा दुसरा म्हणाला , ज्ञानरुप शरीर आत्मा किंवा अज्ञानरुप शरीर आत्मा म्हणतोस ? अज्ञानरुप शरीरच आत्मा असे मी म्हणतो . अज्ञप्तिरुप शरीर आत्मा असे म्हटले तर स्नान , भोजन , योग्य दिसत नाही . असे उत्तर मिळाल्यावर पहिल्याचे तोंड बंद झाले . तेव्हा दुसरा म्हणाला , ज्ञप्तिरुप आत्मा अज्ञप्तिरुप देहाहून भिन्न आहे . याकरिता हा ज्ञप्तिरुप आत्मा गमनागमन करणारा किंवा न करणारा असला पाहिजे . जर गमनागमन न करणारा आहे म्हणाल तर त्याला त्रयावस्था कशा संभवतील ? ज्ञानरुप आत्मा गमनागमन करणारा आहे , असे मानिले तर वायू जडरुप असल्यामुळे त्या ठिकाणी सुखदुःखसंभव नाही . याकरिता मनच आत्मा असावा . का म्हणाल तर मनाच्या ठिकाणी गमनागमन संभवते , त्याप्रमाणेच जाड्याचा अहंभावही संभवतो . सुखदुःखाचे ज्ञानही त्यास होते , म्हणून मनच आत्मा म्हणावा . बौद्ध म्हणतो की , कर्ता नसताही मनोरुप करणही आत्मा होईल . कारण अहंबुद्धी ही सर्व कार्याला कर्ता म्हणून लोक प्रसिद्धच आहे ; म्हणून बुद्धीला आत्मा म्हणावे . भट्टाचार्य याचे शिष्य म्हणतात की निद्रेत बुद्धी लय पावते . म्हणून बुद्धी आत्मा नव्हे तर निद्रेत होणार्‍या आनंदाला आत्मा म्हणावे . शेवटी शून्यवादी म्हणतात की निद्रेत काही दिसत नाही . याकरिता नास्तिरुपच आत्मा होय . तेव्हा सिद्धारुढ म्हणाले की , असे आहे तर नास्ति हे समजून सांगता किंवा न समजून सांगता ? समजून सांगत असाल तर नास्ति हे समजणारा अस्तिरुप असला पाहिजे . म्हणून आत्म्याचे अस्तित्व सिद्ध आहे . अर्थात ब्रह्मरुप सिद्ध आहे .

नंतर प्रारब्धवादी म्हणाला की , आत्मज्ञान्याला प्रारब्ध कर्माचे सुखदुःख आहे . तेव्हा सिद्धारुढ म्हणाले , सुखदुःख विषयात्मक म्हणता किंवा मनोवृत्तिरुप म्हणता ? विषयात्मक असे त्यांनी कबूल केल्यावर -आरुढ म्हणाले , तर मग सर्व मनुष्यास एकाचवेळी सर्व सुखदुःख झाले पाहिजे . तसे अद्यापर्यंत कधी झाले नाही व हे लोकांच्या अनुभवाच्या विरुद्ध आहे म्हणून पहिले म्हणणे बरोबर नाही . आता दुसरे मानावे , तर इष्टानिष्ट हे मनोवृत्तिरुप असल्यामुळे अनेक धर्मापासून त्याला सुखदुःख होऊ नये . कसे म्हणाल तर अग्निधर्म उष्ण आहे म्हणून अग्नी जाळणारा आहे . आणि पाण्याचा धर्म शीत आहे म्हणून पाण्याने थंडाई आली पाहिजे . मनोधर्मापासून झालेले सुखदुःखापासून मनाला शांती व ताप होऊ नये . त्यानंतर वादी म्हणाला , हे मनोधर्मापासून झालेले सुख दुःख आत्म्याला का होऊ नये ? त्यावर आरुढ स्वामींनी उत्तर दिले . सुप्ती समाधिकाळी आत्मा असून मन व त्याचे सुखदुःखादी धर्म त्याला नसल्यामुळे , आत्माच आत्मज्ञानी होय . आत्म्याला सुखदुःख नाही म्हणून ज्ञान्यालाही प्रारब्ध नाही . तेव्हा वादी म्हणाला , ‘ नाभुक्तं क्षीयते कर्म ’ ह्या प्रमाणावरुन ज्ञान्याला प्रारब्ध भोगल्याशिवाय गती काय ? आरुढ स्वामी म्हणाले , हे ज्ञानशून्य मनुष्याकरिता आहे . परंतु सिद्धांत्याला सांगण्याचे नव्हे . हे सर्वांनी ऐकले व ब्रह्मानंदात निमग्न होऊन चित्समाधिसुख संलग्न होऊन ते तेथेच राहिले .

आर्या

वाक्यामृत तव ऐकुनि ह्रदयामाजींच शूलपाणि वसे ॥

कलिकाळा धूळीला मिळवुनि आरुढनाथ शोभतसे ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP